आता अनलॉक व्हायचे आहे. पुनश्च हरिओम म्हणायचे आहे. या कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रविवारी आधार दिला आहे. या संकटातून बाहेर पडण्याची प्रेरणाच दिली आहे. त्याचाच मंत्र आहे पुनश्च हरिओम. गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनोच्या संकटात अडकून पडले आहे. भारतही गेली तीन महिने या संकटात आहे. दोन महिने आपण लॉकडाउन झालो आहोत. आपण कोरोनाच्या चक्रव्यूहात अडकलो होतो. आता त्यातून सहीसलामत बाहेर पडायचे आहे. आता हा चक्रव्यूह भेदायचा कसा, ते कळणारे बरेच आहेत, पण वळणारे किती आहेत हे महत्वाचे आहे.एकदा या चक्रव्यूहात आत गेल्यावर त्यातून बाहेर पडणेच कठीण असते. या लॉकडाउनच्या काळात महाभारत दाखवल्यामुळे सर्वांनी चक्रव्युहाची परिस्थिती पाहिली आहे. त्याची भीषणता पाहिली आहे. म्हणजे अर्जुनपुत्र अभिमन्यू माता सुभद्रेच्या गर्भात होता. कृष्ण हा आपली भगिनी सुभद्रेला चक्रव्यूह भेदून आत जायचे कसे, हे सांगत असताना तिला झोप लागली तरीही पोटात असलेला अभिमन्यू हुंकार देउन आतून त्याला प्रतिसाद देत राहिला. त्यामुळे त्याला चक्रव्यूहात दाखल व्हायचे कसे हे कळले. दरम्यान, सुभद्रा झोपी गेल्याचे कृष्णाच्या लक्षात आल्यावर त्याने बाहेर कसे पडायचे ते सांगितले नाही. त्यामुळे अभिमन्यूला चक्रव्यूह मोडून बाहेर पडता आले नाही आणि रणांगणावर तो धरातीर्थी पडला. हे सगळे आपण सरकारच्या कृपेने पुन्हा एकदा महाभारत प्रसारीत झाल्यामुळे या लॉकडाउनच्या चक्रव्यूहात अडकल्यावर पाहिले आहे. अनेकांनी ते वाचून ऐकलेही असेल. तशीच काहीशी अवस्था आज संपर्ण जगाची झालेली आहे. या चक्रव्यूहात संपूर्ण जग अडकले आहे. आता त्यातून कोण बाहेर पडणार आणि कोण अडकणार हे समजत नाही. पण आता आपण तशी तयारी केली आहे. पण आज जगात कोरोनाशी लढताना अनेकांचा असा अभिमन्यू झालेला आहे. जवळपास सारे जगच कोरोनाच्या प्रभावात आल्यावर एकच उपाय दिसत होता, तो म्हणजे सोशल डिस्टन्सींग पाळणे. मास्क, सॅनिटायझर हे जीवनावश्यक झाले. मुळात कोरोनाबद्दल अद्याप बरीच साशंकता आहे. तो पूर्णपणे कुणालाच कळलेला नाही.या सोशल डिस्टन्सिंगबाबत अनेकांचे अनेक विचार आहेत. याची काही आवश्यकता नाही असेही मत अनेक देशांतल्या तज्ज्ञांनी मांडले होते आणि काही देशांत हे सोशल डिस्टन्सिंग न पाळताही कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात त्यांना यश मिळाले. विशेष म्हणजे या कोरोनोचा जो निर्माता आहे, जो प्रसारक आणि प्रचारक आहे त्या चीनमध्ये या रोगाचा प्रसार फारच कमी झालेला आहे. त्यावर सहज नियंत्रण त्यांनी मिळवले. अर्थात हा चक्रव्यूह त्यांनी सगळ्या जगाला अडकवण्यासाठी मांडला असला तरी आपल्याला त्यातून बाहेर पडायचे आहे. पुनश्च हरिओम म्हणायचे आहे.या संकटात भारतासारख्या खंडप्राय विकसनशील देशाने काय करावे, असा प्रश्न होता. कारण कोरोनाचा प्रभाव देशागणिक बदलतो आहे. भारताने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळायचे ठरविले आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला भारतीय जनतेने चांगलाच प्रतिसाद दिला. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव तुलनेने फार लवकर ओसरतो आहे. आता तो पूर्ण आटोक्यात आलेला नाही; पण आर्थिक परिस्थितीचाही विचार करावाच लागणार आहे. त्यामुळे आता ‘लॉकडाऊन’मधून बाहेर पडावेच लागणार आहे. त्याची तयारी आपण आता करत आहोत. राज्यात 3 जून, पाच जून आणि 8 जून अशा तिन टप्प्यात आपण बदल घडवत आहोत. हा चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण देशात सर्वात जास्त चक्रव्यूहात महाराष्ट्र अडकलेला आहे. त्यातही मुंबई अधिक प्रमाणात अडकली आहे. त्यामुळे हे कार्य आपल्यालाच हाती घ्यावे लागणार आहे हे नक्की. वास्तविक पाहता संपूर्ण जगालाच आता कोरोनासोबत राहण्याची सवय करून घ्यावी लागणार आहे. लस निर्माण करण्याचे प्रयत्न जगभरात 124 ठिकाणी सुरू आहेत. पैकी कुणाला यश मिळेल हे आज तरी सांगता येत नाही, पण तोवर थांबून राहणे शक्य नाही. म्हणून आता पुनश्च हरिओम म्हणत आपल्याला बाहेर पडायचे आहे. म्हणून भविष्यात बाहेर पडताना खबरदारी घ्यावीच लागणार आहे. कोरोनाचा चक्रव्यूह आपण भेदला आहे, पण त्यातून बाहेर नीट पडल्यावरच ते खरे यश आहे, असे म्हणता येणार आहे. दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते. जणू काही सगळीकडे काळे ढग जमले होते. जगाच्या वेशीवर अंधारच दाटून आला होता. आता त्याचे जाळे विरळ होते आहे. नजर रोखून पलीकडे अंधूक का होईना दिसू लागले आहे. कोरोनानंतरचे जग, यावर आता विचार सुरू झालेला आहे. त्यात कोरोनाइतकीच महत्त्वाची चिंता ही अर्थकारणाची आहे. मधल्या काळात जग ठप्प झाले होते. त्यामुळे अगदी छोट्या-मोठ्या उद्योगांची कवाडे बंद होती. बेरोजगारी जगातच प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अमेरिकेसारखा जागतिक महासत्ता असलेला देश हातघाईवर आलेला आहे. उद्योग, व्यापार सुरू करायचे झाले तर गर्दी होईल आणि मग भौतिक दूरतेचे नियम पायदळी तुुडविले जातील. कोरोना वाढेल. लॉकडाऊन कडक केला तर आर्थिक स्थिती आणखीच नाजूक होईल, अशी अवस्था आहे. म्हणजे परिस्थिती अशी आहे की ‘धरले तर चावते, सोडले तर पळते’.अर्थात त्यातून मार्ग काढणे आवश्यक आहे. संपूर्ण जगात वैद्यकीय तज्ज्ञांचे मत हेच होते. लॉकडाऊन अंमलात आणणे सोपे आहे, मात्र तो भेदून बाहेर पडणे कठीण आहे. भारताने त्यावर केलेला पाचव्या ‘अनलॉकडाऊन’चा प्रयोग किती यशस्वी ठरावा, ते येता काळच सांगणार आहे. मात्र, या अनलॉकडाऊनची संहिता मात्र आता तरी आश्वासक अशी वाटते आहे. केंद्राने पहिले पाउल टाकले आहे. त्याला महाराष्ट्र सरकारने चांगला प्रतिसाद देत पुढचे पाउल टाकले आहे. पुनश्च हरिओम म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले नियोजन केले आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, आभार मानले पाहिजेत. आता थोड्या प्रमाणात का होईना आमची मुंबईची लोकल सुरू झाली पाहिजे. या कोरोनानंतर जगाच्या व्यवस्थेतच आमूलाग्र बदल होणार आहे. जगाच्या एकुणातच व्यवस्थेची पुनर्स्थापना होण्यासाठी किती दिवस लागतील हे आज सांगता येणे कठीण आहे. त्यासाठी ही पहिली तीन वर्षे जास्त महत्त्वाची आहेत. जग तसेही जागतिकीकरणाच्या व्यवस्थेशी झगडू लागले होते. स्थानिक व्यवस्थांचे पुनरुज्जीवन करण्याचा मार्ग जगात प्रशस्त होऊ लागला होता. त्याला आता कोरोनाने अधिक वेग दिलेला आहे. त्यामुळे आता स्वदेशी हा बिनीचा शब्द होणार आहे. 12 मे च्या भाषणात पंतप्रधानांनी भारतीयांना याचीच जाणिव करून देण्यासाठी आत्मनिर्भरतेचा मंत्र दिला होता.आता जागतिक व्यवस्था पुनर्स्थापित होण्याचा वेग, कोरोनाने आणलेल्या स्थगितीतून बाहेर कसे पडतात सारे देश, यावर अवलंबून राहणार आहे. त्यासाठी भारताने चौथ्या लॉकडाऊनच्या स्थितीतच पॅकेज दिले होते. त्याची अंमलबजावणी करायची तर आता सावधता बाळगत मोकळीक द्यावी लागणार आहे. छोट्या, मध्यम उद्योगांना बळ देत चालना द्यावी लागणार आहे. त्याची तरतूद 20 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये करण्यात आलेली आहे. मधल्या काळात देशभरात कोट्यवधी मजूर आपापल्या गावी पोहोचले आहेत. याचे कारण त्यांना एकतर कोरोनाची भीती आहे आणि कॉस्ट कटींगच्या नावाखाली कामगार, मजुरांना कमी करण्यात येत आहे. त्यात नेमकी आवश्यकता किती आणि कोरोनाच्या स्थितीचा गैरफायदा घेणे किती, हे आताच मोजता येणार नाही. पण बेरोजगारीचे संकट यात फार मोठे आहे. त्यामुळे या चक्रव्युहात सामान्य, मजूर, कामगारवर्ग पहिला बळी पडणार आहे. नेमका अभिमन्यू कोणाचा होणार त्याच्या छाताडावर नाच करणारे शकुनी, दुर्योधन, दु:शासन, कर्ण, अश्वत्थामा असे कोण असणार आहेत हे आज तरी सांगता येणार नाही. कारण तसला प्रश्नही आता विचारणे अडचणीचे आहे. थोड्याबहुत प्रमाणात त्याचा गैरफायदा घेतलाच जाणार नाही, असेही नाही. कामगार, मजूर आणि ग्राहक यांची पिळवणूक भांडवलदार करतील आणि त्यांना प्रश्न विचारणे हे या काळात अपवित्र ठरणार आहे. त्यातून वाढणारी अस्वस्थता एका नव्या क्रांतीला जन्म देते काय, ते पाहायचे. अर्थात, ती क्रांती नेहमीप्रमाणे आधी युरोपात येईल आणि मग भारतात पोहोचेल. पण आता हळहळू सगळे मोकळे होणार आहे. होते आहे. प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर ही मोकळीक असेल. प्रतिबंधित क्षेत्र हा एकच निकष असेल आणि तो कसा ठरवायचा, त्याचे निकष हे स्थानिक प्रशासनाचे असतील. आताच लोक घरात बसून कंटाळले आहेत. एखाद्दुसरा रुग्ण आढळला म्हणून काही तो परिसरच प्रतिबंधित करायचा का? त्याला आताच विरोध होऊ लागला आहे. थोड्याच अंतरावर सगळेच कसे मोकळे असताना प्रतिबंधित क्षेत्रात मात्र आधीसारखेच कडक नियम असतील आणि ते तिथल्या नागरिकांना असह्य होणार आहे. ते मोकळ्या जगात जाणारच नाहीत, असे नाही. त्यामुळे अमेरिकेत आता सगळेच मोकळे करण्याचा अंमल केला जातो आहे. आता लॉकडाउन उठवण्याची सगळ्या जगात चढाओढ लागली आहे. कोणी तीन महिन्यांनी, कुणी दोन महिन्यांनी लॉकडाउन उठवतो आहे. यातून सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होत असते आणि ती स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आता 8 जूननंतर भारतातही हॉटेल्स, मॉल्स, मंदिरे मोकळी केली जाणार आहेत. अर्थात, त्यातही नियम पाळावे लागणार आहेत. त्यातून अर्थातच हा सामूहिक प्रतिकारशक्तीचा उद्भव होणार आहे. आताच काही ठिकाणी तो दिसू लागला आहे. पण एक मात्र नक्की की, लोकांच्या अंगवळणी बर्याच गोष्टी पडल्या आहेत. स्वच्छता आणि भौतिक दूरता लोक स्वत:हून पाळू लागले आहेत. अगदी छोट्या किराणा दुकानांत, आस्थापनांत सॅनिटायझेन, मास्कचा वापर केला जातो आहे. खूप वर्षे पिंजर्यात असलेला पक्षी अचानक मोकळ सोडला तरीही तो एकदम उडून जात नाही. एकतर त्याची उडण्याची क्षमता आणि बळ, मानसिकता क्षीण झालेली असते. तो काही वेळ इकडे तिकडे बागडतो आणि मग लघु पल्ल्याची उडाणे केल्यावर भरारी घेतो. तसेच नागरिकांचेही होणार आहे. हॉटेल्स खुली झाल्यावरही एकदम गर्दी होणार नाही. मॉल्स, मंदिरातही एकदम गर्दी होणार नाही. क्षितिजाच्या पलीकडे प्रकाश दिसू लागला आहे, आकाश मोकळे होते आहे, पण एकदम भरारी घ्यायची नाही, हे माणसांना कळले आहे! त्यासाठी राज्यात अनेक नामांकीत मंडळांनी विशेषत: मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा, माघ महिन्यात साजरा करण्याचा, मूर्तीचा आकार कमी करण्याचा निर्णय घेउन बदल स्विकारला आहे. कारण प्रत्येकाला यातून बाहेर पडायचे ओह. पुनश्च हरिओम म्हणायचे आहे.
सोमवार, १ जून, २०२०
पुनश्च हरिओम
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा