बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

काँग्रेसला मोठे केले


भारतीय राजकारणात बदलाचे वारे येऊ घातले आहेत. एकीकडे कोरोना जाताना दिसत आहे, कोरोनामुळे झालेली दयनीय अवस्था संपुष्टात येताना दिसत आहे, त्यामुळे त्याचे कवित्व आता सुरू झाल्याचे दिसत आहे. पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये काही परिवर्तनाचे अंदाज येत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी संसदेत एक मोठा पवित्रा घेतला आणि काँग्रेसला मोठे करण्याचा प्रकार केला. देशभरात कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार जर मोठ्या प्रमाणात काँग्रेस करत असेल, तर काँग्रेस बहुमतात आहे असे समजावे लागेल. जी गोष्ट काँग्रेसने केली तीच आता मोदींचा भाजप करताना दिसत आहे. गुजरात दंगलीनंतर सोनिया गांधींनी, काँग्रेसने सातत्याने नरेंद्र मोदींवर टीका केली आणि त्यांना मोठे केले. त्याचा हिशोब आता कोरोनाच्या संकटानंतर काँग्रेसला जबाबदार धरून मोदी करताना दिसत आहेत.


पंतप्रधान सोमवारी आपल्या भाषणात म्हणाले की, महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडले, त्यासाठी मोफत तिकिटे त्यांना देण्यात आली. खरेतर देशात आणि राज्यात काँग्रेस अत्यंत क्षीण आहे. राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे, महाविकास आघाडीत तिसºया क्रमांकावर आहे, तर सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधी पक्षनेतेपद मिळावे एवढे लोकसभेत संख्याबळ नाही. गेल्या वर्षभरात झालेल्या कोणत्याही निवडणुकीत काँग्रेसला यश मिळालेले नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपने भरारी घेतली, तर काँग्रेस शून्य झाली होती. असे असताना पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर केलेली टीका आणि महाराष्ट्रातील काँग्रेसला जबाबदार धरून पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला मोठे केले आहे. काँग्रेस कुठेच नसताना त्यांना जबाबदार धरून त्यांना मोठे करण्याचे काम हे महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्षांपेक्षा काँग्रेस मोठी आहे हे बिंबवण्याचा तो प्रकार होता. राज्यातील सगळे निर्णय हे मुख्यमंत्री जातीने घेत होते, स्वत: फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला सहारा देत होते, मनातील भीती काढून टाकत होते. राष्ट्रवादी काँग्रसचे असलेले आरोग्यमंत्री हे रस्त्यावर उतरून मदतीला उतरत होते. त्या काळात काँग्रेसचे कोणीच मदतीला नव्हते. शिवसेना आणि राष्ट्रवादीच फक्त मदतीसाठी होती. काँग्रेसच्या मंत्र्यांनी कोरोना काळात वीज बिल माफ होईल असे सांगून जनतेची फसवणूक केली होती. त्यामुळे राज्यात काँग्रेस इतकी खाली गेली होती की, रविवारी सगळे पक्षभेद, जातीभेद विसरून भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंत्य संस्काराला आले असताना काँग्रेस कुठेच दिसत नव्हती. प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसात सगळे दंग होते, इतके सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याची अपेक्षा असताना, दुखवटा जाहीर झालेला असतानाही सातत्याने विविध वाहिन्यांवर फक्त बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाची जाहिरात दिसत होती. अशा दु:खद प्रसंगात अशी जाहिरात करणे योग्य नाही, हे पण औचित्य काँग्रेस नेत्यांना राहिले नव्हते. त्यामुळे काँग्रेस अप्रिय होत असताना अचानक सोमवारी पंतप्रधानांनी काँग्रेसला मोठे करण्याचा प्रयत्न केला.

खरेतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च २०२० रोजी देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला, मात्र त्याआधी देशातली किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी लॉकडाऊन घोषित केला होता याचा विचार केला पाहिजे. सरकारी माहितीनुसार तब्बल ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी. आपापल्या राज्यातल्या परिस्थितीनुसार राज्यांनी लॉकडाऊन लागू केला होता. ३१ मार्च २०२० पर्यंत त्याची मुदत होती. देशव्यापी लॉकडाऊन जरी २४ मार्च २०२० ला झाला असला आणि त्यापूर्वी २२ मार्चला एक दिवसाचा बंद पाळला असताना महाराष्ट्रातील एसटी, बसेस, मॉल, स्वीमिंग पूल हे १५ मार्चच्या अगोदरच बंद झालेले होते. हॉटेल, लॉजवरही प्रवाशांना येऊ दिले जात नव्हते. त्यामुळे राज्य सरकारने अगोदरच काळजी घेण्यास सुरुवात केली होती.


म्हणूनच प्रश्न असा उपस्थित होतो की, वेगवेगळ्या राज्य सरकारांनी आपापल्या राज्यात आधीच लॉकडाऊन लागू केला होता, तर देशव्यापी लॉकडाऊनची गरज होती का? २४ मार्च २०२० रोजी लावण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचे समर्थन करताना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले होते, देशभरात लागू करण्यात आलेल्या विविध उपाय-योजनांच्या अंमलबजावणीत सातत्य असणे गरजेचे आहे. पंतप्रधान या प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. याचा अर्थ केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाऊन लागू करत जबाबदारी उचलली. खरेतर ८ जानेवारी ते २४ मार्च २०२० या दरम्यानच्या दोन-अडीच महिन्यांच्या काळात पंतप्रधान जातीने या विषयात लक्ष देत असल्याचे सांगितले गेले. त्यावेळी पंतप्रधान म्हणाले होते, तयारी करा, पण घाबरू नका. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीची तयारी सुरू होती. त्यावेळी २२ फेब्रुवारी २०२० रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी जाहीर केले, भारताची मजबूत आरोग्य यंत्रणा कोरोना विषाणूला भारतात प्रवेश करण्यापासून रोखण्यास तयार आहे. पंतप्रधान आणि आरोग्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली. ५ मार्च २०२० रोजी आरोग्यमंत्र्यांनी, आजाराची साथ पसरल्यास भारताकडे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आणि एन ९५ मास्कचा पुरेसा साठा आणि पुरेसे आयसोलेशन बेड्स असल्याचे संसदेत सांगितले. १२ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ ला जागतिक महामारी असल्याचे जाहीर केले. त्यावेळीसुद्धा सरकारने अत्यंत आत्मविश्वास दाखवला. असे सगळे असताना ज्यावेळी भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या केवळ ६०० होती आणि ९ जणांचा मृत्यू झाला होता, केंद्राने अवघ्या १२ दिवसांत कठोर लॉकडाऊन लागू केला.

लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकºया गेल्या. त्यामुळे मार्च २०२० मध्ये बेरोजगारीचा दर ८.७ टक्क्यावर पोहोचला. एप्रिल महिन्यात तो २३.५ टक्क्यांवर गेला आणि पुढे जूनपर्यंत तो २० टक्क्यांच्या वरच होता. गतवर्षी फेब्रुवारी २०२१मध्ये तो ६.९ टक्क्यांवर आला आहे. लॉकडाऊनचे सर्वात विदारक चित्र म्हणजे कुठल्याही परिस्थितीत, मिळेल त्या मार्गाने आपापल्या घरी परतणारे प्रवासी मजूर. १ कोटींहून जास्त प्रवासी मजूर आपापल्या घरी परतल्याचे मंत्रालयाने सांगितले. यापैकी ६३.०७ लाख कामगारांना सरकारने ट्रेनने आपापल्या गृहराज्यात सोडले. घरी परत जाताना रस्त्यात किती मजुरांचा मृत्यू झाला आणि किती प्रवासी मजुरांना रोजगार गमवावा लागला, याविषयी आकडेवारी उपलब्ध नसल्याचेही मंत्रालयाने सांगितले. तरीपण अंदाजे ३०० हून जास्त लोकांचा थकल्यामुळे किंवा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले. ज्या दिवशी लॉकडाऊन घोषित करण्यात आला त्याच दिवशी कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना बांधकाम मंजुरांसाठी थेट बँक ट्रान्सफरसाठी पाठवलेला निधी वापरावा, असा ‘सल्ला’ दिला. ही सगळी परिस्थिती मोदी सरकारने हाताळली. त्याला वेगवेगळ्या राज्यांनी सहकार्य केले. भारतासारख्या सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशात कोरोनावर केलेली मात हा जगाचा आश्चर्याचा विषय बनला. मोदींचे जगभर कौतुक झाले. सगळे काही व्यवस्थित असताना, या कोरोना काळात कोणीही कुठल्याही वाईट परिस्थितीला मोदी किंवा भाजपला जबाबदार धरलेले नसताना पंतप्रधानांनी अचानक काँग्रेसला मोठे करण्याचा का प्रकार केला हे अनाकलनीय आहे. ज्याप्रकारे पंतप्रधानांनी वेगवेगळ्या लस उत्पादन, संशोधन करणाºया कंपन्यांना भेटी दिल्या, माहिती घेतली आणि लसीकरणाचा देशात प्रभावी कार्यक्रम राबवला हे जागतिक आश्चर्य होते. सगळी चांगली कामगिरी असताना अचानक काँग्रेसला जबाबदार धरून मोठे करण्याचे काम केले हे आश्चर्यकारक आहे.


प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: