गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

रात्रीस खेळ चालेवर बंधन


सध्या सर्वत्र कोरोनाच्या तिसº­या लाटेची चर्चा आहे. त्याप्रमाणे केंद्र सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत निर्बंध घातले आहेतच. हे निर्बंध सणासुदीचा विचार करून लोकांनी गर्दी करू नये यासाठी घालण्यात आलेले आहेत. ते दिवाळीपर्यंत पुढेही वाढवले जातील, असे दिसते. त्याप्रमाणे केंद्राने महाराष्ट्र आणि केरळमधली वाढती रुग्णसंख्या पाहून रात्रीची संचारबंदी जाहीर करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार काय करते हे पहावे लागेल. त्यामुळे रात्रीस खेळ चाले म्हणून जे निशाचर काम करायला बाहेर पडतात त्यांचे काय होणार हे येत्या काही दिवसांत समजेल.


राज्यात अधिक संसर्गदर असलेल्या भागात रात्रीची संचारबंदी लागू करण्याबाबत केंद्राने केलेल्या सूचनेच्या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी स्पष्ट केले होते. देशात कोरोना रुग्णवाढ असणाº­या केरळनंतर महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णवाढ नोंदविली जात आहे. त्याचप्रमाणे केरळ आणि महाराष्ट्रातील उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जास्त संसर्गदर असलेल्या भागांत रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना गेल्या गुरुवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने केली होती. त्यामुळे आज, उद्या मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहेच; पण रात्रीची संचारबंदी ही नेमकी कशावर घालणार हा खरा प्रश्न आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या या नेहमी रात्री चालतात. गणपती आणि गौरीसाठी लोक आपल्या गावाकडे जातात. त्यासाठी कोकणातील फेº­याही वाढवल्या आहेत. बहुतेक जण दिवसभराची कामे संपवून गावाकडे जाताना रात्रीची गाडी पकडतात. मग या संचारबंदीचे नेमके काय होणार आहे? वाहने, बस, रेल्वे चालणार, प्रवासासाठी लोक बाहेर पडणार, त्यांना तर आडवता येणार नाही. फक्त जे सेकंड शिफ्टमध्ये काम करतात त्यांनाच अडवणार का? त्यामुळे रात्रीची संचारबंदी घालून नेमके काय साध्य होणार? आपल्याकडे सगळी बाजारपेठेची व्यवस्था ही रात्रीच होत असते. गावागावातून शहरांकडे, कृषी उत्पन्न बाजारसमित्यांकडे, मंडईत येणारा भाजीपाला, फळफळावळ, फुले, दुधाचे पदार्थ हे सगळे रात्रीत प्रवास करून येत असते. या सर्व गोष्टी तर अत्यावश्यक सेवेत येतात. मग रात्रीची संचारबंदी नेमकी कशावर घालणार आहेत हे न कळण्यासारखे आहे. रात्रीची संचारबंदी करून काही साध्य होईल, असे चित्र दिसत नाही. कोरोनाचा फैलाव हा रात्री, अंधारात होतो असेही कुठे दिसत नाही. रात्रीची संचारबंदी साधारण रात्री १० ते सकाळी ६पर्यंत असू शकते. या काळात फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकच काम करत असतात. वर्तमानपत्रांच्या छपाई, वितरणाचे काम असते, दुधाचे वितरण असते. भाजीपाला असतो. त्यासाठी येणारे सौदे करणारे व्यापारी असतात. यावर तर बंदी घालताच येणार नाही. बाकी सामान्य माणसे कुठे रात्रीची बाहेर जातात? अत्यंत अपवादात्मक पद्धतीतच लोक बाहेर पडत आहेत, तर कशावर बंदी असणार आहे ही?

साधारणपणे जेव्हा सगळं ठिक चाललं होतं, तेव्हा लोक नाटक, चित्रपट पहायला, रात्रीची मुंबई पहायला, बारमध्ये बसायला, पब व डिस्कोमध्ये पार्टी करायला, लग्नसमारंभ, हळदी या कामासाठी बाहेर पडत होते; पण या सर्वांवर बंदीच आहे. नाट्यगृह सुरू नाहीत की, चित्रपटगृह सुरू नाहीत. त्यामुळे रात्रीच्या शोला बाहेर पडणारे लोक घरातच आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट बार हे रात्री दहापर्यंतच सुरू आहेत. मग नेमकी कशावर बंदी घातली जाणार आहे? लग्न समारंभ हे मर्यादीत लोकांमध्येच पार पडत आहेत. त्यामुळे हळदीसारखे जागरणाचे कार्यक्रम थांबले आहेत. अशा परिस्थितीत नेमकी कशावर बंदी घातली जाणार आहे, हे अनाकलनीय आहे.


प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, केरळमधील रुग्णवाढीचा अनुभव पाहता महाराष्ट्राने सावध होणे गरजेचे आहे. पोळा, गौरी-गणपती, दसरा-दिवाळी इत्यादी सणांच्या निमित्ताने गर्दी होऊ नये, यासाठी आपण काळजी घेणे आवश्यक आहे. केंद्राने ज्या काही सूचना दिल्या आहेत त्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. राज्य कृतीदल आणि आरोग्य विभागाचा कोरोना उपाय योजनांच्या संदर्भात सातत्याने संपर्क असतो आणि मुख्यमंत्री त्यासंदर्भात माहिती घेत असतात. राज्यातील लसीकरणासाठी अधिक मात्रा देण्याची विनंती केंद्राकडे केली आहे. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात प्रत्येकी १ कोटी १५ लाख मात्रा केंद्राने राज्यास दिल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात १ कोटी ७० लाख मात्रा उपलब्ध करवून देण्याबाबतचे पत्र केंद्राने राज्यास दिले आहे. प्रतिदिन अकरा लाख लसीकरण करण्याची क्षमता यापूर्वी राज्याने सिद्ध केलेली आहे. दररोज पंधरा ते वीस लाख लसीरकरणाची राज्याची क्षमता आहे. इतकी जर राज्य सरकारची सुसज्जता आहे, तर रात्रीची संचारबंदी म्हणजे जखम मांडीला मलम शेंडीला असे होईल. कोरोनाचा प्रसार रात्री होतो, असे कुठेही सिद्ध झालेले नाही. मग हा आग्रह कशासाठी? उलट केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त कोरोनाचे लसींचे डोस कसे प्राप्त करता येतील याचे प्रयत्न केले पाहिजेत. लसीकरण हे चोवीस तास केले गेले पाहिजे. सकाळी उठून नंबर लावा, दुपारी लस घ्या आणि चार-पाच नंतर लसीकरण बंद हे प्रकार थांबवा आणि तीन पाळीत केव्हाही लस घेता येईल, इतकी त्यात सुलभता आणली गेली, तर लसीकरणाचा वेग वाढेल. लसीकरणासाठी होणारी गर्दी टळेल. रात्रीची कामे करणारे अपवाद वगळता सर्वच अत्यावश्यक सेवेतीली क्षेत्र आहेत. मग रात्रीस खेळ चाले तो बंद करण्याचा खटाटोप अनावश्यक आहे. त्याची भीती घालण्याची आवश्यकता नाही.

मागच्या महिन्यात जेव्हा निर्बंध शिथील करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला होता त्यावेळी गर्दी टाळण्यासाठी तीन शिफ्टमध्ये काम करा, अशा सूचना केल्या होत्या. मग जर बंदी घातली, तरी ही तिसरी रात्रीची शिफ्ट बंद होणार. या लोकांना पुन्हा अन्य दोन शिफ्टमध्ये सामावून घ्यावे लागणार किंवा पुन्हा काही जणांना घरी बसवावे लागणार. हे सामान्य जनतेवर अन्यायकारक होईल. त्यामुळे रात्रीस खेळ चाले बंद पाडून काही साध्य होणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: