मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

संगीतातील सुसंस्कृत व्यक्तिमत्व


रविवारची सकाळ त्या बातमीने उजाडली. जी अप्रिय बातमी कोणाच भारतीयालाच नव्हे तर जगातील कोणाला नको असलेली बातमी आली, ती म्हणजे लता मंगेशकर यांचे निधन. सूर थांबतो, स्वर स्तब्ध होतात त्याप्रमाणे जणू जगच ठप्प झाले. संपूर्ण जगातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा आणि क्वीन आॅफ मेलडी यांसारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या, पण या पदव्यांपेक्षाही सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व ही त्यांची खास ओळख होती. आज संगीतातील सुसंस्कृत व्यक्तिमत्व हरपले आहे.


लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या. त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळविणाºया एम. एस. सुब्बुलक्ष्मीनंतर त्या दुसºया गायिका होत्या. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, द लीजन आॅफ आॅनरने सन्मानित केले. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाºया त्या पहिल्या भारतीय होत्या. एवढी महान गायिका आपल्यातून गेल्याने संपूर्ण देशावर शोककळा आलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाची जडणघडण बघणाºया आणि देशातील सर्व स्थित्यंतरे पहाणाºया त्या साक्षीदार होत्या. अगदी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून, इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयींपासून नरेंद्र मोदींपर्यंत त्यांनी सर्वांशी सलोख्याचे, जिव्हाळ्याचे संबंध जोपासले होते.

अत्यंत पवित्र सुराप्रमाणेच अत्यंत पवित्र मनाची गायिका असेच त्यांचे व्यक्तिमत्व होते. व. पु. काळे यांच्या हसरे दु:ख या कथेत ते सांगतात की, त्या कथेतील नायक सबनीस हे आपल्या घरात देवाधिकांचे फोटो ठेवत नाहीत, पण लता मंगेशकरांचा फोटो ठेवतात. कारण आयुष्यात सुखाचा आणि आनंदाचा सूर कसा लावायचा आणि जीवन आनंदाने कसे जगायचे हे या निष्पाप सुराने शिकवले. तो निष्पाप निरागस सूर म्हणजे लता मंगेशकर यांचा.


लता मंगेशकरांचे महत्त्व जगाला कसे सांगावे हे खेळपट्टीवर स्थिरावणाºया सुनील गावसकर यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत सांगितले होते. त्यावेळी म्हणजे महाराष्ट्राचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम मुंबईत साजरा झाला होता. तेव्हा पहिल्या रांगेत पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर, शरद पवार, सुनील गावसकर असे दिग्गज बसले होते. लता मंगेशकर यांचा गौरव करण्यासाठी सुनील गावसकर बोलायला उभे राहिले, तेव्हा त्यांनी सांगितलेला किस्सा बरेच काही सांगून जातो. सुनील गावसकर म्हणाले की, त्यावेळी पाकिस्तानच्या दौºयावर आम्ही होतो. झहीर अब्बास पाकिस्तानचा कर्णधार होता. त्यापूर्वी नुकताच मी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली होती, ते म्हणजे ब्रॅडमनच्या शतकांचा विक्रम मागे टाकून सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम नोंदवला होता, पण भारतीय संघ पाकिस्तानात बॅडपॅचमधून जात होता. त्यावेळी सामना सुरू होण्यापूर्वी शुभेच्छा देण्यासाठी एक पाकिस्तानी गायिका आली होती. तिच्याशी सुनील गावसकर यांची ओळख करून देताना पाकिस्तानी व्यवस्थापकांनी सांगितले हे फार मोठे जगप्रसिद्ध फलंदाज सुनील गावसकर. तेव्हा ती गायिका म्हणाली की, मी कोणा गावसकरला ओळखत नाही, मी फक्त झहीर आणि इम्रान या दोघांनाच ओळखते. तेव्हा गावसकर यांनी या कोण बाई आहेत असे विचारले. तेव्हा पाकिस्तानी खेळाडूंनी सांगितले, या नूरजहाँ... फार मोठ्या गायिका आहेत. त्यावर गावसकर पटकन म्हणाले, आम्ही अशा कोणाला ओळखत नाही, आम्हाला फक्त लता मंगेशकर माहिती आहेत. होय संगीत क्षेत्रातील अंतिम शब्द म्हणजे लता मंगेशकर हे एका जगप्रसिद्ध क्रिकेटपटूने ठासून सांगितले हा खरा देशप्रेमाचा भाग होता. याचे कारण संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय म्हणजेच देशभक्तीचा झरा.

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाणी, शिवकल्याण राजा, स्वातंत्र्यवीर सावरकरांवरची गाणी गाताना लता मंगेशकर आणि कुटुंबीयांनी आपली देशभक्ती त्यात ओतून गायलेली ही गाणी आहेत. सर्व भावंडांनी गायलेल्या जयोस्तुते या सावरकरांच्या स्वतंत्रदेवतेच्या गीताशिवाय गेल्या ७५ वर्षांतील एकही १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी पूर्ण झालेली नाही.


खरे म्हणजे लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदौर शहरात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया हे होते. त्यामुळेच की काय त्यांनी भारतातल्या प्रत्येकाच्या हृदयात घर केले, स्थान मिळवले. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे आहेत. लता यांना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली. तिथून त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांच्या रक्तात, श्वासात आणि पेशीपेशीमध्ये संगीत निनादत होते. १९४२ मध्ये लतादीदी अवघ्या १३ वर्षांच्या होत्या, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक-मास्टर विनायक यांनी लतादीदींच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लतादीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला. सगळी जबाबदारी त्यांनी घेतली. पण ही जबाबदारी फक्त कुटुंबाची नव्हती, तर संगीत क्षेत्राची होती. त्यांची भावंडे म्हणजेही सप्तसुरांमधील साडेतीन सप्तकेच होती.

लता यांनी नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हंसाल (१९४२) या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लतादीदींना नवयुगच्या पहिली मंगळागौर (१९४२) या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लतादीदी मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवा में (१९४६) या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले (दत्ता डावजेकर हे त्या गाण्याचे संगीतकार होते). लता आणि आशा (बहीण) यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात (बडी माँ-१९४५) नूरजहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लता यांनी माता तेरे चरणों में हे भजन गायले. मास्टर विनायकांच्या दुसºया हिंदी चित्रपटाच्या (सुभद्रा-१९४६) ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लतादीदींची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली.


१९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवाले यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी अमानत खाँ (देवासवाले) यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लतादीदींना तालीम मिळाली. १९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लतादीदींना मार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई (अंबालेवाली) यांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या. गुलाम हैदरांनी लताजींची ओळख तेव्हा शहीद ( १९४८) या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशिधर मुखर्जींशी केली, पण मुखर्जींनी लतादीदींचा आवाज अतिशय बारीक म्हणून नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते-येणाºया काळात निर्माते आणि दिग्दर्शक लतादीदींचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हे शब्द साक्षात खरे ठरले. लता मंगेशकर म्हणजेच सप्तसुर हे भारतीय संगीताचे गणित बनून गेले. त्यानंतर हैदरांनी लतादीदींना मजबूर (१९४८) या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली. सुरुवातीला लता आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचे अनुकरण करत असत, पण नंतर लतादीदींनी स्वत:च्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लीम कवी असत, त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर उर्दू शब्द असत. एकदा सुप्रसिद्ध अभिनेता दिलीपकुमार यांनी लतादीदींच्या हिंदी/हिंदुस्तानी गाण्यातील मराठी उच्चारांसाठी तुच्छतादर्शक शेरा मारला, तेव्हा लतादीदींनी शफी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले.

त्यानंतर लोकप्रिय चित्रपट महल(१९४९)चे आयेगा आनेवाला हे गाणे लतादीदींच्या कारकिर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले. या गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे अभिनेत्री मधुबालाने म्हटले होते.


१९५०च्या दशकात लतादीदींनी ज्या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायिली, अशा नामांकित संगीतकरांची नावे-अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, नौशाद, सचिनदेव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार, सलिल चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, मास्टर कृष्णराव, वसंत देसाई, सुधीर फडके, हंसराज बहल आणि उषा खन्ना हे दिग्गज होते.

संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली बैजू बावरा (१९५२), मुगल-ए-आजम (१९६०) आणि कोहिनूर (१९६०) या चित्रपटांसाठी लतादीदींनी शास्त्रोक्त संगीतावर आधारित काही गाणी गायिली. लतादीदींनी नौशादांसाठी गायिलेले पहिले गाणे हे जी. एम. दुर्राणींसोबतचे द्वंद्वगीत छोरेकी जात बडी बेवफा आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांनी तर आपल्या जवळजवळ सर्व चित्रपटांच्याविशेषत: राज कपूरनिर्मित गाण्यांच्या गायिका म्हणून लतादीदींचीच निवड केली. अशा चित्रपटांमध्ये आग, आह, (१९५३), श्री ४२० ( १९५५) आणि चोरी चोरी ( १९५६) यांचा समावेश आहे. १९५७ पर्यंत सचिन देव बर्मन आपल्या बहुतेक चित्रपटगीतांच्या प्रमुख गायिका म्हणून लतादीदींची निवड करीत. यामध्ये सजा ( १९५१), हाउस नं. ४४, (१९५५) आणि देवदास (१९५५). पण १९५७ ते १९६२ च्या काळात बर्मनदादांनी लतादीदी ऐवजी गीता दत्त आणि आशा भोसले या गायिकांना घेऊन आपली सर्व गाणी बसवली. १९५० च्या दशकात लतादीदींबरोबर अतिशय लोकप्रिय गाणी बनवणाºयांपैकी एक सलिल चौधरी होते. लतादीदींना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम फिल्मफेअर पारितोषिक सलिल चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आजा रे परदेसी या मधुमती (१९५८)मधील गीतासाठी मिळाले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. मग संगीताचा आणि गाण्याचा मानदंड आणि मापदंड लता मंगेशकर हा झाला.


१९८०च्या दशकात सुभाष घई यांचा कर्ज हा चित्रपट आला होता. त्यावेळी एचएमव्हीचा रौप्य महोत्सव आणि लता मंगेशकर यांनी वयाची पन्नास वर्ष पूर्ण केली होती. एचएमव्हीने यासाठी खास ओम शांती ओम गाण्यासाठी एचएमव्ही रेकॉर्डप्लेअरचा सेट केला होता आणि त्यावर ऋषी कपूर नाचणार होता. या चित्रपटातील सगळी गाणी सुपरहिट आहेत. रफी, लता आणि किशोरकुमार यांच्या या हिट संगीतप्रधान चित्रपटात एक गाणे तू कितने बरसकी? तू कितने बरसका? मैं सोला बरस की, तो मैं सतरा बरस का हे गाणे टिना मुनीम आणि ऋषी कपूर यांच्यावर चित्रित झालेले होते. पण सोळा वर्षांच्या मुलीचा गोड आवाज पन्नाशीतील लता मंगेशकर यांचा होता. त्यानंतर एक दुजे के लिये या गाण्यातील त्यांची सगळीच सुपरहिट गाणी आहेत. पण सोला बरस की बाली उमर को सलाम या गाण्यातील त्यांची आर्तता पन्नाशीतील नाही तर सोळा वर्षांचीच होती. ही समरसता फार महत्त्वाची होती.

सभ्यता, सुसंस्कृतपणा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेज लता मंगेशकर होते. कोणाचाही एकेरी उल्लेख नाही. सर्वांना आदराने आणि प्रेमाने बोलण्याची त्यांची खासियत ही खरी सभ्यता त्यांनी जपली होती. हा सगळा अनमोल ठेवा ठेवून लता मंगेशकर गेल्या आहेत. लता मंगेशकर यांनी भरपूर संगीत ठेवा आपल्याला दिला आहे. ही सांगितीक संपत्ती कधीच न संपणारी आहे. ते संगीताचे विद्यापीठ म्हणून भावी गायकांना उपयोगी पडणार आहे. किती पिढ्या येतील जातील पण हे लता मंगेशकर नावाचे सप्तसुर त्या संगीताला भेटल्याशिवाय कोणतेही संगीत अपूर्ण असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: