मंगळवार, १७ जून, २०२५

चला पंढरीला जाऊ




ज्ञानेश्‍वर माऊलींची आणि तुकोबारायांची वारी आता आळंदीतून निघत आहे. प्रत्येक माणसाने जन्माला आल्यानंतर आपल्या आयुष्यात एकदा तरी वारीचा आनंद आणि अनुभव घेतला पाहिजे, इतका सुंदर असा हा सोहळा असतो. माणसाला स्वत:ला विसरायला लावणारा आणि परमेश्‍वराकडे घेऊन जाऊन त्याची अनुभूती देणारा असा निखळ आनंद देणारा कालावधी म्हणजे हा पंढरपूरच्या आषाढी वारीचा काळ. प्रत्येक जण या वारीला जाऊ शकत नाही, म्हणून आपण ही शब्दरूपाने पंधरा दिवसांची वारी करायची आहे. त्यातूनही चांगली अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही.


वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणा‍ºया लोकांचा संप्रदाय. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यांतील शुद्ध एकादशींना होते. आषाढी वारी ही दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या दुस‍ºया पंधरवड्यात वद्य एकादशीच्या अगोदर दोन दिवस निघते आणि आषाढी एकादशीच्या आधी एक दिवस पोहोचते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत आहेत. ख‍ºया अर्थाने समतेची शिकवण देणारा असा हा वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. एकमेकांच्या पाया पडताना दोघेही आनंदी होत असतात. लहान बालकालाही खाली वाकून मोठा वयस्कर माणूस पाया पडत असतो. कारण इथे भाव फार महत्त्वाचा आहे. श्रद्धेवर चाललेली ही अनेक दशकांची प्रथा आधुनिक काळातील चमत्कार म्हणावा लागेल. कारण लाखोंच्या संख्येने येणाºया या वारक‍ºयांमध्ये प्रत्येक वारक‍ºयाला दिसत असतो तो फक्त विठोबा.

विठू-माऊलीशिवाय वारकºयाला काहीच दिसत नसते. कणाकणात ईश्‍वर सामावला आहे, कणाकणात पांडुरंग आहे, प्रत्येक जीवमात्रांमध्ये विठू-माऊली आहे हा भाव प्रत्येकाच्या मनात असतो. त्यामुळे इथे भेदभाव सगळे संपुष्टात येतात आणि अवघी वारीच विठ्ठलमय होऊन जाते. त्यामुळे दिसणा‍ºया प्रत्येकात विठ्ठल दिसत असतो. प्रत्येक दृश्य गोष्टीत विठ्ठल दिसत असतो. त्यामुळे त्याच्यापुढे लोटांगण घालताना, पाया पडताना कधीच लहान मोठा असा विचार कोणाच्या मनात येत नाही. अशा या वारीच्या प्रवासात प्रत्येकाला कुठे ना कुठे तरी विठ्ठलाचे दर्शन घडतच असते. वारीमध्ये नामस्मरणाला अत्यंत महत्त्व आहे. वारक‍ºयाच्या मुखातून सतत नामस्मरण होत असते. विठू-माऊलीचे नामस्मरण होत असते. पांडुरंग पांडुरंग असा जप करता करता तो दंग होऊन जातो, त्याला सगळ्या संसाराचे, जगाचे विस्मरण घडते आणि साक्षात पांडुरंग म्हणता म्हणता दंग होऊन जातो.


कोणतेही फार मोठे अवडंबर माजवण्यापेक्षा केवळ नामस्मरणाने पुण्यप्राप्ती होते, याचे ज्ञान वारक‍ºयाला असते. नवविधाभक्तीमध्ये नामस्मरणाचे जे महत्त्व सांगितले आहे, ते वारक‍ºयांचे जीवन बनते. नामजपाने पुण्य मिळते हा भाव इथे आहे. परमेश्‍वराचे पांडुरंगाचे नामस्मरण घेताना पुढे पुढे पडणारी पावले कधी चालून थकत नाहीत. त्या पावलांना येणारा थकवा साक्षात माऊली घालवते. एवढा विलक्षण असा विश्‍वास वारक‍ºयांचा असतो. म्हणूनच वारकरी कधी वारी केल्यानंतर थकलेले दिसत नाहीत, तर तेजस्वी आणि आनंदी दिसतात. इतक्या लांब चालत येऊन दर्शन घेताना त्या वारक‍ºयाच्या डोळ्यातून येणारे आनंदाश्रू म्हणजे साक्षात पांडुरंगाच्या पायावर केलेला अभिषेक असतो. पंचामृताच्या अभिषेकापेक्षा अत्यंत आनंद देणारा हा अभिषेक असतो. हा आनंद प्रत्येकाला घेता आला पाहिजे.

कुठलीही अंधश्रद्धा नसलेला हा संप्रदाय आहे. जनजागृती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा संप्रदाय आहे. त्यामुळेच अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही वारी आपले ध्येय साध्य करत असते. पण जास्तीत जास्त वा‍ºया करणे हे वारक‍ºयाचे आनंदाचे साध्य असते. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. पंढरीचा वास, चंद्रभागेत स्नान आणि दर्शन विठोबाचे करायचे या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत. ही वारी आजकाल संपूर्ण जगाला आकर्षित करत आहे. भारत हा जगाचा अध्यात्मिक गुरू आहे असे बोलले जाते. आज वारीनेही हे खरे करून दाखवले आहे. कारण या वारीत चालत पंढरपूरला जाण्यासाठी म्हणून अनेक परदेशी पर्यटक विदेशातून येतात. आकर्षण म्हणून, गंमत म्हणून पाहायला येणा‍ºया या परदेशी नागरिकांना न भुतो न भविष्यती असा आनंद मिळतो. पाश्चिमात्य भोगवादी संस्कृतीतून आलेल्या या लोकांना त्यागाची आणि सहिष्णूतेची समृद्ध संस्कृती आणि आनंद या वारीतून मिळतो. ज्ञानेश्‍वरांनी विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो, अशी पसायदानात मागणी करून जी विश्‍वकल्याणाची प्रार्थना केली आहे, ती विश्‍वातील ठिकठिकाणचे लोक इथे वारीत सामील होण्याने पूर्ण होताना दिसते. त्यांनाही त्याचे महत्त्व पटले आहे, हे आपण जाणून घेतले पाहिजे.


प्रफुल्ल फडके/पाऊले चालती/ १

९१५२४४८०५५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: