बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

पापांचा पाढा


सोमवारी लोकसभेत तुफान टीका केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी पुन्हा एकदा काँग्रेस आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका केली. राज्यसभेत काँग्रेसच्या पापांचा पाढा वाचला. साठ-पासष्ठ वर्षांपूर्वी काँग्रेसने केलेल्या चुकांचा उच्चार करून पंतप्रधानांनी काँग्रेसच्या प्रवृत्तीवर तुफान ताशेरे ओढले. अर्थात हे करण्याचे नेमके कारण काय असावे, हे अनाकलनीय आहे; पण त्यांनी सांगितलेल्या सत्य गोष्टींनी काँग्रेसचा खरा चेहरा समोर आणण्याचे काम मात्र झाले आहे. त्यामुळे तरुण वर्गात काँग्रेसवर प्रचंड प्रमाणात नाराजी निर्माण झाली, तर आश्चर्य वाटायचे कारण नाही; पण काँग्रेस रसातळाला जात असताना पुन:पुन्हा हे ठेचून मारण्याचे, शेवटचे शेपूट ठेचण्याचे प्रकार होत आहेत, हे नक्की.


काँग्रेस विरोधात आवाज उठवला, तर काय होत होते हे पंतप्रधानांनी राज्यसभेत ठासून सांगितले. लता मंगेशकर आणि कुटुंबीयांना काँग्रेसने कसा त्रास दिला, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना रेडिओवरून कसे काढून टाकले, हे सांगितले. काँग्रेस कलाकारांच्या कायम विरोधात होती हे चित्र त्यांनी या भाषणात उभे केले. गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी नेहरूंचे ऐकले नाही म्हणून त्यांना एक वर्ष तुरुंगात टाकण्याचे काम नेहरूंनी केले. आणीबाणीच्या काळात किशोरकुमारला कसा त्रास दिला होता, हे सगळे पाढे पंतप्रधानांनी राज्यसभेत मांडून काँग्रेसच्या काळ्या कामगिरीचा उल्लेख केला. अर्थात अर्थसंकल्पीय अधिवेशनात याचा संबंध काय हा प्रश्न यातून निर्माण होतो. पाच राज्यांतील निवडणुकीतील हे भाषण वाटावे इतके कटू प्रसंग काँग्रेसने केलेल्या चुकांचा पुनरुच्चार मोदींनी केला.

यामध्ये गोवा या राज्यावर काँग्रेसने विशेषत: पंडित नेहरूंनी कसा पक्षपात केला, अन्याय केला यावर सांगितलेली गोष्ट अत्यंत सुन्न करणारी आहे. गोवा हे राज्य स्वातंत्र्यानंतर बारा-पंधरा वर्षेपारतंत्र्यात का राहिले, याला नेहरू जबाबदार होते. असे सांगून पंतप्रधानांनी तत्कालीन पुरावे, वर्तमानपत्रांचे दाखले देऊन गोवा मुक्तीला काँग्रेसचा कसा विरोध होता हे बिंबवले. त्यामुळे अनेकांना आपले बलिदान कसे देण्याची वेळ आली, हे सांगितले. जर हैदराबाद मुक्तीसाठी तातडीने कारवाई झाली होती. सरदार वल्लभभाई पटेल गोवा स्वतंत्र करून भारतात सामील करण्याचा प्रयत्न करत असताना, फक्त पंडित नेहरूंनी विरोध केल्यामुळे त्यांना गोवा पारतंत्र्यात ठेवण्याची वेळ आली. हे पुराव्यानिशी सांगून मोदींनी काँग्रेसच्या चुकांचा पाढा वाचला. अर्थात या काँग्रेसने केलेल्या चुका, इतिहासजमा झालेल्या असल्या, तरी त्या कोणी विसरणार नाही. ज्याप्रकारे काँग्रेसने देशाचे नुकसान केले हे सगळे पुराव्यानिशी मांडले असले, तरी ते आता का सांगत आहेत, हा प्रश्न आहे. काँग्रेसचे हे घाणेरडे स्वरूप पंतप्रधान मोदींनी नाही, तर भाजप नेते मोदींनी देशापुढे आणले पाहिजे. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन असताना, अर्थसंकल्पावर आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलायला पाहिजे होते, असे वाटते.


आपल्या भाषणात विरोधी पक्षांची राज्य सरकारे काँग्रेसने कशी उलथवून लावली, आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना आपल्याला कसा त्रास दिला, याचाही न चुकता उल्लेख केला. विरोधकांचे खच्चीकरण करताना, त्यांना त्रास देताना उत्तर प्रदेशातील मुलायमसिंह यादव, महाराष्ट्रातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही कसा त्रास देण्याचा प्रयत्न केला, हे पण आपल्या भाषणात पंतप्रधानांनी सांगितले. अर्थात हा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजेच. पण हा इतिहास सांगण्याची ही वेळ होती का, हा प्रश्न मात्र कायम राहतो. काँग्रेसने कसे देशाचे वाटोळे केले, नुकसान केले हे देशापुढे आलेच पाहिजे. पण हे मुद्दे निवडणुकीत आले, प्रचारात आले किंवा एरवी समोर आले असते, तर अधिक प्रभावी झाले असते. अर्थसंकल्पीय भाषणात ते आल्यामुळे त्याचे चित्र वेगळ्या पद्धतीने उभे राहिले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आपले उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. कोरोना संकटाचा जगाला मोठा फटका बसला आहे. कोरोनानंतर जगात अनेक बदल झाले; पण भारताच्या कार्याचे जगात कौतुक झाल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले. आपण देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. गतिमान विकासासाठी प्रयत्न करू असे सांगून देशात अनेक विकासकामं सुरू असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे पुढील २५ वर्षांची योजना ठरवणं गरजेचं असल्याचं मत प्रकट केलं. पंतप्रधानांकडून कोरोना योद्ध्यांचं कौतुक केले गेले. लसीकरणात देशाची मोठी आघाडी असल्याचे सांगितले. इथपर्यंत हे खूप छान चालले होते. त्याचप्रमाणे कोरोना काळात लॉकडाऊनच्या काळात सरकारने काय केले हे सांगताना मोदी म्हणाले, संपूर्ण लसीकरण हे मुख्य उद्दिष्ट्य आहेच, त्याचप्रमाणे ‘८० कोटी गरीबांना मोफत धान्य वाटप’ करण्याचे काम केले आहे. सरकारने कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली आहे, अनेक गरीब कुटुंबांना हक्काचं घर दिलं, ५ कोटी कुटुंबांना पेयजल योजनेद्वारे पाणी, सरकारची मदत थेट गरीबांच्या खात्यात गेल्याचे सांगतानाच, कोणताही प्रकल्प बंद पडू दिला नाही, हे सांगितले. कोरोनाकाळात भारताकडून जगाला औषधे दिली, जगाकडूनही भारताच्या कामाची दखल घेतली गेली. स्टार्टअपमध्ये तरुणांचं मोठं योगदान आहे त्याचप्रमाणे, कोरोनाकाळात अन्नधान्याचं मोठं उत्पादन असल्याचे सांगितले; पण यानंतर मात्र त्यांची गाडी काँग्रेसच्या काळाकडे वळली आणि सगळा पाढाच वाचला. इतका की, काँग्रेसच्या लोकांनाही आपण काँग्रेसमध्ये आहोत, म्हणून शरम वाटावी. हे स्पष्ट करताना घराणेशाहीचा फटका गुणवान व्यक्तीला बसतो हे नमूद केले. लोकशाही तुमच्या कृपेनं मिळालेली नाही, तर काँग्रेसनं केवळ घराणेशाहीची चिंता केली हे स्पष्ट केले. ते करत असताना काँग्रेसमुळे देशाचं वाटोळं झालं हे ठासून बिंबवलं. काँग्रेस नसती तर आणीबाणी टळली असती, काँग्रेस नसती तर शीख नरसंहार झाला नसता, काँग्रेसमुळेच गरीबांचा विकास थांबला, काँग्रेस नसती तर भ्रष्टाचार झाला नसता, काँग्रेस नसती तर देशाचा विकास झाला असता, काँग्रेस नसती तर जातीवाद संपला असता, अनेक राज्यातील सरकारं काँग्रेसनं अस्थिर केली हा पापांचा पाढा वाचून पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवडणुकीचा संकल्प केल्याचे दिसून आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: