मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

पुण्य कमवायचा फंडा

 अग्रलेख


काळ्या पैशांचे काय करायचे?, तर त्याचे दान देवाला करायचे आणि आपले पापक्षालन करायचे. इतका साधा सिद्धांत आज सगळीकडे दिसत आहे, म्हणजे पुण्यही खरेदी करता येते तर. पण कमवावे नाही, तर काळ्या पैशांतून खरेदी करता येते, असा अनेकांचा समज असतो. अशाच समजापायी मोठमोठ्या देवस्थानांना देणगी देण्याचा फंडा अनेक जण वापरतात. नुकतीच शिर्डीच्या साईबाबा दरबारात एक विचित्र घटना घडली आहे. येथे येणाºया भाविकांनी दानाच्या स्वरूपात जुन्या बंद पडलेल्या नोटा दानपेटीत टाकल्या आहेत. नोटबंदीला पाच वर्षे होत आली असताना, देखील साईबाबाच्या दरबारात काही दानशुरांनी बंद पडलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा टाकल्या आहेत. मंदिराच्या दानपेटीत या नोट्या थोड्या थिटक्या नसून, चक्क तीन कोटी इतके आहे. अर्थात बाबांना पैशांचे काय मोल?, ते तर फकिराचे जीवन जगत होते. त्यामुळे खºया आणि खोट्या नोटा त्यांच्या दृष्टीने फक्त कागदच होता; पण हे दान काही बाबांना नाही, तर ट्रस्टला पोहोचले आहे. अर्थात हा प्रकार काही आजच घडतो आहे, असे नाही. यापूर्वीही जनता पक्षाच्या राजवटीत १९७७ साली मोरारजीभाई देसाई यांनी १०००च्या नोटा बंद केल्या होत्या. त्यावेळी काळा पैसा म्हणून साठवलेल्या प्रचंड प्रमाणात १ हजारांच्या नोटा या तिरुपती देवस्थानात दानपेटीत टाकलेल्या होत्या. त्यावेळी साई संस्थान एवढे श्रीमंत नव्हते; पण बंद झालेल्या नोटा देवाला देऊन पुण्य कमवायचा फंडा तसा जुनाच. आमची पापं जुनी आहेत, ती धुण्यासाठी जुन्या नोटाच वापरल्या जाव्यात, असा विचार या दानशूर लोकांचा असावा.


खरंतर देशातून काळा धन हद्दपार करण्यासाठी मोदी सरकारने ८ नोव्हेंबर, २०१६ रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर ३१ डिसेंबर, २०१६पर्यंत जुन्या नोटांना बँकेत बदलण्याचा कालावधी देण्यात आला होता; मात्र पाच वर्षांनंतर साई दरबारात तीन कोटी रुपयांच्या नोट्या आढळल्या आहेत. साई संस्थानचे मठ अध्यक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार, साईबाबांच्या दानपेटीत जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या सुमारे ३ कोटी रुपयांच्या नोटा आढळल्या आहेत. जुन्या बंद पडलेल्या नोटांना स्वत:जवळ बाळगणे हे आता गुन्हा झाला असून, त्या कारणानेच काही जणांनी आपल्या जुन्या नोटा साईबाबांच्या दानपेटीत टाकल्या आहे. खरंतर हा आता कागदाचा कचराच म्हणावा लागेल. कुठे तरी गटारात, पाण्यात नोटा वाहत आल्याच्या बातम्या आपण नेहमी ऐकतो; पण या महाभागांनी या नोटा दानपेटीत टाकण्याचा प्रयत्न केला. साईबाबा संस्थानच्या प्रमुख भाग्यश्री बनायत यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविकांनी दानपेटीत पैसे टाकल्यानंतर त्या पैशांची मोजणी आठवड्याच्या शेवटी होत असते. देशात नोटबंदी झाल्यापासून बाबांच्या दानपेटीत मोठ्या प्रमाणात जुन्या बंद पडलेल्या नोटा येत आहेत. त्या नोटांना आम्ही जमा करून वेगळे ठेवत आहोत. या नोटांची माहिती आम्ही केंद्रीय वित्त मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय आणि आरबीआयला दिली आहे, असे भाग्यश्री बनायत यांनी सांगितले. म्हणजे हा पैसा जर आरबीआयने ग्राह्य धरला आणि बदलून दिला, तर अनेक नेतेमंडळी, काळेबाजारांचे पोशिंदे दानधर्म करायला मोकळे होतील. किंबहुना देवस्थानच्या मंडळींना हाताशी धरून फिप्टी-फिप्टीचा धंदाही करायला कमी करणार नाहीत. त्याचीच ही लिटमस टेस्ट असावी. भाग्यश्री बानायत पुढे म्हणाल्या की, गेल्या आठवड्यात गृह मंत्रालयाने आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सांगितले की, आरबीआय आम्हाला यासंदर्भात मदत करेल. त्यानंतर आम्ही आरबीआयच्या सतत संपर्कात आहोत आणि आम्हाला आशा आहे की, ते लवकरच आम्हाला काही उपाय सांगतील. भाग्यश्री बानायत यांनी सांगितले की, नोटबंदीनंतर लगेच म्हणजेच ३१ डिसेंबर, २०१६पर्यंत दररोज दानपेट्या उघडल्या जात होत्या आणि दान केलेले पैसे बँकांमध्ये जमा केले जात होते. ३१ डिसेंबरनंतर बँकांनी जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला आहे. हा संस्थेचा पैसा असून, तो सर्वसामान्यांच्या भल्यासाठी वापरला पाहिजे. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा निघावा, अशी आमची इच्छा आहे.

खरंतर या दानात आलेल्या पैशांतून नेमके काय केले पाहिजे, याची यादीच ट्रस्टकडे सोपवली पाहिजे. खड्डेयुक्त रस्ते, कचºयाचे प्रकल्प, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी असे पैसे वापरले, तर तो देवाचा प्रसाद म्हणून लोक स्वीकारतील. अनेक काळे दानशूर आपला पैसा जमा करतील. त्यामुळे देवस्थानला विनिमय केंद्राचे स्वरूपही प्राप्त होईल. काळ्या बंद झालेल्या नोटा दानपेटीत टाकायच्या. त्या ट्रस्टने सरकारकडून मान्य करून घ्यायच्या. त्यापोटी दानशूरांच्या खात्यावर पुण्य जमा करायचे आणि गोरगरीबांसाठी प्रकल्प आणि विकासकामे करायची. आज आपल्याकडे जिथे-तिथे घाण करणारे, कचरा टाकणारे लोक आहेत. रस्त्यावर कचरा टाकणे, थुंकणे असले प्रकार करणारे लोक प्रचंड प्रमाणात आहेत. त्यांना शिक्षा करायची म्हटले, तरी ते शक्य होत नाही, कारण शिक्षा करणारे आणि कायद्याचे रक्षकही हे प्रकार करताना दिसतात. त्यामुळे काही रस्ते जर देवस्थानच्या अशा पैशांतून उभे राहिले, तर तो देवाचा मार्ग म्हणून तरी लोक स्वच्छता पाळतील. त्या मार्गावरून घाण करताना विचार करतील. त्यामुळे अशा पैशांचा विनियोग करण्याचा आणि काळ्याचे पांढरे करण्याचा योग्य निर्णय सरकारने घेतल्यानंतर एक वेगळे विकासाचे चित्र दिसून येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: