सध्या भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराचे सर्वच राजकीय पक्षांना टेन्शन आहे. ज्या पद्धतीने या पक्षाची वाटचाल चालली आहे, हे पाहता योग्य संघटन आणि पक्षबांधणी हेच भाजपच्या यशाचे रहस्य आहे, असे दिसते. लक्ष्य गाठण्यासाठी आवश्यक असलेले संघटन किंवा कौशल्य कशाप्रकारे दाखवायचे याचे नेमके प्रशिक्षण आपल्याला दहीहंडीतून बघायला मिळते. यासाठी भगवान श्रीकृष्णाने आपल्या बाललीलांमधून दाखवून दिलेली उदाहरणे आणि त्याचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. कोणताही पक्ष बांधणे, संघटना बांधणे किंवा आघाडीची विण घट्ट करणे म्हणजे राजकीय दहीहंडीच मानायला हवी.
आज आपल्या देशात भारतीय जनता पक्ष आणि भारतीय राष्टÑीय काँग्रेस हे दोन मुख्य पक्ष आहेत. हे दोन पक्ष बºयापैकी देशभर पसरलेले आहेत, परंतु ते इतके मोठेही नाहीत की, सर्व देशातील सर्व राज्यांमधून त्यांना जनाधार मिळेल किंवा उमेदवार उभे करण्याची त्यांची क्षमता आहे. या दोन्ही पक्षांना आता २०२४च्या लोकसभा निवडणूक जिंकून सत्तेची दहीहंडी फोडण्याचे वेध लागलेले आहेत. सध्या भारतीय जनता पक्षाने बरीच उंची गाठलेली दिसत असली, तरी सत्तेच्या हंडीपर्यंत हात पोहोचण्यासाठी त्यांना खालचे सगळे थर भक्कम आहेत, याची खात्री करून घ्यावी लागणार आहे. कारण आज जरी उंच थर दिसत असला, तरी एखादा थर कमकुवत झाला, तर सत्तेच्या हंडीपर्यंत जाऊन पुन्हा कोसळण्याची वेळ येऊ शकते. यासाठी पक्ष आणि आघाडी मजबूत करणे महत्त्वाचे आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत तसे बरेच झटके मिळाले आहेत. एनडीएच्या थरातील शिवसेनेचा थर कमी झालेला आहे. हरियाणा विकास पार्टी लांब झालेली आहे. नितीश कुमारांचेही तळ्यात मळ्यात असते. त्यामुळे आपल्या मित्रपक्षांना कसे सांभाळायचे हे भान आता त्यांना जपावे लागेल.
काँग्रेसचा हात सत्तेच्या हंडीपासून अजून बराच लांब असला, तरी काही घटक पक्षांचे, प्रादेशिक पक्षांचे थर सोबत घेऊन त्यांचा गोविंदा उंच करण्यात तशा अडचणी येणार नाहीत. फक्त ही आघाडी बांधण्याचे महत्त्वपूर्ण कौशल्य असणारा योग्य संयोजकाचा त्यांच्याकडे अभाव आहे. दहा दिवसांपूर्वी सोनिया गांधींनी बैठक घेऊन तो प्रयत्न केला; पण तसेच प्रयत्न ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनीही केले. थर लावण्यासाठी आघाडी केली, तरी नेमका दहीहंडी फोडणारा गोविंदा म्हणून कोणाला वर पाठवायचे हा प्रश्न आहे.
एक काळ असा होता की, देशातील ग्रामीण भागात काँग्रेसशिवाय दुसरा पक्ष कोणाला माहिती नव्हता. सत्तेवर राहण्याचा अधिकार फक्त काँग्रेसचाच आहे, इतकी मुळापर्यंत काँग्रेस रुजली होती. काँग्रेसला संपवण्यासाठी भले भले उतरले; पण ग्रामीण भागातून काँग्रेसला उखडणे कोणालाही शक्य झाले नाही, कारण काँग्रेसची संघटनात्मक बांधणी त्या काळात भक्कम अशीच होती. काँग्रेसचे काही मातब्बर नेते नेहमी आपल्या भाषणात म्हणायचे की, काँग्रेसला संपवणे सोपे नाही. काँग्रेसचा पराभव करणे विरोधकांना कधीही जमणार नाही. काँग्रेसला फक्त काँग्रेसच हरवू शकते, दुसरे कोणीही नाही. त्यामुळे सत्तेच्या दहीहंडीपर्यंत काँग्रेसचे हात पोहोचू द्यायचे नसतील, तर काँग्रेसचे थर कमकुवत केले पाहिजेत हेच विरोधकांचे ध्येये होते. वर्षानुवर्षे तसे प्रयत्न होत गेले. त्या प्रयत्नांना जिथे-जिथे यश आले, तेव्हा-तेव्हा काँग्रेस पराभूत झालेली आहे.
काँग्रेसचा सर्वात मोठा पराभव म्हणजे भारतीय राजकारणातील माईल स्टोन ठरलेली १९७७ची निवडणूक. या निवडणुकीत जनता पक्षाने काँग्रेसला पराभूत केले होते, त्या जनता पक्षात काँग्रेसचेच माजी नेते होते. मोरारजीभाई देसाई हे भारताचे बिगर काँग्रेस सरकारमधील पहिले पंतप्रधान झाले असले, तरी त्यांचे मूळ हे काँग्रेसशीच जोडलेले होते. म्हणजेच काँग्रेसची संघटना कमकुवत करायला, काँग्रेस पक्ष मोडून काढायला आणि सत्तेच्या दहीहंडीपासून रोखण्यास कारणीभूत ठरले ते हेच पक्षांतर्गत थर. पक्षनेतृत्वावरचा विश्वास उडाला की, खालच्या फळ्या कमकुवत होत जातात आणि तो पक्ष ढासळतो. त्यामुळे वर जाणारा गोविंदा जो आहे आणि जो त्यातील दही हातात घेणार आहे त्याच्यावर सर्वांचा विश्वास असायला लागतो. हा विश्वास आहे तोपर्यंत कोणीच यशापासून दूर जाऊ शकत नाही.
आपल्या पुराणकथांमध्ये कृष्णाने जरी दहीहंडी केली आणि लोणी, दूध, दही असे पळवले, तरी त्याचा लाभ तो खालच्या थरातील प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा. वरच्या वर दही, लोणी खाणे कृष्णाच्या बाललीलांना शोभलेही असते; पण बाललीलांमध्येही कृष्णाने आपल्या अगोदर ते दही, लोणी आपल्या सवंगड्यांना चाखवले आहे. त्यामुळे वाकड्या पेंद्यासारखे कमकुवत सवंगडीही ताकदवान होताना दिसत होते. आज तशी अवस्था बहुतेक पक्षांमधून दिसत नाही, त्यामुळेच पक्ष संघटना या मजबूत होताना दिसत नाहीत. त्यांना स्थानिक पातळीवर इतरांशी हातमिळवणी करावी लागत आहे. यासाठी गोकुळ अष्टमीचा आणि त्यातील दहीहंडीचा अर्थ समजून घेतला पाहिजे.
ईशान्येकडील राज्यांमध्ये जेव्हा भाजपने विजय मिळवला, तेव्हा त्याचे फार मोठे नियोजन केले होते. ते नियोजन एका रात्रीतले नव्हते. माय होम इंडियाच्या माध्यमातून सुनील देवधर वर्षानुवर्षे त्या भागात कार्यरत होते. आपल्याला केव्हा हे लक्ष्य गाठायचे आहे याचे गणित त्यांच्याकडे पक्के होते. तिथल्या नागरिकांना ज्या चीन-नेपाळ अशा शेजारी राष्टÑांकडून धोका होता, त्यापासून त्यांना आधार देण्याचे काम आणि तुम्ही भारतीय आहात आम्ही तुमच्या पाठिशी आहोत हे सांगण्याचे काम या संघटनेने केले होते. त्याचा परिणाम हा भाजपला विजय मिळविण्यात झाला होता.
कोणत्याही पक्षाकडे पहिली फळी, दुसरी फळी अशा संघटनात्मक पायºया असतात, तेव्हा तळागाळातल्या कार्यकर्त्यालाही तेवढेच महत्त्व दिले जाते. हे काम भारतीय जनता पक्षाने आपल्या मित्र आणि संघ परिवारातील घटकांच्या माध्यमातून केले होते. आणीबाणीविरोधात ज्याप्रमाणे घराघरात जाऊन प्रचार केला आणि जनता पक्षाच्या हातात सत्तेची दहीहंडी सोपवली तसाच प्रकार २०१४ च्या निवडणुकीपासून भाजपने केलेला दिसून येतो. त्यामुळे पक्ष संघटना वाढवणे आणि सत्तेची दहीहंडी फोडणे, म्हणजे आपले सर्व थर सुरक्षित आहेत, याची काळजी घेत केलेली चढाई असते. यशस्वी गोविंदा पथकाच्या नियोजनातून आपल्याला तेच तर दिसून येते.
काँग्रेसला दुसरा दणका बसला होता तो १९८९ च्या निवडणुकीत. त्यावेळी राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला पराभूत करून व्ही. पी. सिंग यांचं जनता दल सत्तेवर आला होता, परंतु त्यापूर्वी व्ही. पी. सिंग हे राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. मूळचे काँग्रेसचेच होते. म्हणजे काँग्रेसचा पराभव विरोधक नाही, तर काँग्रेसचे लोकच करू शकतात हे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे. आपण उभ्या केलेल्या दहीहंडीतील मनोºयाच्या एका थरातील लोकांचे मनोधैर्य खचले, तरी सगळा मनोरा जमीनदोस्त होतो. तसाच दणका काँग्रेसला बसला होता.
इथून पुढे भारतीय राजकारणाने आघाडीचाच फॉर्म्युला स्वीकारला होता. त्यामुळे आघाडीतील घटक पक्षांना विश्वासात घेणे आणि त्यांचे मनोबल उंचावणे हे नेतृत्व करणाºया पक्षाचे फार महत्त्वाचे काम असते. अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप १९९८ सत्तेवर आल्यानंतर समता, ममता आणि ललिता हे तीन गट त्यांना छळत होते. यातील जयललितांनी आघाडीतून बाहेर पडल्यानंतर रालोआची दहीहंडी कमकुवत झाली. त्यांचा मनोरा विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी अवघ्या १ मताने कोसळला होता. त्यामुळे दहीहंडी करताना आघाडीतील घटक पक्षांचे समाधान करणे ही तारेवरची कसरत नेतृत्वाला करावीच लागते. म्हणून पौराणिक दहीहंडी आपल्याला संघटनेची उभारणी कशी करावी हे शिकवताना दिसते.
२००४ च्या अपयशानंतर भाजपची पकड ढिली झाली. त्यामुळे २००९ च्या निवडणुकीत आणखी मोठा पराभव पत्करावा लागला; पण नेमकी कच्ची कडी कौन हैं, कोणता थर कमकुवत आहे याचा शोध घेत भाजपने पक्षबांधणीला सुरुवात केली. आघाडीतील घटक पक्षांचा विश्वास संपादन केला आणि सर्वांना बरोबर घेऊन नरेंद्र मोदी नामक गोविंदाला सर्वात वर पाठवायचे नियोजन झाले. सगळ्या पायºया, थर मजबूत करूनच नरेंद्र मोदी वरच्या थरापर्यंत गेले. हे अलीकडचे उदाहरण आहे. आता मोदींना हरविण्यासाठी, भाजपप्रणित रालोआची सत्ता खेचून घेण्यासाठी विरोधक तयार झाले आहेत. फक्त त्यांना आपला गोविंदा कोण असणार आहे? कोणत्या थरावर कोणी उभे राहायचे आहे, कोणाची कितपत मदत घ्यायची याचे नियोजन कौशल्याने करावे लागणार आहे. दुसरी आघाडी, तिसरी आघाडी अशा कितीही चर्चा झाल्या आणि तरी गोविंदाचे नाव ठरवावे लागेल. त्याचप्रमाणे ज्याला गोविंदा म्हणून वर जाऊन हंडी फोडायची आहे त्याला खालचे थर भक्कम आहेत की, नाही याचा अंदाज घ्यावा लागेल. त्यासाठी भाजपच्या वाटचालीचा अभ्यास करणे आणि दहीहंडीचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा