गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

संकटपासून दूर राहायला शिका.


दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्रच नाही, तर देश हादरला. हादरला आणि त्या बालिकेची अवस्था पाहून हळहळला. डोंबिवलीत १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या २९ आरोपींपैकी २३ जणांना अटक करण्यात आली आहे. उरलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे, पण हा सगळा प्रकार आपल्या परिचितांकडूनच झालेला आहे हे नक्की. त्यामुळेच कोणाला किती जवळ करायचे, कोणावर किती विश्वास ठेवायचा याचाही विचार केला पाहिजे. ओळखीचा फायदा घेऊन, परिचयातील व्यक्तींकडूनच अशा घटना घडत असतात हे लक्षात घेतले पाहिजे.


या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या माहितीनुसार जे समोर आले आहे, ते अत्यंत गंभीर असे चित्र आहे. त्या पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्यावर जानेवारी महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत गेले आठ-नऊ महिने बलात्कार करण्यात येत होता. त्या मुलीने इतके महिने हे अत्याचार कसे सहन केले, याचीच कल्पना करवत नाही. पण वेळीच आपल्या पालकांना, घरच्यांना तिने विश्वासात घेऊन न घाबरता कल्पना दिली असती, तर कदाचित पुढचे अत्याचार थांबले असते. वय वेडे असते. फसवले जाण्याचे प्रकार घडतात, पण त्यातून सावरता येणेही फार महत्त्वाचे असते. बलात्कार करणारी मुले ओळखीची आणि मित्र असल्याची माहिती पीडित मुलीने दिल्याचे पोलीस अधिकाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळेच लक्षात घेतले पाहिजे की, आजपर्यंत जेवढ्या बलात्काराच्या घटना घडल्या आहेत, त्यात एखाद दुसरा अपवाद वगळता अशा घटना जवळच्या व्यक्ती, ओळखीचे लोक, नातेवाईक यांच्याकडून होत असतात. ओळखीचा गैरफायदा घेत या घटना घडत असतात. त्यामुळे कितीही विश्वास असला तरी कोणाला किती जवळ करायचे हे लक्षात घेतले तर अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. आता यावरून राजकारण होईल, मोर्चे निघतील, आंदोलने होतील, पण त्याला काही अर्थ नाही. अशा घटना घडूच नयेत, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपणच सावध राहण्याची गरज आहे हे मुलींनी लक्षात घेतले पाहिजे. पालकांनीही कोणावर किती विश्वास ठेवायचा, कोणाबरोबर आपली मुलगी गेली आहे यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. कितीही विश्वासू असला, जवळचा असला, तरी त्याच्याकडून विश्वासघात होणार नाही ना याचा विचार केला पाहिजे.

डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराच्या या घटनेबाबत जी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यातून मुलीच्या तक्रारीनुसार तिच्यावर डोंबिवली, बदलापूर, रबाळे आणि मुरबाड यांसारख्या ठिकाणी चार-पाच वेळा बलात्कार करण्यात आला. या पीडित मुलीने २९ मुलांविरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे. इतकेवेळा हे प्रकार घडत गेले, कारण हा ओळखीचा घेतलेला गैरफायदा होता. प्रकरण हाताबाहेर गेल्यानंतर ही गोष्ट बाहेर आली. पीडित मुलगी 15 वर्षांची असल्याने पोलिसांनी पॉस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यापैकी २३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी दोन अल्पवयीन मुले आहेत. पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तिच्या प्रियकराने तिची एक व्हिडीओ क्लिप काढल्याचे म्हटले आहे. हे प्रकार कसे काय सुचले त्याला? या वयात अशी कृती करणारा तो प्रियकर कसा काय असू शकतो? त्यामुळे अशा घटना घडू नयेत म्हणून मुलींनी सावधगिरी बाळगली पाहिजे. कोणी आपले फोटो काढत नाही ना? आपण सोशल मीडियावरून कोणाशी अनावश्यक बोलत नाही ना? आपली अनावश्यक माहिती देत नाहीना याचाही विचार केला पाहिजे. या वेड्या वयात आपल्या पालकांपासून दूर जाण्याची चूक कुणीही करू नये. जानेवारीत त्या प्रियकराने असे काही केल्यावर, आपली क्लीप बनवली आहे हे समजल्यावर तिने लगेच आपल्या पालकांना सांगितले असते, तर पुढचा अनर्थ टळला असता. वेळीच घातलेला एक टाका पुढचे सात टाके वाचवतो. त्याप्रमाणे तिने जर वेळीच सांगितले असते, तर पुढचे बलात्कार टळले असते. त्यामुळे या घटनेवरून सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे की, आपल्या आई-वडिलांपासून काही लपवून न ठेवता मोकळेपणाने बोला आणि संकटपासून दूर राहायला शिका.


डोंबिवलीसारख्या भागात अशी घटना अतिशय गंभीर आहे. यातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. आरोपींना जरब बसेल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी राज्य सरकारने आतातरी तातडीने आणि गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे हे म्हणणे खूप सोपे आहे. पण आरोपींना शिक्षा होऊनही त्या बालिकेचे झालेले शारिरीक, मानसिक नुकसान भरून येणार आहे का? तिचे झालेले मानसिक खच्चीकरण, तिचे पुनर्वसन हा प्रश्न फार मोठा आहे. तिचे भवितव्य, शिक्षण याचाही विचार करायला पाहिजे.

ज्या घरात मुली आहेत, त्या घरातील पालक अशा घटनांमुळे चिंतीत आहेत. असा प्रकार कोणाबरोबरही घडू शकतो, या भीतीच्या सावटाखाली महाराष्ट्र आहे. आॅनलाइन शिक्षणामुळे हातात आलेला मोबाइल आणि त्यातून अभ्यासाव्यतिरीक्त काही बाबी मुलांपर्यंत पोहोचल्यामुळे अशा घटना घडत आहेत काय याचाही विचार केला पाहिजे, पण हातात आलेल्या या नव्या तंत्राचा वापर अभ्यासासाठी करता आला पाहिजे, अशी सद्बुद्धी आता सर्वांना मिळाली पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: