गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

मालिका विश्वाला आयपीएलची स्पर्धा


आयपीएलचा उर्वरित हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. आयपीएलचा उत्साह गेल्या बारा वर्षांत वाढतच चाललेला आहे. त्यात आजकाल या आयपीएलच्या नावाखाली चालणाº­या स्पर्धा, बक्षीस योजना, जुगार याचेही आकर्षण तरुणाईकडे वाढल्याने विविध वाहिन्यांवरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग आता आयपीएल टी-२० सामन्यांकडे वळला आहे; पण त्या काळात कोणतीही वाहिनी आपला प्रेक्षकवर्ग टिकवताना दिसत नाही. कथानकं पुढं सरकवताना दिसत नाहीत, तर त्या मालिका या पंधरा-वीस दिवस रेंगाळत कशा ठेवायच्या याकडेच वाहिन्यांचा कल आहे. त्यामुळे बहुतेक मालिका या रटाळ वाटू लागल्या आहेत. आयपीएलनंतर प्रेक्षक पुन्हा आपल्या वाहिनीकडे वळतील, तेव्हा कथानक पुढे गेले असेल, तर प्रेक्षकवर्ग पुढे मालिका पाहणार नाही तो तुटेल या चिंतेने हळूहळू कथानक पुढे सरकवण्याचा प्रयत्न वाहिन्यांनी चालवला आहे. त्याचा परिणाम मालिका सपक होताना दिसत आहेत.


झी मराठीवर याचा परिणाम चांगलाच दिसून येत आहे. यातील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत ओमचं घरात आगमन झालं असलं, तरी कथानक तिथल्या तिथे रेंगाळल्यासारखं दिसत आहे. स्वीटूला त्रास देण्यासाठी मालविका आणि मोहितचे नवे प्रयोग सुरू होतील, त्यातून साध्य काही होणार नाही, तर फक्त एकमेकांवरच्या कुरघोड्या करण्याचे प्रकार वाढवले जाणार आहेत. त्यामुळे एखाद दुसरा काय दहा बारा एपिसोड बघितले नाहीत, तरी काही फरक पडणार नाही असे कथानक पुढे सरकवले जात आहे.

कलर्स वाहिनीवरच्या जय जय स्वामी समर्थमध्येही तोच तो पणा येताना दिसत आहे. त्या नाभिक सदा आणि त्याची बायको तिलोत्तमा यांनी स्वामींची नखे काढणे हे गेले पंधरा दिवस अनावश्यक इतके ताणले गेलेले कथानक आहे. त्यातही तो रामाचार्य हा दुष्ट आहे, स्वामी विरोधक आहे हे दाखवताना त्याने कृष्णप्पासारख्या छोट्या मुलाच्या खोड्या काढून त्याला रडवणे आणि स्वामींच्या भक्तांना त्रास देण्याचा प्रकार करणे हे विचित्र वाटते. तुझ्या स्वामींना काही येत नाही, असे आव्हान त्या कृष्णप्पाला देणे आणि कृष्ण्प्पा करता ते आव्हान स्वामींनी स्वीकारणे जरा गमतीशीर वाटते. विसोबा खेचराचा अभंगाचा अर्थ स्वामींनी सांगणे हे अत्यंत पोरकटपणाचे वाटते. हे सगळं आयपीएलच्या काळात प्रेक्षक टिकवण्यासाठी केलं जात आहे का, असा प्रश्न पडतो. कथानक अनावश्यक ताणून धरल्याने त्यातील रंजकता आणि आकर्षण संपून जाते याचे भान निर्माता, दिग्दर्शक आणि लेखकांना असले पाहिजे.


मात्र आयपीएलशी वेळेची स्पर्धा नसल्यामुळे सोनी मराठीवरच्या गाथा नवनाथांची या मालिकेने आपली गती मात्र कायम ठेवली आहे. आता जालंधरनाथांचा जन्म झाला असल्यामुळे त्यांना उपदेश, शिक्षण, दिक्षा देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जालंधर नाथांचे कथानक पुढे सरकले म्हणजे आपोआप मच्छिंद्रनाथांचा पुढचा प्रवास आणि पाचव्या नाथाची निर्मिती या प्रक्रिया अतिशय सूत्रबद्ध रितीने चालताना दिसत आहेत. दरम्यानच्या काळात गोरक्षनाथांचे श्री महादेवांकडे शिक्षण पूर्ण करणे असे सगळे एकाचवेळी दाखवून मालिका योग्य प्रकारे चाललेली आहे.

झी मराठीवर मागच्या महिन्यात सुरू झालेल्या नव्या मालिकांनी मात्र प्रेक्षकांची पकड घेतल्याचे दिसते. यात माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेनेही प्रेक्षकांना आकर्षित केलेले दिसते. यात प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदे, संकर्षण कº­हाडे, मोहन जोशी या प्रतिथयश कलाकारांची उपस्थिती असल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना आवडतही आहे; पण या मालिकेला आयपीएलच्या सामन्यांचा चांगलाच शह मिळत असल्याने कथानकात संघर्ष आणि मसाला आणण्याचा चांगला प्रयत्न इथे दिसत आहे.


त्याचप्रमाणे तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील एकत्र कुटुंब हे अतिशय आनंद देणारे आहे. सगळेजण एकमेकांशी प्रेमाने वागतात, एकमेकांचा आदर करतात, हे अत्यंत स्वप्नवत आहे. कारण आजकाल एकत्र कुटुंबच पहायला मिळत नाही. त्यामुळे यातील बयोबाई आणि कुटुंब हे जितके प्रेक्षकांना आवडते तितकेच सिद्ध आणि आदिती प्रेक्षकांना आवडत आहेत. सिद्धच्या भूमिकेतून हार्दिक जोशी आपली राणाची इमेज तोडण्याचा बº­यापैकी प्रयत्न करत आहे, हे विशेष.

झी मराठीच्या रात्रीच्या ज्या मालिका आहेत त्या मात्र गतीमान आहेत. ती परत आली आहे, ही रामसे फॉर्म्युल्यातील मालिका आता कुठे लाईनवर आलेली दिसत आहे. पहिले पंधरा-वीस एपिसोड कसलीही भूतशक्ती न दिसता नुसतीच घबराहट दाखवली गेली; पण आता प्रत्यक्षात निलांबरी समोर आल्याने भूत दिसू लागले आहे. त्यामुळे या मालिकेतील रंजकता वाढत आहे, हे विशेष. त्याचप्रमाणे रात्रीस खेळ चाले मालिकेत वाडा विकण्यासाठी सुशलीचा घरात शिरकाव झाला आहे. त्यामुळे सयाजीराव आणि कावेरी आयतीच आमने सामने आलेली आहेत. त्यांच्या शरीरांचा ताबा अण्णा आणि शेवंताला घेणे सोपे झाले आहे. त्यामुळे घटकेत सर्वांचा विश्वास संपादन करणारी कावेरी आणि घटकेत शेवंताचे भूत शिरलेली आणि सयाजीरावाच्या गळ्यात गळे घालून हिंडणारी कावेरी यामुळे मालिकेत चांगला ट्विस्ट आलेला आहे; पण हे सगळं जरी असलं तरी आयपीएल सामन्यांचा फटका या मालिकाविश्वाला बसत असल्याचे चित्र दिसत आहे.


प्रफुल्ल फडके/छोटा पडदा

9152448055\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: