सध्या राज्यात आणि देशात सतत कुठे ना कुठेतरी कसली ना कसली, तरी आंदोलने होताना दिसतात; पण त्या आंदोलनांचे फलीत काहीच होताना दिसत नाही. त्यामुळे ही आंदोलने फक्त राजकीय शक्ती प्रदर्शनासाठी केली जातात का? यातील हेतू किती शुद्ध आहे. ज्यासाठी ही आंदोलने केली जातात ते प्रश्न जर सुटले, तर या नेत्यांना ते चालणार आहे का? का प्रश्न सुटूच नये फक्त आम्हाला आंदोलन करता यावे यासाठी ही आंदोलने होताना दिसत आहेत? आंदोलनातून मार्ग निघाला पाहिजे, तोडगा काढला गेला पाहिजे, थोडीफार तडजोड करून का होईना तो प्रश्न सोडवला पाहिजे; पण फक्त आंदोलने होताना दिसतात. त्यावर तोडगा काढण्याच्या हालचाली होताना मात्र दिसत नाहीत. प्रयत्न चालू आहेत, असे भासवले जाते; पण प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही.
गेली तीन वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न रेंगाळतो आहे. मराठा समाजाने त्यासाठी लोकशाही मार्गाने शांततेने मोर्चे काढले, आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रारंभी कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली नसलेले, कोणाही राजकीय नेत्याच्या नेतृत्वाखाली नसलेले हे आंदोलन अनेक राजकीय पक्षांनी हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यावर सातत्याने चर्चा होत राहिली. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. तरीही हा प्रश्न का सुटत नाही? ते आडलं आहे नेमके कुठे हे समजत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा समाजाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. त्यामुळे एकदा काहीतरी तोडगा काढून हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न व्हायला पाहिजेत.
तोच प्रकार ओबीसी आरक्षणाचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावरून दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने राज्यभर आंदोलने केली. हा प्रश्न सुटल्याशिवाय कोणत्याही निवडणुका घ्यायच्या नाहीत, अशा भावना सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने मान्य केल्या. तरीही न्यायालयाने अशा प्रकारे निवडणुका रोखता येणार नाहीत, असे मत नोंदवले. त्यामुळे काही निवडणुका आता होणार आहेत; पण तरीही हा प्रश्न कायमच रेंगाळताना दिसतो आहे. पन्नास टक्केच्या वर की पन्नास टक्केमध्ये सामावून घ्यायचे की नाही, याबाबत एकदाचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे. ते कशासाठी रेंगाळले आहे याचा शहानिशा झाला पाहिजे; पण फक्त रस्त्यावर येऊन आंदोलने करून कोणीतरी कुणाचा तरी निषेध करून काहीही साध्य होणार नाहीये. हे फक्त राजकीय शक्तिप्रदर्शन होताना दिसत आहे. या असल्या नाटकांना सामान्य माणूस वैतागला आहे. निर्णयक्षम आंदोलने असली पाहिजेत, असे प्रत्येकाला आज जाणवू लागले आहे.
तिकडे दिल्लीत शेतकºयांचे आंदोलन गेली दहा महिने चालू आहे. शेतकरी संघटनेच्या नावाखाली तोडगाच काढायचा नाही, अशा भूमिकेतून हे आंदोलन सुरू आहे. लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवणारे हे आंदोलन आहे. मुळात हे आंदोलन शेतकºयांचे आहे की नाही, हा प्रश्न आहे. केंद्र सरकारने गेल्यावर्षी पावसाळी अधिवेशनात केलेल्या तीन कृषी कायदे नकोत म्हणून हे आंदोलन उभारले गेले आहे. त्यासाठी हे कायदे शेतकरी विरोधी आहेत, अशीच भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे. प्रत्यक्षात त्या कायद्यात काय चुकीचे आहे? काय नको आहे? त्याने शेतकºयांचे नुकसान कसे होईल? याबाबत हे आंदोलक काहीही बोलत नाहीत. बैठकांवर बैठका घेऊनही आंदोलक या कायद्यात सुधारणा करायलाही तयार नाहीत. त्यामुळे फक्त शक्ती प्रदर्शनासाठी हे आंदोलन चालवले आहे. त्या आंदोलनाचा राजकीय फायदा कोणता पक्ष घेतो, यावर त्याचे खरे स्वरूप कळणार आहे.
शेतकºयांचा कैवार अशाप्रकारे अनेकांना येतो. राजू शेट्टी यांची संघटनाही सातत्याने आंदोलने करून आपले शक्तिप्रदर्शन करत असते. यात हे आंदोलक करतात काय? तर शेतमालाचे नुकसान करतात. भाजीपाला रस्त्यावर फेकून देतात. दुधाचे टँकर फोडतात, दूध रस्त्यावर ओतून देतात. हे काय आंदोलन आहे का? कुठलाही शेतकरी आपला माल अशाप्रकारे वाया जाऊ देणार नाही, कारण त्या पिकावर, शेतमालावर शेतकरी आपल्या जीवापाड, मुलाबाळांप्रमाणे प्रेम करत असतो. त्यामुळे मालाची नासाडी शेतकरी करत नाहीत, तर हे आंदोलनाच्या नावावर शक्तीप्रदर्शन करणारे मालाची नासाडी करतात आणि शेतकºयांना बदनाम करतात. त्यामुळे अशा आंदोलनांमुळे सर्वसामान्य जनता अगदी व्यथित होऊन जाते.
आंदोलने काय पूर्वी होत नव्हती का? पण त्यातून तोडगा निघायचा. महागाईविरोधात मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर अशा रणरागिणी रस्त्यावर उतरल्या की, त्यांच्या लाटण्याला, घंटानादाला सरकारही घाबरायचे आणि तातडीने त्यावर उपाययोजना केली जायची. ही सर्वसामान्यांच्या हिताची आंदोलने होती; पण सध्याची आंदोलने ही तोडगा न काढता फक्त चालवण्यासाठी केली जातात हे वाईट आहे. आंदोलने ही जनहिताची असली पाहिजेत. त्यात सर्वसामान्यांचे प्रश्न समोर आले पाहिजेत. ती तोडगा काढून सोडवण्याची इच्छा असणारी असली पाहिजेत; पण हट्टाला पेटल्यासारखी आंदोलने होताना दिसत आहेत. प्रश्न सोडवायची त्यात इच्छाच कुठे दिसत नाही, अशा प्रकारे आंदोलने होत आहेत. एक आंदोलन केल्यावर त्यावर तोडगा निघाला नाही, तरी दुसरे आंदोलन सुरू केले जाते. त्यामुळे सगळीच आंदोलने रेंगाळत पडतात. हे प्रकार बंद झाले पाहिजेत. आंदोलक कशासाठी आंदोलन करत आहेत, त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ का आली हे समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा