गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

कृष्णाच्या ताकदीची ओळख करून देण्याची गरज

 


कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे गोकुळ अष्टमीचा उत्सव आपल्याला साजरा करता आलेला नाही. अर्थात गेल्या काही वर्षांपासून गोकुळ अष्टमीचा सण आणि दहीहंडी म्हणजे राजकीय शक्तिप्रदर्शनाचे अड्डे बनले होते. त्यामुळे असा सण साजरा झाला नाही, तर काही फरक पडत नाही. कारण गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने होणाºया मुंबई आणि एकूणच महाराष्ट्रातील दहीहंडीतून कृष्ण गायब झाला आहे, असे वाटू लागले आहे. म्हणजे मुंबई-ठाण्यातील अनुकरण सर्वत्र होत असते. त्यामुळे तोच प्रकार सगळीकडे होताना दिसतो, म्हणजे कृष्णाचा उत्सव असूनही कृष्णाचा फोटो इवलासा न दिसेल असा किंवा नसतोही आणि आयोजकांचे बॅनर आभाळाएवढे. त्यामुळे दहीहंडी ही भक्तीभावाने नाही, तर थिल्लरपणासाठी आणि राजकीय शक्ती प्रदर्शनासाठी केली जाते, असा याचा अर्थ स्पष्ट होतो. म्हणूनच या लोकांना कृष्णाच्या ताकदीची ओळख करून देण्याची गरज आहे.


श्रीकृष्णाची चरित्रकथा सांगते की, श्रीकृष्ण जन्माला येण्याआधीच त्याला ठार करायची तयारी झाली होती. त्यातून तो वाचला. पुढे सतत जीवावर संकटे आली. तो लढत राहिला. काही ना काही युक्ती करून वाचला. प्रसंगी पळसुद्धा काढला; पण संकटे टळावीत म्हणून स्वत:ची कुंडली घेऊन त्याने ज्योतिषी गाठला नाही, ना उपास केले, ना अनवाणी पायाने फिरला. यावरून संकटावर मात करण्याची ताकद तुमच्यातच असते, संकटांना भिऊन चालत नाही हे लक्षात घेतले पाहिजेच. कोरोनाच्या या संकटात आपण हीच कृष्णाची प्रेरणा आजच्या दिवशी घेतली पाहिजे; पण कृष्णाला लपवायचा प्रयत्न केला, तरी तो लपवता येणार नाही. गोकुळ अष्टमीत कृष्णाचा फोटो नाहीसा केला आणि नेत्यांचे फोटो आले, तरी कृष्णाचा महीमा कधीच कमी होत नाही, हे नेत्यांना सांगण्याची वेळ आली आहे.

कृष्णाने सदैव पुरस्कार केला फक्त कर्मयोगाचा! भर रणांगणात अर्जुनाने धनुष्य खाली टाकले. तेव्हा कृष्णाने, अर्जुनाची कुंडली मांडली नाही. त्याला गंडे-दोरे बांधले नाहीत, तर त्याला कर्माची जाणिव करून दिली. तुझे युद्ध तुलाच करावे लागेल, असे त्याने अर्जुनाला ठणकावून सांगितले. अर्जुनाने धनुष्य खाली टाकले, तेव्हा श्रीकृष्णाने ते उचलून स्वत: अर्जुनातर्फे लढाई केली नाही. मी देव आहे, तुझ्या ऐवजी मी लढतो आणि तुझे रक्षण करतो, असे कृष्णाने म्हटले नाही. तर प्रत्येकाने स्वत:ची लढाई स्वत:च लढायची असते हे सांगितले. तू माझी भक्ती कर, मी तुझे युद्ध करतो, असेही सांगितले नाही, तर तुला युद्ध केलेच पाहिजे, ते तुझे कर्तव्य आहे, असे सांगून कर्तव्याची जाणिव त्याने करून दिली. आज आपल्या कर्तव्यापासून भरकटलेल्या लोकांना हे सांगणे आवश्यक आहे.


राजकीय नेते बॅनरबाज झाले आहेत; पण कर्तव्यापासून दूर गेले आहेत. श्रीकृष्ण हा त्या काळातील सर्वात शक्तिशाली योद्धा होता. त्याने मनात आणले असते, तर एकट्याने कौरवांचा पराभव केला असता; पण श्रीकृष्णाने शस्त्र हाती धरले नाही. जर अर्जुन लढला तरच त्याने अर्जुनाचे सारथ्य करण्याची तयारी दाखवली. एक महान योद्धा सारथी बनला. अर्जुनाला स्वत:ची लढाई, स्वत:लाच करायला लावली. यातून लक्षात घेतले पाहिजे की, जे लोक मदतीवर अवलंबून राहतात ते परस्वाधीन होतात. मदत, सहानुभूती या सगळ्या माया आहेत, तुम्हाला आळशी, निष्क्रिय बनवणाºया आहेत. तुमचे काम तुम्हालाच केले पाहिजे, हा संदेश यातून घेतला पाहिजे.

युद्ध न करता अर्जुनाचे सारथ्य करण्याच्या या कृतीतून कृष्णाने संदेश दिला की, तुम्ही स्वत:चा संघर्ष करायला स्वत: सज्ज झालात, तरच मी तुमच्या पाठिशी आहे. मी तुमचा सारथी बनायला तयार आहे; पण तुम्ही लढायला तयार नसाल, तर मी तुमच्या वतीने संघर्ष करणार नाही. तुमच्या पदरात फुकट यश टाकणार नाही. कोणत्याही देवाचा-देवीचा आशीर्वाद घ्यायला जाल, तेव्हा श्रीकृष्णाला विसरू नका. म्हणजे असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी असा कोणी प्रचार करत असेल, तर त्याला खाटल्यावरच पडू देत; पण मदतीला कोणी येणार नाही. हे श्रीकृष्णाने सांगितले आहे. त्यामुळे कृष्णाचा बाजार मांडून त्याची दहीहंडी हिरावून घेऊन स्वत:ला मोठं करू पाहणाºया नेत्यांनीही लक्षात घेतले पाहिजे की, कृष्णापेक्षा तुम्ही कधीच मोठे होऊ शकणार नाही.


उपासना म्हणून, व्रत म्हणून अनेक जण काही तरी अघोरी करत असतात; पण अनवाणी चालत जायची गरज नाही. उपाशी राहायची गरज नाही. शस्त्र खाली टाकू नका. प्रत्येक व्यक्तीकडे गुणांचे एक शस्त्र आहे. नेमके तेच शस्त्र काढा आणि त्याचा उपयोग करून लढा. कोणताही देव-देवी तुमची लढाई लढणार नाही. तुमची स्वप्ने फुकटात पूर्ण करून देणार नाही. स्वत:ची लढाई स्वत:च लढा हे कृष्णाचे तत्वज्ञान आहे. जो शूरपणे स्वत:ची लढाई स्वत: करू शकतो त्याच्या पाठिशी कृष्ण असतो. म्हणूनच वि. वा. शिरवाडकर यांच्या कणा या कवितेचा सारच कृष्ण तत्वज्ञान आहे. मोडून पडला संसार माझा, तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. हे सार या जीवनाचे आहे. कर्म आणि कर्तव्याची जाणिव करून देण्याचे काम श्रीकृष्णाने केले आहे. गलीतगात्र झालेल्याला, संकटात सापडलेल्याला मदतीची गरज नाही, तर त्याला लढ म्हणणारा श्रीकृष्णासारखा मित्र असला पाहिजे, अशी आजची गरज आहे. प्रत्येकाने स्वत:च्या जीवनाचा संघर्ष स्वत: करायचा आहे, फक्त त्याच्या पाठिशी एखादा पाठीवर थाप मारून लढ म्हणून प्रोत्साहन देणारा कोणीतरी कृष्ण हवा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: