बदलत्या परिस्थितीनुसार रंगभूमीची सेवा आणि कार्य करताना आपणही बदलले पाहिजे. काही प्रथा, फॉरमॅट बदलता आले पाहिजेत. थोडसे लवचिक होता आले पाहिजे, याची जाणिव ठेवून नाटककार आनंद म्हसवेकर यांनी रंगमंचाची अट नसलेले नाटक निर्माण करण्याचा ध्यास घेतला. २२ बाय चौदाच्या रंगमंचावरचे नाटक त्यांनी खुले केले आणि भिंती तोडून ते प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचू लागले. या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी आणखी एक नाटक नुकतेच आणले आणि त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ते नाटक म्हणजे फॅमिली नंबर वन.
फॅमिली नंबर वन या नाटकाचा पहिला प्रयोग सावित्रीबाई फुले रंगमंदिर डोंबिवली येथे दिनांक ९ फेब्रुवारी रोजी झाला. लेखक, दिग्दर्शक आनंद म्हसवेकरांचे हे रंगमंचाची अट नसलेले आठवे नाटक. नाटकाचे नेपथ्य अनिश विनय यांचे आहे, पार्श्वसंगीत आणि शिर्षक गीत सुखदा भावे दाबके यांनी केले आहे. या नाटकात श्रद्धा मोहिते, सुगत उथळे, विनय म्हसवेकर आणि जुन्या जाणत्या सुप्रसिद्ध अभिनेत्री नैना आपटे यांनी भूमिका केली आहे.
गेली पन्नास वर्षे रंगभूमीसाठी झटणाºया आनंद म्हसवेकर यांची एकांकिका ही स्पेशॅलिटी असली, तरी १९८६ साली त्यांचे जोडी जमली तुझी माझी हे पहिले नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले आणि त्यानंतर २००२ सालापर्यंत आणखी सात नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आली. तोवर प्रायोगिक रंगभूमीवर २५ एकांकिकांचे प्रयोग सादर झाले होते आणि ११ नाटके प्रायोगिक रंगभूमीवर राज्य नाट्य स्पर्धा मंचावर सादर झाली होती, पण रंगभूमीच्या मर्यादा आणि प्रेक्षक आणि नाटक यांच्यातील वाढत दरी लक्षात घेता काहीतरी वेगळा प्रयोग केला पाहिजे हे म्हसवेकर यांच्या लक्षात आले आणि त्या प्रयोगातून त्यांनी रंगमंचाची अट नसलेले नाटक तयार करण्याच्या ध्यास घेतला. तो यशस्वी करून दाखवला.
आज होते असे की, नाटकाचे प्रयोग फक्त शनिवारी, रविवारी होतात. ते नाटक हे मुंबई, पुण्याच्या पलीकडे जातच नाही. नाटकाचा खरा प्रेक्षक तर कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आहे. त्यांच्यापर्यंत नाटक पोहोचत नसेल, तर त्याला अर्थ काय? म्हसवेकर यांचे बालपण गावाकडे गेल्यामुळे आणि नाटकाचे बाळकडू गावाकडून घेतल्यामुळे आपले नाटक छोट्या गावापर्यंत जात नाही याची खंत त्यांना वाटली. मुंबई, पुण्याचे मोठे कलाकार असलेले नाटक छोट्या गावापर्यंत सोडाच, पण सातारा, वाई, धुळे, अमळनेर, नांदेड अशा छोट्या शहरांपर्यंतही जात नाही. मग या मुंबईबाहेरच्या मराठी नाट्य रसिकांचे काय? मुंबई, पुण्याचे मोठे कलाकार असलेले नाटक मुंबई, पुण्याबाहेर का जात नाही याची कारणे त्यांनी शोधली. तेव्हा त्यांच्या हे लक्षात आले की, या छोट्या गावांमध्ये मोठी नाट्यगृहे नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटकाचे अर्थकारण. मुंबईबाहेर व्यावसायिक नाटक घेऊन जायचे तर नाटकाची बस लागते आणि तिचाच खूप मोठा खर्च असतो. मग त्यांनी विचार केला की, नाटकाला बस का लागते, तर नाटकाचा सेट नेण्यासाठी आणि नाटकाचे नेपथ्य म्हणजे तरी काय असते? घराचा किंवा राजवाड्याचा आभास. पूर्वी संगीत नाटके पडद्यावर व्हायची. मराठी रंगभूमीवरील हजारो प्रयोग झालेली लोकनाट्य नुसत्या काळ्या पडद्यावर सादर झालेली आहेत आणि मग ठरवले की, व्यावसायिक नाटक लिहितानाच असे लिहायचे की, त्याचे नेपथ्य भव्य दिव्य नसेल आणि जे एखाद्या छोट्या कारमधून सहज नेता येईल, शिवाय हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवरच्या मोठ्या नावाजलेल्या नटांना घेऊनच करायचे, पण कलाकार कमी म्हणजे दोन किंवा जास्ती जास्त तीन-चार घ्यायचे आणि असे नाटक करायचे की, ते मुंबई, पुण्याबाहेर छोट्या गावांत सहज करता येईल. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे नाटक जिथे मोठा रंगमंच नाही अशा ठिकाणी असेल, त्या रंगमंचावर सादर करता येईल. म्हणून या नाटकांना रंगमंचाची अट नसलेले नाटक असे म्हटले गेले. या नाटकांमुळे आनंद म्हसवेकर यांची सात मराठी व्यावसायिक नाटके ज्या नाटकात मोठे नावाजलेले कलाकार होते, छोट्या गावापर्यंत पोहचली आणि गेली एकोणीस वर्षे हा प्रयोग ते सातत्याने करत आहेत.
२००२ साली रंगमंचाची अट नसलेले फिफ्टी फिफ्टी हे पहिले नाटक त्यांनी लिहले. त्यात कलाकार होते अरुण नलावडे आणि विजय गोखले. एक पडदा हे नेपथ्य, पार्श्वसंगीतासाठी एक माणूस आणि एक बॅक स्टेज अवघ्या चार जणांच्या टीममध्ये पंचवीस प्रयोग छोट्या रंगमंचावर मुंबईत आणि मुंबईबाहेर केले. नंतर याच नाटकाचे प्रदीप पटवर्धन, आनंद अभ्यंकर आणि आशा साठे या तीन कलाकारांना घेऊन नंतर दोनशे प्रयोग केले, काही प्रयोग गोव्यातही झाले. या नाटकानंतर नयनतारा, नंदू गाडगीळ आणि आशा साठेला घेऊन त्यांनी सासू नंबर वन हे नाटक केले. या नाटकाचे महाराष्ट्रभर २२५ प्रयोग केले.
आनंद अभ्यंकर, आशा साठे आणि विघ्नेश जोशी या तीन कलाकारांना घेऊन अस्से नवरे अशा बायका हे नाटक घेऊन महाराष्ट्रभरच काय तर दिल्ली, लखनऊ, चेन्नई येथेही या नाटकाचे प्रयोग केले. तीनशेच्या वर प्रयोग झाले आणि महाराष्ट्राबाहेर जो मराठी प्रेक्षक आहे. त्यांच्यापर्यंत नाटक पोचले. २००२ ला सुरू झालेला रंगमंचाची अट नसलेल्या नाटकाचा प्रवास २०२२ पर्यंत सुरूच आहे. आताचे रंगभूमीवर आलेले फॅमिली नंबर वन हे रंगमंचाची अट नसलेले आठवे नाटक. यापूर्वी केलेल्या सात नाटकांचे संपूर्ण महराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर १५०० च्या वर प्रयोग झाले. अशा या प्रयोगशील नाटककाराचे नवे नाटक फॅमिली नंबर वन हे आता महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. या नाटकाबाबत भरभरून बोलताना आनंद म्हसवेकर म्हणाले की, प्रेक्षकांची इच्छा आहे ना मग आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणारच. अगदी तुमची इच्छा असेल तर तुमच्या केबिनमध्येही हे नाटक आम्ही करून दाखवू. इतकी लवचिक रंगभूमी करण्याचे केलेले हे काम खरोखरच नंबर वन असेच आहे.
प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा