सत्य परिस्थिती समोर यावी
गेल्या
काही दिवसांपासून महाराष्ट्रातील त्यातही विशेषत: मुंबई, ठाणे आणि
पुण्यातील कोरोना रूग्णांची संख्या प्रचंड वाढते आहे. ही चिंतेची बाब आहे.
माध्यमांनी या वाढत्या रूग्णसंख्येचा इतर देशांशी तुलना करायला सुरूवात
केली. महाराष्ट्रात चीनपेक्षा जास्त रूग्ण, महाराष्ट्रात अमेरिकेपेक्षा
जास्त रूग्ण वगैरे वगैरे. पण आपली लोकसंख्याच जास्त असल्याने ती
रूग्णसंख्याही जास्त असणे क्रमप्राप्त आहे. पण त्याचा विचार न करता
एकप्रकारची भिती निर्माण केली जात आहे.
आता मुंबई, ठाण्यातील सरकारी
दवाखान्यात कोरोना रुग्णांना ठेवायला बेड्स उपलब्ध नाहीत, त्यामुळे
रुग्णांना प्रवेश नाकारला जात आहे. ज्यांना कोरोनाशिवाय इतर आजार आहेत, अशा
रुग्णांचे अत्यंत दुर्दैवी हाल होत आहेत. याविषयीचे सत्य सांगणारा
मनसेच्या संदीप देशपांडेचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. सध्या
महाराष्ट्रातील खासगी दवाखान्यातील 80 टक्के बेड्स कोरोना रुग्णांच्या
उपचारासाठी सरकारने ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जाते, तर बांद्रा
कुर्ला कॉप्लेक्स आणि इतर काही मैदानात सुमारे एक हजार बेड्सची उपलब्धता
असल्याचेही वारंवार समोर आणले जात आहे. ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजची
इमारतही कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ठाणे पालिकेने नुकतीच ताब्यात घेतली
आहे. ही परिस्थिती जरी भयावह असली तरी त्यातील सकारात्मक बाजू कोणतेही
चॅनेल दाखवत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. म्हणजे 36 पैकी 27 जिल्ह्यात
रूग्णांचा रिकव्हरी रेट हा 50 टक्केपेक्षा अधिक आहे ही सकारात्मकता दाखवणे
गरजेचे आहे. एकुणच भारतात बर्या होणार्या रूग्णांचा आकडा हा उपचार
घेणार्या रूग्णांपेक्षा कित्येक हजारांनी जास्त आहे हे सांगायला हवेच. पण
केवळ भिती घातली जात आहे. या भितीमुळे मुख्यमंत्र्यांना शुक्रवारी जाहीर
करावे लागले की लॉकडाउन वाढवलेला नाही. सोशल मिडीयावरून तशा पोस्ट व्हायरल
होउन 15 तारखेपासून लॉकडाउन वाढवला असल्याचे सांगितले जात होते.
मुख्यमंत्री जे बोललेच नाहीत त्याचीही चर्चा होत होती. हे रोगापेक्षा भयंकर
आहे.
त्यातच कोरोना रूग्णांना वाईट वागणूक दिली जात असल्याबाबत
सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत सरकारचे कान उपटले आहेत. त्यामुळे
नेमके काय चालले आहे हेच सामान्य माणसाला समजेनासे झालेले आहे.
म्हणजे
आज महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालयांच्या इमारती
सध्या कोरोनाच्या उपचारासाठी वापरल्या जात आहेत. असे असूनही रुग्णांंना
उपचारासाठी एक तर प्रवेश नाकारला जातो आहे किंवा जिथे कोरोनाबाधीत मृतदेह
ठेवले आहेत, त्यांच्याच शेजारी रुग्णांवर उपचार केल्याचे प्रकारही उघडकीस
आले आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण हॉस्पिटलमधून गायब होत असल्याच्या घटना घडत
आहेत.
कोरोनासारख्या साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारला
वेळोवेळी योग्य त्या सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.
कोरोनाचे संकट आहे, सरकारला मदत केली पाहिजे म्हणून चुका दिसत असूनसुद्धा
सलग दोन-अडीच महिने विरोधी पक्ष चूप राहिला, तरीदेखील सरकारला जाग आलेली
नाही. एकीकडे सरकार योग्य ती काळजी घेत असल्याचे चित्र निर्माण केले जात
आहे, तर दुसरीकडे कोरोना नाही पण सरकारी दुरावस्थेमुळे मृत्यूला सामोरे
जाण्याचे दुर्दैव अनेकांना अनुभवायला मिळते आहे. कोरोनामुळे होणार्या
मृत्यूची संख्या देशभरात कमी असली तरी ती महाराष्ट्रात अधिक आहे. त्यामुळे
केंद्र सरकार महाराष्ट्रात काही नवीन घोषणा करेल अशीही भिती घातली जात आहे.
पण यात एकुणच शिक्षण, करीअर, रोजगार याचे वांध झालेले आहेत.
एकीकडे
कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यावर कोणत्याही प्रकारचे ठोस
औषध अद्याप उपलब्ध झालेले नाही. केवळ चाचण्या सुरु आहेत, सरकार यावर
कोणतेही भाष्य करायला तयार नाही. कोरोना रुग्ण आणि त्यांच्या
नातेवाईकांसोबत अत्यंत अपमानास्पद व्यवहार सुरु आहेत. सरकारी दवाखान्यात
नेमके किती रुग्ण दाखल होतात, त्यापैकी किती बरे होतात आणि कितीजणांचा
मृत्यू होतो याबाबतची सत्यता लपवली जात आहे. मुंबईतून अधिकृत आणि
अनधिकृतपणे पॉझिटिव्ह रुग्ण गायब होत असल्याचे समोर येते आहे. विशेष म्हणजे
चाचणी निगेटीव्ह की पॉजीटीव्ह याचा काहीच परिणाम होत नाही. एकेठिकाणी
निगेटीव्ह तर दुसरे ठिकाणी पॉजीटीव्ह येते. खुद्द मंत्री असलेल्या धनंजय
मुंडे यांचीही चाचणी अगोदर पॉजीटीव्ह होती पण त्यांना कोरोनाची लागण
झाल्याचे जाहीर केले गेले. त्यामुळे एकुणच या रोगाबाबत संभ्रमावस्था कायम
राहिलेली आहे.
या रोगाची विनाकारण भिती घेतली आहे. हा रोग झाला म्हणजे
जणू आपण संपलोच असा प्रकार होताना दिसत आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वी
मुंबईत उपचारार्थ दाखल झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने दवाखान्यातून पळ
काढला आणि त्याचा अपघातात मृत्यूही झाला. याशिवाय परस्पर रुग्णांची आणि
मृतदेहांची विल्हेवाट लावल्याप्रकरणी दोन अॅम्ब्युलन्स चालकांवरही गुन्हे
दाखल करण्यात आले आहेत. हा सगळा सावळा गोंधळ आहे. एकीकडे सरकारी दवाखान्यात
रुग्णांसाठी जागा नाहीत अन् ज्यांनी मोठ्या दानशूरपणे आपली खासगी
हॉस्पिटल्स, हॉटेल्स पालिकेला वापरण्यास हस्तांतर केलीत त्यांनी आता
अव्वाच्या सव्वा भाडे मागणीचा तगादा सुरु केला आहे. खासगी दवाखान्यात
कोरोनाच नाही, तर इतर आजारानेही दाखल होण्यास विलंब होतो आहे. प्रत्येक
रुग्णाकडे कोरोनाच असेल या संशयाने पाहिले जाते आणि वैद्यकीय उपचाराचे
शुल्कही वाढवले जाते. नुकतेच हायकोर्टाने याबाबत निर्देश दिले होते की, या
काळात खासगी दवाखान्यांच्या शुल्कावर नियंत्रण आणले जावे, संपूर्ण
राज्यातील खासगी दवाखान्यांनी एकच एक शुल्क आकारावे. मात्र सध्या एक तर
खासगी दवाखाने बंद आहेत, तेथे फक्त ओळखीच्या रुग्णांवरच उपचार केले जातात.
प्रत्येकच दवाखान्यात शुल्क वाढवण्यात आले आहेत. कोरोना उपचाराबाबत दर
दिवशी 5 ते 7 हजारापेक्षा अधिक रक्कम आकारली जावू नये असे आदेश असताना
दिवसाला 15 ते 25 हजार इतके शुल्क आकारले जात आहे.
एकट्या
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने चीनलाही मागे टाकले आहे.
त्यातच मुंबई-पुण्यासह राज्यातील इतर अनेक ठिकाणी वाढत असलेली कोरोना
रुग्णांची संख्या आरोग्य यंत्रणेसमोर नवी आव्हाने उभी करत आहेत.
आता
पावसाळा सुरु झाला असून येत्या एक दोन दिवसात राज्यात मुसळधार बरसण्याचा
अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. ज्या मैदानात कोरोना उपचारार्थ बेड्सची सोय
केली आहे, ती मैदाने पावसाळ्याला तोंड देण्यास सक्षम आहेत का? ऐन
पावसाळ्यात दरवर्षी उद्भवणारे साथीचे आजार आणि कोरोनाचे रुग्ण या सर्व
पातळीवर सक्षमपणे लढा देण्यासाठी खरेच मुंबई पालिका आणि राज्यातील आरोग्य
यंत्रणा सक्षम आहे का? राज्यात सर्वत्रच तुंबलेले कचर्याचे ढीग, सफाई
कामगारांना देण्यात येणार्या अपुर्या सुविधा अशा अनेक प्रश्नांची मालिका
सध्या अनुभवायला मिळते आहे.
डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सुरक्षा रक्षक
आणि दवाखान्याशी संबधित कार्यरत असणारा कर्मचारी विभाग यांना योग्य आणि
परिपूर्ण सुविधा देण्यास अद्यापही राज्य सरकार अपयशी ठरले आहे. आजही अनेक
टिकाणी या वर्गात असंतोषाचे वातावरण आहे.
हा गोंधळ संपवला पाहिजे. या
रोगाची मुंबईत, महाराष्ट्रात, देशात नक्की काय परिस्थिती आहे, तो कधी
आटोक्यात येईल याची खरी, सत्य परिस्थिती समोर आली पाहिजे. हे जे घोषणांचे
आणि अफवांचे पिक पिकत आहे त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. याला कुठेतरी आळा
बसला पाहिजे. त्याशिवाय ही परिस्थिती सुधारणार नाही. लोकांना करोनापेक्षा
घाबरवून मारण्याचे तंत्र विकसीत केले गेले आहे ते बंद झाले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा