शुक्रवार, ३० जानेवारी, २०२६

वृत्तवाहिन्या आणि नेत्यांचा उतावीळपणा


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकतेच अपघाती निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. पण त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना वृत्तवाहिन्या आणि राजकीय नेत्यांनी जो उतावीळपणा दाखवला तो अत्यंत हिडीस म्हणावा लागेल. दादांच्या पार्थिवाला अग्निही दिलेला नव्हता, तोपर्यंत सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री होतील, अशा चर्चा आणि मागणी करण्याचा वृत्तवाहिन्यांचा आणि राजकीय नेत्यांचा उतावीळपणा म्हणजे गलिच्छ राजकारणाचे उदाहरण म्हणावे लागेल.


आपल्या पतीच्या पार्थिवाला अग्नि दिला जात आहे, दु:खातून बाहेरही पडलेल्या नाहीत अशा अवस्थेत त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या नावाची चर्चा करणे ही अत्यंत चुकीची प्रथा आहे. सगळ्या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी त्यावर मते, प्रतिक्रिया घेत जो बाजार मांडला होता तो अत्यंत घृणास्पद असा होता.

एकीकडे दादांची चिता जळत असताना अत्यंत भावनिकपणे मंत्री असलेले नरहरी झिरवळ यांनी प्रसारमाध्यमांपुढे मागणी केली की, आता वहिनींना उपमुख्यमंत्री करावे. दादांना ती श्रद्धांजली असेल वगैर वगैरे. पण त्या सुनेत्रा वहिनींच्या मनाचा कोणी विचार केला का? त्या गर्दीत जेमतेम २४ तासही झालेले नसताना आणि अग्नि देऊन दहा मिनिटेही झालेली नसताना अशा चर्चा कशा केल्या जातात? वेळ काय आणि आपण बोलतो काय याचे भान नेत्यांना असू नये? त्याहीपेक्षा जबाबदारी ही वृत्तवाहिन्यांची होती. त्यांनी याला कशासाठी प्रसिद्धी दिली? केवळ आपला टिआरपी वाढवण्यासाठी? आमच्या वाहिनीवरून सर्वात प्रथम हे वृत्त, हा अंदाज आम्ही व्यक्त केला होता. तो खरा ठरला असे अजून काही दिवसांनी दाखवण्यासाठी हा आटापिटा केला? याला दुसरे काही नाही तर प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे म्हणतात.


त्याचप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार, येत्या ८ फेब्रुवारीला हे जाहीर केले जाणार होते, १४ बैठका झाल्या, दादांची इच्छा होती वगैरे चर्चा शुक्रवारी एकीकडे दादांच्या सावडण्याचा विधी सुरू असताना केल्या गेल्या. जरा थांबाना...! कसली ही घाई झाली आहे? दोन्ही पक्षांचे नेते त्याबाबत यथावकाश निर्णय घेतील? त्यासाठी इतकी घाई करण्याचे कारण काय? जाणारा माणूस गेला, त्याच्या दु:खाला बाजूला सारून आगामी राजकारणाची चर्चा कशी करू शकता? हा उतावीळपणा अत्यंत घातक आहे. सर्वात प्रथम आम्ही ही बातमी दिली, असा अट्टाहास बाळगण्यापेक्षा आमच्या वाहिनीने सत्य बातमी दिली, वास्तवाला धरून बातमी दिली हे अभिमानाने सांगता येईल हे वृत्तवाहिन्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

त्याचप्रमाणे नरहरी झिरवळ, अंकुश काकडे अशांसारख्या नेत्यांनी थोडे भान राखायला पाहिजे. दुखवटा संपुदेत ना. दादांचे क्रियाकर्म पूर्ण होऊदेत. चार दिवसांनी यावर चर्चा केली तर काय बिघडणार होते की, कोणाच्या झोळीत धोंडा पडणार होता? पवार कुटुंबात अनेक व्यक्ती निर्णय घेणाºया आहेत. खुद्द शरद पवार आहेत, सुप्रियाताई सुळे आहेत. ते त्यांचा कौटुंबिक निर्णय आधी घेतील. अशी मते व्यक्त करण्यापूर्वी सुनेत्रा वहिनींच्या मनाचा कोणी विचार का केला नाही? त्यामुळे संपूर्ण जनमानसात या वृत्तवाहिन्याबाबत किळस निर्माण झालेली आहे. अशा उतावळ्या नेत्यांवर महाराष्ट्रात नाराजी निर्माण झालेली आहे हे लक्षात घेतले पाहिजे.पक्षाचे जे नेते आहेत, ज्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे असे शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे याबाबत काहीही बोलत नाहीत. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय हा प्रश्न सुटणारा नाही. असे असताना सुमार नेत्यांशी चर्चा करण्यात वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी वेळ का घालवला? काहीतरी वेगळे दाखवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी असली वृत्त रंगवत बसणे हा अत्यंत घाणेरडा प्रकार म्हणावा लागेल. वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांवर विश्वास कोणी ठेवतच नाही. पण जी काही टक्के विश्वासार्हता होती ती पण रसातळाला नेण्याचे काम या घटनेने वाहिन्यांनी केलेले आहे. नरहरी झिरवळ म्हणजे चर्चेत राहण्यासाठी कायम आतूर असतात. मग कधी मंत्रालयाच्या इमारतीवरून उड्या मारण्याचे प्रकार करतील तर कधी काही वादग्रस्त वक्तव्य. पण त्यांनी केलेला हा प्रकार अत्यंत निंदनीय असा आहे. अशा प्रकारांना आळा घातला पाहिजे.


संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय. सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यात अश्रू आहेत. पवार कुटुंब हताश झालेले आहे. काय करावे आता हे कोणाला सुचत नाहीये. अशा परिस्थितीत दादांच्या जागी सुनेत्राताई उपमुख्यमंत्री होतील अशा चर्चा करणे, दोन पक्ष एकत्र होतील यावर चर्चा करणे हे अत्यंत अयोग्य असे आहे. वृत्तवाहिन्यांना वृत्त दाखवण्यापूर्वी सेन्सॉर बोर्ड असले पाहिजे असे आता वाटू लागले आहे. मुळात आपल्याकडे एकही वृत्तवाहिनी नाही. जे स्वत:ला वृत्तवाहिनी म्हणवून घेत आहेत त्या एंटरटेन्मेंट चॅनल म्हणून आहेत. त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न येत नाही. तरीही काहीतरी ताळतंत्र असले पाहिजे.


- प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: