गोवा विधानसभेच्या चाळीस जागांसाठी सोमवारी मतदान झालं. गोमंतकीय मतदारांनी नेहमीप्रमाणेच भरघोस मतदान करून आपली राजकीय जागरूकता पुन्हा एकवार दाखवून दिली आहे. अर्थात हे इतकं छोटं राज्य आहे की, आमची मुंबई, ठाणे महापालिका या विधानसभेपेक्षा दहा पटीने अधिक मोठी आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे जास्त मतदान होते, स्थानिक निवडणुकीच्या वातावरणाचा तो परिणाम असतो, तसाच प्रकार गोवा विधानसभा निवडणुकीत असल्यामुळे इथे नेहमीच मतदानाची टक्केवारी जास्त असते; पण गोव्यातील मतदानाचा कौल सांगणे सोपे नसते. त्याचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. अनेक धक्कादायक निकाल इथे लागत असतात. त्यामुळे अपेक्षेपेक्षा वेगळा निकाला लागला तर आश्चर्य नाही, त्यापेक्षा इथल्या निकालाची कोणीच अपेक्षा करू नये, हे खरे आहे.
कोरोनाची तिसरी लाट आणि गोव्यातील एकूण राजकीय साठमारीमुळे आलेला निरुत्साह या दोन्ही गोष्टी बाजूला सारून आणि जोडून तीन दिवस सुट्टी आलेली असतानाही बाहेरगावी न जाता मतदारांनी आपला मताधिकार व्यवस्थित बजावला आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानकेंद्रांची संख्या अधिक असूनदेखील सोमवारी सकाळपासूनच बहुतेक मतदारसंघांतील मतदानकेंद्रांवर रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या आणि दुपारनंतरही मतदारांचा हा जोश कायम होता. मतदान मोठ्या प्रमाणात होणे याचाच अर्थ मतदार लोकशाहीने बहाल केलेल्या आपल्या कर्तव्याप्रती जागरूक आहेत, असा होतो. परंतु, त्याची राजकीय समज किती आहे आणि योग्य लोकप्रतिनिधी निवडून देण्याइतपत त्याला परिपक्वता आहे का, हे येत्या १० मार्च रोजी कळणार आहे. कुणी कितीही अंदाज वर्तवले, एक्झीट पोलचा अंदाज वर्तवला तरीही तो एक्झीट पोलचा निकाल हा एक्झॅक्ट निकाल असेल, असे नाही.
खरंतर आजवरच्या निवडणुकांपेक्षा यावेळची ही विधानसभा निवडणूक बरीच वेगळी होती, हे तर वारंवार नमूद केले गेले आहे; पण तसे काही वाटत नाही. पात्र बदलतात, सोंग तिच असतात. तसाच काहीसा प्रकार आहे. मुख्य स्पर्धक इथे भाजप आणि काँग्रेस आहेत. त्यामुळे आलटून पालटून आणि उलथून सत्ता मिळवणे आणि सत्ता नाट्य रंगणे हे इथले कायमचे वैशिष्ट्य राहिले आहे. बहुतेक मतदारसंघांमध्ये यावेळी बहुरंगी लढती झाल्या आहेत. सत्ताधारी भाजप एकीकडे आणि विरोधकांची विखुरलेली ताकद दुसरीकडे असा हा एकंदर सामना आहे. भाजपातून ठिकठिकाणी झालेली बंडखोरी, सरकारच्या कामगिरीप्रतीचे असमाधान एका बाजूला आणि राज्यात बाहेरून आलेल्या नवनव्या राजकीय पक्षांच्या गलबल्यामुळे आणि त्यांच्यात पुन्हा एकवाक्यता नसल्याने मतदारांत उडालेला गोंधळ दुसºया बाजूला, असेच चित्र या निवडणुकीत सर्वसाधारणपणे पाहायला मिळाले.
गोव्यात या निवडणुकीत उतरलेल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांची त्यामागील नेमकी उद्दिष्टे काय, याचीच शंका यावी अशा प्रकारे त्यांनी भूमिका घेतलेल्या पाहायला मिळाल्या. काँग्रेस पक्षाने आपला स्वबळाचा हेका शेवटपर्यंत सोडला नाही. केवळ दिगंबर कामत यांच्या मध्यस्थीमुळे गोवा फॉरवर्डचा युतीचा टिळा त्यांनी लावून घेतला असला, तरी भाजपला सत्तेवरून खाली उतरवण्याची भाषा करणाºया बाकी सर्व पक्षांना त्यांनी आपल्यापासून कटाक्षाने दूर ठेवले. आपले आजवरचे सर्व बाहुबली उमेदवार बघता-बघता पक्ष सोडून गेल्याने बहुतेक सर्व नवखे उमेदवार निवडणुकीत उतरवण्याची पाळी काँग्रेसवर आली. तृणमूल काँग्रेसचे एकूण लक्ष्यही भाजपपेक्षा काँग्रेसच अधिक असल्याचे सतत दिसत राहिले. मगो पक्षाने आपल्या विचारधारेशी सुतराम संबंध नसलेल्या तृणमूल काँग्रेसशी यावेळी गाठ बांधली. आम आदमी पक्षाने यावेळी सुरुवातीपासूनच आपला एकला चलो रेचा मार्ग अवलंबिला. दिल्लीप्रमाणे गोव्यातही राजकीय चमत्कार घडवण्याचे स्वप्न तो पक्ष पाहत आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, आरजीपासून जय महाभारत पक्षापर्यंत अनेक पक्ष आणि त्याहून अधिक अपक्ष उमेदवार यावेळी रिंगणात आहेत. खुद्द सत्ताधारी भाजपपासून दुरावलेले अनेक जण अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरलेले आहेत. त्यामुळे मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात होऊन कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही, अशी अवस्था इथे घडल्यास आश्चर्य नाही. किंबहुना अपक्ष आणि इतरांचे संख्याबळ वाढले, तरी आश्चर्य वाटायला नको.
या निवडणुकीत उतरलेल्या राजकीय पक्षांचे आणि अपक्षांचे मोठे प्रमाण पाहिले, तर निवडणुकीनंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार की, त्रिशंकु स्थिती निर्माण होणार ही खरी चिंता आज गोमंतकीय मतदाराला सतावत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल काँग्रेसच्या बाजूने गेला होता, परंतु भाजपने रातोरात सर्जिकल स्ट्राइक करून सरकार घडवले होते आणि त्याला स्थैर्य देण्यासाठी पुन्हा दोन सर्जिकल स्ट्राइकही केले होते. त्रिशंकू स्थिती उद्भवली, तर गेल्यावेळच्या चुका यावेळी होणार नाहीत, असे काँग्रेस नेते सांगत आहेत. सत्ताधारी भाजपला स्वबळावर २२ जागा जिंकण्याचा विश्वास आहे. प्रश्न एकच आहे. समजा त्रिशंकु स्थिती उद्भवली, तर या निवडणुकीपूर्वीची आपली भूमिका एका रात्रीत सोडून देऊन सरकार बनवणाºया पक्षामध्ये, तर निर्वाचित उमेदवार उडी घेणार नाहीत ना? मतदारसंघाचा विकास, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा अशी कारणे मग आपल्या भूमिका बदलताना मग पुढे करीत असतात. गेल्या निवडणुकीत तर आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच पक्षत्याग करून सत्तेच्या गोटात शिरण्याचा प्रकार झाला होता. यावेळी पक्षांतर करणार नाही, अशा शपथा काय घेतल्या गेल्या आहेत, प्रतिज्ञापत्रे काय भरली गेली आहेत; प्रत्यक्षात ही मंडळी निवडून आल्यास कशी वागते ते मतदार पाहणारच आहे. त्यामुळे मतदानाचा पहिला अंक पूर्ण झालेला आहे. गोमंतकांच्या राजकीय नाट्याला सुरुवात ही १० मार्चला निकाल लागल्यावरच होईल, असे दिसते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा