गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

असे कार्यक्रम असता कामा नयेत.

 हिंदी बिग बॉसला एक तप पूर्ण झाल्यानंतर आता मराठी बिग बॉसचे तिसरे पर्व नुकतेच सुरू झाले आहे. शंभर दिवसांच्या बिग बॉसमधील या घरात जो धिंगाणा दाखवला जातो, त्यातून काय साध्य होते? हा शो कशासाठी केला जातो, हेच अनाकलनीय आहे. चर्चेतल्या लोकांना जमवायचे आणि त्यांच्यातली भांडणे, कुरघोड्या दाखवायच्या, कुणाला तरी रडवायचे आणि फक्त दंगा करायचा. यात ना करमणूक असते ना काही; पण यामुळे ज्यांचा या कार्यक्रमात सहभाग होतो त्या व्यक्ती मात्र लोकांच्या नजरेतून उतरतात हे नक्की. विशेष म्हणजे या बिगबॉसमधून बाहेर पडल्यावर या कलाकारांना पूर्वीसारखी मागणी नसते. कोणत्याही कारणाने प्रसिद्धीला हपापलेले आणि काहीही वादग्रस्त करणाºयांसाठी हा प्लॅटफॉर्म आहे, असेच दिसते. या हिंदी कार्यक्रमात पूर्वी राखी सावंत, राहुल महाजन अशा व्यक्ती होत्या. काहीही करणारी राखी सावंत काय किंवा व्यसनाधीनतेमुळे प्रसिद्ध झालेले राहुल महाजन यांच्यापासून समाजाने काय घ्यायचे? तोच प्रकार आता मराठीतही येताना दिसत आहे. कसले, तरी टास्क दिले जातात आणि एकमेकांना घालून पाडून बोलायचे, भांडणं करायची, कुणाला तरी रडवायचे हे प्रकार अत्यंत हिन वाटतात, म्हणजे एखाद्या हॉस्टेलवर जसे रॅगिंगचे प्रकार असतात, तसेच शंभर दिवसांत एकमेकांना छळण्याचे प्रकार यात होत असतात, म्हणूनच असे कार्यक्रम असता कामा नयेत.


'बिग बॉस' मराठीचा तिसरा सीझन १९ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. तसं तर 'बिग बॉसच्या घरात १५ स्पर्धकांनी एंट्री घेतली आहे; पण काही नावं ही अगदी शो सुरू झाल्या दिवसापासून अधिक चर्चेत आहेत आणि त्यापैकीच एक नाव आहे कीर्तनकार शिवलीला पाटील यांचं. शिवलीला पाटील या वारकरी संप्रदायातील कीर्तनकार आहेत. सोशल मीडियावर शिवलीला या लोकप्रिय आहेत; पण तरीही 'बिग बॉस'च्या घरात कीर्तनकार म्हटल्यावर ते ऐकायला बरोबर वाटत नाही. हा वारकरी संप्रदायचा अपमानच म्हणावा लागेल, कारण या शोचा फॉरमेट आता प्रेक्षकांना चांगलाच माहिती आहे. तिथे त्यांना कीर्तन नाही, तर तमाशा करावा लागणार आहे. साहजीकच हा शो संपल्यानंतर त्या समाजापुढे काय म्हणून जातील हा प्रश्न आहे. किमान कीर्तनकारांनी तरी अशा कार्यक्रमात सहभागी असायला नको होते. अर्थात या सगळ्यात सहभागी होण्यासाठी शिवलीला पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे, हे विशेष. त्यांच्या मते 'कीर्तनकार असताना बिग बॉसच्या घरात जाणं हाच एक मोठा टास्क आहे, कारण बिग बॉसचं घर म्हटलं की भांडणं आणि भांडणं म्हणजे अध्यात्माची एकदम विरुद्ध बाजू. भले त्यासी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी, या तुकोबांच्या अभंगाप्रमाणेच एक सुशिक्षित मुलगी सुसंस्कृत असू शकते, कीर्तनकार असू शकते आणि आपली मतं ठामपणे मांडू शकते हे दाखवून देण्यासाठी, लोकांचं मत बदलण्यासाठी मी बिग बॉसच्या घरात येत आहे,' पण कीर्तन हा भक्ती आणि प्रबोधनाचा मार्ग आहे. इथे कसलेही प्रबोधन नाही, तर नको ते प्रकार पाहायला मिळतात. अशा कार्यक्रमात एक कीर्तनकार महिला जाणे हे बिल्कुल योग्य वाटत नाही, कारण बिग बॉसच्या घरातील वाद, भांडण-तंटे या व्यतिरिक्त काहीच नसते. यापासून त्या वेगळं राहू शकतील का? कीर्तन हा प्रकार आपल्याकडे समाजाला एकत्र आणणे, प्रबोधन आणि अंधश्रद्धा दूर करणे, ज्ञानाचा प्रसार करणे यासाठी असतो; पण १०० दिवस समाजापासून दूर जाणे, एकाकी कोंडून घेणे आणि तिथे भांडणे करणे यासाठी एका कीर्तनकाराचा वापर व्हावा हे काही मनाला पटणारे नाही.

हा कार्यक्रम म्हणजे, कुरघोड्या, गॉसिपींग, चर्चेसाठी वाटेल तसे लाज सोडून वागणे, बोलणे असा आहे. यात कीर्तनकाराचे अवमूल्यन होत आहे. त्यामुळे असे कार्यक्रमच दाखवले जाऊ नयेत. टीव्ही हे करमणुकीचे आणि ज्ञानाचे माध्यम आहे. या कार्यक्रमातून ना कसली करमणूक असते ना काही ज्ञान. फक्त उखाळ्या पाखाळ्या काढणारा हा एक अड्डा आहे, म्हणूनच असे कार्यक्रम किमान मराठी वाहिन्यांवर तरी असता कामा नयेत. सुसंस्कृत लोकांनी अशा कार्यक्रमात सहभागी होता कामा नये.


राजकारणी आणि अभिनेते यांना प्रसिद्धी लागते. त्यासाठी ते काहीही करायला तयार होत असतात. बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ, म्हणत ते कसलीही प्रसिद्धी मिळवण्यासाठी सिद्ध असतात. त्यांना कुरघोड्या केल्याशिवाय आणि एकमेकांना पायदळी तुडवल्याशिवाय पुढे जाता येत नसते. त्यामुळे अशा कार्यक्रमात फक्त नेते आणि अभिनेते असतील, तर मान्य करता येईल, कारण त्यांची जीवनशैलीच या बिगबॉससारखी असते; पण कीर्तनकार जे स्वत:ला हभप म्हणजे हरी भक्त परायण म्हणवतात ते अशा कार्यक्रमात कसे काय येतात? यामुळे हभपचा अर्थच बदलून गेला आहे. हरी भक्त परायण ऐवजी हळूच भलतीकडे पाहणारे असा त्याचा अर्थ झाला आहे. त्यामुळे ज्या कार्यक्रमातून कसलेही प्रबोधन नाही, ज्ञान नाही, मनोरंजन नाही अशा कार्यक्रमात कीर्तनाचा बळी देण्याचे काम होता कामा नये. कीर्तनातून उपदेशाचे डोस दिले जातात; पण उपदेश करणारा जर ताडाच्या झाडाखाली बसून दूध पित आहे असे म्हणेल, तर कोण विश्वास ठेवणार? म्हणूनच प्रश्न पडतो की, हा कार्यक्रम नक्की कशासाठी केला जात आहे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: