गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

काल्पनिकतेची गरज काय?



कलर्स मराठी वाहिनीवर जय जय स्वामी समर्थ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे; पण मालिका प्रेक्षकांना आवडू लागल्यावर त्यात काही तरी भेसळ करायची, गोंधळ निर्माण करायचा असा मोह निर्माता, दिग्दर्शक आणि लेखकांना आवरत नाही. तसाच प्रकार या मालिकेत होताना दिसत आहे. काही काल्पनिक कथानके घुसडून मूळ श्री स्वामी समर्थांच्या कथानकांबरोबर जोडून अनावश्यक महती वाढवण्याचा प्रकार होतो आहे, हे चुकीचे वाटते.


गेल्या काही दिवसांपासून त्या राधा कलावंतीणीचे कथानक यात दाखवले आहे. त्यात किती काल्पनिक कथानके घुसडायची याला काही मर्यादा असल्या पाहिजेत. विशेषत: जेव्हा अध्यात्मिक, भक्तीविषयक मालिका असतात त्यात काल्पनिक कथानके घुसडणे हे चुकीचे आहे. नाट्यमयता आणणे, रंजकता आणणे ठिक आहे; पण काल्पनिक आणि न घडलेले प्रसंग घुसडणे हे त्या संत महात्म्यांचा अनादर करणारे असे असते. तो प्रकार या मालिकेत टाळण्याची गरज आहे.

श्री स्वामी समर्थांचा भक्त संप्रदाय मोठा आहे. अनेकांना त्यांची अनुभूती आजही येत असते. मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका विश्वातही त्यांचा फार मोठा भक्त संप्रदाय आहे. अनेक कलाकार, तंत्रज्ञ सतत स्वामींच्या नावाचा जप करत असतात. त्यांना त्याची अनुभूती आलेली असते. अशा भक्तांबाबत घडलेल्या कथा या मालिकेत दाखवल्या, तर त्या मान्य करता येतील; पण न घडलेली कथानके त्यात दाखवणे हे स्वामींचे अवमूल्यन करण्यासारखे आहे. किंबहुना त्यांच्या नावावर असे काही खपवणे चुकीचे आहे. त्या राधा कलावंतीणीची वेडसर बहीण जीजा म्हणून दाखवली आहे. ती रस्त्यावर आल्यावर त्या गावातली मुलं आणि मोठी माणसं तिला वेडी म्हणून चिडवतात आणि स्वामी सगळ्यांना रागावतात. हा प्रसंग दाखवला जात असताना, खाली टीप येते की, हा प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहे, फक्त प्रवृत्ती दाखवण्यासाठी म्हणून या प्रसंगाची निर्मिती केलेली आहे; पण रामाचार्य आणि त्याच्या सहकार्यांकडून कितीतरी खलप्रवृत्तीचे दर्शन झालले आहे. त्यासाठी असली भाकड कथानके घालण्याची काहीच गरज नाही. त्यामुळे एका चांगल्या मालिकेची वाट लावण्याचे काम निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक करत आहेत असे वाटते.


या मालिकेत अशा अनेक गोष्टी दाखवल्या आहेत की, त्याचे खरोखरच कुठे दाखले आहेत की नाही, याबाबत शंका येते. दाजिबा सरकार, त्यांच्या आई, दाजिबा सरकारची बायको राणी सरकार यांच्यातील वर्तन, त्यांचे मग्रूरपणे वागणे याचे संदर्भ थोडे संशयास्पद वाटतात. तसेच त्या कलावंतीणीला दाजिबा सरकारने स्वामींची महती कमी करण्यासाठी आणणे आणि तिच्या कुरघोड्या करण्याचे प्रकार चुकीचे वाटतात. प्रत्यक्षात स्वामींपुढे लावणी म्हणायला आल्यावर तमाशातील ढोलकीतून जेव्हा मृदुंगाचे आणि भजनाचे सूर उमटतात, तेव्हाच त्या राधा कलावंतीणीला अनुभूती आलेली आहे. असे असताना पुन्हा तिने कुरघोड्या करणे. स्वामींनी तिच्याकडून चिखलाचे पाय धुवून घेणे हे प्रकार खरोखरच आहेत काय, याबाबत शंका निर्माण होते. त्यामुळे श्रद्धा स्थानांना धक्का लावणारे काल्पनिक कथानक रचणे थांबवले पाहिजे.

खरं तर स्वामी हे अत्यंत प्रेमळ आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणारे आहेत. त्यांचे असे चित्र का उभे केले जात आहे? ते विक्षिप्त आहेत, ते खेकसतात, रागावतात असे कसे काय दाखवले आहे, याचे आश्चर्य वाटते. ही मालिका खूप काळ चालवायची असेल, तर त्यांच्या भक्तांकडून घडलेले किस्से मिळवता येतील. त्यावर मालिका चालेल; पण काल्पनिक कथानकांची घुसखोरी करून स्वामींच्या नावावर खपवण्याचा प्रकार थांबला पाहिजे. एकतर असे काल्पनिक न घडलेले प्रसंग या मालिकेत दाखवायचे आणि खाली हा काल्पनिक प्रसंग आहे, अशी टीप टाकायची. याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे मालिका भरकटवण्यापेक्षा ती योग्यवेळी थांबवलेली बरी, असे वाटते. मुळात या विषयावर कृपासिंधू नावाची एक मालिका यापूर्वीच झालेली आहे. दोन्ही मालिकांचे लेखक एकच आहेत. त्यामुळे आपल्या लिखाणात काहीतरी वेगळेपण आणण्यासाठी म्हणून असे काल्पनिक प्रसंग घातले जात असतील, तर ते चुकीचे आहे. त्या दाजिबा सरकारची चंदावर वाईट दृष्टी आहे. तिला मिळवण्यासाठी दाजिबा सरकार राणी सरकारला गुंगीची औषधे देऊन आजारी पाडतो हे कथानक न पटणारे आहे. ज्याचा संपूर्ण गावात दबदबा आहे, धाक आहे, जो सक्तीने लोकांकडून कर वसूल करतो, लोकांना चाबकाने फटके मारतो, त्याला चंदाला मिळवणे अवघड नाही. त्यासाठी बायकोला तो गुंगीचे औषध देण्याचे काम कसे करेल? त्यामुळे कथानकात रंजकता आणताना, नाट्यमयता आणली तर चालेल; पण काल्पनिकतेला वाव असता कामा नये.


श्री स्वामी समर्थ हे चिंतनशील आणि तत्वज्ञानाने उपदेश करणारे गुरू आहेत. त्यांनी वास्तवाचे भान कायम राखले आहे. भक्तांचा आत्मविश्वास वाढवला आहे आणि सतत भीऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, असा खंबीर आधार भक्त संप्रदायाला दिलेला आहे. त्यामुळे अनेकांना त्यांचा चांगला अनुभव आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या महतीच्या इतक्या गोष्टी असतील की, त्याच पुरेशा आहेत. त्यासाठी वेगळ्या काल्पनिक कथा घुसडायची काहीही गरज नाही. यामुळे त्या संत महात्म्यांबाबत चुकीचा संदेश जात असतो.

प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा


9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: