‘एकच वादा, अजित दादा’ ही नुसती घोषणा नव्हती, तर तो एक आविष्कार होता. कारण वादा केला की, तो पूर्ण करणारा नेता अशी ख्याती दादांची होती. बुधवारची सकाळ महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळवणारी ठरली. महाराष्ट्राचे धुरंधर नेते उपमुख्यमंत्री आणि अभ्यासू असे अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र कळवळला. कारण ते व्यक्तिमत्त्वच जबरदस्त होते. काम करणारा नेता गेला अशी भावना प्रत्येकाच्या मनात होती.
अजित पवारांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत मोकळे ढाकळे असे होते. रोखठोक, परखड आणि स्पष्ट बोलणारा नेता अशी त्यांची ख्याती होती. लोकशाहीचा खºया अर्थाने सन्मान करणारे ते व्यक्तिमत्त्व होते. फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार रक्तात भिनलेले असे ते व्यक्तिमत्त्व होते. म्हणूनच त्यांचे वागणे अत्यंत खरे, स्पष्ट आणि कधीकधी निरागस असे होते.
दादांनी लोकसभेकडून विधानसभेकडे असा उलटा प्रवास केला. त्यांची १९९१च्या निवडणुकीत बारामतीचे खासदार म्हणून निवड झाली. पण, राजीव गांधी यांच्या हत्येनंतर बनलेल्या नरसिंहराव सरकारमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करणाºया शरद पवारांना दिल्लीत संरक्षणमंत्री म्हणून जावे लागले. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघांचा अजित दादांनी राजीनामा दिला आणि त्या जागी शरद पवार दिल्लीत गेले. त्याचवेळी शरद पवारांच्या मतदारसंघातून ते विधानसभेत गेले.
पण सर्वाधिक टर्म आमदार, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री, सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडायची संधी मिळाली असली तरी दादांना संघर्षही प्रचंड करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतर शरद पवारांचे लक्ष दिल्लीकडे होते. पण अजित पवारांनी मात्र खºया अर्थाने महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पोहोचवला होता. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रावर दादांची पकड मजबूत होती. युवा नेते म्हणून त्या काळात ते तरुणांमध्येही प्रचंड लोकप्रिय होते.
अजित दादांनी आपला रांगडेपणा, अस्सल मराठमोळेपणा जपला होता आणि आपल्या भाषेतही त्यांनी तो न लाजता ठेवला होता. कृत्रिम आणि खोटे भाषण करणे हे दादांना कधी माहितीच नव्हते. पण हाच त्यांचा गुण होता. अनेकांना तो खटकत असेल पण जे आहे ते आहे हे सांगण्याचे मोठे मन होते. कधीही तिरस्काराचे राजकारण त्यांनी केले नाही. कोणाबद्दल आकसाने ते बोलले नाहीत. कोणी कितीही पराकोटीची टीका केली तरी त्याला उत्तर देताना लोकशाहीत कोणालाही काहीही बोलण्याचा अधिकार आहे, बोलल्याने काही मला भोकं पडत नाहीत असे म्हणून दुर्लक्ष करत होते.
२०१२/१३च्या सुमारास एका भाषणातून त्यांची बोलताना जीभ घसरली. पण त्याचे प्रायश्चित्त त्यांनी घेतले. धरणात पाणी कुठून आणू म्हणताना अनवधानाने त्यांनी चुकीचा शब्द वापरला. तो खरे तर तितक्याच खेळीमेळीत घेता आला असता, पण विरोधकांनी तो शब्द उचलून धरला आणि दादांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते थेट कराडला प्रीतीसंगमावर गेले, यशवंतराव चव्हाणांच्या समाधीजवळ बसून आत्मक्लेश आंदोलन करून प्रायश्चित्त घेतले. इतके ते संवेदनशील आणि प्रामाणिक असे व्यक्तिमत्त्व होते.
अनेकवेळा दादांना टीकेला सामोरे जावे लागले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले. पण ते कधी डगमगले नाही. कसलीही चौकशी होऊ दे आपण तयार आहोत असे सांगून ते मोकळे व्हायचे. रंगुनी रंगात साºया रंग माझा वेगळा आणि गुंतुनी गुंत्यात साºया पाय माझा मोकळा अशी त्यांची ख्याती होती.
कोणत्याही गोष्टीत अभ्यास करून बोलण्याची त्यांची ख्याती होती. चांगल्याला चांगले म्हणण्याचे मोठे मन त्यांचे होते. म्हणूनच केंद्रात मोदी सरकार विकासाचे काम करत आहे म्हटल्यावर त्यांना साथ देण्याची गरज आहे. देशाच्या, राज्याच्या विकासाच्या प्रवाहात आपलाही हातभार लागला पाहिजे या भावनेने त्यांनी एनडीएबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर आपल्यावर प्रचंड टीका होईल हे पण त्यांनी ओळखले होते, पण त्याला न डगमगता ते महायुतीत आले आणि महाराष्ट्राच्या विकासात हातभार लावला.
महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा तर ते सर्वेसर्वा होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असले तरी सगळी सूत्र त्यांच्याच हातात होती. कारण तत्कालीन मुख्यमंत्री काहीच काम करत नव्हते आणि घरातून बाहेरही पडत नव्हते. ही संधी त्यांना आपली कर्तबगारी दाखवण्यासाठी मिळाली. त्याचाही त्यांनी योग्य फायदा घेतला आणि सतत काम करणारा नेता कसा असतो हे महाराष्ट्राला दाखवून दिले. अजित दादांचे वैशिष्ट्य म्हणजे ते कुठेही वेळेवर येत आणि वेळेवर जात असत. कोणाला ताटकळत ठेवण्याचा खोटेपणा त्यांनी कधी केला नाही. सकाळी लवकर उठून काम करणारा नेता अशीच त्यांची ओळख होती. त्यामुळेच सतत काम करणाºया आणि लवकर उठून जनमानसात मिसळणाºया त्रिकुटाचे राजकारण हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य बनले होते.
आपल्या तत्त्वांशी ते कायम प्रामाणिक राहिले होते. महायुतीबरोबर गेले तरी नागपूर अधिवेशनादरम्यान संघाच्या बौद्धिकाला ते कधी गेले नाहीत. आमची विचारसरणी फुले, शाहू, आंबेडकरांची आहे. आम्ही संघाच्या बौद्धिकाला जाणार नाही अशी परखड भूमिका ते घेत असत. तरीही सरकारमध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करत होते.
वास्तवाचे भान राखणारे असे ते नेते होते. भावनेच्या आहारी जाऊन दांभिकपणा करण्याचा नाटकीपणा त्यांनी कधी केला नाही. साडेतीन वर्षांपूर्वी शरद पवारांनी जेव्हा आपण निवृत्त होत आहोत पुढची जबाबदारी बाकीच्यांनी घ्या, असा अचानक पवित्रा घेतला, तेव्हा जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी रडारड केली. अनेक कार्यकर्ते पवारांना विनंती करत होते. तेव्हा अजित दादा सगळ्यांवर ओरडत होते. वास्तव स्वीकारा. कुठेतरी थांबता आले पाहिजे म्हणून ते कार्यकर्त्यांना दटावत होते. पण त्यात एक प्रामाणिकपणा होता. पण तेव्हा कोणी त्यांचे ऐकले नाही. तेव्हा जर ऐकले असते तर आज राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी वाजली नसती, तर घड्याळाची टिकटिक कायम राहिली असती. पण काळाच्या मनात काही वेगळेच असते. आज राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष खºया अर्थाने पोरका झालेला आहे. जणू काही घड्याळाची टिकटिक थांबली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत एकत्रित होत्या. ही एकी कायम राहील आणि पुन्हा एक पक्ष होईल असे अंदाज बांधले असताना दादा अचानक अकाली सोडून गेले आणि तेही स्वप्न अपूर्ण राहिले. नियतीच्या मनात काय आहे हे कोणीच जाणू शकत नाही. न्यायालयात त्यांच्या अनेक केसेस होत्या. त्यांचा काय निकाल लागला असता नसता पण हा नियतीने केलेला न्याय मात्र कोणालाच मान्य होणारा नाही हे नक्की.
प्रफुल्ल फडके/श्रद्धांजली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा