शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

तोतया शिक्षक

 आजवर आपण विविध वृत्तांमधून पोलीस असल्याचे भासवून तोतया पोलिसाकडून फसवणूक झाली, कोणा बोगस डॉक्टरांवर कारवाई झाली. बनावट डॉक्टर, बनावट तोतया पोलीस त्याप्रमाणे खंडणी मागणारे बनावट बोगस पत्रकार असल्याचेही अनेकवेळ ग्रामीण भागांतून ऐकायला मिळते. बनावट नेते, बनावट अधिकारी असे भासवून अनेकांची लूट होताना नियमित वृत्त सर्वत्र प्रसिद्ध होत असतात. बनावट संत, भोंदुगिरी, उपचार सांगणारे काही महाराज असे अनेक बनावट प्रकार आपण पाहत असतो. अमूक एका मंत्र्याचा पीए आहे, असे सांगून लुटणारे आपण बातम्यांमधून अनेकवेळा वाचले आहे; पण बोगस शिक्षक किंवा बनावट शिक्षक हे प्रकरण जेव्हा समोर आले, तेव्हा मात्र सगळेच जण हैराण झाले, कारण शिक्षकी पेशाबाबत एक प्रकारचा आदरभाव मनात असतो. असे आदरणीय स्थान जेव्हा बोगस असल्याचे समोर येते, तेव्हा प्रचंड धक्का बसतो.


हे सांगण्याचे कारण म्हणजे, टीईटी परीक्षा २०१९ च्या परीक्षेत तब्बल ७ हजार ८८० जणांना बनावट पद्धतीने प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे. त्याबाबतची पत्त्यांसह यादी तयार झाली आहे. संख्या मोठी असल्याने दोषानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सरकारचे म्हणणे आहे. जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचा संस्थापक गणेशन ट्रांझिट रिमांड घेऊन पोलिसांसमोर हजर झाला असून, त्याची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली; पण विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी, संस्कार करण्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी टाकायची ते मास्तर लोक जर सुसंस्कृत नसतील, स्वच्छ चारित्र्याचे नसतील, गुणवत्तेवर त्यांनी शिक्षकाचे पद मिळवलेले नसेल आणि ते भ्रष्ट मार्गाने मिळवण्याचे काम केले असेल, तर त्यांच्याकडून विद्यार्थ्यांनी काय शिकायचे?

एखाद्या वारांगनेकडून सतीचे पुराण ऐकण्याचा प्रकार म्हणजेच अशा बोगस शिक्षकांडून शिक्षण घेणे आहे, असे म्हणावे लागेल. भावी पिढी कशी तयार होणार हा फार मोठ्या चिंतेचा विषय आहे. राज्यात तब्बल ७ हजार ९०० बोगस मास्तर कुठे तरी बोगस प्रमाणपत्रांवरून रूजू होतात. हे काय शिकवणार आहेत मुलांना?, सभ्यतेच्या कोणत्या गोष्टींचा आदर्श हे शिक्षक ठेवणार आहेत? शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे हे काम आहे. केवळ नोकरीसाठी वाटेल त्या थराला जाणारे हे लोक मास्तर किंवा शिक्षक म्हणायच्या लायकीचे आहेत का?, अर्थात पकडला तर चोर नाही, तर देवाहून थोर असे आपण म्हणतो. आज हे सात-आठ हजार जणांचे प्रकरण पुढे आले. यापूर्वीही असे हजारो शिक्षक भरती झाले नसतील कशावरून?, एकूणच शिक्षण क्षेत्रावरचा विश्वास उडवणारी, शिक्षकी पेशावरचा विश्वास उडवणारी ही घटना आहे.


हे कशाने झाले? दहावी-बारावीला मार्क कमी पडले. का कमी पडले याचा शोध न घेता आता काही तरी केले पाहिजे. डॉक्टर होता आले नाही, इंजिनिअरींग साइडला जाण्यासाठी पुरेसे मार्क नाहीत. मग इतके कमी मार्क पडले आहेत, तर कुठे डी.एड करा, बी.एड करा आणि शिक्षकी पेशा पत्करा ही प्रवृत्ती फोफावली आहे. काही जमले नाही, म्हणून शिक्षक झालो. हे शिक्षक नाहीत, हे तर पोटार्थी आहेत. शिक्षकी पेशा हे एक व्रत असते. शिकवण्याची आवड लागते. लोकांना शिकवण्याचा ध्यास असतो; पण हे शिक्षक फक्त पैसा कमवण्यासाठी, चरितार्थासाठी काम पाहिजे म्हणून आलेले शिक्षक आहेत. त्यासाठी कोणत्याही थराला जाऊन हे काम मिळवणे या ध्येयाने असलेले शिक्षक आहेत. अशा शिक्षकांमुळे संपूर्ण शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. त्यामुळे या बोगस शिक्षक म्हणून ज्यांनी बनावट प्रमाणपत्र मिळवून नोकºया मिळवल्या आहेत त्या सर्वांना कडक शासन झाले पाहिजे. हे देशविघातक कृत्य आहे. देशातील भावी पिढी बरबाद करण्याचे काम या सात-आठ हजार शिक्षकांकडून होणार होते. त्यामुळे त्यांना कडक कायदे लावून शिक्षा केली पाहिजे.

सन २०१९ ची शिक्षक पात्रता परीक्षा २०२० मध्ये पार पडली. या परीक्षेच्या निकालात १६ हजार परीक्षार्थींपैकी ७ हजार ८८० परीक्षार्थींना बनावटरीत्या पास केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी अंतिम निकालाची यादीची फेरतपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात बोगस परीक्षार्थी यादी टाकण्यात आल्याचे दिसून आले. हे अत्यंत भयानक कृत्य आहे. या तोतया मास्तरांनी काय केले नाही? त्यांनी परीक्षार्थींच्या ओएमआर शीटमध्ये बदल केला. ओेएमआर शीट स्कॅननंतर निकालात बदल केला. जातीचा रकाना बदलून उत्तीर्ण केले. तिन्ही प्रकारांत न बसणाºयांना बनावट प्रमाणपत्र दिले. अशाप्रकारे साधारण तीनशे प्रमाणपत्रे बोगस असल्याचे समोर आले आहे. टीईटी प्रमाणपत्र प्रत्यक्ष देणे आवश्यक असूनही काहींना ते पोस्ट, कुरिअरने पाठवले गेले. ही सविस्तर माहिती जिल्ह्यांकडून मागवण्यात आली आहे. आतापर्यंत चार ते पाच जिल्ह्यांतील ३०० बोगस प्रमाणपत्रांची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. सर्व माहिती पडताळणी करून अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. हे कधी होणार आहे?, हा एकप्रकारचा देशविघातक असा शिक्षण क्षेत्रावरचा हल्ला आहे. त्यामुळे या बोगस तोतया शिक्षकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: