गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

गुजरातमध्ये भाजप काँग्रेसचा विक्रम मोडणार का?


एकाच पक्षाचे सरकार दोन दशकांपासून असणे ही प्रथा आपल्याकडे फारशी पचनी पडणारी नाही. बहुतेक राज्यांमध्ये जास्तीत जास्त दोन दशके एखादा पक्ष आपले सरकार स्थापन करू शकतो; पण नंतर जनता त्यात बदल करते. त्यांनी काम चांगले केले असो वा नसो एकाच पक्षाकडे सातत्याने सत्ता राहण्याला जनता कंटाळलेली असते, त्यामुळे हा बदल घडतो; पण सर्वात दीर्घ काळ कोणत्याही पक्षाला संधी ही गुजरातमध्ये मिळाली आहे, म्हणूनच गुजरातमध्ये भाजप काँग्रेसचा विक्रम मोडणार का? विक्रमाशी बरोबरी करणार का, हे येत्या काही दिवसांत बघावे लागेल.


गुजरात राज्याची निर्मिती झाल्यानंतर १९६० ते १९९० पर्यंत सलग ३० वर्ष काँग्रेसने गुजरातमध्ये राज्य केले. अगदी आणीबाणीच्या काळातही सगळीकडे काँग्रेसची पडझड होत असताना, काँग्रेसला गुजरातने संधी दिली होती; मात्र १९९०मध्ये गुजरातमधील काँग्रेसचे वर्चस्व कमी केले ते भारतीय जनता पक्ष आणि जनता दल यांनी. त्यानंतर १९९५ला जो भाजप गुजरातमध्ये सत्तेवर आला तो सलग अडीच दशके सत्तेवर आहे. पुढील वर्षी निवडणुकांपर्यंत २७ वर्ष भाजप गुजरातमध्ये पूर्ण करेल. त्यामुळे त्यानंतरची टर्म गुजरातमध्ये भाजपला मिळणार का? मतदारांचा कौल टिकवणार का? काँग्रेसचा तीस वर्षांचा विक्रम मोडणार का? या प्रश्नांची उत्तरे मिळतील.

गुजरातबरोबरच महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे; पण महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वात प्रथम सत्ता अठरा वर्षांनी गमवावी लागली. १९७७च्या लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेसची जी अनेक शकले झाली, गटतट पडत गेले त्यात शरद पवारांची खेळी यशस्वी होऊन काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले गेले आणि पुलोदचे सरकार आले. त्याचप्रमाणे प. बंगालमध्ये डाव्यांची सत्ता २४ वर्षांनी गेली. त्याठिकाणी तृणमूल काँग्रेसची सत्ता आली. पंजाबमध्ये सलग दोन निवडणुका जिंकणे कोणत्याही पक्षाला अवघड असते; पण देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात १९५१ पासून १९७७पर्यंत सलग अडीच दशके काँग्रेसची एकहाती सत्ता होती; पण त्यानंतर मात्र जनता पक्ष, जनता दल, भाजप, बसप, समाजवादी पार्टी यांनी आलटून पालटून सत्ता मिळवली. पुन्हा कोणालाही सलग सत्ता मिळालेली नाही. बिहारमध्येही सातत्याने सत्तांतर होत राहिले आहे. देशात बहुतेक ठिकाणी असे बदल होत असताना, दीर्घकाळ सत्ता स्थापन करण्याची परंपरा फक्त गुजरातमध्ये राहिलेली आहे. त्यामुळे या आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष काँग्रेसचा हाच विक्रम मोडणार का हे पहावे लागेल.


सध्याचे भाजपचे नियोजन हे त्याच दृष्टीने चाललेले दिसते. मागच्याच आठवड्यात विजय रूपाणी यांचे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणे, भूपेंद्रकुमार पटेल यांचे नवे भाजपचे सरकार येणे, या सरकारमध्ये जुन्या कोणत्याही मंत्र्याला संधी न मिळणे, हे सगळे भाजपच्या दृष्टीने शुद्धीकरणाचे प्रकार होते. त्याप्रमाणे त्यांनी ती शुद्धी केलेली आहे. आता या शुद्धीकरणानंतर आगामी वर्षभरात भाजपला पुन्हा इथली जनता संधी देणार का, हे पहावे लागेल. तशी संधी मिळाली, तर पुढील पाच वर्षांत काँग्रेसचा सलग तीस वर्ष सत्ता स्थापनेचा विक्रम भाजप मोडू शकते. ही जबाबदारी आता नव्या सरकारपुढे आहे.

कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री बदलाचा निर्णय काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्ये होत असतो. त्याप्रमाणे भाजपचा मुख्यमंत्रीही काँग्रेसप्रमाणे दिल्लीतूनच ठरतो. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी आनंदीबेन पटेल यांना संधी दिली आणि त्या सर्वात पहिल्या गुजरातच्या महिला मुख्यमंत्री झाल्या. पण त्यांना पाच वर्ष संधी देऊन निवडणुकीपूर्वीच त्यांच्या जागी विजय रूपाणी यांना आणले गेले. आनंदीबार्इंच्या नेतृत्वाखाली २०१७च्या निवडणुका लढवणे महागात पडेल हे सूज्ञ भाजप नेत्यांनी ओळखले होते; पण तरीही भाजपने रूपाणींच्या नेतृत्वाखाली ही सत्ता काठावर पास का होईना राखली; पण आता हा धोका पुन्हा पत्करणे भाजपला शक्य नाही. गुजरातमध्ये भाजपला पर्याय फक्त काँग्रेसच होऊ शकतो. मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे वाढते संख्याबळ पाहता काँग्रेस केव्हाही भरारी मारू शकते. त्यामुळे वेळीच योग्य त्या हालचाली करून सत्ता राखण्याचे काम करावे लागेल याची जाणिव भाजप नेत्यांना झालेली आहे. मागच्या निवडणुकीत काँग्रेसचा आलेख वर गेला त्याचे श्रेय अनेकांनी राहुल गांधींना दिले होते. अर्थात ते तितकेसे खरे नव्हते, कारण गुजरातमध्ये निरीक्षक आणि संघटकाच्या भूमिकेत राजीव सातव यांनी केलेली मेहनत फार मोठी होती. आज राजीव सातव यांचे नेतृत्व त्याठिकाणी नाहीये ही काँग्रेसची लंगडी बाजू आहे; पण मागच्या निकालावरून आता मोदींच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली, असे अंदाज सर्व माध्यमांनी विशेषत: इलेक्ट्रॉनिक मीडियाने बांधायला सुरुवात केली. २०१९ला भाजपला पुन्हा सत्ता मिळणार नाही, असेही अंदाज वर्तवले गेले; पण उलट भाजपला २०१४पेक्षा जास्त घवघवीत यश मिळाले. विधानसभेला ज्या प्रमाणात काँग्रेसला जागा मिळाल्या त्या प्रमाणात लोकसभेला साफ पराभव झाला. मग त्या संख्याबळाचे काय झाले? म्हणूनच भाजपने वेळीच हालचाली करून काँग्रेसचा दीर्घकाळ सत्ता स्थापनेचा विक्रम मोडीत काढण्याची तयारी केलेली दिसते. याला कितपत यश मिळणार याचे उत्तर पुढील वर्षी मिळणार आहे.


प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स

9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: