सोनी मराठी वाहिनीवर सोमवारपासून ज्ञानेश्वर माऊली ही मालिका सुरू झालेली आहे. वारकरी संप्रदायाचे दैवत असणाºया ज्ञानेश्वरांची मालिका सुरू होणार म्हणून प्रेक्षकांना अतिशय आनंद झाला होता. त्याचे गेले काही दिवस प्रोमो पाहून. कधी एकदा ती मालिका सुरू होते याची प्रत्येकाला उत्सुकता होती; पण या मालिकेची वेळ सायंकाळी सात वाजता ठेवल्यामुळे अनेकांना थोडीशी निराशा वाटली. याचे कारण म्हणजे वारकरी संप्रदायाचा फार मोठा एक घटक आहे, तो म्हणजे शेतकरी. शेतात कामं करून तिन्ही सांजा झाल्यावर हातपाय धुऊन टीव्हीपुढे बसेपर्यंत शेतकºयांना साडेसात-आठ वाजतात. त्यामुळे या मालिकेची वेळ जर ८ किंवा त्याच्यापुढे ठेवली असती, तर खूप बरे झाले असते. त्याचप्रमाणे कामगार वर्गही मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात सायंकाळी ६ वाजता कामावरून सुटल्यावर घरी जाईपर्यंत आठ-साडेआठ वाजतात. सीएसएमटी ते कर्जत, खोपोली, कसारा, पनवेल, चर्चगेट ते विरार अशा लांबच्या प्रवासाचे कामगार असतात. त्यांना ही मालिका पाहणे शक्य होत नाही. त्यामुळे चांगल्या मालिकांची वेळ ही योग्य असली पाहिजे. हा या मालिकेवरचा प्रसारणाचा पहिला आक्षेप आहे. अर्थात तो आग्रह समजून सोनी वाहिनीने त्याची वेळ बदलली तर चांगले होईल.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या ७२५व्या संजीवन समाधी वर्षानिमित्त संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडाची जीवनगाथा सोनी मराठी वाहिनी घेऊन आली आहे. ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. सोमवारपासून सोमवार ते शनिवारी संध्याकाळी ७ वा. 'ज्ञानेश्वर माऊली' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेचा निर्माता असलेल्या चिन्मय मांडलेकरने त्यानिमित्ताने २७ सप्टेंबर रोजी आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात आजही अस्तित्वात असलेल्या भक्तिसंप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. या मालिकेतून ज्ञानेश्वर माऊलींची चरित्रगाथा उलगडणार आहे. चिन्मय मांडलेकर आणि दिग्पाल लांजेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली असून, दिग्पाल या मालिकेचे दिग्दर्शन देखील करत आहे. फक्त या मालिकेकडून एकच अपेक्षा आहे ती वास्तववादी असणे गरजेचे आहे. त्यात काल्पनिकतेला फार भर दिला जाऊ नये. यापूर्वी चिन्मय मांडलेकर यांनी संत तुकारामांच्या जीवनावर एक मालिका काढली होती. तू माझा सांगाती म्हणून; पण त्यात अनेक प्रसंग इतके काल्पनिक घुसडले होते की, त्यानंतर ही मालिका तुकारामांच्या जीवनावर नसून एका संताच्या जीवनावर आहे, असे सांगावे लागले. मोठ्या संत महात्म्यांच्या चरित्रात काहीही घुसवण्याचा प्रकार टाळला, तर ही मालिका चांगली होईल. सध्या कलर्स टीव्हीवरच जय जय स्वामी समर्थ या मालिकेत काहीही काल्पनिक कथानके घुसडण्याचे प्रकार सुरू झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ती मालिका प्रेक्षकांच्या मनातून उतरू लागली आहे. तसे होणार नाही याची काळजी चिन्मय मांडलेकर आणि दिग्पाल लांजेकर यांनी घेतली पाहिजे.
हे सांगण्याचे कारण इतकेच की, पहिल्याच भागात धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यात धर्मसत्तेचे वर्चस्व होते हे दाखवताना अजय पूरकर यांनी साकारलेला विसोबा शास्त्री किती क्रूर होता इथूनच ही मालिका सुरू होते. त्याचे गीतेचे श्लोक एका सामान्य माणसाने म्हटले म्हणून त्याला मारणे हे भयावह होते. इतकी वाईट प्रवृत्ती तेव्हा खरोखरच होती का? त्याचप्रमाणे त्याला मारत असतानाच विठ्ठलपंत कुलकर्णींचे तिथे येणे आणि विसोबाने त्यांना वाळीत टाकण्याचा आदेश देणे हे एकदम अंगावर येणारे होते, परंतु ज्ञानेश्वर हे जरी लहानपणापासून अभ्यासू, शांत असले आणि निवृत्तीनाथांना त्यांनी गुरू केलेले असले, तरी आई-वडिलांच्या विरहानंतर त्यांच्यात अमूलाग्र बदल झाला होता, परंतु या पहिल्याच भागात इंद्रायणी नदीत पाण्यात खोलवर जाऊन ते साधना करताना दाखवले आहेत. हे जरा अति चमत्कारीक वाटते. कल्पकता आणि दिग्दर्शकीय कौशल्य दाखवण्यासाठी, ट्रीक सीन्स हॅमर करण्यासाठी अति काल्पनिकतेला जवळ करणे त्यांनी टाळले पाहिजे. सर्वसामान्यांना माहिती असलेल्या इतिहासानुसार आई-वडिलांनी जलसमाधी घेतल्यानंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचे खूप हाल होतात. त्यात ते साधना करतात; पण आई-वडील असताना पाण्याखाली बसून साधना करणारे ज्ञानेश्वर या मालिकेत प्रथमच पाहायला मिळाले आहेत, म्हणूनच या मालिकेच्या नावाखाली भाकड कथा रचण्याचा मोह निर्माता, दिग्दर्शक आणि लेखकांनी टाळला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे.
भगवद्गीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिव्यत्वाचे दर्शन अनुभवास मिळणार आहे. संत ज्ञानेश्वर यांनी भिंत कशी चालवली, तसेच मुक्ताईने ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीवर मांडे कसे भाजले, रेड्याच्या तोंडून वेद कसे वधवून घेतले हे फक्त आपण ऐकले व वाचले असेल; मात्र आता या दिव्यत्वाचे दर्शन या मालिकेतून आपणास पाहता व अनुभवयास मिळणार आहे.
सोनी मराठी वाहिनीने 'ज्ञानेश्वर माऊली' या मालिकेतील काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये संत ज्ञानेश्वर यांनी भिंत कशी चालवली, तसेच मुक्ताईने ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीवर मांडे कसे भाजले हे दाखवण्यात आले आहे. मालिकेतील हे क्षण पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे. फक्त याच्या वेळेत थोडा बदल केला आणि कल्पकतेला आवर घालून वास्तव कथानक समोर आले, तर त्याचा प्रेक्षकांना चांगला आनंद मिळेल.
प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा