आपल्याकडे म्हण आहे की, उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग, म्हणजे मुलगी पाहिलेली नाही, लग्न ठरण्याची चर्चा नाही आणि हे लग्नाळु नवरे गुडघ्यालाच बाशिंग बांधून आपण बोहल्यावर जायला तयार असल्याच्या गप्पा करतात. तसलाच प्रकार शुक्रवारी पहायला मिळाला. औरंगाबादच्या मराठवाडा मुक्ती संग्रामच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य काय केले; पण त्यामुळे राजकीय चर्चा घडवून आणण्याचा खटाटोप वाहिन्यांनी चालू केला. उलट सुलट चर्चा करून संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला; पण प्रेक्षकांना यात काहीही वाटले नाही, त्यात उत्सुकता वाटेल, असे काहीही नसताना हे वृत्त रंगवण्याचा प्रकार केला गेला. त्यात राजकीय नेत्यांनीही हात धुवून घेतले, तर काहींनी सहज दिलेल्या प्रतिक्रियांचे अर्थ चुकीचे लावण्याचा प्रयत्न झाला.
वास्तविक या आजी माजी आणि भावी या शब्दांचा नेमका अर्थ काढण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. किंबहुना तो अर्थ काढण्याची इच्छाही नव्हती. सामान्य प्रेक्षकांपर्यंत नेमकं अर्थ पोहोचूच नये, यासाठीच या वावड्या कशा उठतील याचे नियोजन केले गेले, कारण दिवसभर काहीतरी एरंडाचे गुºहाळ चालवण्याचा प्रकार सुरू झाला. यात सगळ्याच राजकीय नेत्यांनी आपला हात धुवून घेतला, म्हणजे वाहिन्यांना वाटले की, आपण हे काहीतरी खळबळजनक दाखवत आहोत, त्यामुळे राजकीय नेते, पक्ष बिथरतील; पण वाहिन्यांवर कुठल्याही गोष्टीचा कुठेही संबंध लावून काहीही दाखवले जाते हे राजकीय नेत्यांना माहिती असल्यामुळे कोणाच्याही कसल्याही वक्तव्याचा अर्थ काढत न बसता आजकाल राजकीय नेते गंमत पाहत असतात.
खरं म्हणजे या व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकीकडे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि दुसरीकडे भाजपचे रावसाहेब दानवे हे बसलेले होते. त्यामुळे भाजप हा माजी सहकारी आणि काँग्रेस हा आजी सहकारी असे बरोबर होते. साहजीकच आजी माजींबरोबर जमलं, तर भावी सहकारी हे संबोधन भाजपलाच स्मरून केले असे होत नाही, कारण एकीकडे काँग्रेस आणि शिवसेनेतही मतभेद आहेत. त्यांनी सतत स्वबळाची भाषा केलेली आहे, म्हणून जमलं तर त्यांनाही पुन्हा भावी सहकारी असे संबोधन लागू होते हे लक्षात घेतले पाहिजे.
पण दोन दिवसांपूर्वीच्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा संबंध जोडून ही बातमी घडवली गेली आणि उगाच दिवसभर चर्चा चर्विचरण चालवले गेले, याला काहीही अर्थ नव्हता. राजकारणातील माणसं धोरणी असतात. वाहिन्यांनी विचारल्यावर रावसाहेब दानवेंसारखे हिकमती नेते ती संधी थोडीच सोडणार आहेत? त्यांनी लगेच माध्यमांसमोर विशेष चर्चा करून जागा व्यापून टाकली आणि चर्चेचा केंद्रबिंदू बनून गेले. त्यासाठी अब्दुल सत्तार यांनाही आपल्याबरोबर भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी दिली. आम्ही आणि शिवसेना नैसर्गिक मित्र आहोत, असे म्हणत त्यांनी बाजी मारण्याचा प्रयत्न केला.
ठाकरे व राणे यांच्यातून विस्तव जात नाही. त्यामुळे माध्यमांनी या संभाव्य भावी युतीचा विषय राणेंसमोर काढल्यावर ठाकरेंच्या मनातलं ओळखायला मी काही ज्योतिषी नाही, असे सांगून मोकळे झाले. उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य भाजपला उद्देशूनच होते, असे बिंबवण्याचा प्रयत्न वाहिन्यांनी केला त्यामुळे विधानसभेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही याबाबत विचारले. त्यावर त्यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. अब्दुल सत्तार यांनी लगेच युतीसाठी आमची तयारी आहे, असे मत व्यक्त केले. वैतागलेल्या नाना पटोले यांनी हे भाजपच्या समाधानासाठी केलेले वक्तव्य असल्याचे म्हटले. माध्यमांची नेहमीच मजा घेणाºया उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे, हे मी कसे सांगू, असे म्हणून या चर्चा रंगवण्याचा प्रयत्न केला.
म्हणजे साप सोडणे हा एक वाक्प्रचार आहे. गर्दीत कुणीतरी असा साप सोडण्याचा प्रयत्न करतो. आजकालच्या सभा या खर्चिक असतात. बसायला खुर्च्या असतात; पण पूर्वी मैदानावर होणाºया सभेत नेता, वक्ते स्टेजवर, बाकीचे सगळे जमिनीवर भारतीय बैठक घालून बसलेले असायचे. त्यावेळी कोणीतरी असे साप सोडण्याचे प्रकार करायचे. पिळू देऊन लांबवर हालचाल दिसेल अशा प्रकारे दोरी टाकायची. लगेच साप-साप म्हणून सगळे ओरडायला सुरुवात करतात आणि ती दोरी आहे साप नाही हे माहिती असूनही दोरी धोपटत, बडवत राहतात. न जाणो दोरीच्या ऐवजी खरंच साप असला तर अशाप्रकारे भुई धोपटण्याचाही प्रकार केला जातो. तो प्रकार खºया अर्थाने शुक्रवारी पहायला मिळाला.
पण आता माध्यमांनी विशेषत: वाहिन्यांनी आपला वेगळा अर्थ काढण्याचे प्रकार थांबवले पाहिजेत. अशा प्रकारांवर खरंतर कोणीही विश्वास ठेवत नसतो. आता हे सरकार कोसळण्याची तिळमात्र शंका नाही. कोणत्याही हेतूने सेना-भाजप एकत्र येण्याची शक्यता नाही. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी व शिवसेनेचा पाठिंबा काढून घेणार नाहीत की, सरकारमधून बाहेर पडण्याची सुतराम शक्यता नाही. कारण आयतीच मिळालेली सत्ता असताना ती घालवण्याइतकी काँग्रेस व राष्ट्रवादी कच्चे खिलाडू नाहीत. या सत्तेचा लाभ उठवतच त्यांना पक्षवाढ करता येत असताना, ते हे सरकार पाच वर्ष चालवण्यापासून मागे हटणार नाहीत. आज एकत्र राहूनही विरोध करण्याची त्यांना संधी आहे, स्वबळाची भाषा करत एकत्र नांदायची तयारी आहे. त्यामुळे कुणी कितीही गुडघ्याला बाशिंग बांधून बसले, तरी नवरीच मिळण्याची शक्यता नसल्याने या वायफळ गप्पांना काहीही अर्थ उरत नाही.
प्रफुल्ल फडके/ मुखशुद्धी\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा