गुरुवार, २५ जून, २०२०

लाठीचे रहस्य..


  भारत आणि चीन या दोन देशांमधील संबंध अत्यंत तणावाचे झालेले आहेत. कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडेल अशी भिती व्यक्त होत आहे. वास्तविक चीन आणि भारत यांच्यातील हे युद्ध फक्त सीमेवरून आहे. पण त्याहीपेक्षा सीमा ओलांडून चीनने जे सांस्कृतिक आणि व्यापारी आक्रमण केले आहे ते फार भयानक आहे. ते आक्रमण आपल्याला रोखता आले तर ये युद्ध सहज जिंकता येईल. नाहीतर तितकेसे ते सोपे नाही हेही तितकेच खरे. पण या घटनेला भारतीय सैन्याने शस्त्र न वापरता काठीचा वापर केला, त्यावरून काँग्रेसने गलिच्छ राजकारण सुरू केले. त्या लाठीचे रहस्य समजले तर काँग्रेसच्या टाळक्यात जनता काठी मारल्याशिवाय राहणार नाही.
   आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आवश्यकता पडली तर शस्त्र चालवण्याची मोकळीक भारताने आपल्या लष्कराला दिल्यानंतर, चीनचा जळफळाट होणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच असे काही केले तर भारताला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा चीनने दिला आहे. अर्थात चीन आणि भारत या दोन देशातील वर्तमानपत्रातून डरकाळ्या फोडून काही होत नसते. तिथे प्रत्यक्षात सैन्याला काय करावे लागते याचे वास्तव चित्रही कधी समोर येते असे नाही. आज लडाखमधील गलवान खोर्यातील भारत आणि चीन यांच्यातील झटापटीच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या लष्कराला गोळी चालवण्याच्या दिलेल्या पूर्ण स्वातंत्र्यामुळे चीनची पाचावर धारण बसल्याचे चीनी वर्तमानपत्रातून स्पष्ट झालेले आहे. म्हणजे हातात शस्त्र नसताना भारतीय जवानांनी दिलेल्या दमदार प्रत्युत्तरात चीनचे भारतापेक्षा दुप्पट जवान मारले गेले आहेत. त्यामुळे हातातील शस्त्रांचा वापर भारतीय जवानांनी केला, तर चीनचे काय हाल होतील, याची कल्पना करवत नाही. आता इथे शस्त्र का वापरले नाही आणि काठी का वापरली? ती का संघाची शाखा आहे का असे मुद्दे जरी काँग्रेसने उपस्थित केले असले तरी करार, नियम आणि कायदा याचे भान ठेवूनच सैनिकांनी काठीचा वापर केला असणार आहे. म्हणजे इथे जर काँग्रेसचे सरकार असते तरी तेच केले असते. मग त्यावेळी संघावर टीका करता आली नसती. मग काठी का घेतली याचे उत्तर त्यावेळी काँग्रेसने काय दिले असते हा प्रश्न उरतोच.
  1962 च्या भारतात आणि 2020 च्या भारतात जमीन-अस्मानचा फरक आहे. तेव्हाचा भारत हा नेहरूंचा भारत होता, तर आजचा भारत नरेंद्र मोदी यांचा आहे, हे चीनने ओळखले आहे म्हणूनच चीन कासावीस आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पंडित नेहरूंनी चीनवर आंधळा विश्वास ठेवत ‘हिंदी चिनी भाई भाई’ असा नारा दिला होता. पण, आपण कधीच कुणाचे भाऊ होऊ शकत नाही, हे चीनने 1962 मध्ये दाखवून दिले. जो चीन आपल्या देशातील तरुणांचा कधी झाला नाही, तो आपला कसा होणार? तियानमेन चौकात लोकशाहीमार्गाने आंदोलन करणार्या तरुणांवर रणगाडे घालणार्या आणि हजारो तरुणांची हत्या करणार्या चीनच्या निर्दयी राज्यकर्त्यांपासून यापेक्षा वेगळी अपेक्षा कशी करता येणार? त्यामुळे चीनबरोबर लढण्यासाठी मोदी, पोलादी पुरूष वल्लभभाई पटेल अशा नेतृत्वाची गरज आहे. तिथे राहुल गांधींचा उपयोग नाही.
भारतासोबत विश्वासघात करण्याची चीनची जुनी सवय आहे. 1962 पासूनची ही सवय 58 वर्षांनंतरही कायम आहे, नव्हे, वाढली आहे. चीनने विश्वासघात केल्यानंतर, तेव्हा पंतप्रधान असलेले पंडित जवाहरलाल नेहरू हतबल झाले होते. पण, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी चीनला तेवढेच दमदार प्रत्युत्तर दिले आहे. चीनला कदाचित अशा प्रत्युत्तराचीच अपेक्षा नसावी. ब्रिकमध्ये भारताचे वाढलेले वर्चस्व, आशियाई देशांमध्ये वाढलेली ताकद, आतंरराष्ट्रीय पातळीवर असलेले वर्चस्व यामुळे भारताचा निर्माण झालेला दबदबा ही चीनची पोटदुखी आहे. त्यामुळे युद्ध करण्याची हिंमत नाही फक्त डरकाळ्या फोडायच्या अशी अवस्था झालेली आहे. पण क्रौर्याच्या बाबतीत ते कोणत्याही थराला जाउ शकतात याचेही भान आपल्याला ठेवावे लागेल. त्यासाठी सैन्याला दिलेला अधिकार महत्वाचा आहे. मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर मित्राने विश्वासघात केला, तर हात पिरगाळायची ताकद आताच्या सरकारमध्ये आहे, हे चीनने ओळखले आहे. म्हणूनच चीनला आज भारतात राजकीय बदल हवा आहे. आज जर काँग्रेस सरकार असते तर चीनला पोषक वातावरण निर्माण झाले असते. त्यामुळेच चीन काँग्रेसी भलावण करत आहे आणि काँग्रेसला चीनचा पुळका आलेला आहे. यावरूनच देशेवासियांनी काँग्रेसची नितीमत्ता ओळखली पाहिजे.
 यापूर्वी भारत आणि चीनमध्ये 1996 आणि 2005 मध्ये झालेल्या कराराचा आदर करत भारतीय लष्कराने आपल्याजवळची शस्त्रं चालवली नाहीत, त्यामुळे भारताच्या जवानांना शहीद व्हावे लागले.  या दोन्ही काळात भाजप सरकार सत्तेत नव्हते. तरीही काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई काठी हातात न्यायला ती काय संघाची शाखा आहे का असा सवाल करतात. अर्थात त्यामुळे भाजपचाच फायदा झाला आहे. मोदी सरकारचाच फायदा होणार हे नक्की. कारण काँग्रेसने केलेल्या करारामुळे सैन्याच्या हातात लाठी आली आता मोदी बंदुका देतील, सैन्याला अधिकार देतील हे समजले आहे. एखाद्या खुनाला वाचा फुटते तसे काँग्रेसच्या पापाला वाचा फुटली आणि त्यांच्याच चुकीवर दलवाई यांनी बोट ठेवले. म्हणजे नियंत्रण रेषेवर जाताना दोन्ही बाजूच्या जवानांनी आपल्या जवळ शस्त्र ठेवू नये, असे या करारात म्हटले होते. या करारामुळेच भारतीय लष्कराचे हात बांधले गेले होते. संरक्षणमंत्री राजनाथिंसह यांनी तिन्ही सेनादलांची उच्चस्तरीय बैठक घेत, या करारातून भारतीय लष्कराला मोकळे केले आहे. हे काम मोदी सरकार करू शकले हे काँग्रेस नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळेच काँग्रेस नेत्यांना चीनपेक्षा जास्त भिती वाटत आहे. मोदींनी जर चीनला आता हरवलं तर त्यांचे कौतुक जग करेल आणि आपल्याला टीका करता येणार नाही याची भिती काँग्रेसला वाटत असल्याने मुंबईतील लोकल नेते सचिन सावंत ते राहुल गांधींपयर्र्त सरकावर चुकीची टीका करत आहेत. स्वत:हून शस्त्र चालवायचे नाही, पण समोरच्याने शस्त्र चालवायची वेळ आणली तर आता माघार घ्यायची नाही, हातातील शस्त्रानिशी त्वेषाने समोरच्या शत्रूवर तुटून पडायचे, अशी भारताची आज भूूमिका आहे. प्रत्येक देशाला आपल्या भूमीचे रक्षण करण्याचा, त्यासाठी शस्त्र चालवण्याचा अधिकार आहे, हेच भारताने आपल्या भूमिकेतून दाखवून दिले आहे. या भूमिकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथिंसह यांचे अभिनंदन केले पाहिजे. पण तेवढे मोठे मन काँग्रेस आणि विरोधी नेत्यांचे नाही हे या देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल. काँग्रेसला कधी लोकशाही समजली नाही. लोकशाहीत विरोधक महत्वाचा असला तरी सरकारने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करायचे नाही असा नियम नाही. सरकार आपला शत्रू आहे, आपले विरोधक हे शत्रू आहेत असे समजून जोपर्यंत काँग्रेस वागते आहे तोपयर्र्त काँग्रेस आता वर येणार नाही, हेही नक्की.
  चीन हा देश आणि त्याचे राज्यकर्ते हे नेहमीच वर्चस्ववादी भूमिकेचे राहिले आहेत. आपल्या पाशवी बळाच्या आधारे जगावर राज्य करण्याची त्यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. तीच प्रवृत्ती काँग्रेसमध्ये असते. फक्त इथे घराणेशाहीचे पाशवी बळ असते. त्यामुळे काँग्रेस आणि चीन हे सगोत्र होतात म्हणून त्यांना भाई भाईची भाषा सुचते. पण त्यातून देशाचे कल्याण कधीच होणार नाही, चार टाळक्यांचे हीत पाहिले जाईल एवढेच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: