चोख उत्तर देण्याची वेळ
गेल्या
अठ्ठेचाळीस तासात चीनने भारतीय सीमेवर उन्माद दाखवला आहे. भारताचे वीस
जवान शहीद झाले आहेत तर भारतीय सैन्याने चीनच्या 40 पेक्षा जास्त सैनिकांना
आसमान दाखवले आहे. हीच वेळ आहे चीनला जोरदार धडा शिकवण्याची. आज चीनच्या
विरोधात जगभर संताप असताना त्या संधीचा फायदा घेत चीनला सरळ करण्याची ही
संधी भारताने आता सोडता कामा नये. गेल्या पन्नास वर्षात काँग्रेस सरकारने
लाडावून ठेवलेले हे संकट आता संपवण्याची वेळ आलेली आहे. हिंदी चीनी भाई भाई
म्हणत गळ्यात गळे घालून स्वत:चा गळा कापून घेण्याची वेळ आलेली आहे हे आता
काँग्रेसला आणि चीनला दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. यात आश्चर्य वाटते ती
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे. सीमेवर आपले सैनिक शहीद होत आहेत,
सरकार योग्य ती पावले उचलत आहे, भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत आहे. असे
असताना राहुल गांधी मोदींवर काय टीका करत बसले आहेत? पाकीस्तानने दहशतवादी
हल्ला केला की पाकीस्तानची बाजू घ्यायची, चीनने हल्ला केला की चीनची बाजू
घ्यायची. ही प्रवृत्ती काँग्रेस सोडणार आहे की नाही? राहुल गांधी आणि
काँग्रेस नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे की आपण भारतीय आहोत, भारताचे हित
पाहिले पाहिजे, चीन किंवा पाकीस्तानचे नाही.
आता सीमेवरील तणाव हा चीनने
वाढविला आहे. जाणीवपूर्वक वाढविला आहे. सोमवारी गलवान खोर्यात भारत आणि
चीनच्या सैनिकांमध्ये जी झटापट झाली, त्यात भारताचा एक अधिकारी आणि दोन
सैनिक शहीद झालेत. त्याचप्रमाणे चीनचे पाच सैनिकही मारले गेल्याची बातमी
दोन देशांमधील तणाव आणखी वाढविणारी आहे. सीमेवर गोळीबार झाला नसतानाही,
आपले तीन सैनिक शहीद कसे झालेत आणि चीनचे पाच मारले कसे गेलेत, हा प्रश्नच
आहे. एकीकडे वाटाघाटी करून प्रश्न सोडवू असे म्हणायचे आणि दुसरीकडे आपल्या
सैनिकांना भारतीय सीमेत घुसायला सांगायचे, ही चीनची दुटप्पी भूमिका वेळीच
ओळखून भारत सरकारने अधिक सतर्क होण्याची आवश्यकता आहे. काँग्रेस आदी
चीनप्रेमी राष्ट्रीय पक्षांच्या नादाला न लागता सरकारने योग्य तो निर्णय
घेतला पाहिजे.
भारत सरकारने कुठल्याही परिस्थितीत चीनवर विश्वास ठेवू
नये. ‘हिंदी-चिनी भाई भाई’ करीत भारतावर युद्ध लादणारा चीन विश्वासघातकी
आहे. त्यामुळे भारताने आता निर्णायक भूमिका घेणे गरजेचे आहे. हीच योग्य वेळ
आहे. अमेरिकादी देश चीनविरोधात एकवटले असताना, मुत्सद्देगिरीचा परिचय देत
भारताने चीनविरोधात ताकद एकवटून चीनला नामोहरम केले पाहिजे. आंतरराष्ट्रीय
पातळीवर कुठेतरी चीनवरही आता दबाव वाढला आहे. असे असले तरी भारत सरकारने
सर्व आघाड्यांवर सतर्क राहात चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवत परिस्थिती
गांभीर्याने हाताळली पाहिजे.
शेजारच्या चीनने सध्या कारण नसताना
भारताच्या खोड्या करणे सुरू केले आहे. कोरोना व्हायरस जन्माला घालून आणि
त्याचा जाणीवपूर्वक जगभरात प्रसार करून आता चीन स्वत:च निर्माण केलेल्या
चक्रव्यूहात फसला आहे. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधताना
चीनने मुद्दाम भारताशी सीमावाद उकरून काढला आहे. कोरोनाच्या मुद्यावरून
एकाकी पडलेला चीन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी आणि जागतिक समुदायाचे लक्ष
इतरत्र वळविण्यासाठी ठरवून भारताशी भांडण करीत आहे, हे स्पष्ट झाले आहे.
डोकलामच्या वेळी चीनने जे धोरण अंगीकारले होते, तशीच वागणूक यावेळीही दिसून
येत आहे. तणाव निर्माण करायचा, संबंध ताणून धरायचे आणि परिस्थिती अधिकाधिक
तणावपूर्ण करून आपला दुष्ट हेतू साध्य करायचा, हा चीनचा डाव दिसतो आहे.
त्यामुळे चीनला धडा शिकवण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. अर्थात चीन काही फक्त
भारताशीच असा वागतो असा नाही. म्हणून तर त्याला डॅ्रगन राक्षस म्हणतात.
त्यांची प्रवृत्ती ही राक्षसी असल्याने चीनला लागून असलेल्या अन्य 14
देशांशीही चीन असाच वागतो. त्यामुळे ज्याप्रमाणे व्हीएटनामने चीनला चाळीस
वर्षांपूर्वी अद्दल घडवली होती तशी अद्दल घडवण्याची वेळ आलेली आहे. या
युद्धात व्हीएटनामने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय याच्या
रणनीतीचा अभ्यास केला होता. आपल्यापुढे असले चांगले आदर्श असताना मोदी
सरकारने चोख उत्तर दिले पाहिजेत. तसेच चीनचे समर्थन करून चीनला पोषक
वातावरण निर्माण करण्याचा काँग्रेसचा डावही हाणून पाडला पाहिजे.
प्रसारमाध्यमांनीही राहुल गांधींच्या वक्तव्याला किती महत्व द्यायचे याचा
विचार केला पाहिजे.
आज चीनला जेरीस आणणे भारताच्या दृष्टीने सोपे नसले
तरी कठीणही नाही. पण, तरीही सध्या जी कूटनीती वापरली जात आहे, तिचा तत्काळ
परिणाम येणे कठीण आहे. वेळ लागेल. आपल्याला थोडा संयम ठेवावा लागेल.
डोकलामच्या वेळी आपण जी भूमिका घेतली होती आणि चिनी सैनिकांना हुसकावून
लावले होते, तसेच यावेळीही करावे लागेल. पण, त्याच वेळी थोडा संयमही ठेवावा
लागेल.
तणावाचा जो स्तर आहे, तो वाढता ठेवत राजकीय-आर्थिक सौदेबाजी
करून भारताला नामोहरम करण्याचे चीनचे षडयंत्र आहे. भारत आणि चीनच्या सीमेवर
गेल्या 40 वर्षांत कधीही गोळीबार झालेला नसला, तरी भविष्यात होणारच नाही,
याची कुठलीही शाश्वती नाही. चीनची अर्थव्यवस्था निर्यातीवर अवलंबून आहे.
सध्या अमेरिकेसह अनेक देशांनी चीनविरोधी भूमिका घेतल्याने चीनची अडचण झाली
आहे. त्यातच कोरोना व्हायरसबाबत जगाला वेळीच सतर्क का केले नाही, याचेही
उत्तर चीनकडे नाही. त्यामुळे भारतासारख्या सोशीक देशाला त्रास देऊन,
युद्धासारखी परिस्थिती निर्माण करून जगाचे लक्ष इतरत्र वळविण्याचा चीनचा
डाव ओळखून भारताने चीनचा कसा मुकाबला करायचा, याबाबत दिशा निश्चित केली
पाहिजे. आपल्या व्यापारावर कुठलाही विपरीत परिणाम होऊन अर्थव्यवस्था
रुळावरून घसरू नये, हा चीनचा स्वार्थ आहे. त्यातून चीनने कुरापती सुरू
केल्या आहेत, हे भारताला आणि जगाला कळणार नाही, या भ्रमात चीन राहणार असला,
तरी चीनचा मुकाबला करणे वाटते तेवढे सोपेही नाही.
चीनशी मुकाबला
करताना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. कुठल्या आघाडीवर कसे लढायचे,
याबाबत एकदम मजबूत असे नियोजन करावे लागणार आहे. अमेरिका, भारत, जपान आणि
ऑस्ट्रेलिया यांच्यात ऐक्य होत असल्याचे चीनला खुपते आहे. त्यामुळे असे
ऐक्य होऊ नये आणि भारताने अमेरिकेशी हातमिळवणी करू नये, या दृष्टीने दबाव
आणला तर भारत दोन पावलं मागे जाईल, असे चीनला वाटते आहे. त्यातूनच चीनने
सीमेवर सैन्य जमा करून, काही सैनिकांना लडाखमध्ये घुसवून तणाव वाढवला आहे.
अमेरिकेसोबत जे शीतयुद्ध सुरू झाले आहे, त्यात भारताने पडू नये, असा सूचक
इशारा चीनने भारताला दिला आहे. चीनने अप्रत्यक्ष धमक्याही दिल्या आहेत. हा
चीनचा मूळ स्वभावच आहे. संपूर्ण जग कोरोनाशी लढताना दिसत असताना, चीनने
लडाखच्या सीमेवर सैन्य आणून काहींना भारतीय सीमेत घुसवत जी खोडी काढली आहे,
ती भारताने सामान्य समजता कामा नये. काहीही करून भारतावर दबाव वाढवायचा
आणि अमेरिकेपासून दूर करायचे, हा चीनचा डाव स्पष्टपणे लक्षात येणारा आहे.
चीनने ‘वन बेल्ट वन रोड’ ही जी योजना तयार केली आहे आणि त्यावर जे काम केले
आहे, त्यात भारताकडून बाधा आणली जाऊ नये, आपला ग्वादर रोड सुरक्षित राहावा
यासाठी चीनची सगळी धडपड सुरू आहे. भारताशी युद्ध करून तसा चीनला कोणताही
फायदा होणार नाही, हे चीनलाही माहिती आहे.
अमेरिकेसोबत गेल्यास
काय परिणाम होतील, हे भारताला सांगण्यासाठीच चीनने लडाखला लागून असलेल्या
सीमेचा वाद उकरून काढला आहे. भारत सरकारने कलम 370 रद्द करून एक मोठे पाऊल
उचलले होते. आता भारताचा भविष्यात असा प्रयत्न राहील की, व्याप्त काश्मीरचा
प्रदेश, जो आधी आपलाच होता, तो परत मिळवायचा. नेमके हेच चीनला नको आहे.
पण, चीन भारताची भूमिका, बाजू आणि भावनाच समजून घ्यायला तयार नाही. भारत
आणि चीन या दोन देशांमध्ये जी सीमारेषा आहे, ती नव्याने चिन्हांकित
करण्यासाठी भारताने अनेकदा पाठपुरावा केला. पण, चीनकडून वारंवार टाळाटाळ
केली जात आहे. व्यापारात जे असंतुलन आहे, ते दूर करण्याबाबतही भारताने
अनेकदा आवाहन केले आहे. पण, त्यालाही चीनकडून सकारात्मक प्रतिसाद कधी
मिळाला नाही. चीनने पाकिस्तानशी हातमिळवणी करून भारताला घेरण्याचा जो
प्रयत्न चालवला आहे, त्याबाबतही भारताने वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे.
पण, त्याची तरी चीनने कुठे दखल घेतली? नाहीच घेतली. पण चीनने भारताच्या
संयमाची फार परीक्षा पाहू नये. भारताकडून लडाखच्या सीमेंतर्गत रस्त्यांची
जी कामे केली जात आहेत त्याला चीनचा आक्षेप आहे. पण, हा आक्षेप वरवरचा आहे.
प्रत्यक्षात चीनच्या मनात वेगळीच भावना आहे. भारताने आपल्या धोरणांमध्ये
जे बदल केले आहेत, व्याप्त काश्मीरसाठी जी भूमिका घेतली आहे, त्यामुळे चीन
बिथरला आहे. 1993 आणि त्यानंतर जेवढे करार झालेत, त्यात सीमेवर शांतता कायम
राखावी, यावर दोन्ही देशांची सहमती झाली आहे. मात्र, भारताने प्रयत्न
करूनही सीमारेषा चिन्हांकित करण्यासाठी चीनने कधीही सहकार्य केले नाही, हे
वास्तव आहे. काहीही असले आणि काहीही झाले, तरी भारतासाठी आता ही निर्णायक
वेळ आहे. यासाठी देशांतर्गत राजकारण करणारांना रोखत सरकारने चीनला चोख
उत्तर दिले पाहिजे, सगळा देश नाही आज सगळे जग पाठीशी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा