बुधवार, ३ जून, २०२०

तारणहार....

कोरोनाच्या संकटानंतर माणसांना घरात बसून करमणूक मिळावी आणि माणसं घराच्या बाहेर पडू नयेत म्हणून सरकारने अनेक प्रयत्न केले. त्या प्रयत्नांमध्ये जुन्या पौराणिक मालिकांचे प्रसारण करण्याचा निर्णय घेतला गेला. यात सर्वप्रथम दूरदर्शनवर इतिहास घडवणार्‍या रामायण या मालिकेचे प्रसारण सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर महाभारत आणि नंतर उत्तर रामायण या मालिकांचे प्रसारण केले. मग लगेच श्रीकृष्ण आणि विष्णू पुराण या मालिका सुरू झाल्या. दूरदर्शनने सगळा टीआरपी खेचला, प्रेक्षक खेचला म्हणून सगळ्या वाहिन्यांनी लगेच त्याचेच रतीब सुरू केले. स्टार प्लसने दूरदर्शनच्या रामानंद सागर यांच्याच रामायणाचे पुन:प्रक्षेपण सुरू केले. त्याबरोबर अन्य वाहिन्यांनीही त्याच विषयावरील अन्य निर्मात्यांच्या पौराणिक मालिका दाखवायला सुरूवात केली. कोणी मूळच्या हिंदी असलेल्या मालिकांचे डबिंग स्थानिक भाषेत करून त्याच प्रसारण केले. एकुणच सगळे वातावरणच अध्यात्मिक, पौराणिक बनून गेले. त्या ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेवून माणसं हळवी बनली. कारण या भौतेक सर्व मालिकांमध्ये कोणतेही संकट, प्रलय आला की त्या माणसाला तारण्यासाठी तो तारणहार येतो. म्हणूनच आज या कोरोनाच्या संकटातून आम्हाला तारणारा तारणहार कधी येणार याची वाट प्रत्येकाला आहे.अशा मालिका पाहून हळवी झालेली माणसे, खेड्यातील माणसे, वृद्ध माणसे एक वाक्य हमखास व्यक्त करत  आहेत. ते म्हणजे, कलियुग आहे. माणसं पाप करायला लागली, त्यामुळे हे संकट आले आहे. आता प्रश्न पडतो की कोणत्या माणसाने पाप केले? काय पाप केले? ते एकाच माणसाने केले का? एकाच माणसाने पाप केले असेल तर त्याचा फटका संपूर्ण मनुष्यजातीला का बसतो आहे? एक पापी आणि एक पुण्यवान असेल तर पापी माणसाचेच पारडे जड का? जे काही पुण्यात्मे आहेत त्यांच्या पुण्यकर्माला काहीच अर्थ नाही का? वाईट गोष्टीचा, संकटाचा फटका जर पापी आणि पुण्यवान दोघांनाही सारखाच बसणार असेल तर पाप आणि पुण्य यात नेमका फरक काय राहिला?  पोटाची चिंता पापी माणसाला आहे तेवढीच पुण्यवानालाही आहे. पुुण्यवानाच पोट भरण्यासाठी कोणता देव आला आहे का? पण कलियुग आहे आणि माणसाने सगळा नाश केला आहे, पाप वाढले आहे त्यामुळे माणसाचा नाश होत आहे, असा कोरोनासारखा प्रलयंकारी रोग आला आहे अशी भावना माणसाच्या मनात निर्माण केली आहे, झाली आहे, होत आहे. पण या पौराणिक मालिकांप्रमाणे खरोखरच कोणीतरी तारणहार आता येणार आहे का? जो या रोगाचे समूळ नष्ट करेल असे कोणी आहे का? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही अन घरात अडकून पडलेले आपण उगीचच भावूक होउन त्या पुराणकाळात जातो.म्हणज त्या कंसाने बंदी केलेले अनेक निरपराध लोक साधू, सामान्य माणसांप्रमाणे आम्हालाही असेच कोंडून ठेवले आहे काय अशी भावना मनात येते. जरासंधाने बंदी केलेल्या राजे राजकुमारांप्रमाणे आपण बंदी झालो आहोत का? रावणाने पायाशी बांधून ठेवलेल्या नवग्रहांप्रमाणे आपण कोणाच्या पायी तुडवले जात आहोत का? असे अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण होताना दिसतात. तरीही कुठेतरी भोळा भाव असतो की कोणीतरी तारणहार येईल आणि आम्हाला वाचवेल. या संकटातून मुक्तता होईल.     पण आज मानव जातीच्या इतिहासात पहिल्यांदाच निसर्गाने सार्‍या विश्वाला आपल्या कह्यात घेतले आहे. सारी पृथ्वी एकाच वेळी कोरोना विषाणूशी संघर्ष करत आहे. निसर्गाचे तर्क आणि नियमांचे तंत्र विचारात घेता या महामारीचा मुकाबला कसा करावा हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. पण यासाधी कोणी तारणहार असेेल या आशेवर माणूस जगतो आहे. किती असहाय झाला आहे माणूस?        आज प्रत्येकाला जगायचे आहे. त्याला जगण्याची ओढ लागली आहे. आपल्यावर अवलंबून असलेल्यांना जगवायचे आहे. त्यामुळेच  लोक आपला व्यवसाय टिकवण्यासाठी, वेतन मिळवण्यासाठी उतावीळ आहेत. पण हे करताना आपण आपल्या बुरसटलेल्या कल्पनांना कुरवाळत बसलो आणि धर्म, जात, कुलाचार यातच अडकून पडलो तर या रोगाशी, संकटाशी मुकाबला करणे केवळ अवघड आहे. चारच दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहांनी स्पष्टपणे बोलून दाखवले होेते. आम्ही दिल्लीतील कार्यक्रम रोखू शकलो असतो तर या रोगाचा प्रसार झाला नसता. म्हणजे एकीकडे सगळे सण समारंभ, लग्न, सभा, सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले जात आहेत. परंतु एखाद्या विशिष्ठ धर्माचे लोक मात्र आपल्या धार्मिक भावनांशी धर्मांधतेने चिकटून राहिले आहेत. गर्दी करायची नसतानाही त्यांनी दिल्लीत हा कार्यक्रम केला आणि संपूर्ण देशभरात हा रोग पसरवला. म्हणजे सरकारने, राज्यकर्त्यांनी जागे करूनही आम्ही शहाणे झालो नाही का? अमूक एक गोष्ट करू नका त्यामुळे संकट ओढवेल हे सांगूनही काही लोक हेतुपुरस्सर ऐकत नसतील तर करायचे काय? परंतु जर मास्क वापरणे, धार्मिक कार्यक्रमांमध्ये गर्दी टाळण्याच्या भूमिकेला प्रकृतीचा सन्मान समजण्याऐवजी व्यक्ती स्वातंत्र्याचा अवमान मानत असाल तर ती मोठी चूक करत आहात. आपण लक्षात घेतले पाहिजे की, निसर्ग केवळ रसायने, जीव आणि भौतिक विज्ञान आहे आणि त्यास कार्यान्वित करते ती प्राकृतिक निवड. प्रत्येक जीवाचा हाच शोध आहे. पारिस्थितिक आश्रय मिळवून स्वत:ला सुरक्षित ठेवणे, संवर्धित आणि विकसित होणे, आपला डीएनए पुढच्या पिढीस देण्यासाठी संघर्ष करणे जेणेकरून ते तसेच घडू नयेत, ज्यांना बनवणार्‍यांकडे परत पाठवले आणि ते पुन्हा फिरून आलेच नाहीत आणि विषाणू हेच करतात. ते बचावासाठी धडपडत असतात. आपणही त्या विषाणूप्रमाणे प्रसार करण्याचे काम करतो आहोत हे या लोकांना सांगणार कोण? पाप म्हणजे काही वेगळे नसते. कितीही मालिका आणि काही आदर्शपाठ समोर ठेवला तरी त्याचा अर्थच कळला नाही, चांगले वागण्याचे धोरण ठेवले नाही तर या मालिकांचे प्रसारण आणि कथा पाहणे हे पालथ्या घड्यावर पाणी आहे. अष्टादश पुराणेशु व्यासस्य वचनं द्वयं... परोपकाराय पुण्याय, पापाय परपिडनम ... इतके सोपे वर्णन आपल्या सुभाषितात केलेले आहे. आपल्या गर्दी करण्याने, मास्क न वापरण्याने संपूर्ण देशाला त्रास होतो आहे हे न समजणेच पापकर्म आहे. पण या कलियुगात पापी माणसांच्या कर्माचा त्रास सामान्यांना होत आहे. त्यामुळे हे पापी आणि साथीच्या रोगांचे जंतू यात फरक तो काय?  म्हणजे कोरोना विषाणू हा जंगली वटवाघळासोबत राहिला, वाढला. त्यास मानवी शरीरात आश्रय मिळाला, आता तो जीवघेणा ठरला आहे. आपल्यापैकी कोण अधिक सुदृढ आहे हे पाहण्यासाठी तो आता प्रकृतीचे आणखी एक माध्यम ठरला आहे. प्रकृती निर्दयी देखील आहे. मानव ज्याची पूजा करतो त्या ईश्वरासारखी ती कनवाळू नाही. प्रकृती हिशेब ठेवत नाही. ती काहीही करू शकते. म्हणजे सोमवारी आजीला विषाणूद्वारा छळू शकते. दुसरे दिवशी वादळात आपले घर उडवू शकतो आणि पुन्हा एखाद दिवशी तळघरात पाणी भरू शकते. काहीही करू शकते. पण याची जाणिव असली पाहिजे. आज नियती, परिस्थितीमुळे तुम्ही लॉकडाऊनला उबगला आहात यामुळे ती लक्ष देत नाही असे नाही, तिच्यावर फरक पडतो तो केवळ समन्वयामुळेच. ती श्रीमंत, गरीब, हुशार असा भेद विचारात घेत नाही. ती फक्त सर्वाधिक अनुकूल असणार्‍यालाच बक्षिसी देते, केवळ तोच जो तिच्या शक्तीचा सन्मान करतो. जर तिचे विषाणू, जंगलातील वणवा, दुष्काळ, वादळ, महापूर आदींचा सन्मान करणार नाहीत तर, ते आपल्या शेजार्‍यांना, नागरिकांना हानी पोहोचवणारच. निसर्ग कधीच भेदभाव करत नाही. ठराविक लोकांनी गर्दी करून कोरोनाचा विषाणू वाढवला आहे म्हणून त्यांनाच त्याचा त्रास होईल हे समजणे भाबडेपणाचे आहे. आपल्या देशाची एक संस्कृती आहे. आपण श्रद्धेवर जगणारी माणसं आहोत. पाप पुण्य, बरे वाईट हे आपल्याला कळते. त्याचा हिशोब आपण करतो. दहावेळा वाईट वागलो तर थोडे तरी चांगले वागून पाहू असा विचार करणारा आपला समाज आहे, आपला देश आहे. अन्य देशात तसे नाही.दुसर्‍याचे बळकावणे, हिसकावणे, हिरावणे ही राक्षसी संस्कृती आहे. तीच त्यांनी जोपासली आहे. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प निसर्गाचा सन्मान करीत नाहीत, कारण ते प्रत्येक बाबीला पैसा आणि मार्केटचे मापदंड लावतात. पण विशेष म्हणजे निसर्गही त्यांनाच इनाम देतो, ज्यांची अनुकूल प्रतिक्रिया सर्वाधिक वस्तुनिष्ठ आणि समजूतदार तसेच सामंजस्यपूर्ण असते. आपण या पौराणिक मालिकांमधून काय पाहिले आहे यापेक्षा वेगळे? रावणाला शंकर महादेव प्रसन्न होतो. आत्मलिंग काढून देतो. हिरण्यकश्यपूला हवे तसे मरण देण्याचा वर देतो. अनेक राक्षसांना तो सर्वशक्तीमान ईश्वर वश होतो. पण सामान्य माणसे मात्र भयभीत झालेली असतात. वाईट वागणारांनाचा ईश्वर कसा काय शक्ती देतो? डोनाल्ड ट्रम्प हे स्वार्थाने बरबटलेले आहेत. त्यांच्याकडे शक्ती एकवटते आहे. चीनी डॅ्रगनने या राक्षासाची, रोगाची निर्मिती केली. पण त्याचा फटका चीनला काहीच बसला नाही. चीनमध्ये जेमते 80 हजार रूग्ण आहेत तर दोन हजार माणसे मेली आहेत. जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशात सर्वात कमी विध्वंस या रोगाने केला आहे. तर कमी, मर्यादीत लोकसंख्या असलेल्या देशांना मोठा फटका बसला आहे. हे असे का घडते?निसर्ग आणि निसर्गातील शक्ती या सर्वांकडे समान दृष्टीने बघतात. तो विषाणूंना अशा पद्धतीने विकसित करतो की, ते खासगी किंवा सामुदायिक प्रतिकार क्षमतेतही कमजोरी शोधतात. जर तुमचे कुटूंब किंवा समाज विषाणूशी एकोप्याने लढले नाहीत तर त्यांना थोडीशी संधी मिळाली तर मोठ्या प्रमाणावर फैलावतील आणि त्याची किंमत सर्वांनाच चुकवावी लागेल. निसर्ग हे रसायन, जीव आणि भौतिक विज्ञानाने बनले आहे याचा उल्लेख यापूर्वीच केला आहे.   कोरोना निरनिराळ्या क्षेत्रात, हवामान आणि समाजावर निराळ्या पद्धतीने हल्ला करतो, हे खरे आहे. यासाठी अनुकूल असण्याच्या पद्धतीही निराळ्या असतील. परंतु मिनेसोटा विद्यापीठातील अ‍ॅपिडेमिलॉजिस्ट मायकल ओस्टरहोम यांनी म्हटले आहे की,  ‘हा विषाणू तोपर्यंत अस्तित्वात राहील जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला तो संक्रमित करू शकणार नाही किंवा जोपर्यंत लस किंवा नैसर्गिक कठोर प्रतिकार क्षमता उपलब्ध होणार नाही.’ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ डॉ. डेव्हिड कॅटज् यांनी आपत्तीच्या सुरुवातीलाच सांगितले की, आम्हाला एकूण हानी किमान राखण्यासाठी टिकाऊ रणनीतीची आवश्यकता असेल. जेणेकरून अनेक जीव आणि चरितार्थाची साधने टिकाव धरतील. निरनिराळ्या क्षेत्रातील लोकांचा निरनिराळा जोखीम स्तर शोधून सर्वाधिक असुरक्षित असलेल्यांना वाचवणे आणि जे कमी जोखीम वर्गातील आहेत, त्यांना कामावर परतण्याची रणनीती आपण बनवू शकतो. म्हणजेच काय सुरू करायचे आणि बंद ठेवायचे यामध्ये सर्वोत्तम सामंजस्य राखावे लागेल. त्यामुळेच आज वर्क फ्रॉम होम, कमीत कमी माणसे कार्यालयात ठेवा, अंतर राखा हे जे सांगितले जात आहे ते त्यासाठीच आहे.चीन, जर्मनी, दक्षिण कोरिया आणि स्वीडनसह अनेक देश निसर्गाचा सन्मान करत खुले होत आहेत, सामंजस्य आणि विज्ञानाला आधार बनवून कामकाज सुरू करत आहेत. जोपर्यंत प्रतिकार क्षमता सक्षम होत नाही तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करत राहावा लागेल. याउलट अमेरिकेची स्थिती अतिशय वाईट आहे. मुळात आपण एकमेकांच्या विरोधात उभे नाहीतच, निसर्गाच्या समोर उभे आहोत. सार्‍या बाबी पुन्हा सुरू करणे आणि अनुकूल बनवण्याची गरज आहे पण ते समजण्याची गरज आहे. हे सगळे विसरून आपण नेमके काय करत आहोत याचे भान नाही.तारणहार कोण असणार आहे? तो कधी येईल या आशेवर या मालिकांच्या जगात जगताना विचार केला पाहिजे की तारणहार म्हणजे नवा अवतार असेल. तो म्हणजे या रोगावरची लस निर्माण करणारा देश, शास्त्रज्ञ हाच तारणहार असेल. त्याची प्रतिक्षा करूया. पाप पुण्य, स्वर्ग नरक या कल्पना आपणच निर्माण केलेल्या आहेत. स्वर्ग नरक म्हणजे स्वच्छता आणि अस्वच्छता एवढात त्यातला अर्थ घेतला तर या घाणीतून कोण बाहेर काढतो आहे तो तारणहार. रस्त्यावर घाण करणारे, कचरा टाकणारे हे सगळे दानव आहेत तर स्वच्छता करणारे , आरोग्यदूत हे सगळे दानवांशी लढणारे आहेत. पुराणातील वानगी म्हणजे दाखले तिथेच सोडून दिले तरी नवे दाखले लक्षात घेउन आता तारणहार हा स्वच्छता राखणारा आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: