गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

घंटा वाजणार

 शुक्रवारी संध्याकाळीच राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली. ती म्हणजे ४ आॅक्टोबरपासून शाळा-महाविद्यालये सुरू होणार आहेत, तर ७ आॅक्टोबरपासून मंदिरे धर्मस्थळे, प्रार्थनास्थळं उघडली जाणार आहेत. त्यामुळे आता शाळा म्हणजे विद्या मंदिर आणि मंदिर अशा दोन्ही घंटा पुढच्या महिन्यात वाजणार असल्यानं थोडे समाधान वाटले.


आॅक्टोबरमध्ये तिसरी लाट येणार, तिसºया लाटेत लहान मुलांना धोका असेल, अशी भीती घातली जात असतानाच अचानकपणे आपण कोरोनावर बºयापैकी नियंत्रण मिळवल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शाळा आणि मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. अर्थात त्यासाठी काही अटी आहेत; पण त्याचे पालन आता इथून पुढे कायमच करावे लागणार आहे.

राज्यात ४ आॅक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी परवानगी दिली आहे. शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे शाळा सुरू करण्यास परवानगी मागितली होती. त्यामुळे पुढील महिन्यात शाळेची घंटा वाजणार आहे. त्यानुसार आता ग्रामीण भागांत पाचवी ते बारावी, तर शहरी भागांत आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शाळा सुरू करण्याअगोदर शिक्षक आणि पालकांना प्रशिक्षण देणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले आहे. आधी कोरोनामुक्त झालेल्या ठिकाणी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र टास्क फोर्ससोबत चर्चेनंतर आता ग्रामीण भागांत पाचवी ते बारावी आणि शहरी भागांत आठवी ते १२ वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण मंत्री गायकवाड यांनी सांगितले आहे. शाळा सुरू करण्याअगोदर आजारी मुलांना कसे शोधायचे? त्यासंदर्भात टास्क फोर्स ट्रेनिंग देणार आहे. यासोबतच पालकांनी काय काळजी घ्यायची यासंदर्भातही आम्ही माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे तसे अवघड काम आहे, कारण शिक्षक आणि पालकांचे याला कितपत सहकार्य मिळते हे पाहावे लागेल; पण ते सहकार्य सर्वांनी करणे आवश्यक आहे. आता जर शाळा सुरू झाल्या, तर पुढील वर्षी तरी दहावी-बारावीच्या परीक्षा होतील, अशी अपेक्षा आहे. २०२२ हे वर्ष तरी आरोग्यदायी असायला हरकत नाही.


राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत याआधी शिक्षण विभागाकडून तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या; मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, त्यासोबत तिसºया लाटेची शक्यता पाहता अनेक मोठ्या शहरांत शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. आता मात्र शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने नेमलेले तज्ज्ञ डॉक्टरांच्या चाइल्ड टास्क फोर्स सकारात्मक असून, कोरोना स्थिती नियंत्रणामध्ये राहिल्यास दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास त्यांनी हिरवा कंदील दाखवला होता. ही एक चांगली बाब म्हणावी लागेल. अर्थात शाळा सुरू करण्यापूर्वी याआधी ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या आहेत, त्याबाबतची तयारी शिक्षण विभागला करायची आहे. शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे लसीकरण पूर्ण करणे, शाळा सॅनिटाइज करणे, शाळेत आरोग्य कक्ष तयार ठेवणे, अशी तयारी शिक्षण विभागाला यादरम्यान पूर्ण करायची आहे. टास्क फोर्स किंवा राज्य सरकारच्या शाळा सुरू करण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचना या जिल्हास्तरावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पाळायच्या आहेत. त्यामुळे स्थानिक कोरोना परिस्थितीचा विचार करून त्यानुसार शाळा सुरू करण्याबाबतचे नियोजन जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या आदेशानुसार होईल. शिक्षण विभागाने लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षकांचा डेटा मागवला असून, शाळा सुरू करण्याबाबतची तयारी सुरू ठेवली आहे. सोबतच मुंबई महापालिका शिक्षण विभागसुद्धा शाळा सुरू करण्याबाबतच्या तयारीचे नियोजन करत असल्याचे सांगितले जात आहे. ही एक गेल्या काही दिवसांतील अत्यंत आनंदाची बातमी आहे.

त्याचप्रमाणे आणखी एक आनंदाची बाब, म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत काही दिवसांपूर्वी विधान केले होते. त्यातच आता राज्यातील मंदिरे ७ आॅक्टोबरपासून खुली होणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडली जातील, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी मंदिरे खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. दुसºया लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसºया लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे; मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बºयाच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये उतार येत असला, तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. चेहºयावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे, हे विसरू नये, असेदेखील मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यात कोरोनाचे संकट कायम असल्याने मंदिरे बंद ठेवण्यात आली होती; पण आता राज्य सरकारने गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्राच्या पहिल्याच दिवशी कोरोना नावाच्या दैत्याशी लढण्याचे सामर्थ्य भक्तांना मिळणार असून, देवीचे दर्शन घेणे शक्य होणार असल्याने त्या शक्तीस्वरूपा देवीची आराधना फळाला येणार, असे म्हणायला हरकत नाही; पण येत्या काही दिवसांत शाळा आणि मंदिरांच्या घंटा वाजणार हे मात्र नक्की झाले आहे, सर्वसामान्यांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: