शुक्रवार, १३ जून, २०२५

पाकीस्तान हाच पाकीस्तानचा शत्रू


मोहम्मद अली जीना यांच्या ‘द्विराष्ट्र सिद्धांता’च्या आधारे पाकिस्तानची स्थापना झाली. जीना यांचा असा विश्वास होता की, हिंदू आणि मुस्लीम एकत्र राहू शकत नाहीत. दोन्ही मूलत: दोन भिन्न राष्ट्रे आहेत. म्हणून, त्यांना दोन देश म्हणून वेगळे केले पाहिजे, परंतु त्यांचा मानवताविरोधी सिद्धांत १९७१ मध्येच मोडून पडला, जेव्हा पूर्व पाकिस्तान वेगळे झाले आणि बांगलादेशची स्थापना झाली.


पूर्व पाकिस्तानमधील बंगाली भाषिक लोकांनी वेगळा देश का बनवला? ते भाषेने बंगाली आहेत, परंतु धर्माने मुस्लीम आहेत. मुस्लीम असूनही त्यांनी पाकिस्तानविरुद्ध मोठे युद्ध लढले आणि भारताच्या मदतीने पाकिस्तानपासून वेगळे झाले आणि बांगलादेशच्या रूपात स्वत:साठी एक नवीन राष्ट्र निर्माण केले. या युद्धात सुमारे ३० लाख लोक मारले गेले, लाखो हिंदू आणि मुस्लीम महिलांवर पाकिस्तानी सैन्याने बलात्कार केले. हे २०व्या शतकातील एक मोठे नरसंहार म्हणून ओळखले जाते.

पाकिस्तानमधील सुमारे ९८ टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे, परंतु बहुतेक पंजाबी मुस्लीम वर्चस्व आणि दडपशाहीचे बळी आहेत आणि बलुच, पश्तून आणि सिंधींप्रमाणे पाकिस्तानपासून वेगळे होऊ इच्छितात. पाकिस्तानी पंजाबमधील सुन्नी मुस्लिमांनी अप्रत्यक्षपणे संपूर्ण देशावर आपले राज्य स्थापित केले आहे, मग ते सैन्य असो, राजकारण असो, नोकरशाही असो किंवा व्यवसाय आणि मीडिया असो, पंजाबमधील लोक प्रत्येक क्षेत्रात वर्चस्व गाजवतात. ते देशातील इतर मुस्लिमांना दुसºया श्रेणीचे किंवा कनिष्ठ पाकिस्तानी मानतात.


बलुचांच्या संघर्षाबद्दल आपणा सर्वांना माहिती आहे. तेही मुस्लीम आहेत, परंतु ते वेगळ्या देशाची मागणी करत आहेत. स्वातंत्र्यापासून पाकिस्तानी सैन्य बलुचांना दडपत आहे. २००६ पासून पाकिस्तानी सैन्याने सुमारे १५,००० बलुचांना मारले आहे. कोणत्याही बलुच तरुणाला बंडखोर मानून, सैन्य त्याचे हातपाय तोडते आणि त्याला गटारात फेकून देते आणि नंतर त्याला बेपत्ता घोषित करते. पाकिस्तानच्या स्थापनेपूर्वी मोहम्मद अली जीना हे बलुचींचे वकील होते. त्यांनी वेगळ्या बलुचिस्तानचीही बाजू मांडली होती, परंतु पाकिस्तानच्या स्थापनेनंतर त्यांनी सांगितले की, आता बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग असेल आणि त्यांनी सैन्य पाठवून हा भाग ताब्यात घेतला. बलुचिस्तानने हे कधीही मनापासून स्वीकारले नाही. ते अजूनही वेगळ्या देशाच्या मागणीवर ठाम आहेत. बलुचिस्तानचे भौगोलिक महत्त्व मोठे आहे. त्याची सुमारे ७०० किमी सीमा अरबी समुद्राला स्पर्श करते. त्याची सीमा अफगाणिस्तान आणि इराणला लागूनही आहे. जर बलुचिस्तान वेगळे झाले तर पाकिस्तान आणि इराणची सीमा संपेल.

बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ४०-४२ टक्के आहे, परंतु त्याची लोकसंख्या पाकिस्तानच्या फक्त पाच टक्के आहे. संपूर्ण पाकिस्तानच्या नैसर्गिक संसाधनांपैकी ८० टक्के बलुचिस्तानमध्ये आहेत. पेट्रोल, सोने, तांबे इत्यादींचा त्यात समावेश आहे, परंतु पाकिस्तानी पंजाबी राज्यकर्ते बलुचिस्तानशी किती भेदभाव करतात याचा पुरावा म्हणजे बलुचिस्तान संपूर्ण पाकिस्तानला गॅस पुरवतो, परंतु आजही तेथील प्रत्येक घरात स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध नाही.


पश्तून किंवा पख्तूनही मुस्लीम आहेत, परंतु तेही बºयाच काळापासून पाकिस्तानपासून वेगळे होऊन पश्तूनिस्तानची मागणी करत आहेत. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच टीटीपी ही मुळात पश्तूनांची संघटना आहे. तालिबान ही मुळात पश्तूनांची संघटना आहे. म्हणूनच दोघेही एकमेकांबद्दल सहानुभूती बाळगतात. शिया समुदायही भेदभावाचा बळी आहे. ते पाकिस्तानात सुमारे २० टक्के आहेत. ते सुशिक्षित, समृद्ध आहेत आणि राजकारणातही चांगले आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख शिया आहेत. असे असूनही, जनरल झिया-उल-हकच्या काळापासून पाकिस्तानमध्ये शिया मुस्लिमांवर अत्याचार सुरूच आहेत.

आजपर्यंत ५०,००० हून अधिक शिया मुस्लीम मारले गेले आहेत. पंजाबमधील सुन्नी मुस्लिमांच्या सर्व संघटना शियांना मुस्लीम मानत नाहीत. ते त्यांना काफिर म्हणतात आणि त्यांना गैरमुस्लीम घोषित करण्याची मागणी करत राहतात. अहमदिया मुस्लिमांना १९७४ मध्येच गैरमुस्लीम घोषित करण्यात आले. १९४७ पूर्वी ते मोठ्या उत्साहाने वेगळ्या पाकिस्तानची बाजू मांडत असत. पाकिस्तानमधील आणखी एक छोटासा मुस्लीम समुदाय म्हणजे सराइकी. तो दक्षिण पंजाबमध्ये राहतो. ते सराइकी बोलतात. जैसलमेरसमोरील पाकिस्तान ही सराइकी भूमी आहे. सराइकी स्वत:साठी सराइकिस्तानची मागणी करत आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की, पाकिस्तानी पंजाबींनी त्यांचे शोषण केले आहे.


पाकिस्तानमध्ये हिंदूंची लोकसंख्या फक्त ३८ लाख आहे. ३०-४० लाख ख्रिश्चन आणि काही शीख आहेत. अशा अल्पसंख्याकांना तिथे टिकून राहणे कठीण होत चालले आहे. त्यांना सर्व प्रकारच्या छळाला तोंड द्यावे लागत आहे. अल्पसंख्याक महिलांवरील छळाचे प्रमाण खूप जास्त आहे. म्हणूनच मानवी हक्कांच्या बाबतीत पाकिस्तानचा रेकॉर्ड खूप वाईट आहे. तो मोठ्या प्रमाणात आपल्याच लोकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करतो. तो आपल्याच देशातील सर्व नागरिकांना त्यांचे कायदेशीर हक्क देत नाही. त्यामुळे हे सगळे पाहता पाकिस्तान हाच पाकिस्तानचा खरा शत्रू आहे हे लक्षात येईल. त्यामुळे जे तुटायला, वेगळे होण्यासाठी तयार झालेले आहे त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: