जवळपास दीड वर्षाच्या कालखंडानंतर आता नाटकाची तिसरी घंटा वाजणार आहे. रूपेरी पडदा झळकणार आहे. चित्रपटसृष्टीत चैतन्य निर्माण होणार आहे. ही एक अतिशय आनंदाची बाब आहे. शाळा, प्रार्थनास्थळांपाठोपाठ चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. २२ आॅक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेत चित्रपटसृष्टीला फार मोठे महत्त्व आहे. हा एक फार मोठा उद्योग आपल्या अर्थव्यवस्थेतील घटक आहे. मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि उलाढाल होणारा हा उद्योग असल्याने अर्थचक्र वेगाने सुरू होण्यासाठी हा घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या दीड वर्षात या इंडस्ट्रीला फार मोठा फटका बसला होता. त्यातून सावरण्याची ही संधी मिळणार आहे.
२२ आॅक्टोबरपासून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिली आहे. शाळांची घंटा ४ आॅक्टोबरपासून, मंदिरांची घंटा ७ आॅक्टोबरपासून तर नाट्यगृहांची तिसरी घंटाही आता वाजणार असल्याने नाटक आणि चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे. चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांचे प्रतिनिधी यांच्यासोबत शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला आणि त्यानंतर लगेच त्यांनी निर्णय घेतला. जवळपास दीड वर्षापासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद आहेत. ती सुरू करण्यासाठी महिन्याभराचा वेळ लागेल.
सांस्कृतिक क्षेत्र बंद राहणे हे फार वाईट असते. नाटक, चित्रपट आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे फार महत्त्वाचे असतात. त्यातून ज्ञान, मनोरंजन आणि प्रबोधन होत असते. थकलेल्या माणसांना मानसिक आराम देण्याचे काम या क्षेत्राकडून होत असते. त्यामुळे आपल्याकडे नाटक, चित्रपटांना फार महत्त्व आहे. सनातन काळापासून राजदरबारी नाटक आणि अन्य कलांना प्रोत्साहन दिले जाते आहे. जेव्हा जेव्हा कलाक्षेत्रावर आक्रमण होते, तेव्हा तेव्हा ते राष्ट्र संकटात सापडते. आताही तसेच झालेले होते. कोरोनामुळे संपूर्ण कला क्षेत्रावर आक्रमण झाले होते. नाटक, रंगमंचीय अन्य अविष्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रपट या क्षेत्रांवर बंदी आल्यामुळे लाखो कलाकार आणि सहाय्यकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला. अनेकांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्याही केल्या होत्या. चित्रपट क्षेत्रात अनेक निर्मात्यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. दरवर्षी हजारो चित्रपट आपल्याकडे प्रदर्शित होतात, पण गेल्या दीड वर्षात चित्रपटांचे प्रदर्शन होऊ न शकल्याने हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. हे चित्र लवकरात लवकर बदलणे गरजेचे होते. त्यादृष्टीने आता आशादायक चित्र दिसू लागले आहे.
खरे तर देशातील अनेक राज्यांमध्ये चित्रपटगृहे सुरू करण्यात आली आहेत. दिल्ली, लखनऊमध्ये सिनेमागृहे सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सिनेमागृहे सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. बॉलीवूडला सर्वाधिक उत्पन्न मुंबईतून मिळते. त्यामुळे ही मागणी करण्यात येत होती. अखेर शनिवारी याबद्दलचा निर्णय झाला. देशात कुठेही चित्रपट सुरू असला, तरी तो जोपर्यंत महाराष्ट्रात चालत नाही तोपर्यंत त्याला राजमान्यता नसते. कारण बॉलीवूडचे म्हणजे मुंबई महाराष्ट्राचे या क्षेत्रावर वर्चस्व आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तशीच चित्रपट क्षेत्राचीही ती राजधानी आहे. त्यामुळेच मुंबई महाराष्ट्रात चित्रपट आणि नाटक सुरू होणे आवश्यक होते. ते आता पुढील महिन्यात २२ तारखेपासून सुरू होणार असल्याने यंदाच्या दिवाळीत नवे चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतील ही अपेक्षा.
चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद असल्याने इंडस्ट्रीमधल्या सगळ्यांचीच सगळीच गणिते बिघडली होती. बॅकस्टेजला काम करणाºयांची अवस्था अतिशय वाईट झाली होती. त्यांना आले दिवस ढकलणेदेखील अत्यंत कठीण जात होते. आता नाट्यगृहे सुरू होणार असल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटेल. अनेकांच्या हाताला काम मिळेल. म्हणूनच चित्रपटगृहे, नाट्यगृहे पुन्हा सुरू होणार आहेत. ही बातमी प्रचंड आनंद देणारी आहे. सध्या जवळपास २०० मराठी चित्रपट तयार आहेत. त्यामुळे चित्रपटगृहे कधी सुरू होणार याची निर्माते-दिग्दर्शक वाट पाहत होते. आता सर्वात मोठी अडचण म्हणजे कोणता चित्रपट केव्हा प्रदर्शित करायचा, किती दिवस कोणते थिएटर मिळवायचे हा संघर्ष यातून उभा राहणार आहे, पण सर्वच निर्माते, दिग्दर्शक, वितरक यांनी सामंजस्याने मार्ग काढून चित्रपटगृहांची वाटणी करून घेणे आवश्यक आहे. किती शो करायचे, केव्हा करायचे याचा विचार करावा लागेल. मॉल मल्टिप्लेक्समध्ये जिथे एकाच ठिकाणी अनेक स्क्रिन आहेत तिथे त्याचे योग्य नियोजन करून सर्वांना जगता आणि जगवता येईल असे शो लावावेत. कोणत्याही प्रकारची मोनोपॉली, अडवणूक होईल असे कोणाही निर्मात्याने करू नये. लीव्ह अँड लेट लिव्ह जगा आणि जगू द्या या न्यायाने काम करावे लागेल. त्याचप्रमाणे चित्रपट आणि नाट्यगृहातील कर्मचाºयांच्या सुरक्षेचा विचारही करावा लागेल, पण एकूणच राज्यातील नाटक व चित्रपटगृहे सुरू होणार असल्याने सर्वांना आनंद झाला आहे, हे निश्चित.
दिवाळीनंतर दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धा असतात. दोन वर्ष त्यात खंड पडला आहे, पण पुढे मागे तारखा करून हा पडलेला खंड भरून काढावा आणि २0२२ मध्ये प्रवेश करताना नाटक, चित्रपट क्षेत्राला भरघोस यश मिळावे हीच अपेक्षा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा