हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्ण काळात त्यांचा जन्म झाला. त्या काळात गाण्याची आणि संगीताची संधी त्यांना मिळाली नाही, त्यामुळे खºया सोन्याचे वेध त्यांना लागले. अंगावर भरपूर सोने, दाग-दागिने असा पेहरावा आणि डोळ्याला काळा स्टाईलिश गॉगल असा मुखडा दिसला की, हे संगीतकार बप्पी लहिरी हे ओळखायला वेळ लागायचा नाही. अत्यंत उत्साही चेहरा असलेल्या या संगीतकाराने एकापेक्षा एक सुंदर चित्रपट गीते दिली. पण डिस्कोचा चेहरा बॉलीवूडला देणारे म्हणून त्यांच्यावर छाप बसली होती. तरीह काही क्लासिकल आणि प्रतिभा संपन्न दिलेली गाणी हे बप्पी लहिरींचे वैशिष्ट्य होते.
बप्पी यांचे खरे नाव आलोकेश लहिरी असे होते. त्यांना सगळे बप्पी लहिरी या नावाने ओळखत होते. बप्पीदा नावाने प्रसिद्ध असलेल्या लहिरी यांना ते परिधान करत असलेल्या प्रचंड सोन्यामुळेही वेगळी ओळख मिळाली होती. वयाच्या चौथ्या वर्षी लता मंगेशकर यांच्या एका गाण्यात तबला वाजवून बप्पीदा प्रसिद्ध झाले होते. ८०च्या दशकात बप्पी लहिरी यांच्या डिस्कोच्या तालावर संपूर्ण देश थिरकत होता. त्यामुळे त्यांना डिस्को किंग असे म्हटले जात होते. बॉलीवूडमध्ये संगीत डिजिटल बनवण्यात बप्पीदा यांचे मोठे योगदान होते. बप्पी लहिरी यांनी जवळपास पाच दशकांपेक्षा अधिक काळ संगीत क्षेत्रात काम केले आहे.
१९७० आणि ८०च्या दशकातल्या अनेक चित्रपटांना बप्पी लहिरींनी संगीत दिले होते. चलते-चलते, डिस्को डान्सर, शराबी, नमक हलाल या सिनेमांमधली त्यांची गाणी विशेष गाजली. शराबी चित्रपटासाठी बप्पी लहिरी यांनी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. तसेच त्यांना फिल्मफेअरतर्फे जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. २०२०साली आलेल्या बागी-३ सिनेमामधले ‘भंकस’ हे त्यांचे शेवटचे गाणे ठरले. डिस्को बीट्सवरची उडत्या चालींची गाणी हे बप्पीदांचे वैशिष्ट्य होते. डिस्को डान्सर सिनेमातले ‘आय अॅम अ डिस्को डान्सर’, थानेदार सिनेमातले ‘तम्मा-तम्मा’, द डर्टी पिक्चरमधले ‘ऊलाला ऊलाला’, साहेब मधले ‘यार बिना चैन कहाँ रे’ ही गाणी गाजली.
विशेष म्हणजे १९९०मध्ये बप्पी लहिरींनी ‘डोक्याला ताप नाही’ नावाच्या मराठी सिनेमाला संगीत दिले होते, तर २०१८ साली ते एका मराठी सिनेमासाठी गायले.
बप्पी लहिरी यांनी मे २०१४ मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. देशात नरेंद्र मोदी यांची लाट असल्याचे ते त्यावेळी म्हणाले होते. २००४ मध्ये लहिरी यांनी काँग्रेसचाही प्रचार केला होता. भाजपमध्ये प्रवेश करताना ते म्हणाले होते की, १० वर्षांपूर्वी काँग्रेसची लाट होती. त्यावेळी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह होते. बप्पी लहिरी पश्चिम बंगालमध्ये पक्ष मजबूत करतील असे राजनाथ सिंह यांनी म्हटले होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत बप्पी लहिरी यांनी हुगळी जिल्ह्याच्या श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला होता. खरंतर कलाकारांनी राजकारणात येऊच नये. कारण सगळे लोक निरपेक्षपणे त्यांच्यावर प्रेम करत असताना आपण विशिष्ट विचारांचे आहोत हे दाखवणे त्या कलाकारांचा ºहासच असतो.
बप्पीदांच्या गळ्यामध्ये सोन्याच्या साखळ्या, हातात अंगठ्या असे मोठ्या प्रमाणावर सोने त्यांनी नेहमी परिधान केलेले असे. जख्मी हा पहिला चित्रपट हिट झाला तेव्हा, त्यांच्या आई-वडिलांनी सुवर्ण मंदिर इथून घेऊन बप्पीदांना सोन्याचे कडे घातले होते. तेव्हापासून सोने आपल्याला सुवर्णकाळ दाखवले असा विश्वास त्यांचा होता. बप्पी लहिरी यांची शेकडो गाणी हिट झालेली आहेत. त्यांनी संगीत दिलेल्या अनेक चित्रपटांची सिलव्हर ज्युबिली झाली आहे. एवढ्या गाण्यांत बप्पीदांचे सर्वात आवडचे गाणे म्हणजे, ‘चलते, चलते मेरे ये गीत याद रखना’ हे होते. किशोर कुमार यांना बप्पीदा हे किशोर मामा म्हणायचे. त्याचे कारण म्हणजे किशोर कुमार नात्याने त्यांचे मामा लागत होते. ‘चलते-चलते हे गाणे गाताना किशोर मामांना अश्रू अनावर झाले होते अशी आठवण बप्पी दा यांनी सांगितली होती. त्यामुळे आपल्या जीवनात हे गाणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बप्पीदा यांनी सांगितले होते.
डिस्को किंग अशी ओळख असली तरी बप्पी लहिरी यांनी ऐतबार चित्रपटात दिलेली गाणी आणि संगीत फारच सुंदर आहे. त्यातील ‘किसी नजर को तेरा, इंतजार आजभी है’ हे भूपेंद्र आणि आशा भोसले यांनी गायलेले गीत सर्वोत्कृष्टपेक्षाही सुंदर म्हणावे लागेल. नमक हलालमधील पग घुंगरू बांध मिरा नाचे या गाण्यात बप्पीचे संगीत, किशोर कुमार यांची गायकी यामुळे अमिताभ बच्चनलाच नाही तर प्रेक्षकांनाही नाचवले आहे. शराबी मधल्या जहा चार यार मिल जाय या गाण्यात किशोर कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या आवाजाचे केलेले एकत्रिकरण हे अप्रतिम कॉम्बिनेशन होते.
बाकी आपल्या फॉर्म्युल्यात जितेंद्र, जया प्रदा आणि श्रीदेवीपासून अनेकांना तºहतºहेच्या प्रकारे बप्पीदांनी नाचवले आहे. १९८०च्या दशकात डिस्को भारतात आणला तो नाझिया हसनला घेऊन फिरोज खानच्या कुर्बानी या चित्रपटाने. त्याचे संगीतकार कल्याणजी आनंदजी होते. पण खºया अर्थाने भारतात डिस्को रूजवला तो बप्पी लहिरींनी. डिस्को डान्सर हा चित्रपट त्यादृष्टीने उत्कृष्ट होता. केवळ गाणीच नाही तर कथानकाच्या दृष्टीनेही तो महत्त्वपूर्ण होता. राजेश खन्ना आणि मिथून चक्रवर्ती यांना एकत्र आणून दोन पिढ्यांना जोडणारा हा चित्रपट होता. आजवरच्या संगीतकारांच्या तुलनेत बप्पी लहिरींनी पटापट येईल तो चित्रपट स्वीकारत दणादणा संगीत दिले. त्यामुळे त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांची संख्याही कोणत्याही संगीतकारापेक्षा भरपूरच झाली. वर्षभरात दहा-वीस चित्रपटांना संगीत दिल्यावर कोणत्या तरी चार चित्रपटांची गाणी हमखास हिट होतात हे टी-२० सामन्याप्रमाणे झटपट संगीताचे गणित बप्पीदांनी मागच्या शतकात यशस्वी करून दाखवले होते, पण काळाप्रमाणे बदलत आणि योग्य त्या वेळी प्रतिभा संपन्न संगीत देत बप्पीदांनी आपला सुवर्ण काळ तयार केला होता हे नक्की.
प्रफुल्ल फडके/ विशेष लेख
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा