गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

गैर काय?


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लांचे दर्शन घेतले आणि रामाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. अरे राष्ट्रपती कसे काय अयोध्येत गेले? ते कशाला गेले? का गेले? त्यांनी असे मत भावना व्यक्त करणे योग्य आहे की, नाही याबाबत चर्चा सुरू झाल्या. सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅपवरही यावर अनेक ग्रुपमध्ये चर्चा सुरू झाली; पण राष्ट्रपतींनी रामाचे किंवा देवाचे दर्शन घेऊ नये, असा काही नियम नाही. त्यामुळे त्यांनी दर्शन घेतले आणि आपल्या भक्तीमय भावना प्रकट केल्या, तर गैर काय आहे?


प्रभू श्रीरामचंद्रांशिवाय अयोध्येचा विचारही करू शकत नाही, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतल्यावर म्हटले. देशाच्या इतिहासात अयोध्येला भेट देऊन रामलल्लाचे दर्शन घेणारे रामनाथ कोविंद हे पहिलेच राष्ट्रपती आहेत, त्यामुळे अनेकांच्या मनात शंका आली. याआधी कोणत्याही राष्ट्रपतीने किंवा पंतप्रधानाने अयोध्येला भेट देऊन रामलल्लाचे दर्शन घेतले नव्हते. आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अयोध्येची वारी केलेली आहे; पण त्यात काही वेगळं केलं आहे, असे समजण्याचे कारण नाही. मुळात राष्ट्रपती हे भाजप संघ परिवारातून आलेले आहेत. त्यामुळे राम हा त्यांच्या नावातच नाही, तर मनातही असणे स्वाभाविक आहे. राष्ट्रपतीपद हे जरी घटनात्मक पद असलं, तरी अशा पदावरच्या व्यक्तीने आपल्या श्रद्धास्थळांना भेट देऊ नये, असा काही नियम नाही. त्यामुळे काँग्रेस आदी पक्षाच्या नेत्यांना यात गैर वाटले; पण त्यात गैर काहीही नाही.

स्वत:ला सेक्युलर मानणाºया राजकीय पक्षांनी विनाकारण धर्मनिरपेक्षतेचा गजर सुरू केला. मुळात धर्मनिरपेक्षता ही संकल्पना चांगली आहे; पण त्याचा अर्थ धर्म सोडावा, असा होत नाही. ही संकल्पना आपल्या देशात चुकीच्या पद्धतीने राबवली गेली. धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्मांना समान आणि आदराची वागणूक देणे; पण आपल्या देशात मतपेटीवर डोळा ठेवत धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदूंवर टीका करणे आणि अन्य धर्मांचे कौतुक करणे, असा बिंबवला जात आहे. याच प्रवृत्तीमुळे अयोध्येत रामलल्लालाही अनेक वर्षे बंदिवासात घालवावी लागली.


विश्व हिंदू परिषदेने रामजन्मभूमीच्या मुक्तीचा शंखनाद केला. ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेने रामजन्मभूमीचे आंदोलन सर्वस्पर्शी आणि देशव्यापी झाले. त्यानंतर अनेक घटना घडल्या आणि न्यायनिवाडा झाला. आता अयोध्येत रामलल्लाच्या भव्य मंदिराचे काम सुरू झाले आहे. मंदिर वही बनायेंगे या लाखो कारसेवकांनी, तसेच कोट्यवधी रामभक्तांनी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता होण्याचा दिवस जवळ आला आहे. अशा अयोध्येत राष्ट्रपतींनी दर्शन घेतले, तर त्याचे दु:ख करण्याचे काहीच कारण नाही.

राम हे मर्यादापुरुषोत्तम होते. आपल्या वागणुकीतून त्यांनी अनेक बाबतीत आदर्श घालून दिले. मरामरा म्हणणाºया वाल्याचा वाल्मिकी याच रामनामाने झाला होता, हे आपल्याला विसरता येणार नाही. त्यामुळे रामाशिवाय अयोध्येची कल्पनाच करता येत नाही, असे दर्शनानंतर राष्ट्रपतींनी मत व्यक्त केले आणि रामाचा महिमा सांगितला. कोरानाकाळातही लॉकडाऊन होते, तेव्हा रामायण या मालिकेचे प्रसारण करून जनतेला बळ दिल्याचे, मानसिक धीर दिल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. यात गैर काही नाही. धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घालून चुकीचे वागण्यापेक्षा सरळ आपल्या भावना व्यक्त करण्याचे त्यांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पदच आहे.


राम म्हटला की, आम्हाला अयोध्या आठवते आणि अयोध्या म्हटली की, राम आमच्या डोळ्यासमोर येतो. राम आणि अयोध्या हे द्वैत आहे. त्यामुळेच अयोध्येतील आमचा रामलल्ला हा बंदीवासात असताना आणि रामजन्मभूमी बाबरी मशिदीच्या नावाने ओळखली जात असताना, अयोध्या ही अयोध्याच होती. रामजन्मभूमी मुक्त होण्याच्या आधीही अयोध्येच्या रेल्वेस्थानकाचे डिझाईन मंदिरासारखेच होते. याचाच अर्थ अयोध्या ही रामाची आहे, हे आमच्या येथील राज्यकर्त्यांनीही काही दशके आधीही मान्य केले होते. रामनाम हे आमच्या जीवनातील त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळेच एखादा माणूस गेल्यानंतर त्याने राम म्हटला असे म्हटले जाते, तर अंत्यविधीसाठी त्याला स्मशानात नेतानाही रामनाम सत्य हैं, असे म्हटले जाते. या रामनामाचे महत्त्व न समजल्यामुळे काँग्रेसला सत्तेपासून वंचित राहावे लागले. त्यांच्या नशिबी वनवास आला. रामनामाचा जप करणारे, रामावर श्रद्धा आणि आस्था ठेवणारे आज सत्तेवर आहेत. कधीकाळी भाजपाचा सत्तेचा वनवास सुरू होता. रामनामाने त्यांचा सत्तेचा वनवास संपवला. हा रामनामाचा महिमा आहे.

रामनाथ कोविंद अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला गेले; पण त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोखले नाही. हे सांगण्याचे कारण म्हणजे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले असता, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना तेथे जाण्यापासून अटकाव करण्याचा प्रयत्न केला होता. डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी नेहरूंचा हा सल्ला मानला नाही. नेहरूंच्या नाकावर टिच्चून ते सोमनाथ मंदिराच्या उद्घाटन समारंभाला हजर राहिले होते; पण बेगडी धर्मनिरपेक्षतेपोटी नेहरू अशा कार्यक्रमांना जात नसत. हीच मानसिकता ही नेहरू आणि गांधी घराण्याच्या रक्तात तेव्हापासूनच भिनली आहे; पण २०१९च्या निवडणुकीत आणि त्यापूर्वी गुजरात, कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी धोतर, सोवळे नेसून विविध मंदिर, मठांच्या पूजा केल्या होत्या. हा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा त्यांना उतरवावा लागला होता; पण कोणतेही आपले भावना, पूजा, संस्कार काय आहेत ते मोकळेपणाने करायला काहीही हरकत नाही. राष्ट्रपती असले म्हणून त्यांनी देवदर्शन करू नये, असे मत व्यक्त करणेच चुकीचे आहे. त्यामुळे यात गैर असे काहीच नाही.


प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: