यांना कुणीतरी आवरा
देशापुढे
सध्या चीनी ड्रॅगनचे आव्हान आहे. हे आव्हान भारतीय जनतेच्या सदिच्छांमुळे
मोदी सरकार नक्कीच पार करेल यात शंका नाही. ही वेळ सरकारच्या पाठीशी
राहण्याची आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी बुधवारी तो मनाचा
मोठेपणा दाखवला आणि या परिस्थितीत सरकारच्या पाठीशी असल्याचे, सरकारबरोबर
असल्याचे जाहीर केले. यालाच तर राजकारण म्हणतात. योग्य वेळी विरोधकांचीही
साथ देणे आणि देशासाठी एक असणे हा खरा राजधर्म आहे. पण आमच्या पत्रकारीतेत
स्वत:ला महान समजणारे मात्र सरकारव टीका करण्यात धन्यता मानत आहेत. निखिल
वागळेंची वागळे की दुनिया सोशल मिडीयावर सध्या सक्रीय झाली आहे आणि डाव्या
विचारसरणीच्या या विकृत तथाकथीत पत्रकारांनी चीनी डाव्या प्रवृत्तीचे
समर्थन करत भारताला दोषी ठरवण्यात धन्यता मानली. फेसबुकवरून बुधवारी
त्यांचे झालेले दर्शन अक्षरश: हिन प्रकारचे होते. भारत आणि चीनची तुलना
करून या देशाच्या अस्मितेलाच या विचारवंत म्हणवणार्या डाव्या पत्रकारांनी
डिवचले. केवळ मोदी द्वेषातून जे हे लोक करत आहेत ते चांगले नाही. तोच
प्रकार खासदार संजय राउत यांचाही आहे. ते खासदार नंतर पत्रकार अगोदर आहेत.
पण त्यांनी मोदी सरकारला जाब विचारला आहे, हिशोब विचारला आहे, गांधी
घराण्याची, नेहरूंची तळी उचलली आहे, पण सोनिया गांधींनी त्याला किंचितही
महत्व दिले नाही. आम्ही सरकारबरोबर आहोत हे जाहीर करून संजय राउत यांचा
अक्षरश: कचरा केला. पण आज सरकारबरोबर राहण्याची, देशाने एक होण्याची ही वेळ
आहे. ही आपसातील मतभेद प्रकट करण्याची वेळ नाही, हे जर संजय राउत यांना
समजत नसेल तर सामान्यांचे काय होईल?
आज कोरोना नावाचा एक अतिसूक्ष्म
विषाणू, मात्र त्याने सार्या भारतातच नव्हे, तर जगात हलकल्लोळ माजवून ठेवला
आहे. चीनमध्ये 2019 सालच्या डिसेंबर महिन्यापासून पसरलेल्या या विषाणूने
प्रत्यक्षात 2020 सालच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून जगातही पाय पसरणे
सुरू केले होते. भारतातही त्याने आधी चोरपावलाने प्रवेश केला आणि नंतर
मात्र तो शिरजोर झाला. त्याला जास्त शिरजोर होता येऊ नये म्हणून पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आणि तो जाहीरही केला. कधी
नव्हे ते विमानांपासून रेल्वेपर्यंतची संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली.
सर्व उद्योगधंदे बंद झाले. हातावर कमावून पानावर खाणार्यांचे हाल झाले.
पाहता पाहता तीन-चार महिने निघून गेले. या सर्व पृष्ठभूमीवर पंतप्रधानांनी
नुकतेच राजधानी दिल्लीतून देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना
संबोधित केले आणि लवकरच भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येईल, असे संकेत दिले.
पंतप्रधानांच्या या विधानाने तात्पुरता का होईना, मुख्यमंत्र्यांसह
देशवासीयांना दिलासा मिळाला असून, त्यांच्या या विधानामुळे आणि विद्यमान
परिस्थिती पाहता, नक्कीच अर्थव्यवस्थेच्या गाडीची मंदावलेली चाके लवकरच
धडधडू लागतील, असा विश्वास निर्माण झाला आहे. नुसत्या शब्दाने नव्हे, तर
लवकरच देशवासीयांना अर्थव्यवस्थेच्या बाबतीत नक्कीच दिलासा मिळेल, असेही
आता मनोमन वाटू लागले आहे. यातून आपण सावरत असतानाच चीनने अघोषित युद्ध
सीमेवर पुकारले आहे. त्या युद्धाला तोंड देण्यास भारत समर्थ आहे. पण आज
सोशल मिडीया इतका सक्रीय झालेला असताना, पॉवरफुल असताना त्याचा वापर करून
काही देशातील डाव्या विचारशक्ती याला धक्का पोहोचवत आहेत. चीनची बाजू घेउन
मोदींना चुकीचे ठरवणारी प्रवृत्ती फेसबुकवर चालवली आहे ही चुकीची आहे.
देशांतर्गत टीका करताना कोणी काही बोलणार नाही. पण परकीय शत्रू आपल्यावर
आक्रमण करतो तेंव्हा हेवेदावे आणि मोदीद्वेश विसरला पाहिजे हे निखिल वागळे
आणि त्यांच्या दुनियेने लक्षात घेतले पाहिजे.
कोरोनाच्या संकटातून
आपण बाहेर पडतो आहोत. आपण आता लॉकडाउन नाही तर त्यातून बाहेर पडण्याचे
प्रयत्न करत असताना हे चीनी संकट सीमेवर आलेले आहे. अशा परिस्थितीत
सर्वांनी एकजुटीने राहणे आवश्यक असताना विनाकारण टीका करणे थांबवले पाहिजे.
या पोरकटपणाला आळा घालत आता मोठे मन केले पाहिजे. चार लॉकडाऊननंतर केंद्र
सरकारने ‘अनलॉक-1’ जाहीर केले, त्यामुळे परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येणे
सुरू झाले आहे. एवढेच नव्हे, तर उद्योगधंद्यांना सुरू करण्याची परवानगी
मिळाल्यामुळे तसेच वाहतुकीच्या संदर्भातील नियमही शिथिल केल्यामुळे हे मजूर
आणि कामगार पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी परतू लागले आहेत. देशाची आर्थिक
राजधानी असलेल्या मुंबईतून सुमारे 30 ते 40 लाख मजुरांनी गावाकडे प्रस्थान
केले होते, त्यापैकी दीड लाख पुन्हा मुुंबईत परतले असल्याची माहिती आहे.
अशा परिस्थितीत आपली अर्थव्यवस्था गतीमान होत असताना चीनचा या
अर्थव्यवस्थेवर डोळा आहे. चीनी मालावर बहिष्कार टाकल्याने भारतासारगी मोठी
बाजारपेठ गमावण्याची भिती निर्माण झाल्याने चीनने हा हल्ला चढवला आहे. अशा
परिस्थितीत हे बहिष्काराचे शस्त्र सर्वांनी अवलंबावे असे आवाहन या लोकांनी
करणे गरजेचे आहे. पण केवळ मोदी द्वेषाने सामान्यांना भरकटवण्याचे काम हे
तथाकथीत विचारवंत करत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. अर्थात भारतातील जनता
अशा विकृतांच्या अफवांना बळी पडणार नाही, पण यांना कुठेतरी रोखले पाहिजे.
या कंपूशाहीतील काही लोकांनी तर फेसबुकवर चीन आणि भारताच्या नेत्यांना
स्वत:ची खुर्ची सुरक्षित करण्यासाठी हे युद्ध केले जात असल्याचे म्हटले
आहे. हा पोरकटपणा यांनी थांबवले पाहिजे. एकाचवेळी कोरोना आणि सीमेवरील
युद्ध करणार्या भारताला नागरिकांनी उभे करायचे आहे. अशा परिसरात चीन
वटवाघळांप्रमाणे उलटे टांगून घेण्याची ही वाघळे प्रवृत्ती आता रोखली
पाहिजे. ही वेळ मोदी चूक की बरोबर, ते चांगले का वाईट यावर चर्चा करण्याची
नाही. त्यांनी देशासाठी जो कणखरपणा दाखवला आहे त्याचे गुणगान गा असेही
म्हणणार नाही, पण सर्वांनी एकजुटीने देशापुढचे संकटाला रोखण्याची वेळ
असताना अंतर्गत वाद आणि द्वेष बाजूला ठेवण्याचा समंजसपणा दाखवला पाहिजे. हा
समंजसपणा सोनिया गांधींनी दाखवला. सोयीसाठी गांधी नेहरू घराण्याची तळी
उचलणार्यांनी किमान त्यांचा तो आदर्श घेतला पाहिजे.
समोर चीनचे संकट
असताना, युद्धजन्य परिस्थिती असतानाही च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन
टप्प्यांत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पहिल्या टप्प्यात त्यांनी,
कोरोचा प्रभाव जास्त नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत, तर दुसर्या
टप्प्यात ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव जास्त आहे तेथील
मुख्यमंत्र्यांसोबत विचारांचे आदानप्रदान केले आणि देशाच्या
अर्थव्यवस्थेच्या मंदावलेल्या गाडीची गती पुन्हा एकदा हळूहळू का होईना वेग
पकडू लागेल आणि ही गाडी पुन्हा एकदा रुळावर आपल्या नेहमीच्या गतीने धावू
लागेल, असा विश्वास व्यक्त केला. सर्वांना बरोबर घेउन जाण्याचे प्रयत्न
केंद्र सरकार करत असताना हातात असलेल्या सोशल मिडीयाचा दुरूपयोग करण्याचे
काम काही स्वकीय करत आहेत, त्यांना आवरण्याची गरज आहे असे वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा