शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

अचानक आलेला पुळका


या आठवड्यात अचानक धूमकेतू उगवावा तसा हिंदुस्थानी भाऊ नावाचा धूमकेतू उगवला आणि त्याने राज्यात धुमाकूळ घातला. हा असा अचानक आलेला शिक्षण क्षेत्राबद्दलचा पुळका हे एक आश्चर्यच आहे, पण या अचानक भाऊंना जरा दणका देण्याची गरज आहे. कायदा आणि न्यायालयाने अशांना चांगलीच समज दिली पाहिजे, म्हणजे अशी बांडगुळे अचानक कुठेही उगवणार नाहीत.


केवळ प्रसिद्धीसाठी वाटेल ते करणारी प्रवृत्ती असते, त्यातलाचा हा एक भाग होता, पण त्यामुळे जनजीवन विस्कळीत करण्याचा जो प्रयत्न होत असतो, तो समाजहितासाठी चांगला नसतो. म्हणून अचानक आलेल्या कोणत्याही वादळाला आणि कोणाच्याही पुळक्याला भीक घालायची गरज नाही. म्हणजे परीक्षा केंद्रांवर होणाºया प्रत्यक्ष परीक्षांना विरोध करणाºया विद्यार्थ्यांनी मुंबई, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये जे आंदोलन केले, त्यामागे हा हिंदुस्थानी भाऊ होता. आपण यात मुलांच्या हिताचे काय करतो आहोत, असा प्रश्न याला पडणे अपेक्षितच नाही. मात्र या बाष्कळ दबावाला बळी न पडता शिक्षण खात्याने आपला प्रत्यक्ष परीक्षा घेण्याचा निर्णय कायम ठेवला, याबद्दल सरकारचे अभिनंदन. कुणीही उपटसुंभ येतो आणि शिक्षण क्षेत्रात सल्ले देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असेल, तर अशा धटिंगणांना आळा घालावाच लागेल.

अर्थात असल्या उपटसुभांना भिक न घालता गुरुवारी शिक्षण विभागाने पत्रकार परिषद घेऊन परीक्षा कशा पद्धतीने होतील याची सविस्तर माहिती दिली आणि सगळे गैरसमज दूर केले. ही फार मोठी चपराक या धटिंगणाला होती, पण अशा वाह्यात लोकांच्या आहारी जाऊन काही जण संभ्रमावस्थेत सापडण्याची शक्यता होती, पण आता तरी राज्यातील दहावी आणि बारावीच्या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात या परीक्षांबाबत संदेह राहू नये, ही अपेक्षा. त्याचप्रमाणे अशा आततायी अचानक तयार झालेल्या नेत्यांच्या मागे कोणी जाऊ नये हीच अपेक्षा.


खरेतर कोरोनाने सारे समाज जीवन ढवळून काढले आणि शिक्षणक्षेत्रालाही त्याचा फटका बसला. गेल्या वर्षी परीक्षा न घेता पास करण्याचे गणित कसे मांडावे लागले, हे सर्वांना माहीत आहे, मात्र आता कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. हवा मोकळी होत आहे. असे असताना मुलांना आणि पालकांना प्रत्यक्ष परीक्षा होते आहे, याचा खरेतर मनापासून आनंद व्हायला हवा. असे होण्याऐवजी कोणीतरी एक फालतू माणूस या परीक्षांना विरोध करतो आणि त्याच्या बरळण्याला भुलून शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरतात, हे चिंताजनक चित्र आहे. गेल्यावर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांना ज्याप्रकारे गुण मिळाले होते हे चिंताजनक चित्र होते. त्यामुळे आता परीक्षा होणे अपेक्षित असताना हा शिक्षणाचा शत्रू विरोध करतो हे चुकीचे आहे. गेल्यावर्षीही राज्य सरकार दहावी-बारावीची परीक्षा घेणार होते, पण अशाचप्रकारे पुण्यातील काही पालक संघटनांनी विरोध केल्याने मूल्यांकनाचा निर्णय झाला आणि परीक्षा रद्द झाल्या. हे वारंवार होणे चांगले नाही.

अर्थात परीक्षांना विरोध करण्यासाठी सोमवारी ही मुले अशी रस्त्यावर आली, याचा दोष मोठ्यांकडेच जातो. साºया समाजाचा विचार न करता आपल्यापुरते पाहून निव्वळ स्वार्थासाठी आंदोलनाचे हत्यार उपसण्याची सवय समाजाला लागली आहे. त्यांचे अनुकरण या मुलांनी केले. मुलांच्या या पराभूत मनोवृत्तीला खतपाणी घालणारे आणि आवाज देणारे कुणीतरी तयार असतेच, तसेच यावेळी झाले. या मुलांच्या पालकांनीही आपली मुले नेमकी काय मागणी करत आहेत आणि ती त्यांच्या दीर्घकालीन हिताची आहे किंवा नाही, याची काळजी केली का? कोणतीही परीक्षा संपूर्ण तयारीने देणे आणि त्यासाठी अभ्यास करून आत्मविश्वासाने परीक्षा केंद्रावर जाणे, हे केवळ त्या परीक्षेपुरते मर्यादित नसते. ती आयुष्याला सामोरे जाण्याची रंगीत तालीम असते. आम्हाला परीक्षाच नको, आम्हाला गुणच वाढवून द्या, आमचे फक्त ‘बेस्ट पाच’च मोजा, आम्हाला एटीकेटी द्या, आम्ही नापास असलो, तरी आम्हाला पास म्हणा आणि आठवीपर्यंत परीक्षाच घेऊ नका, ही सगळी पराभूत मनोवृत्तीची लक्षणे म्हणावी लागतील. कोणत्याही आंदोलनात हौशे गवशे नवशे असतात. त्याप्रमाणेचे हा गवशा भाऊ या आंदोलनात उतरला आणि अचानक नेता बनण्याचा प्रयत्न केला, पण अशा लोकांच्या मागे धावायचे नसते हे समजले पाहिजे. परीक्षा घेतली नाही आणि समजा उद्या तशीच दहावी, बारावी किंवा अगदी पदवी प्रमाणपत्रेही मिळाली, तरी त्यांची किंमत बाजारात काय असणार? आज पदवीधर किंवा द्विपदवीधरांनाही त्यांच्या विषयातल्या छोट्या छोट्या गोष्टी येत नाहीत, यामागेही शिक्षण व्यवस्थेचे आणि परीक्षा पद्धतीचे जे सुमारीकरण झाले आहे, तेच आहे.


आपली सगळी पूर्वतयारी कसाला लागली पाहिजे आणि त्यासाठी होणाºया कोणत्याही निकोप स्पर्धेत आपण उतरायलाच पाहिजे हा विचार प्रत्येकाने जोपासला पाहिजे. परीक्षांना घाबरून कसे चालेल?, अशी मनोवृत्ती रूजली तरच ही मुले आयुष्यात पराक्रम करू शकतील का? परीक्षा देण्याची तयारी असली पाहिजे. तरच आयुष्यात कोणत्याही समस्यांना तुम्ही भिडू शकता. खरेतर अशा पॉझिटिव्ह मनोधारणेची तयारी लहानपणापासून करावी लागते. कोरोनाचे संकट जगावर आले. त्याने जग मुळापासून हादरले, पण पुन्हा सावरले. उभे राहिले. अशावेळी, ‘आम्ही आॅनलाइनच परीक्षा देऊ. प्रत्यक्ष देणार नाही,’ हा आग्रह कशासाठी? काय आयुष्यभर घरात बसून राहणार आहात का? बाहेर पडायला घाबरणाºया या शेंदाड शिपायांचा उपयोग काय? आवश्यक ती काळजी घेऊन परीक्षा पार पाडणे, ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार त्यासाठी तयारी करत आहे. मुलांना लिहिण्याची सवय नसेल तर वेळ वाढवून दिला आहे. पत्रकार परिषदेत तसे स्पष्ट सांगितले की, ४० गुणांच्या पेपरला १५ तर ७० ते १०० गुणांसाठी अर्धातास वेळ वाढवून दिला आहे. आजारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कक्ष केलेला आहे. यापेक्षा सरकारने काय करायला पाहिजे?

कोणातरी समाज माध्यमांवर वाह्यात बोलून बुडबुडे सोडणारे नव्या पिढीचे आणि समाजाचे शत्रू आहेत. आभासी माध्यमांचा पदर पकडून आपल्या खºया आयुष्यात धुमाकूळ घालणाºया या गुंडांना आपण कधी ओळखणार आहोत? त्यांच्या हातचे बाहुले बनण्याइतकी आपली अक्कल गहाण टाकायची गरज नाही. सरकारला सहकार्य करून नीट परीक्षा देण्यातच सर्वांचे हित आहे. अशा अचानक पुळका आलेल्यांना चार हात लांब ठेवण्याची गरज आहे, हे प्रत्येक विद्यार्थी आणि पालकाने समजले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: