आपल्याकडे विनोद सर्वांनाच आवडतात, म्हणजे समर्थ रामदासांनी जरी टवाळा आवडे विनोद असे म्हटले असले, तरी सभ्य माणसांनाही विनोदाची गरज असते. हसा आणि लठ्ठ व्हा, म्हणजे निरोगी व्हा, असे म्हटले जाते. मुंबई, पुणेच नाही, तर जगभर हास्य क्लबच्या माध्यमातून कृत्रिम हास्य आणण्याचे प्रयत्न होत असताना खºया अर्थाने नैसर्गिक हास्य आणण्यासाठी विनोद अत्यंत महत्त्वाचे असतात. या विनोदाचे वैशिष्ट्य आहे की, त्याच्या लाटा असतात. त्यातील काही लाटांवर नजर टाकली, तर हा बदल लक्षात येईल.
विनोदासाठी कोणाचा तरी आधार घेतला जातो किंवा कोणाला तरी टार्गेट केले जाते, पण त्यात मिश्किली असते, कुठलेही कपट नसते, म्हणूनच तो विनोद महत्त्वाचा असतो किंवा अनेकवेळा विनोद हे खपवलेपण जातात. काही दशकांपूर्वी आचार्य अत्रे, बिरबल-अकबर यांच्या नावावर न घडलेले विनोदही खपवले जात होते. त्यात काही पांचट, अश्लीलही असायचे, तर काही मार्मिक आणि बौद्धिकही असायचे, पण ज्या काळात जी गोष्ट लोकांच्या अंगवळणी पडलेली असते, लोकप्रिय असते, तेव्हा त्यांचा वापर हा विनोदासाठी केला जात असतो, त्याप्रमाणे अत्रेंवर भरपूर विनोद तत्कालीन बाजारात असायचे. अत्रे स्वत: सिद्धहस्त, भाषेवरील प्रभुत्व असणारे विनोदी लेखक होतेच, पण त्यांच्या नावावरही अनेक विनोद खपवले जात होते.
विनोदाच्या लाटांमध्ये अशीच एक दीर्घकाळ चाललेली लाट म्हणजे, सरदारजीचे विनोद. सरदारजीच्या विनोदांचे इतके किस्से बाजारात आले आणि सांगितले जात की, कालांतराने सरदारजींवर विनोद करायचे नाहीत, असा दंडक घालण्याची वेळ आली. पुण्यात १९८५च्या दरम्यान एक विनोद कथनाची स्पर्धा झाली होती, त्यावेळी संयोजकांनी आधीच सांगितले होते की, पंजाब वासीयांवरचे विनोद स्पर्धेत स्वीकारले जाणार नाहीत. खरे तर बारा वाजण्याचा आणि त्यांचा संबंध जोडून अनेक विनोद केले जात होते, पण कालांतराने त्यात फाजीलपणा यायला लागला आणि एका समाजाला यावरून टार्गेट केले जात असल्याचे लक्षात आल्यावर त्यावर बंदी आली, पण सरदारजीचे सहज सोपे विनोदही खूप असायचे. म्हणजे दोन सरदारजी एकमेकांना भेटतात. त्यातला पहिला सरदारजी दुसºया सरदारजीला विचारतो की, माझ्या पिशवीत काय आहे हे ओळखलेस, तर त्यातील एक आंबा तुला देईन आणि किती आहे हे ओळखलेस, तर बाराच्या बारा आंबे तुला देईन. असे काहीसे हलके फुलके असायचे, तर काही अत्यंत खालच्या पातळीवरही जायचे.
सरदारजींवर विनोद करायचे नाहीत हे जाहीर झाल्यावर संता-बंताचे विनोद सुरू झाले. अर्थात संता-बंताचे विनोदही बºयाच अंशी सरदारजी छापच असतात, पण ही लाटही दीर्घकाळ सुरू आहे. संता-बंताचे विनोद वाचायला लोकांना आवडतात.
एक काळ होता की, बस कंडक्टरवर खूप विनोद असायचे. अर्थात त्यात कंडक्टर हा हुशार दाखवला जायचा. बसने प्रवास करणाºयांची संख्या जास्त होती आणि खाजगी वाहने फारशी नव्हती, तेव्हा कंडक्टर हा हिरो होता. खाजगी गाड्या, दुचाकी जशी प्रत्येकाच्या घरी वाढल्या तसे कंडक्टरचे आकर्षण कमी झाले, पण या कंडक्टरच्या विनोदांनी खूप काळ गाजवला होता. त्यातला एक विनोद म्हणजे, एक लहान मुलगा फुलपँट घालून बसमध्ये बसतो. तो कंडक्टरला एक हाफ तिकीट द्या असे सांगतो. तसा कंडक्टर गमतीने म्हणतो, फुल पँट फुल तिकीट... त्याबरोबर तो मुलगा पँट काढतो आणि म्हणतो नो पँट नो तिकीट. अनेक विनोदांत कंडक्टर कुरघोडी करताना दाखवला आहे. त्यामध्ये एक सुंदर मुलगी बसमध्ये बसते. कंडक्टर तिला तिकीट विचारतो. ती म्हणते, माय ब्युटी इज माय तिकीट... तसा कंडक्टर पटकन म्हणतो, आय वाँट टू पंच इट. पण या कंडक्टर नामक हिरोवर खूप विनोदाच्या लाटा येत असत.
त्यानंतर विनोदाची एक लाट आली, ती अचाट शक्ती असलेल्या टॉलीवूड बॉलीवूडचा हिरो रजनीकांतची. रजनीकांतवर सोशल मीडिया आल्यापासून भरपूर विनोद होऊ लागले. रजनीकांतपाठोपाठ लोकांना विनोदासाठी आणखी एक काही काळ मिळालेले व्यक्तिमत्व म्हणजे आलिया भट. तिच्या आकलन शक्तीचा वापर करून तिच्यावर प्रचंड विनोद, मिम्स सोशल मीडियावर आले होते. त्यानंतर गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावरील विनोदासाठी मिळालेले पात्र म्हणजे करिना कपूर व सैफ अली खानचा मुलगा तैमूर. या तैमूरवर सोशल मीडिया अक्षरश: तुटून पडतो. पाहिजे तितके विनोद करतो. त्याचे करिना वेगवेगळे फोटो टाकत होती आणि त्यावर विनोद होत होते.
पुण्यातील आणखी एक वैशिष्ठ असलेले व्यक्तिमत्व म्हणजे चितळे. या चितळ्यांवरही अनेक विनोद सातत्याने बाजारात येत असतात. चितळ्यांच्या बाकरवडी इतकेच ते खुसखुशीतही असतात. पुणेरी कर्मठपणा आणि १२ ते ४ दुकान बंद ठेवण्याच्या प्रवृत्तीत चितळ्यांवरचे विनोद खूप गाजले होते.
अशाच प्रकारे साधारण १९७०च्या दशकात प्रोफेसर किंवा प्राध्यापकांवर विनोद करायची प्रथाच होती. प्रोफेसर म्हणजे विसरभोळेच, असे त्यांचे नामकरण होते. विशेषत: तोरडमलांचा प्रोफेसर बारटक्के किंवा गुपचूप गुपचूपमधील अशोक सराफचा प्रोफेसर धोड हा या विनोदातूनच बाहेर आलेला होता. असाच एक प्रोफेसर आनंदाने घरी येतो आणि बायकोला म्हणतो, बघ तू म्हणतेस ना मी नेहमी छत्री विसरून येतो, बग आज छत्री न विसरता परत आणली आहे. त्यावर बायको म्हणते, पण आज बाहेर जाताना तुम्ही छत्री न्यायलाचा विसरला होतात. एक नामांकित प्रोफेसर लिखाणाच्या कामासाठी एकांत मिळावा म्हणून लॉजवर जायचे. लेखन पूर्ण झाल्यावर लॉजवरून परत जायचे. असेच एकदा लॉज सोडून गेल्यावर त्यांच्या लक्षात येते की, आपण आपली छत्री रूमवर विसरलो आहोत. ते परत लॉजवर येतात. तोपर्यंत ती खोली लॉज मालकाने नवीन लग्न झालेल्या जोडप्याला दिलेली असते. नेहमी येणारे प्राध्यापक असल्यामुळे लॉज मालक सांगतो तुम्हीच दार वाजवा आणि त्यांना छत्री मागा. ते प्राध्यापक दाराला कान लावतात. आतून लाडीक बोलणे चाललेले असते. हे गाल कुणाचे? हे डोळे कुणाचे? हे ओठ कुणाचे वगैरे वगैरे. प्राध्यापक बाहेरून ओरडतात, सगळे तुमचे आहे. फक्त आत ती छत्री आहे ती माझी आहे.
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा