काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे खºया अर्थाने परिपक्व झाले आहेत. राजकारणात आता ते पक्के मुरले आहेत, त्यामुळे त्यांना आता पक्षाने संधी देण्यास हरकत नाही. हे मत व्यक्त करण्याचे कारण म्हणजे रविवारी पंजाबच्या राजकारणात त्यांनी केलेली कृती ही लक्षात ठेवण्यासारखी आहे. ती कामगिरी म्हणजे, चरणजीत सिंग चन्नी हे पंजाबचे काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा त्यांनी केली. या घोषणेतून त्यांनी पंजाब काँग्रेसमधील द्विधा स्थिती बंद करून फडफडणाºयांना चाप लावला. फडफडणाºयांना चाप लावता आला की, तो माणूस काँग्रेसमध्ये यशस्वी होतो. गेल्या काही दिवसांपासून पंजाबच्या राजकारणात नवजोतसिंग सिद्धूची फडफड वाढली होती. पक्षाने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली असली, तरी आपण मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहोत, हे बिंबवण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून त्यांनी चालवला होता. इतकेच नाही, तर चन्नी आणि आपण अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री असणार आहोत, असा प्रचार त्यांनी सुरू केला होता. कोणी पहिल्यांदा मुख्यमंत्री व्हायचे हे निवडून आलेले आमदार ठरवतील, असे सांगून सिद्धंूनी आपला गट प्रबळ करण्याचा प्रकार केला होता. त्यामुळे सिद्धूची ही वाढती फडफड काँग्रेसला अडचणीत आणू शकली असती. त्यामुळेच राहुल गांधी यांनी नेमके दुखणे हेरले आणि त्यावर उपाय केला.
काँग्रेसध्ये कोणताही नेता लोकशाही पद्धतीने निवडला जात नाही. कोणताही मुख्यमंत्री आमदार ठरवत नाही, तर पक्षश्रेष्ठी ठरवतात. गांधी कुटुंबीय ठरवतात. कोणत्याही पदावर शिक्कामोर्तब हे गांधी कुटुंबाकडून होत असते. असे असताना नवनिर्वाचित आमदार ठरविणार की, कोण मुख्यमंत्री सर्वात प्रथम होणार असे वक्तव्य करून नवजोत सिद्धंूनी पक्षनेतृत्वावर कुरघोडी करण्याचा प्रकार केला होता. त्याला राहुल गांधींनी चांगलाच चपराक देत आळा घातला आहे. हेच राहुल गांधी यांचे परिपक्वपण आहे. काँग्रेसाळलेपण आहे. काँग्रेसची संस्कृती रक्तात असल्याचे ते लक्षण आहे.
काँग्रेसमध्ये कोणी जरा पुढे जातो आहे, असे दिसल्यावर त्याचे पंख कापायची संस्कृती आहे. ती ज्याला जमली तो खरा काँग्रेसचा नेता होण्यास लायक असतो. काँग्रेस सवाशे वर्ष मोठी झाली, टिकली ती अशी कापाकापीची, पंख छाटण्याची कामे केली, म्हणून टिकली. मोठा वृक्ष मोठा होतो तो फांद्या छाटल्याने मोठा होतो. काँग्रेसमध्ये जो कोणी लोकशाही मार्गाचा अवलंब करू पाहतो, त्याला दूर केले जाते. अर्थात हे काही आजचे नाही.
अगदी साधारण नव्वद वर्षांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष पद हे लोकशाही मार्गाने, बहुमताने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे आले होते, तेव्हा साक्षात महात्मा गांधींनी विरोध करत त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये एका विशिष्ठ व्यक्तीच्या मतालाच अर्थ असतो. बाकी सगळे होयबा असतात. असे असताना नवजोतसिंग सिद्धू यांच्यातील भाजपचे रक्त सात वर्षे झाली, तरी सळसळताना दिसत आहे. इथे लोकशाही मार्गाने पदाची निवड होत नाही, हे अजून त्यांना समजले नाही, याची जाणीव करून देण्यासाठी राहुल गांधी यांनी नेमकी खेळी केली आणि आपण कट्टर काँग्रेसचे पुरस्कर्ते आहोत, आपल्याला हवे तेच इथे होणार हे त्यांनी दाखवून दिले.
ज्या-ज्यावेळी बाहेरून आलेल्यांनी असा पदावर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला आहे, त्या-त्यावेळी काँग्रेस नेतृत्वाने पंख छाटण्याचे काम केले आहे. २००५ मध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असलेल्या प्रभा राव यांनी नारायण राणे यांना पदाचे, मुख्यमंत्री पदाचे आमिष दाखवून शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आणले. नारायण राणे यांची ती महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ नये यासाठी काँग्रेसने अगोदर प्रभा राव यांची उचलबांगडी केली. त्यांना हिमाचल प्रदेशात राज्यपाल म्हणून नेऊन टाकले. नारायण राणे यांना दहा वर्षे तिष्ठत ठेवले; पण मुख्यमंत्री पदाच्या रांगेत येऊ दिले नाही.
त्यामुळे हीच संस्कृती जपत राहुल गांधींनी नवजोतसिंग सिद्धूंचा काटा काढला. राहुल गांधींनी लुधियानामधील सभेत बोलताना ही घोषणा केली आहे. यादरम्यान चरणजीतसिंग चन्नी यांच्याशिवाय पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू देखील व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे अक्षरश: बोलती बंद केली. त्यामुळे फडफडणाºयांचे पंख कापण्याची कला त्यांना आता जमत असल्याने ते काँग्रेसचे नेतृत्व करू शकतील हे नक्की.
हे पंख कापताना राहुल गांधी म्हणाले की, आम्हाला गरीब कुटुंबातील मुख्यमंत्री हवा आहे. आम्हाला असा व्यक्ती हवा आहे, जो गरीबांना समजू शकतो, भूक काय असते ते समजू शकतो, गरीब व्यक्तींच्या मनातील भीती समजू शकतो, कारण पंजाबला अशाच व्यक्तीची गरज आहे. हा निर्णय कठिण होता; पण तुम्ही सोपा केला. पंजाबचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार चरणजितसिंग चन्नी असतील, असं चन्नी यांच्या नावाची घोषणा करताना राहुल गांधी यांनी म्हटलं आणि या निकषात नवजोतसिंग सिद्धू कुठेच बसत नाहीत, हे दाखवून दिले.
राहुल गांधींनी घोषणा करताच सिद्धू यांनी चन्नी यांचा हात वर केला आणि त्यानंतर राहुल गांधींनी दोघांना व्यासपीठाकडे आणलं. त्यावेळी पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखडही तिथे होते. राहुल गांधींनी घोषणेनंतर चन्नी-सिद्धू आणि जाखड तिघांची गळाभेट घेतली. सगळं काही आलबेल आहे, हे बिंबवण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे पंजाब काँग्रेसने अर्धी लढाई जिंकली आहे. काँग्रेसशी लढाई नेहमीच विरोधक आणि स्वकीय अशी दोघांशी असते. स्वकीयांशी लढता-लढता काँग्रेस विरोधकांकडून पराभव पत्करते. त्यामुळे अगोदर स्वकीयांची लढाई जिंकण्याचे काम राहुल गांधींनी केले. त्यामुळे आता एकजुटीने विरोधकांशी लढता येईल. ही खेळी करून त्यांनी आपण राजकारणात आता परिपक्व झालो आहोत. पप्पू राहिलेलो नाही, हे दाखवून दिले आहे. या खेळीतून कट्टर विरोधक भाजपलाही त्यांनी समज दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिद्धू त्यांच्या वक्तव्यांच्या माध्यमातून राज्यात ते पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असू शकतात याचे संकेत देण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, सुनील जाखडही चन्नी यांच्यावर हल्ला करत होते. त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता होती; पण या सगळ्या शक्यता पुसून टाकण्याचे काम राहुल गांधींनी केले आहे. आपण कच्चे खिलाडी नाही हे दाखवत त्यांनी मुरब्बी राजकारण्याचे दर्शन घडवले आहे.
पंजाबच्या राजकारणात जाखड, अंबिका सोनी व सुखजिंदर सिंग रंधवा आदी नावे माध्यमातून पसरत होती. परंतु, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी पंजाबचे नवीन मुख्यमंत्री म्हणून चरणजीतसिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा करून सर्वांनाच चकित केले आहे. कोणते कार्ड, केव्हा बाहेर काढायचे हे समजणारे ते पक्के नेते आता होताना दिसत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा