रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

एकाकी पडलेल्या नलिनी जयवंत


आपल्या ऐन उमेदीच्या काळात चांगले यशस्वी झालेले, पण काळाच्या पडद्याआड जाण्यापूर्वी अज्ञातवासात गेलेले अनेक शापीत कलाकार या इंडस्ट्रीने पाहिले आहेत. हे कलाकार कधी काळाच्या पडद्याआड गेले हे पण कालांतराने कळावे इतकी शोकांतिका त्यांच्या बाबतीत घडलेली दिसते. अशाच शापीत कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री नलिनी जयवंत. आज १८ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस. मुंबईस्थित असलेल्या या एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या, हे नव्या पिढीला आज सांगावे लागेल. म्हणजे बॉलीवूडच्या कृष्ण-धवल काळातील १९४० आणि १९५०च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटांत प्रामुख्याने काम केले आणि आपली ओळख निर्माण केली होती.


नलिनी जयवंत यांचा जन्म १९२६ मध्ये मुंबई येथे झाला. त्यांना त्यांच्या नात्यातूनच हा कलेचा वारसा लाभला होता. म्हणजे अगदी बादरायण संबंध जोडायचा नाही तर या सृष्टीत कलाकारांमध्ये परस्परांशी नातेसंबंध खूप असतात. तसेच नलिनी जयवंत यांच्याबाबतीतही होते. ते म्हणजे मराठी/हिंदी चित्रपट अभिनेत्री रतन बाई या नलिनी जयवंत यांच्या आत्या होत्या. आता रतनबाई कोण तर रतन बाईची मुलगी अभिनेत्री शोभना समर्थ होत्या. शोभना समर्थच्या मुली नूतन आणि तनुजा या आहेत. नव्या पिढीच्या माहितीसाठी नूतनचा मुलगा मोहनीश बहेल तर तनुजाची कन्या काजोल. अशा या कलाकारांच्या मागच्या पिढीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नलिनी जयवंत होत्या. कृष्ण-धवल चित्रपटाच्या काळात त्यांनी आपली कारकीर्द गाजवली असली, तर उत्तरार्धात त्यांनी १९८३ मध्ये त्यांनी नास्तिक या हिंदी चित्रपटात शेवटचे काम केले होते. विशेष म्हणजे नास्तिक या नावाचे दोन चित्रपट बनले त्या दोन्हीतही त्या होत्या हे विशेष. एका चित्रपटात जो १९५४ ला बनला होता त्यात त्या नायिका होत्या, तर १९८३च्या चित्रपटात त्या चरित्र अभिनेत्री होत्या. अर्थात तेव्हा पासून नलिनी मुख्यत: एकाकी जीवन जगत होत्या.

नलिनी जयवंत यांचा विवाह १९४५ मध्ये दिग्दर्शक वीरेंद्र देसाई यांच्याशी झाला होता, मात्र जेमतेम तीन वर्षांच्या कौटुंबिक सहवासानंतर त्यांचा १९४८ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर जवळपास १२ वर्षे त्या एकट्या होत्या. पण चित्रपट क्षेत्रात काम करत असल्याने त्या व्यस्त होत्या, मात्र नंतरच्या काळात नव्यानव्या नायिका आल्या आणि त्यांच्या कारकिर्दीला ओहोटी लागली. त्यानंतर त्यांनी १९६० मध्ये अभिनेते प्रभू दयाल यांच्याशी लग्न केले. या जोडप्याने त्याकाळी बºयाच चित्रपटांमध्ये काम केले होते.


नलिनी जयवंत यांचे २२ डिसेंबर, २०१० रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी, युनियन पार्क, चेंबूर, मुंबई येथे निधन झाले. या ठिकाणी त्यांचे वास्तव्य जवळपास ६० वर्षे होते, पण एवढी गाजलेली आणि एक जमाना गाजवलेली अभिनेत्री मृत्यू पावल्याचे कोणाच्याही लक्षात आले नव्हते. नलिनी जयवंत यांच्या मृत्यूच्या तीन दिवसांनंतर रुग्णवाहिकेने त्यांचा मृतदेह घेऊन जाईपर्यंत तिचा मृत्यू कोणाच्याही लक्षात आला नाही. त्यावेळी नलिनी जयवंतच्या शेजाºयांनी सांगितले की, तिने स्वत:ला समाजापासून वेगळे केले होते. त्यांचा जीवनसाथी त्यांच्याअगोदर दहा वर्षे म्हणजे २००१ मध्ये हे जग सोडून गेला होता. त्यामुळे दयालच्या मृत्यूनंतर ती लोकांना भेटत नव्हती. तिचे नातेवाईकदेखील तिच्याशी बराच काळ संपर्कात नव्हते. त्यामुळे या अभिनेत्रीची अखेरही एकाकी अशीच झाली, पण आपण केलेल्या कामामुळे त्यांच्यावर चित्रित झालेल्या काही लोकप्रिय जुन्या गाण्यांमुळे त्या आजही स्मरणात राहतील अशा नोंदी आहेत.

तो काळ हिंदी चित्रपट सृष्टीतील सुमधुर गाण्यांचा असल्याने नलिनी जयवंत यांच्यावर चित्रित केलेली काही प्रसिद्ध गाणी आजही अनेकांना आठवतात. कधीतरी म्युझिक चॅनलवर अशी गाणी पाहायला मिळतात. यामध्ये ठंडी हवाएं लहरा के आएं...(नौजवान); नजर लगी राजा तोहरे बंगले पे...(काला पानी); तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार...(नास्तिक); हाए जिया रोए...(मिलन); गिन गिन तारे मैं हार गई रात को...(जादू); हाय जिया रोये पिया नही आए...(मिलन); जिन्दगी भर गम जुदाई का...(मिस बॉम्बे); बुझ गए आशा के दिए बदले रंग जहां के...(शिकस्त); ओ जाने वाले राही इक पल रुक जाना...(राही); कहां ले चले हो बता दो मुसाफिर...(दुर्गेश नन्दिनी); ओ माटी के पुतले इतना ना कर गुमान...(शेरू); जीवन के सफर में राही, मिलते हैं बिछड़ जाने को...(मुनीम जी) ही गाणी आजही अनेकांच्या तोंडावर आहेत.


देवानंदच्या नवकेतन फिल्मची निर्मिती असलेल्या काला पानी यात देव आनंद, मधुबाला आणि नलिनी जयवंत हे प्रमुख कलाकार होते. लॉकडाऊनच्या काळात क्लासिक चॅनलवर हा चित्रपट अनेकवेळा दाखवला जात होता. यात आपल्या वडिलांचे निदोषत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या देव आनंदला अखेरच्या क्षणी पुरावा मिळवून देणारी सहनायिका किशोरीची भूमिका नलिनी जयवंत यांनी केली होती. त्यांचे असे अनेक गाजलेले चित्रपट आहेत की ते त्यांच्या आठवणी जागृत ठेवतील.

प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन


9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: