शनिवार, २८ जून, २०२५

भक्तीचा उमाळा वेगाने होण्याचा काळ


आता सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात वारी पुढे सरकत आहे. विठ्ठलाच्या अधिकाअधिक जवळ वारी पोहोचत आहे. जसजसा एकादशीचा दिवस जवळ येऊ लागतो तसतसा हा आनंद, ही विठ्ठल भेटीची ओढ वेगाने वाढत जाते. कधी एकदा या विठ्ठलाच्या पायावर डोके टेकून आपल्या आयुष्याचे सार्थक करून घेऊ अशी ओढ लागते. तुकारामांच्या अभंगात वर्णन केल्याप्रमाणे ‘भेटी लागी जीवा, लागलीसे आस’ म्हणजे नेमके काय ते या आठवड्यात वारकरी अनुभवताना दिसेल. मजल दरमजल करत एकेक गाव, शहर, तालुका, जिल्हा मागे टाकत आता पंढरपुराच्या दिशेने पावले पडत आहेत.


वारक‍ºयांच्या दिंडीचा मार्ग म्हणजे प्रेमभक्तीचा मार्ग. समर्पणाचा मार्ग. हे समर्पण म्हणजे आपल्यातील अहंकार, गर्व, मत्सर या भावनांचा त्याग करण्याचा मार्ग. जे काही आहे ते या वारीत आहे. जे काही घडते आहे ते या पांडुरंगामुळे घडले आहे. कर्ता करवता तो आहे हे समजण्याचा मार्ग. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगताना, ‘जे काही घडते आहे ते माझ्या इच्छेने’ सांगितले. सगळे काही माझ्यामुळे आहे, माझ्या इच्छेने घडते आहे. जे तू करत नाहीस त्याचा शोक का करतोस असे सांगून आपल्या कर्तव्यापासून च्यूत होणा‍ºया अर्जुनाला मार्गावर आणले. तोच हा मार्ग. प्रत्येक वारक‍ºयाला त्याचा अर्थ समजला आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्याप्रमाणे सांगतात की, ‘तुझे नि माझे नाते हे जन्मजन्मांतराचे आहे. आपण सतत एकमेकांबरोबरच आहोत.’ तसेच आपले या पांडुरंगाशी नाते जोडले गेलेले आहे याची जाणीव प्रत्येक वारक‍ºयाला आहे. त्यामुळे आपण वारीच्या मार्गावरून चालायचे आहे, आपल्याला दरवर्षी वारी करायची आहे आणि त्या भगवंतावर प्रेम करून त्याच्या सान्निध्यात राहायचे आहे हे वारक‍ºयाला समजले आहे. त्यामुळे भगवंतभेटीची ही ओढ फार महत्त्वाची असते.

भगवंताच्या या भक्ताला, या वारक‍ºयाला भगवत प्रेमाची एवढी भूक आहे की, ती काही केल्या संपत नाही. याचे कारण एकदा प्रेमाची गोडी चाखल्यानंतर तितके प्रेम त्याला मिळत नाही. म्हणून त्याला प्रेमाची भूक आहे आणि त्याचाच त्याला दुष्काळ आहे. याचे वर्णन संत तुकाराम एका अभंगात करतात. ते म्हणतात..-


थोर प्रेमाचा भुकेला हाचि दुष्काळ तयाला

पोहे सुदाम देवाची फके मारी कोरडेची


न म्हणे उचिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भावापुढे॥

आपल्या वाट्याला जे आलेले आहे हे थोडे आहे का, उष्टे आहे याचीही पर्वा त्या भगवंताला नसते. शबरीची उष्टी बोरेसुद्धा तो आवडीने खातो. कारण त्यामध्ये भक्ताचे प्रेम त्याला दिसते आहे. कारण त्यात प्रेम आहे, भाव आहे. ही भावाची महती प्रत्येक वारक‍ºयाला समजली आहे. त्यामुळे कधीही तोंडात घास घेताना पांडुरंगाचे स्मरण केल्याशिवाय तो घेत नाही. केवळ वारीतच नाही तर त्याच्या जीवनातच प्रत्येक श्‍वास, प्रत्येक घास हा तो पांडुरंगासाठी घेत असतो. हे प्रत्येक संतांना समजले होते. त्यामुळे वारक‍ºयांच्या या भगवद् भक्तीची माहिती असल्याने संत एकनाथ महाराजांनी म्हटले आहे की,


भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तयामाजी

प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमावीण नाही समाधान॥


म्हणजे ज्ञानापेक्षाही प्रेमाचे महत्त्व आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, ‘भावाशिवाय भक्ती करणे म्हणजे शक्तीशिवाय बळ दाखवण्यासारखे आहे.’ अगदी बळ जरी असले तरी प्रेमापुढे बळाचा वापरही होऊ शकत नाही. त्यामुळे ख‍ºया अर्थाने भगवंतावर प्रेम करत, प्रत्येक गोष्टीत भगवंताचे दर्शन घेत हा वारकरी ही वारी करत असतो. त्याला जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी परमेश्‍वर दिसत असतो, पांडुरंग दिसत असतो. कारण तो आहे यावर त्याचा विश्‍वास गाढ असतो.

विश्‍वास, श्रद्धा, भक्ती असल्याशिवाय याची अनुभूती मिळणे शक्य नसते.


पदरी घाली पिळा बाप निर्बळ साठी बाळा

एखादा अगदी हिंदकेसरी पैलवान आहे. संपूर्ण देशात त्याला तोडीस तोड असा कोणी नाही, असा दांडगा पैलवान घराबाहेर पडू लागतो. तेव्हा त्याचा दोन वर्षांचा मुलगा त्याला पायाला धरून सांगतो. बाबा तू बाहेर जाऊ नको. मी तुला सोडणार नाही. मोठमोठ्या पैलवानांना सहज आडवा करणारा तो हिंदकेसरी मग बाहेर जायचे सोडतो आणि मुलांच्या आग्रहाखातर घरात जाऊन बसतो. बाप निर्बळासाठी बाळा. भगवंतही तसाच शक्तिमान आहे. परंतु भक्तांच्या प्रेमापुढे तो त्यांच्यासारखा होऊन राहतो. मात्र भावाविण केलेल्या भक्तीचा कोणताही उपयोग होणार नाही. तशा भक्तीने कोणतेही दैवत प्रसन्न होऊ शकत नाही, असे ज्ञानेश्‍वरांनी सांगितले आहे. त्यामुळे या दिंडीत येणा‍ºया प्रत्येक वारक‍ºयाच्या मनात अत्यंत भक्तिभाव असतो. म्हणूनच त्यांना त्याचे दर्शन होते. दूध जसे जास्त उष्णता मिळाल्यावर वर वर येऊ लागते, तसा हा भक्तिभाव उफाळून येतो. कारण आता सोलापूरच्या हद्दीत शिरताना त्या भगवद् प्रेमाची ऊब वाढत असते. दुधाप्रमाणे हे प्रेमाचे, भक्तीचे उतू जाणे हा खरा आनंद आता इथून पुढच्या प्रवासात मिळत असतो.


प्रफुल्ल फडके/ पाऊले चालती


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: