नेमके केंव्हा काय बोलावे याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अजूनही भान आलेले दिसत नाही. एखादे महाराष्ट्रासारखे राज्य सत्तेसाठी मित्रपक्षांच्या कृपेने मिळाले म्हणजे आपली बरोबरी मोदींबरोबर होईल असे नाही. पण नेहमी चुकीच्या वेळी चुकीचे बोलून स्वत:चे हसे करून ते घेत आहेत. आता नरेंद्र मोदींना सरेंडर मोदी म्हणताना सरेंडरचे स्पेलिंग न आल्यामुळे त्यांना सुरेंद्र मोदी केले आणि आपले आपण टीकेचे आणि हसे करून घेणारे धनी ते बनले. काही गरज होती का? पण अशा वागण्याने मोदींना जास्ती मोठे करण्याचे काम राहुल गांधींनी केले आहे.
खरं तर कुठल्याही क्षेत्रात नेतेपदी असलेल्या व्यक्तीला मात्र सार्या समाजाचीच भाषा समजून घेण्याची कुवत असावी लागते. त्याच्यात ही क्षमता जितकी जास्त तितके त्याचे प्रभावक्षेत्र खोल आणि विस्तारलेले असते. देशाच्या जनतेची भाषा समजून घेतली, तर जनताही त्या नेत्याचे बोल समजून घेते, स्वीकारते आणि त्या नेत्याचे शब्द जनतेसाठी मंत्र असतात. पण आपल्या पोरकट विधानांनी आणि त्यांना फिडींग करणार्यांनी, ड्राफ्ट देणारांनी त्या नेत्यांची अक्कल काढलेली असते. हे पूर्वी सोनिया गांधींच्या बाबतही अनेकवेळा झघले आहे. पण सोनिया गांधींनी अभ्यासू वृत्ती दाखवत त्या चुका टाळल्या. म्हणजे एका निवडणुकीच्या भाषणात सोनिया गांधींनी हिंदी भाषण इंग्रजी अक्षरात लिहून दिले होते. त्याचे उच्चार करताना अर्थाचा अनर्थ झाला होता. वाजपेयी सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या होत्या , चुनाव में वडे करो, बाद में भुल जावो, अशी भाजपची अवस्था आहे. यात वडे करो आणि वादे करो याचे स्पेलिंग एक होते. पण त्यानंतर त्यांनी हिंदी शिकून त्यावर प्रभुत्व मिळवले. आज त्या कमित कमी इंग्रजी बोलतात आणि जास्तीत जास्त हिंदी बोलतात. पण हे राहुल गांधींना गेल्या पंधरा वर्षात जमलेले नाही. सोनिया गांधींनी दोन वर्षात हे करून दाखवले होते.
गेल्या दहा वर्षात जनतेची नाडी समजून नेमके कुठे काय बोलावे, काय केल्याने लोक आपले होतील हे पंतप्रधान मोदींना चांगले जमले आहे. तेच त्याच्या यशाचे रहस्य आहे. सोशल मिडियावर थोडीफार टीका होते, पण त्यात तसा दम नसतो. कुठे, कसे आणि किती, काय बोलावे हे मोदींना नेमकेपणाने कळते. त्यामुळे ते नेमक्या वेळी अचूक तेच बोलतात. त्याच्या नेमकी उलट कृती राहुल गांधींकडून होते आणि आपसूक लोकांना चर्चेला संधी मिळते. राहल गांधींची ही कालची स्पेलिंग मिस्टेक आणि अज्ञान कंगना राणावतने दाखवून दिले आणि एकच धमाल उडाली. राहुल गांधी यांनी ही टीका करण्याची वेळ नाही हे भान ठेवले असते तर आज ही वेळ आली नसती.
परवा चीनसोबतच्या तणावाच्या पृष्ठभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशालाही संबोधित केले आणि त्या आधी त्यांनी देशातल्या प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशीही चर्चा केली. अशा परिस्थितीत कुठल्याही देशाच्या प्रमुखाने जेवढे आणि जे बोलायचे असते तितकेच मोदी सर्वपक्षीय बैठकीत बोलले. त्या आधी खरेतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी समंजसपणाची भूमिका घेतली होती. आम्ही या काळात सरकार आणि सैन्य यांच्या सोबत आहोत, असे त्या म्हणाल्या होत्या. मात्र, नंतर सत्ताधार्यांच्या भूमिकेचा स्वीकार करणे म्हणजे कमीपणा आहे, असे त्यांना वाटले की काय त्याच जाणोत किंवा राहुल गांधी आणि त्यांच्या कंपूला खूष करण्यासाठी त्यांना भाषा बदलावी लागली असावी. पण ती त्यांच्या अंगलट आली. मोदींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्याची ही वेळ नव्हती याचे भान काँग्रेस नेत्यांना का येत नाही? ही राजकारणाची वेळ नाही, टिकाटिपण्णी निवडणुकीत करा, युद्धजन्य परिस्थिती असताना हातात हात घेउन चला हे काँग्रेसला, राहुल गांधींना का जमत नाही? आपली अचानक भाषघ बदलून सोनिया गांधी काही बोलल्या तेवढे कमी होते की काय; पण कायम अपयशी ठरलेले राहुल गांधी फक्त खासदार असूनही त्यांनी पुन्हा आपले अज्ञान प्रकट करण्याचा प्रयत्न केला. अडचणीत आणायला गेले मोदींना पण स्वत:चेच नाक कापून घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. खरं तर आजकाल त्यांच्या आक्षेपांना मोदी उत्तरे देणे तर दूर, लक्षही देत नाहीत! पार्टीचे इतर नेतेच त्यांचा समाचार घेतात. शुक्रवारच्या बैठकीत पंतप्रधानांनी नेमकी माहिती दिली. खरेतर पंतप्रधानांनी त्या बैठकीत दोनच वाक्यांत माहिती दिली. त्यांच्या दोन वाक्यांवर काँग्रेसी आणि मोदीद्वेषाचा कावीळ झालेल्या समाजमाध्यमांवरील कल्पकांनी उगाच एरंडाचे गुर्हाळ लावले. ‘भारताच्या भूमीवर कुणीही अतिक्रमण केलेले नाही’ आणि ‘भारताच्या भूमीवर कुणीही आपली चौकी स्थापन करू शकलेले नाही...’ याचा अर्थ काय होतो, ते समजून घेण्यासाठी भाषाप्रभुत्व असले पाहिजे असे अजिबात नाही, तरीही त्यावरून गदारोळ माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘चीनचे सैनिक भारतीय भूमीत आलेच नव्हते, तर मग चकमक कशाला झाली?’ ‘भारताचे सैनिक शहीद का झाले?’ चीनने भारताची भूमी बळकावली आहे, हे सरकार लपवीत आहे, असा निष्कर्ष काढून मग चीनने मागे जावे, यासाठी उच्चस्तरावर चर्चा का करण्यात आली, असले प्रश्न विचारण्यात येऊ लागले. पंतप्रधानांच्या बोलण्याचा स्पष्ट अर्थ असाच आहे की, चीनने घुसखोरीचा आणि जागा बळकावण्याचा प्रयत्न केला होता आणि आपल्या लष्कराने तो विफल ठरविला. पण देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. ज्या चर्चा जाहीरपणे होणे अपेक्षि नव्हते त्या चर्चा करवून काँग्रेसने आपण भारतद्रोही आहोत, चीन पाक प्रेमी आहोत याचेच दर्शन घडवले आहे. चीनने भारतीय भूमीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला; पण तो आपण तोडीस तोड प्रत्युत्तर देत अपयशी ठरविला. यात 42 चिनी सैनिकांना कंठस्नान घातले. त्यांनी तसा प्रयत्न केला म्हणूनच चकमक घडली... लष्कराच्या सामरिक बाबींबद्दल सर्वकाही खुलेआम सांगायचे असते का? जगजाहीर करायचे असते का? युद्धनीती काय असते... हेही, देशावर इतका दीर्घकाळ सत्ता गाजविणार्या पक्षाला कळू नये का? युद्धाचे तपशिल यांना कशाला हवे असतात? मागेही सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही, पुलवामा घडलेच नाही असे बोलून काँग्रेसने आपली दुष्ट भाषा दाखवून दिली होती. पण हे चांगले नाही, काँग्रेसची ही चुकीची गोष्ट आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा