संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पक्षाकडून दावेदारी सांगण्यात येत होती, मात्र आता या प्रकरणात पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. जदयूचे राष्ट्रीय महासचिव के. सी. त्यागी यांनी यासंदर्भात भाष्य करताना नितीश कुमार यांच्यामध्ये पंतप्रधान बनण्याची योग्यता आहे, मात्र ते पंतप्रधानपदाचे दावेदार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. अर्थात नितीश कुमार यांच्या मनात हे पंतप्रधानपदाचे वेध कायम असतात. त्यांच्या नावाची त्यांनी अनेक वेळा अशी चर्चा केलेली आहे, पण पक्षाने राष्ट्रीय परिषदेनंतर थेट पंतप्रधानपदाचे उमेदवार असे घोषित करून स्वत:चीच अडचण झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर ही चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.
म्हणजे जदयूच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीमध्ये राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचे दावेदार नसले, तरी त्यांच्यामध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवारामध्ये आवश्यक असणारे सर्व गुण असल्याचे म्हटले आहे. राजीव रंजन यांच्या याच वक्तव्यामुळे बिहारमधील राजकीय वर्तुळात सध्या राज्यात सत्तेत असणाºया जदयू आणि भाजप युतीमध्ये काहीतरी बिघडले असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर त्यागी यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. आज कमी संख्याबळ असतानाही केवळ भाजपमुळे आपण बिहारचे मुख्यमंत्री आहोत याची जाणीव नितीश कुमार आणि संयुक्त जनता दलाला झालेली आहे हे नक्की. मुळात पंतप्रधानपदाचे उमेदवार असण्यासाठी पक्ष मोठा असावा लागतो, चांगले संख्याबळ असावे लागते. पक्ष देशव्यापी असावा लागतो. आपले डबके केवढे आहे याचा अंदाज न घेता मोठ्या पक्षांशी बरोबरी करणे योग्य नसते, पण नितीश कुमार यांना याची आता थोडीफार जाणीव झाल्याने त्यांनी पक्षाकडून केल्या गेलेल्या वक्तव्याचे समर्थन न करता वाक्य फिरवले.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यागी यांनी, नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचे दावेदार नाहीत. आमचा पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील (एनडीए) एक मबजूत घटक पक्ष असून, एनडीएचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. जेडीयू ही राज्यात आणि केंद्रात भाजपसोबत असल्याचे त्यागी यांनी म्हटले आहे. नितीश कुमार यांच्यामध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवारामध्ये आवश्यक असणारे सर्व गुण आहेत, मात्र पंतप्रधान बनण्यासाठी आवश्यक असणारे गुण आणि पंतप्रधानपदासाठी दावा करणे या दोघांमध्ये फार अंतर आहे. त्यामुळे ज्या लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम असेल त्यांना मी हे सांगू इच्छितो की, आमच्या नेत्यामध्ये पंतप्रधान बनण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण आहेत, असे ललन सिंह म्हणाले होते. त्यानंतर जदयू आणि भाजपमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याला विराम देण्याचा प्रयत्न केला, पण संयुक्त जनता दल हा रालोआत सतत आपले अस्तित्व वेगळे दाखवण्याचा प्रयत्न करतो. कधी आघाडीतून बाहेर पडतो. सर्वात प्रथम नरेंद्र मोदींचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे आल्यावर २०१३ मध्ये मोदींच्या नावाला विरोध हा नितीश कुमार यांनीच केला होता. भाजपने अगोदर गोव्यातील बैठकीत मोदींना प्रचार प्रमुख आणि निवडणुकीचे नेतृत्व दिले होते. त्यानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. त्यानंतर आघाडीतील घटक पक्षातील प्रमुख नेत्यांची त्यांनी मान्यता मिळवली. त्यावेळी नितीश कुमार हे आपण पंतप्रधानपदाचे दावेदार आहोत असे सांगत मोदींच्या नावाला त्यांनी विरोध केला होता. तो अजून मावळलेला दिसत नाही हे यातून स्पष्ट होते, पण अशा सुप्त इच्छा अधूनमधून व्यक्त करत संयुक्त जनता दल खडे टाकू पहात आहे हे नक्की.
नितीश कुमार यांच्यात पंतप्रधानपद सांभाळण्याचे गुण आहेत असे मत संयुक्त जनता दलाने फिरवले आहे. यात गुण असण्याचा संबंध येतो कुठे? एका राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. पक्षाचे नेतृत्व केले आहे. ज्याच्याकडे नेतृत्वगुण आहेत तो अशा पदाला पात्र असतो. हे कोणाचेही स्वप्न असू शकते. महाराष्ट्रातून शरद पवार, बंगालमधून ममता बॅनर्जी याही आपण पंतप्रधान व्हावे असे स्वप्न पाहतात. त्यांचे कार्यकर्ते कधी कधी तसे बोलूनही दाखवतात, पण त्यासाठी असावा लागणारा देशव्यापी जनाधार महत्त्वाचा असतो. ममता बॅनर्जींना बंगालच्या बाहेर जनाधार किती आहे? त्यांच्या पक्षाची व्याप्ती किती आहे हे माहिती आहे. शरद पवार यांचेही तसेच आहे. आपला पक्ष राष्ट्रीय असला, आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलो, तरी हा पक्ष महाराष्ट्रीय आहे आणि त्याच्याबाहेर आपल्याला कुठेही पाय पसरणे जमलेले नाही. या मर्यादा त्यांनी ओळखल्या आहेत. त्यामुळे आता शरद पवारांकडून ना पंतप्रधानपदाचा दावा केला जात आहे ना यूपीएच्या अध्यपदाची मागणी होत आहे. तशी परिपक्वता अजून नितीश कुमार यांच्याकडे आलेली नाही. त्यामुळेच आपल्या मनातील सुप्त इच्छा ते अधूनमधून बोलून दाखवत आहेत, मात्र मोदी सरकारने, भाजपने त्यांच्यावर इतके उपकार करून ठेवले आहेत की, त्यांना आता रालोआतून बाहेर पडणे परवडणारे नाही. त्यामुळे अशा इच्छा व्यक्त करून भाजपला दुखावणेही परवडणारे नाही. आज बिहारमध्ये संयुक्त जनता दलाची सत्ता आहे ती केवळ भाजपमुळे आहे. मागच्या पाच वर्षांत भाजपविरोधात जाऊन आणि लालूप्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी केल्यानंतरही अखेरच्या टप्प्यात मदतीला भाजपच धावून आला होता याची जाणीव त्यांना असल्याने नितीश कुमार यांनी ही चूक सुधारून घेतली आणि आपला दावा नसल्याचे स्पष्ट केले. तरीसुद्धा पाण्यात खडा टाकून अंदाज पाहतात तसा खडा टाकून कशा प्रतिक्रिया उमटतात हे पाहिले, पण भाजपने त्यावर कसलीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे त्यांना जास्तच धडकी भरली असावी असे दिसते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा