सध्या कर्नाटकमध्ये हिजाब परिधान करण्यावरून सुरू झालेल्या वादाने आता हिंसक वळण घेतले आहे. त्याचे पडसाद मुंबईसह महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. ही अंदाधुंदी का माजते आहे?, अशा विषयावरून अराजक माजवायचा कोणी प्रयत्न करत असेल, तर त्याला वेळीच आळा घातला पाहिजे. नेमका काय आहे, हा प्रकार ते समजून घेतले पाहिजे.
कर्नाटकातल्या अनेक कॉलेजांमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत, तर मंड्या जिल्ह्यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी एका हिजाब घातलेल्या विद्यार्थिनीला विरोध करण्यासाठी जय श्रीरामच्या घोषणा देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या मुलीने अल्लाहू अकबर म्हणत या विद्यार्थ्यांना उत्तर दिलं. हे अत्यंत वाईट आहे. शिक्षणात अशाप्रकारे धर्माच्या भिंती उभारल्या जात असतील, तर देशात पुन्हा दुसरा पाकिस्तान आणि दुसरी फाळणी व्हायला वेळ लागणार नाही.
कर्नाटक शिक्षण कायदा, १९८३च्या कलम १३३(२)चा दाखला देत सरकारने म्हटले, सर्वांनी एकाच प्रकारचे कपडे घालणे बंधनकारक आहे. कर्नाटक शिक्षण कायद्यानुसार शैक्षणिक संस्था आणि शालेय विकास आणि नियमन समितीला विद्यार्थ्यांचे गणवेश ठरवण्याचा अधिकार असल्याचे कर्नाटकच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी म्हटले आहे. युनिफॉर्म हा समतेसाठी असतो. सर्वांमध्ये समानता निर्माण करणारा असतो. युनिफॉर्ममुळे भेदभावाच्या भिंती गळून पडतात; पण या युनिफॉर्मला विरोध करत जर कोणी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला, तर तो चुकीचा असेल. कर्नाटकात नेमके तेच घडले. उडुपी आणि चिकमंगळुरू शहरांतल्या कॉलेजांमध्ये काही विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब परिधान करायला सुरुवात केली आणि जानेवारीमध्ये या वादाला सुरुवात झाली. २८ डिसेंबर, २०२१ला पहिली घटना उडुपीमध्ये नोंदवली गेली. त्यानंतर ३ सरकारी कॉलेजेस आणि २ खासगी संस्था अशा एकूण पाच शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थिनींना हिजाब घालून प्रवेश करण्यास मनाई केली आहे. खरंतर यात चुकीचे काहीच नाही. युनिफॉर्म हा युनिफॉर्म असतो. शाळेचे नियम सर्वांना सारखेच असतात. त्याकडे हिंदू मुस्लीम म्हणून बघण्याचे कारण नाही; पण राजकीय पक्षांनी या प्रकरणात घुसखोरी केल्याने हे प्रकरण चिघळवण्याचा प्रकार झाला.
उडुपी कॉलेज आणि त्यानंतर कुंदापूर खासगी महाविद्यालयातल्या काही विद्यार्थ्यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे नेले. याविषयीची प्राथमिक सुनावणी गेल्या आठवड्यात झाली. मंगळवारी पहिल्यांदाच याविषयीची व्यवस्थित सुनावणी सुरू झाली. कोर्टाचं कामकाज सुरू झाल्यानंतर एका वकिलाने सुनावणी तहकूब करण्याची मागणी केली; पण जस्टिस दीक्षित यांनी आपली भूमिका सगळ्या वकिलांसमोर स्पष्ट केली. आपण आपल्या सगळ्या भावना कोटार्बाहेर ठेवूयात. आपल्यासाठी आपली घटना हीच आपली भगवत गीता आहे. मी पद स्वीकारताना जी शपथ घेतली त्यानुसार मी वागणार आहे. विद्यार्थ्यांनी वर्गाबाहेर असणं ही चांगली परिस्थिती नाही. मी सकाळी उठून सोशल मीडिया अॅप पाहतो, तेव्हा मला ‘या कोर्टाने हे सांगितलं’ असं सांगणारे शेकडो मेसेजेस अनेक अनोळखी नंबरवरून आलेले असतात. या हिंसक घटनांनंतर कर्नाटक सरकारनं बुधवारपासून तीन दिवस राज्यातील शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे किती भयंकर आहे. असे वाद चिघळू न देता ते सामंजस्याने सोडवायचे असतात. त्या मुलींना तुम्ही इथे कशासाठी असे ड्रेस परिधान करण्याचा आग्रह धरता हे विचारले असते आणि समजावून सांगितले असते, तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. आपण शिक्षण घेण्यासाठी येत आहोत, धर्मप्रसारासाठी नाही, अशी समज त्या मुलींच्या पालकांना दिली असती, तर हा प्रश्न भावनिक आणि धार्मिक झाला नसता; पण याला राजकीय रंग चढवले गेले, धार्मिकतेचे रंग चढवले गेले त्यामुळे ही अशांतता माजते आहे. त्याचे पडसाद सगळीकडे उमटणे ही तर त्याहून निंदनीय बाब आहे.
खरंतर २०१८मध्ये शेजारी राज्य असलेल्या केरळमध्ये दोन मुस्लीम शालेय विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या खटल्यात निर्णय देताना कोर्टानं शिक्षण संस्थेचे अधिकार कायम असल्याचं म्हटलं होतं. स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे वैयक्तिक हित हे सार्वजनिक हितापेक्षा मोठे नसते. या प्रकरणात एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अल्लाहू अकबर म्हणणाºया मुलीचा व्हिडीओ ट्विट करत या मुलीला सॅल्यूट केलाय. त्यांनी या प्रकरणाला धार्मिकतेचा रंग देत भडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कर्नाटकात अशांतता पसरली आहे. या पक्षांना दंगली घडवून सामान्य जनतेला घाबरवायचे आहे, असे दिसते; पण यात राजकारण न आणता समानतेच्या दृष्टीने आणि गणेवेशापासून वेगळे काही करण्याचा प्रयत्न करू नये या दृष्टीने पाहिले पाहिजे. या प्रकरणातला राजकीय हस्तक्षेप दूर करून तो शिक्षणसंस्था आणि न्यायालय यांच्यावर सोडून दिला, तर सगळं ठिक होईल. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची काहीच गरज नाही. तशा प्रकारचा प्रयत्न कोणी राजकीय नेते महाराष्ट्रात करत असतील, तर त्यांना वेळीच आळा घातला पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा