महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्याच कार्यप्रणालीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच टीका केली आहे. अर्थात ती अत्यंत रास्त आणि योग्य आहे. अजित पवार स्पष्ट बोलतात आणि खरे बोलण्यात त्यांचा हातखंडा आहे. कोणाचीही भीडभाड न बाळगता ते बोलतात. गेल्या काही वर्षांत त्यांच्यातील झालेला बदल आणि समंजसपणा हा वाखाणण्यासारखाच आहे. आपले मत कधीही ते उथळपणे मांडत नाहीत. त्यामुळेच त्यांनी केलेल्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. राजकारणात नवीन पिढीला पुढे आणण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केली. हे योग्यच आहे. अर्थात काँग्रेसने या देशात घराणेशाही रूजवली त्यामुळे नव्यांना कधीच संधी दिली जात नाही. ज्या पक्षाला अजून अध्यक्ष निवडता येत नाही, त्या पक्षाकडून कशी काय अपेक्षा करता येईल? पण तरीही अजित पवार यांनी आपले मत स्पष्टपणे मांडले.
पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डीमध्ये डी. वाय. पाटील ज्ञानशांती शाळेचं उद्घाटन पवारांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी आपले हे मत व्यक्त केले; पण त्यात कुठेही कुचेष्ठा नव्हती, तर आपल्या मित्र पक्षाला सुधारण्यासाठी दिलेला तो सल्ला होता. या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, सतेज पाटील यांना मी आता वय विचारलं, ते म्हणाले आता पन्नाशीला पोहोचलो. त्यांचं वय ५० तरी काँग्रेस त्यांना राज्यमंत्रीच ठेवते, मला तर काही कळत नाही. नव्या पिढीला पुढे आणण्यासाठी शरद पवार यांनी, आम्ही ४० पूर्ण नसतानाही आम्हाला मंत्रिपद दिलं. त्या माध्यमातून आम्ही हिरीरीने काम करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या या कमतरतेची जाणिव अजित पवारांनी अत्यंत प्रांजळपणे व्यक्त केली; पण काँग्रेस त्यातून काही बोध घेणार नाही, हे नक्कीच आहे. अर्थात याचा अर्थ कोणी काहीही काढेल. अजित पवारांनी काँग्रेसला कमी लेखून सतेज पाटील यांना राष्ट्रवादीची आॅफर दिली काय, अशी शंका उपस्थित केली जाईल; पण तसे काहीही नाही तर आपल्या मित्राचा चांगला सल्ला काँग्रेसने स्वीकारण्याची गरज आहे.
राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांचे अधिकार यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. राज्यमंत्र्यांनी मनात आणलं, तरी कॅबिनेट मंत्र्याने सहकार्य केल्याशिवाय ते काम राबवण्यात अडचणी येत असतात, असं अजित पवार म्हणाले. यातून त्यांना इतकंच म्हणायचं आहे की, सतेज पाटील यांच्यासारख्या कर्तृत्ववान निष्ठावान नेत्याला योग्य संधी दिली, तर ते काँग्रेससाठी फायद्याचे ठरेल. त्यामुळे आपल्या मित्राला चांगला सल्ला देण्याची ही कृती अत्यंत योग्य आहे. पण त्याचा काँग्रेसवर काहीही परिणाम होणार नाही हे वेगळं. काँग्रेसला कधीही बदलायचे नसते. तुम्ही बदलायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला पक्ष बदलावा लागतो. शरद पवार यांनी जेव्हा बदल सुचवला, तेव्हा त्यांना विरोध केला गेला होता. त्यांना पक्षविरोधी कारवाई म्हणून त्यांच्यावर हरकत घेतली. शरद पवारांना काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करावी लागली. ज्या ज्या वेळी कोणी काँग्रेसमध्ये राहून बदलाच्या सूचना करतो, तेव्हा तेव्हा त्याला पक्षातून बाहेरच पडावे लागते. ममता बॅनर्जी या पण पूर्वी काँग्रेसमध्येच होत्या. त्यांना पण बाहेर पडून तृणमूल काँग्रेस काढावा लागला. तुम्ही बदला, इथून निघून जा पण आम्ही आमच्या चाकोरीतून बाहेर पडणार नाही, हा काँग्रेसचा बाणा असतो. त्यामुळे निष्ठावंत काँग्रेसचे नेते पक्षश्रेष्ठी म्हणजे गांधी कुटुंबीय सांगतील ती पूर्वदिशा या न्यायाने काम करत असतात. तिथे एखादा बाणेदार माणूस असला, तर त्याला काडीची किंमत नसते. त्यामुळे सतेज पाटील किती कार्यक्षम आहेत, किती हुशार अभ्यासू आहेत याला काहीही महत्त्व नाही. ते कितीवेळा गांधी कुटुंबाचा जप करतात, कितीदा सोनिया गांधी की जय, राहुल गांधी की जय म्हणतात हे फार महत्त्वाचे असते. हा जप कदाचित त्यांच्याकडून कमी झाला असेल, म्हणून कार्यक्षमता असतानाही त्यांना राज्यमंत्रीपदच दिले जाते. ते पन्नाशीत आले म्हणून त्यांचे प्रमोशन होत नसते. तिथे फक्त गांधी हेच श्रेष्ठ असतात. बाकी कोणाची उंची, वय वाढत नसते हे अजितदादांना माहिती नसेल असे नाही.
अर्थात सतेज पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना, त्यांच्या कामाच्या पद्धतीचा गौरव करताना त्यांच्यातील कर्तबगारी हेरून अजित पवार यांनी उत्स्फूर्तपणे हे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या बोलण्यात फार मोठा अर्थ असतो. एखादा चांगला काम करत असेल, तर त्याला प्रोत्साहन देण्याची वृत्ती आणि दिलदारपणा अजित पवारांकडे नक्कीच आहे. फडणवीस असेच चांगले काम करत होते, असा विश्वास वाटल्यानेच त्यांनी २३ नोव्हेंबरला रात्रीत त्यांची साथ दिली होती. एखाद्या मित्राला आपण म्हणतो, तू रात्री अपरात्रीही मला बोलाव मी येईन. त्याप्रमाणे फडणवीसांसारख्या तरुण रक्ताला साथ देण्यासाठी ते आले होते. आजही अशाचप्रकारे कर्तबगार अशा सतेज पाटील यांच्यासाठी त्यांचा जीव तुटतोय. चांगल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना संधी मिळावी ही त्यांची त्यामागची भावना समजून घेतली पाहिजे. त्याचा अर्थ कोणीही आॅफर दिली असा न काढता पन्नाशीचा अर्थ समजला पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा