गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

मान्याच्या वाडीत पेंग्विन


मान्याच्या वाडीत पारावर नेहमी परमानं कंपू जमला होता. सगळ्यांनी पेपरमध्ये डोकं खुपसलं आन तोंडात बोटं घालून आक्रीत घडल्यागत चेहरे करून बसले हुते. तुक्या माने, सख्या माने, परबती पाटील, दौलतराव, हैबती, महिपतराव माने कोंडाळं करून पुना पुनांदा ती बातमी वाचत हुते.


मुंबई महापालिकेच्या प्राणीसंग्रहालयातील पेंग्विनला बाळं झालं. त्याचं नामकरण केलं गेलं. या बातमीनं गावात लईच उंच्चुकता वाडली.

पारावर हे टोळंक जमल्यामुळं सगळी गावकरी पाराजवळ गोळा झाली अन् कायतरी भानगड हाय समजून बातमी काढू लागली. गर्दी जमल्यावर आमचे ग्रामपंचायतीचे विरोधीपक्ष नेते जित्याभाऊ मानेबी दाखल झाले. गर्दीचा फायदा घेत तिथं सभा लावायची जित्याभाऊला सवयच असल्यानं त्यांनी लगेच भाषनालाच सुरुवात केली. ‘जमलेल्या माझ्या मान्याच्या वाडीतील तमाम बंधू भगिनींनो....’ कुनीच टाळ्या वाजवल्या नाहीत, तरीबी पॉज घेऊन भाषणाला सुरूवात केलीच. ‘सध्या आमी इरोदी पक्षात हाओत... पन लवकरच ग्रामपंचायतीच्या इलेक्शन लागतील. आमची सत्ता येईल अन् मी आपल्याला आश्वासन देतो की, मुंबई महापालिके प्रमानंच मान्याच्या वाडीतही आपण पेंग्विन आणायचा. गावातल्या बालबच्चांसोबत पेंग्विनही खेळायला येईल. तो सोनेरी दिवस फार दूर नसेल.’


झालं... जित्याभाऊनं घोषणा केली, तसा गावात हुरूप आला. सरपंचाच्या वाड्यावर ही बातमी जाताच सरपंचांनी आपल्या गटातल्या समद्या सदस्यांना बोलावलं अन् सांगितलं, ‘आव घाबरताय काय रामभाऊ? केंद्रात आपलीच सत्ता हाय... राज्यात भी तशी आपलीच हाय... मग ग्रामपंचायतीत पेंग्विन आनायला आपल्याला कुनाच्या परवानगीची गरज हाय? विलेक्षत लागतील तवा लागतील. पन विरोधी पक्षांनी सत्तेवर आलो तर पेंग्विन आनू म्हनलंय. आपन अदुगरच आनून विरोधकांची आता काय गरज नाय हे दाखवून द्याचं.’ सगळ्या सदस्यांना ही आयडीयाची कल्पना लई म्हंजी लईच आवडली.

हा हा म्हनता गावात बातमी पसरलीच. गावात पेंग्विन येनार. बायकांमध्ये तर लईच हुरूप आला. नदीवर कपडे धुवाय गेलेल्या बायकांनी तर मैफीलच जमवली. अनुबाई, कोंडाबाई, पारूबाई, सरूबाई सगळ्यांनी धुनी बाजूला ठेवली अन् दाताला मिश्री लावत चर्चा करायला लागल्या. ‘मला तर बाई कंदी येकदा त्या पेंग्विनला पाहते असं झालंय.’ सरूबाई म्हनाली तशी पारूपाई म्हनाली, ‘अगं कालच्या रातीला तर मज्जाज झाली.’ तशी अनुबाई म्हनाली, ‘रातीला तुमची रोजच मज्जा असते म्हाईताय.’ समद्या बाया फिदीफिदी हासल्या तशी लाजत पारूबाई म्हनाली, ‘ती मज्जा न्हाय काय...माझ्या सपनातच पेंग्विन आला हुता... मी त्याला अस्सा कुरवाळत होते... अन् त्याच्या तोंडावरून हात फिरवाय सुरूवात केली तशी जाग आली.. पाहते तो काय? आमचं काळवीह होतं बाजूला.’ सगळ्या बाया खोखो हासायला लागल्या. तशी सरूबाई म्हनाली, ‘म्या किनई छानसा पाळना तयार करनार हाय... त्या पेंग्विनची बारसं कराय लागंल न्हवं का? मुंबईत बी केलं म्हने म्हापौरांनी त्या नव्या पेंग्विनचं बारसं. आपन बी धडाक्यात करायचं.’ समद्या बायांनी लगेच व्हय व्हय म्हनून त्याला होकार दिला.


तिकडं पंचायतीच्या कार्यालयात सगळे सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी जमले होते. शहरातून कुनी तरी चार-पाच इंजिनीअर आले हुते. त्यांच्याशी चर्चा चालली हुती. तास-दोन तास चर्चा झाल्यावर इंजिनीअर निगून गेले अन् सरपंच सगळ्यांना सांगू लागले, ‘या इंजिनीअरचं म्हननं हाय की, गावात पेंग्विन पाळायचा म्हंजी सगळीकडं गारीगार करायल लागतंय. आपल्या इतली गरमी त्या पेंग्विनला सोसायची न्हाय. त्यासाठी सगळीकडं थंड व्हायला हवं. म्हनून एअरकंडिशन्ड सगळं करावं लागल. येक भला मोट्टा फ्रिजच जनू तयार करावा लागंल. त्या पेंग्विनला वाटलं पायजेल की, आपन आॅस्ट्रेलियातच हाओत.’

‘पन म्या काय म्हंतु?’ परबत्यानं तोंड खुपासलंच, ‘आॅस्ट्रेलियात कांगारू असतात ना? पेंग्विन विंग्लंडला असतात.’ तसं सरपंच उसळलंच आन म्हनालं, ‘आरं सुक्काळीच्या विग्लंड, फिनलंड, थायलंड कुटल्या का लँडवर असनात पर भारतात तयार हुत न्हाईत.. तिथं थंड वातावरन असतंय तिथंच ते उपजतयं.. म्हनून त्येला गरमी लागू लागू नाय म्हनून मोट्टा कांप्रेसर बसवायचा, त्याचं काय ते स्प्लींट युनीट तयार करून पाइपलाइननं सगळीकडं बर्फागत थंड करायचं अन् त्यात त्यो पेंग्विन ठिवायचा. त्यासाठी म्हनं धा पंदरा कोटी रूपये खर्च यील. शिवाय वर्षाला त्याला पोसायचा खर्च पंदरा लाख हाय.. आपल्या ग्रामपंचायतीला झेपनार हाय का हे?’


सरपंचानं गनित सांगितलं तसे समद्यांचे चेहरे खाडकन पडलं. दोलती म्हनाला, ‘पन आता इरोदी पक्षानं ह्योच मुद्दा लावून धरला अन् गावात सादा पेंग्विन हे सत्ताधारी आनू शकत न्हाईत म्हनाले, तर विलेक्षनमध्ये सगळे पेंग्विनमुळे तिकडं वळतील त्याचं काय?’

तसं सरपंच म्हनाले, ‘आरं आपल्याला इकती थंडी झेपनार हाय का? आपल्याकडे कोंबड्या अंडी उबवतात, त्या थंडीमुळं कोंबड्या अंडी बी देनार न्हाईत. तुमच्या गाई म्हशी हिटला नाय आल्या तर रेडा कुनाला दावनार त्या पेंग्विनच्या थंडीत? त्यापरीस गावात जी भटकी कुत्री हायत, त्यांच्यासाठी चांगला कुत्ता घर बनवू अन् त्यांना भटकन्यापासून, गावात घान करन्यापासून आवर घालू. जिकडं तिकडं भटकी कुत्री गावापासून शेरापर्यंत घान करतात त्यांची सोय केली आन गाव स्वच्छ केलं, तर लई भारी हुईल. पेंग्विनचा इकता खर्च करन्यापेक्षा आख्ख्या मान्याच्या वाडीला स्पेशल गाडी करून आपन मुंबईची सहल घडवून आणू आणि दाखवू की पेंग्विन. हाय काय अन् नाय काय?’


ही कल्पना समद्यांना आवडली अन् सगळ्यांनी एका सुरात म्हनलं, ‘पर येत्या विलेक्षनला आपल्या पॅनलची खूण मात्र पेंग्विनच ठेवू.. कसं?’

प्रफुल्ल फडके/ रविवारची कथा


9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: