गुरुवार, २२ जानेवारी, २०२६

सत्य नाकारण्याचा कोतेपणा


भारतीय जनता पक्षाचा विरोधी पक्ष असलेल्या उबाठा सेनेचा सातत्याने दावा असा असतो की, आम्ही भाजपला मोठे केले. आमच्यामुळे भाजप मोठा झाला आणि आम्हाला संपवायचे राजकारण सुरू केले. पण राजकारणात कोणी कोणाला मोठा करत नसतो. जसे राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र नसतो किंवा कायमचा शत्रूही नसतो तसेच राजकारणात कोणीच कोणाला मोठे करू शकत नाही, प्रत्येक जण स्वत:च्या हिमतीवर मोठा होत असतो आणि आपल्या हाताने पायावर कुºहाड पाडून घेत असतो, पण हेच सत्य नाकारण्याचा कोतेपणा उबाठा सेना करते आहे आणि भाजपच्या नावाने अकारण शंख करत आहे. राजकारणात मोठे करण्याची ताकद त्यांच्यात असती तर ते स्वत:च मोठे झाले असते. इतक्या वर्षात १००चा आकडा गाठता आला नाही, परंतु भाजपने सातत्याने तीन निवडणुकीत १००चा आकडा पार केला आहे तो त्यांच्या हिमतीवर, हेच सत्य आहे.


पूर्वीचा भारतीय जनसंघ असलेल्या आणि १९७७ला जनता पक्षात विलीन झाल्यानंतर जनता पक्षाचे जे १९७९ला तुकडे पडले त्यात अनेक जनता दल झाले. राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल, धर्मनिरपेक्ष जनता दल अशा नावाने त्या पक्षाचे तुकडे झाले. पण या दलदलीत न अडकता अटलजींनी भारतीय जनता पक्ष असे नामकरण करून याच दलदलीतून कमळ फुलवण्याचा संकल्प केला होता. त्यानंतर १९८०च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १४ आमदार स्वबळावर निवडून आणले होते. त्यावेळी शिवसेनेचे शून्य इतके आमदार होते. १९८५च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १६ आमदार निवडून आणले तेव्हा शिवसेनेचे शून्य आमदार होते. त्यामुळे भाजपचे १९८०पासून अस्तित्व होते. तरीही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेशी युती केली आणि १९९०च्या निवडणुकीत शिवसेनेला १८३ जागा दिल्या आणि आपण केवळ १०४ जागा लढवल्या. यात भाजपने ४२ आमदार निवडून आणले, तर शिवसेनेचे पहिल्यांदाच ५२ आमदार निवडून आले. मग शून्यावरून ५२वर कोणी नेले आणि कोणी कोणाला मोठे केले?

१९९५ला पहिल्यांदा युतीचे सरकार आले तेव्हा भाजपच्या वाट्याला ११६ जागा आल्या आणि शिवसेनेने १६९ जागा लढवल्या. यात भाजपने ६५ आणि शिवसेनेने ७३ जागा जिंकल्या. कमी जागा लढवूनही भाजपचा स्ट्राईक रेट कायम चांगला राहिला आहे. एकमेकांच्या मदतीने हे शक्य झाले. त्यामुळे आम्ही भाजपला मोठे केले, अशा फुकाच्या बाता मारणे आता थांबवले पाहिजे.


१९९९ला या अहंकारातूनच युतीला पुन्हा संधी मिळाली नाही. कमी जागा लढवून भाजपने ५८ जागा तर जास्ती जागा लढवून शिवसेनेने ६९ जागांवर विजय मिळवला होता. भाजपला जर त्यांनी मोठे केले म्हणतात तर इतक्या जागा लढवून १०० जागा का जिंकता आल्या नाहीत? हीच परिस्थिती पुढे दोन टर्म राहिली. २००४ ला कमी जागा लढवून भाजप ५४ जागा जिंकते, तर शिवसेना जास्तीत जास्त जागा लढवून ६२ जागा जिंकते, यात कोण मोठा ठरतो? २००९ला तर शिवसेनेत फूट पडली आणि मनसेचा उदय झाला. मनसेने युतीची मते खाल्लीच, १३ आमदार निवडून आणले, पण त्याहीपेक्षा युतीचा सत्तेचा मार्ग रोखला. त्यामुळे जास्ती जागा लढवूनही शिवसेना ४४ जागांवर विजयी झाली आणि भाजपने कमी जागा लढवून ४६ जागा जिंकल्या.

साहजिकच २०१४ ला मोदी लाट आल्यावर महाराष्ट्रात भाजपने अधिक जागांवर दावा केला तर तिळपापड होण्याचे कारण काय? २५ वर्षे युतीत सडलो म्हणण्याला अर्थ काय? युती झालीच नसती तरी १९९०पासून भाजपने आपल्या हिश्शाच्या जागा नक्की मिळवल्या असत्या. पण भाजपच्या मतांमुळे इतके आमदार शिवसेनेचे होऊ शकले हे वास्तव का नाकारता?


भाजपला आम्ही मोठे केले असे म्हणतात, पण भाजपमुळेच केंद्रीय सत्तेत सहभागी होता आले, भाजपमुळेच केंद्रात मंत्रिपदे मिळाली, नाहीतर कोणी दिली असती संधी याचा विचार कधी केला आहे का? भाजप राष्ट्रीय पक्ष आहे. संपूर्ण देशात पसरला आहे, पण भाजपला मोठे केले म्हणणारे मुंबईबाहेर जाऊ शकले नाहीत, संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकले नाहीत हे सत्य किती दिवस लपवून ठेवणार? भाजपवर खालच्या पातळीवर येऊन टीका करण्यापेक्षा आपण काय करू शकतो याचा विचार आता केला पाहिजे.

तरुण मतदार आता भूलथापांना बळी पडत नाही. आम्ही हे बंद करू ते बंद करू अशा भावनिक आव्हानांना बळी पडत नाही तर तो वास्तववादी आहे. तुम्ही काय करणार ते सांगा, तुमचे कर्तृत्व काय ते सांगा नाहीतर आम्ही पर्याय निवडतो असा विचार मतदार करतो. ईव्हीएम, इलेक्शन कमिशन, आता शाई यावरून गळे काढून झाले. पण मतदार विकासाला, कामाला प्राधान्य देतो, जमिनीवर उतरणाºयांना साथ देतो हे वास्तव आता तरी समजून घेतले पाहिजे. आता मुंबई महापालिकेत जे काही यश मिळाले आहे ती झाकली मूठ सव्वा लाखांची आहे, हे सत्य स्वीकारले पाहिजे. मनसेची दोन ते तीन टक्के मते मिळाली म्हणून बोटावर निभावले आहे. ती नसती तर २००९च्या विधानसभेप्रमाणे इथेही हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही आले नसते हे सत्य आहे.त्यामुळे कोणी कोणाला मोठे केले, कोणामुळे आपली लाज राखली गेली आहे हे लक्षात घेऊन वक्तव्य करण्याची गरज आहे.


प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाइन्स


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: