१९८०च्या दशकात ‘चंद्रलेखा’ या नाट्य संस्थेने दिलेले एक सुंदर नाटक म्हणजे प्रेमाच्या गावा जावे. वसंत कानेटकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले हे नाटक म्हणजे सहकुटुंब पाहावे आणि आपल्या कुटुंबात असेच काही घडत असेल, तर त्यातून सहज बोध घेत प्रेमाच्या गावा जावे असे हे नाटक. हे नाटक कोणाला उपदेश करण्यासाठी लिहिले नाही असे जरी वसंत कानेटकरांचे म्हणणे असले, तरी या नाटकातून खरोखरच घेण्यासारखे खूप आहे.
या नाटकाचे महत्त्वाचे एक कारण आहे. त्या काळात म्हाताºयांची फरफट, आबाळ होणारी अनेक नाटकेआली. कुसुमाग्रज, वि. वा. शिरवाडकरांचे नटसम्राट, जयवंत दळवींचे संध्या छाया...यातून म्हातारपण नकोसे वाटावे, अत्यंत वाईट असते असाच जणू संदेश मिळायचा. त्यामुळेच या नाटकाला उत्तर देणारे एखादे नाटक असावे अशी अनेकांची अपेक्षा होती. या नाटकाच्या प्रस्तावनेतच याचा खुलासा कानेटकरांनी केलेला आहे. त्याच्याकडे एक प्रतिथयश इतिहास संशोधक आले होते. त्यांनी बहुदा संध्या छायासारखे जयवंत दळवींचे नाटक पाहिले आणि ते जाम वैतागले होते. अरे म्हातारपण इतके वाईट असते का? म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण नाही, तर हुंदडण्याचे दुसरे तरुणपण असते. त्यासाठी खूप काही शिकायचे असते आणि त्या इतिहास संशोधकांनी आपल्या आनंदी म्हातारपणाचे किस्से सांगितले आणि कानेटकरांनी त्यावरून प्रेमाच्या गावा जावे हे नाटक लिहिले. यामध्येच कानेटकरांना बिंदू माधव सरनोबत हे पात्र सापडले आणि जनरेशन गॅप, तीन पिढ्या, असा विषय घेऊन हे सुंदर नाटक तयार झाले. चंद्रलेखा नेते तितक्याच ताकदीने उभे केले.
तरुण मुलांच्या आवडीत रस घ्यायला सुरुवात केली की, पिढी पिढीतल्या सगळ्या भेगा कशा फटाफट बुजून जातात. म्हातारपणी हात नेहमी देण्यासाठी उचलला असावा; घेण्यासाठी कधीही कोणापुढेही हात पसरायचा नाही. घरात सून आली की, सगळ्या किल्ल्या तिच्या अंगावर भिरकवून द्याव्या आणि आपल्याच घरात आपण पाहुणे व्हावे. म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण नाही, म्हातारपण म्हणजे स्वच्छंद तरुणपण, मनसोक्त उनाडण्याचे खरेखुरे वय.
म्हातारपण म्हणजेदेखील मजा आहे... रंग आहे रंग... डोंगर चढून जाईपर्यंत काय दमछाक होईल तेवढीच. एकदा म्हातारपणाच्या शिखरावर पोचले की, सगळा आनंदी आनंद. डोंगरावर बसून प्रौढांच्या, तरुणांच्या, कुमारांच्या, बालकांच्या गमती, जमती पाहणे आणि त्यात मधून-मधून शिंगे मोडून भाग घेणे म्हणजे काय अद्भुत नशा आहे... त्यासाठी तरी म्हातारपणात मुरंब्यासारखे मुरायला हवे... हा गोड मुरंबा खाण्यासाठी --- प्रेमाच्या गावा जावे! ही कानेटकरांची सुंदर अशी कलाकृती होती.
या नाटकाचे दिग्दर्शन अरविंद देशपांडे यांचे होते, तर पार्श्व संगीत अनंत अमेंबल यांचे होते. स्वत: मोहन वाघ यांची निर्मिती, नेपथ्य आणि प्रकाशयोजना होती. यात अनेक दिग्गज कलाकारांनी काम केले होते. त्यामध्ये बिंदु माधव सरनोबत ही मध्यवर्ती भूमिका स्वत: अरविंद देशपांडे यांनी केली होती, तर चिंतामणी ही भूमिका जगन्नाथ कांदळगांवकर यांनी आपल्या करारी आवाजात साकारली होती. याशिवाय कमळजा ही भूमिका रेखा कामत या जुन्या जाणत्या अभिनेत्रीने साकारली होती. प्रिया ही भूमिका वंदना गुप्ते आणि गौरीची भूमिका निवेदिता जोशीने साकारली होती. या नाटकाला चांगली लोकप्रियता लाभली होती. विशेष म्हणजे हे नाटक केवळ व्यावसायिक रंगभूमीवरच नाही, तर हौशी रंगभूमी, राज्य नाट्य स्पर्धा आणि कॉलेजच्या गॅदरींगमध्येही चांगल्या प्रकारे सादर केले गेले. अरविंद देशपांडे यांच्या निधनानंतर हे नाटक बंद झाले. त्यानंतर नव्या संचात काही प्रयोग सुधीर जोशींना घेऊन केले गेले.
पण मराठी रंगभूमीवर आलेल्या सुंदर नाटकांपैकी एक चांगले नाटक म्हणून प्रेमाच्या गावा जावे या नाटकाचा कायम उल्लेख करावा लागेल. सकारात्मकतेने जगायला शिकवणारे हे नाटक असले, तरी या नाटकाचा मूळ उद्देश हा करमणूक ठेवूनच त्याची निर्मिती होती. कुठेही उपदेशाचे डोस देण्याचा प्रयत्न या नाटकात नव्हता. कसलाही संदेश देण्याचा प्रयत्न नव्हता. पण या नाटकातच एक वाक्य आहे. म्हातारपण हे चोरपावलाने येत असते. त्यासाठी खूप काही शिकावे लागते. ते शिकवता येत नाही, पण शिकता मात्र जरूर येते. त्याप्रमाणे या नाटकाने काही शिकवायचे ठरवले नसले, तरी त्या नाटकापासून शिकता मात्र जरूर येते, असा या प्रेमाच्या गावाचा प्रवास आहे.
या नाटकात बिंदू माधव हा बरेच काही सांगून जातो. पन्नाशी आल्यावर चिडचीड करणाºया माणसांचे प्रतिक असलेल्या चिंतामणी आणि त्याची बायको सुमंगल यांना या वयात चिडचिडीने होणारे रोग डायबेटीज, ब्लडप्रेशर, हार्टअॅटॅक यांपासून कसे बचावायचे, कसे आनंदी व्हायचे ते सांगतो. कमळजेला म्हातारपणात पोटातल्या तक्रारींची फार पत्रास बाळगायची नाही, समोर येईल तो चेंडू कसा चौफेर फटकावायचा हे सांगतो आणि आनंदी जीवनाचा सल्ला देतो. गोट्याला सिनेमात हिरो होण्याची आवड असते. त्यासाठी अभिनयासाठी काय केले पाहिजे? स्पर्धा कशा महत्त्वाच्या आहेत हे सांगताना राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेण्याची मोलाची शिकवण देतात. प्रेमानंद स्वामींच्या नादाला लागलेल्या गौरीला हे अध्यात्माचे वय नाही तर तरूणपणाचा आनंद घेण्याचे हे दिवस आहेत हे समजावून सांगताना अध्यात्माच्या नावाखाली चालणाºया बुवाबाजीचा बुरखा बिंदू माधव सरनोबत फाडतात. अशाप्रकारे प्रत्येकाला चुकलेल्या मार्गावरून परत आणताना क्रिकेट की नोकरी, घरात राहायचे की, परदेशात जायचे या द्विधा मनस्थितीत सापडलेल्या टिटुला मार्ग दाखवतात आणि प्रियापासून लांब जात असलेल्या टिटुला पुन्हा प्रेमाच्या मार्गावरही आणतात. अशाप्रकारे एका सर्वागसुंदर नाटकाचा मोठा प्रवास प्रेक्षकांना बघताना सुखद आनंद देताना दिसतो. १९८०च्या दशकातील एक चांगले नाटक म्हणून याचा उल्लेख करावा लागेल.
प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा