कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वादाच्या निमित्ताने काँग्रेसने पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलाचा निर्णय घेतला आहे; पण त्यानिमित्ताने काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीतील फासे टाकण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकांतील समीकरणे ही जातीयतेवर आखली जातात. त्याप्रमाणे काँग्रेसने आता चरणजीत सिंग हे कार्ड काढले आहे.
चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. चन्नी हे दलित शीख समाजातले नेते आहेत. त्यामुळे दलित शीख समाजाला संधी देऊन आगामी काळात एक गठ्ठा दलित मते मिळवण्यासाठी ही व्यूहरचना केलेली आहे. अर्थात हे कितपत यशस्वी होते याला समजायला ६ महिने लागतील; पण ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे. सिद्धू आणि कॅप्टन यांच्यातील वाद हे निमित्त आहे; पण काही झाले असले, तरी काँग्रेसने हा बदल केलाच असता.
काँग्रेस हायकमांडने चरणजीत सिंग चन्नी यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांनी रविवारी ट्विट करून ही माहिती दिली. पंजाब विधिमंडळात काँग्रेसचे नेते म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर एकमत झालं आहे, हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे, असं रावत यांनी म्हटलं आहे. हा आनंद आगामी निवडणुकांमधील नेतृत्वासाठी होता, असे दिसते; पण ज्याप्रमाणे जातीयवाद उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतून चालतो, तसा जातीयवाद पंजाबमध्ये चालत नाही. त्यामुळे हे जातीयवादाचे कार्ड इथेही वापरण्याचा परिणाम काँग्रेसला फारसा चांगला मिळेल, असे वाटत नाही. शीख धर्मांमध्ये सगळे शीख असतात. श्री गुरू नानकांच्या विचारांवर चालणारे असतात. न कोई हिंदू हैं, न कोई मुसलमान हैं या शिकवणुकीनुसार चालणारा हा पंथ जातीयवादात विभागण्याचे काम जर काँग्रेस तिथे करत असेल, तर फारसे यश मिळणार नाही. जातीमध्ये शीख धर्मीयांना हे मान्य होईल का, हा प्रश्न आहे. त्यामुळेच काँग्रेसने काढलेले हे कार्ड कितपत यशस्वी होईल हे अजून काही कालांतराने समजेल.
या निर्णयानंतर पंजाब काँग्रेसमधील नेत्यांनी त्याचे स्वागत केले आहे. हा हायकमांडचा निर्णय आहे. मी या निर्णयाचं स्वागत करतो. चन्नी हे माझ्या लहान बंधूसारखे आहेत. मी अजिबातच नाराज नाही, असं काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील उमेदवार सुखजिंदर सिंग रंधावा यांनी म्हटलं आहे. याचा अर्थ नेमका काय असतो. काँग्रेसमध्ये संधीपासून जेव्हा एखाद्याला डावललं जातं, तेव्हा तो गोड बोलून त्याचा काटा काढतो. ही काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे हायकमांडचा निर्णय आम्हाला मान्य आहे, मी अजिबात नाराज नाही याचा अर्थ नाराज आहे असाच होतो. जेवढे आमदार असतात तेवढे प्रत्येक जण इच्छुक असतात. प्रत्येकाचीच महत्त्वाकांक्षा वरचे पद मिळावे ही असते; पण जेव्हा ज्यांची नावे प्रत्यक्षात एखाद्या पदासाठी चर्चेत येतात, तेव्हा ज्यांना संधी मिळते त्यांच्याविरोधात ज्यांना संधी मिळत नाही त्यांचा गट काम करायला लागतो. हे काँग्रेसमध्ये सातत्याने घडणारे प्रकार आहेत. प्रत्येक राज्यात हे प्रकार घडत असतात.
अगदी महाराष्ट्राचाच विचार करायचा झाला, तर विलासराव देशमुख यांच्यानंतर जेव्हा अशोक चव्हाण यांचे नाव आले, तेव्हा नारायण राणे यांचे नाव चर्चेत होते. अशोक चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यावर राणे चव्हाणांच्या विरोधात गेले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना संधी मिळाल्यावरही नारायण राणे दुखावले. तिसरी संधी गेल्यामुळे त्यांचा थयथयाट झाला. त्याचा परिणाम काँग्रेसमधली एकजूट धुळीला मिळाली. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या अंतर्गत मतभेदांनी काँग्रेसचे पानीपत झाले. असाच प्रकार अनेक राज्यांत झाला. त्यामुळे जेव्हा काँग्रेसकडून नेतृत्वबदलाच्या हालचाली होतात, मुख्यमंत्री बदलला जातो तेव्हा चर्चेत असलेल्या अन्य इच्छुकांचे गट तयार होतात. ते जातीपेक्षा भयानक असतात. साहजिकच जातीयतेवर आधारित समीकरणापेक्षा या गटावर आधारित समीकरणांचा विचार केला, तर राजकारणासाठी जात वापरण्याची वेळ कोणावर येणार नाही.
शनिवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सुनील जाखड, सुखजिंदर सिंग रंधावा, नवज्योत सिंग सिद्धू, प्रताप सिंह बाजवा यांची नावं चर्चेत होती. अर्थात भडक डोक्याच्या नवज्योत सिद्धूंना ही संधी मिळणार नव्हतीच, कारण शेवटी सिद्धू हे ओरीजनल काँग्रेस नेते नाहीत. त्यांच्या तोंडाळ, वाचाळ बोलघेवड्या वक्तृत्वामुळे काँग्रेसने त्यांना आपल्याकडे घेतले आहे. आयात केलेल्यांना मोठे पद दिले जात नाही. नारायण राणे यांनाही मुख्यमंत्रीपदाचे गाजर तत्कालीन अहमद पटेल, प्रभा राव यांनी दाखवले होते; पण नंतर तोंडाला पानेच पुसली. त्यामुळे सिद्धूंना ही संधी मिळणार नव्हतीच. साहजिकच यातून काय साध्य त्यांनी केले हे त्यांनाही आता समजेल, कारण भाजपात असते, तर नवज्योत सिद्धूंना ही संधी आज सहज प्राप्त झाली असती, हे आता समजेल; पण हे नवे कार्ड वापरून काँग्रेसला नक्की कितपत फायदा होतो हे समजण्यासाठी ६ महिने थांबावे लागेल. काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि पंजाबमधील काँग्रेस नेत्यांच्या दिवसभर झालेल्या बैठकांमध्ये चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. ५८ वर्षीय चन्नी दलित शीख समाजातले नेते आहेत. अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते तंत्रशिक्षण मंत्री होते. गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये दलित नेते प्रमुख भूमिकेत येऊ शकतात, अशी चर्चा सुरू होती. ही चर्चा नेमकी कधी कोणी सुरू केली हे लक्षात घेतले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा