गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

जिद्दी आणि दुराग्रही सिद्धू


पंजाबमधील राजकीय नाट्य दररोज नवे वळण घेत आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा मंगळवारी राजीनामा दिला. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तो नाकारला असला, तरी या एकूणच प्रकरणातून नवज्योत सिंग सिद्धू यांचा दुराग्रही आणि जिद्दी स्वभाव पुन्हा एकदा दिसून आला आहे. सिद्धू भारतीय क्रिकेट संघात असताना फार मोठी कारकीर्द त्यांनी गाजवलेली नाही; पण हीच जिद्द त्यांनी क्रिकेटमध्ये दाखवली असती, तर कदाचित विराट, सेहवागसारखी चांगली कारकीर्द ते करू शकले असते. त्यानंतर आपल्या वक्तृत्वावर आणि भाषेवरील प्रभुत्वाचा फायदा घेत कॉमेंट्री करण्यात एक प्रकारची रंजकता आणली होती; पण तीही गेल्या काही दिवसांपासून त्यांनी बंद केली. त्यानंतर कपिल शर्मासारख्या कॉमेडी शोमध्ये सहभाग घेऊन आपले विनोदावरचे प्रभुत्व त्यांनी दाखवले, ते पण कालांतराने थांबले. राजकारणात गेल्यावर सुरुवातीला दीर्घकाळ भाजपमध्ये आणि गेली सात वर्ष काँग्रेसमध्ये; पण या प्रत्येक प्रवासात त्यांची अवस्था ही असंतुष्ट आत्मा अशीच राहिल्याचे दिसते.

पंजाबचे भवितव्य आणि पंजाबच्या नागरिकांचे कल्याण यांसाठी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. त्यामुळे मी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मी यापुढेही काँग्रेससाठी काम करत राहीन, असे सिद्धू यांनी राजीनामा पत्रकात म्हटले आहे. आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर असल्याने आणि नसल्याने पंजाबचे काय भवितव्य आणि नागरिकांचे कल्याण असणार आहे? ते सिद्धू यांनाच माहिती, पण सिद्धू यांनी केलेल्या बंडामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनामा दिला. त्यानंतर चन्नी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली. कदाचित चन्नींच्या ऐवजी आपल्या गळ्यात ही माळ पडावी, आपल्या पत्नीची वर्णी लागावी, अशी अपेक्षा असेल. हा अपेक्षाभंग झाल्यामुळे त्यांनी हे दबावतंत्र सुरू करण्याचा प्रकार केला असू शकतो.


पंजाबचे माजी मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती, पण पंजाब काँग्रेसला अंतर्गत मतभेदांचा सामना करावा लागत होता. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद निर्माण झाल्याचे चित्र होते. नवज्योत सिंग सिद्धू पूर्वी भाजपमध्ये होते. महाराष्ट्रात भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. हेच समीकरण पंजाबमध्येही लागू झाले आहे. तशी सिद्धू यांची राजकीय वाटचाल भरपूर झालेली आहे. भाजप, आप आणि काँग्रेस असा सिद्धू यांचा प्रवास आहे. २००४ मध्ये ते भाजपचे उमेदवार म्हणून अमृतसर मतदारसंघातून निवडून आले. न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यामुळे त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्यांनी पोटनिवडणूक जिंकली. २०१६ मध्ये सिद्धू यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली, मात्र तीन महिन्यांतच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. काही महिन्यांतच त्यांनी आवाज-ए-पंजाब या राजकीय आघाडीची स्थापना केली. २०१७मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्याकडे पर्यटन खाते सोपवण्यात आले होते. नियमभंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने सिद्धू यांना ७२ तास प्रचार करण्यापासून रोखले होते. १४ जुलै २०१९ रोजी सिद्धू यांनी राजीनामा सादर केला. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांचा राजीनामा स्वीकारला. सिद्धू यांनी पंजाब सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकाही केली होती. पंजाबमधील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. २६ मे रोजी कथित शेतकरी आंदोलनास ६ महिने पूर्ण झाल्याबद्दल शेतकरी संघटनांनी एकदिवसीय आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर असल्याने संघटनांनी तसे न करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती; मात्र नवज्योत सिंग सिद्धू यांनी पटियाला आणि अमृतसर येथील आपल्या निवासस्थानी काळे झेंडे लावून मुख्यमंत्र्यांच्या विनंतीस केराची टोपली दाखविली होती. त्यामुळे या प्रत्येक घटनेत नवज्योत सिद्धू यांची अवस्था ही दुराग्रही, हट्टी अशीच राहिली आहे. काँग्रेसमध्ये अशा हट्टवादाला काडीची किंमत नसते. हाच प्रकार महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नारायण राणे यांनी केला होता. अखेर त्यांना काँग्रेस सोडावी लागली. सिद्धंूचेही तसेच होणार का याचे उत्तर भविष्यकाळात मिळेल.

सिद्धू यांनी ५१ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना ३२०२ धावा केल्या आहेत. यामध्ये ९ शतके आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे. १३६ वनडे सामन्यांत सिद्धू यांनी ३७.०८च्या सरासरीने ४४१३ धावा केल्या. वनडेत सिद्धू यांच्या नावावर ६ शतके आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. तिथे सातत्य दाखवले असते, तर सचिनसारखा विक्रम ते करू शकले असते; पण आक्रमकता, संयम नसण्याच्या गुणामुळे मर्यादित यश पदरात पडताना दिसते आहे. तीच तºहा आता राजकीय इनिंगमध्येही दिसत आहे.


कपिल शर्माचा कॉमेडी शो, यामध्ये जज म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तिथेही थोडे वाद झाल्याचे दिसून आले होते. याशिवाय वादग्रस्त असलेली मालिका किंवा टीव्ही शो बिग बॉसमध्येही त्यांनी हजेरी लावली होती. हे सगळे पाहता सतत चर्चेत राहण्याचा त्यांचा अट्टाहास दिसून येतो. या अट्टाहासापोटी अनेक चांगल्या संधीपण त्यांना गमवाव्या लागत असल्याचे दिसत आहे. येत्या काही दिवसांत पंजाबच्या निवडणुका आहेत. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळून नेतृत्व करण्याची आलेली संधी ते अशाच हट्टामुळे गमावत आहेत असे दिसते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: