जीवनवाहिनीला हिरवा झेंडा दाखवा
पुनश्च हरिओमच्या तिसर्या टप्प्यात आठ तारखेपासून बरेच काही सुरू होईल. पण खरी सुरूवात होईल ती मुंबईची लोकलसेवा रेल्वे सुरू होईल तेंव्हाच. त्यामुळे आता तातडीने मुंंबईची लोकलसेवा सुरूळीत होणे आवश्यक आहे. मुंबईच्या लोकलला जीवनवाहिनी हे दिलेले नाव किती रास्त आहे ते या काळात तिने दाखवून दिले आहे. लोकाचे जगणे, श्वास, जीवन ठप्प करून आपणच जीवनवाहिनी आहोत हे सिद्ध करण्याचे काम या जीवनवाहिनीने केले. त्यामुळे ही जीवनवाहिनी सुरू होणे आवश्यक आहे. रेल्वे मंत्रालयाने कोणतेही आढेवेढे न घेता, मुंबईची लोकल सेवा लवकरात लवकर सुरू करण्याला प्राधान्य द्यावे, हीच अपेक्षा. मुंबई आणि देशाची अर्थव्यवस्था सुरू करणारी ही रक्तवाहिनी आहे. मुंबईचे गेल्या दीडशे दोनशे वर्षातील वैशिष्ठ्यच लोकल आहे. त्यामुळे मुंबई सुरू करणे म्हणजे देश सुरू करणे हे जर समिकरण असेल तर आज खर्या अर्थाने मुंबईची लोकल सुरू केली पाहिजे. पुनश्च हरिओम जोपर्यंत मुंबईची लोकल करत नाही तोपर्यंत देशाची अर्थव्यवस्थाही सुरू होणार नाही हे तितकेच खरे. केवळ मुंबईचा हा श्वास नाही तर देशाचा तो श्वास आहे. तो सुरू करणे ही आज काळाची गरज बनली आहे.चालणे, बोलणे, धावणे, पळणे, हसणे, खिदळणे, गोंधळ, गोंगाट अशी सारी मानवी स्वभाव व गुणवैशिष्टये असलेले शहर म्हणजे मुंबई. घडयाळाच्या काटयाप्रमाणे गतिमान चालणारे नि धावणारे हे महानगर. देशातील अनेकांना रोजीरोटी देणारी ही मुंबापुरी. पण आज केवळ लोकल बंद झाल्यामुळे ही मुंबई बंद आहे. अनेक संकटांना सामोरे दिलेली, बाँम्बस्फोटांपासून अनेक संकटे आपल्या उरावर घेतलेल्या या लोकलने सगळ्या संकटात तग धरली. पण हे कोरोनाचे संकट आले आणि त्याने मुंबईची लोकल रोखली. मुंबईचा श्वास कोंडला. देश बंद पाडला. हा देश बंद पाडायचा असेल तर संपूर्ण मुंबईची लोकल बंद केली पाहिजे हा संदेश यातून स्पष्टपणे मिळाला आहे.मुंबई म्हणजे आज अनेकांच्या स्वप्नातील एक शहर. अनेकांना घडवणारे, त्यांना निवारा देणारे शहर. या शहराची काही बातच और. कोरोनाच्या संकटानंतर आलेल्या लॉकडाऊनमुळे या जित्याजागत्या शहराचा मानवी चेहरामोहराच पार विस्कटून गेला. लॉकडाऊनच्या काळात हे शहर कधी नव्हे ते निशब्द झाले. या शहराच्या इतिहासात बहुदा प्रथमच फेरीवाले रस्ते, फुटपाथवरून गायब झाले. रस्ते निर्मनुष्य झाले. कारखान्याची धडधड थांबली. कचेर्या, कार्यालयांमध्ये जीवघेणी शांतता पसरली. या शहरात लॉकडाउनच्या काळात निर्मनुष्य रस्त्यावरून धावत होत्या, त्या फक्त रुग्णवाहिका आणि शववाहिन्याच रुग्णालयांमध्ये सुरू होता, जगण्या-मरण्याचा संघर्ष. अधूनमधून दृष्टीस पडणारी मेडिकलची खुली दुकाने भयावहच वाटत होती. कारण मुंबई थांबली होती. लाईफलाईन झटके देत होती. मुंबईच्य लोकलची ती धडधड म्हणजे हृदयाचा ठोका. तो ठप्प झाला होता. त्यामुळे खर्या अर्थाने देश बंद पडला होता. म्हणूनच आज गरज आहे ती लोकल सुरू होण्याची. मुंबईकर आणि चाकरमानी डोळे लावून बसला आहे की कधी एकदा लोकलला ग्रीन सिग्नल मिळणार आहे?कोरोनामुळे आता दाट लोकवस्त्यांमध्ये भय होते केवळ कोरोना आणि कोरोनाचेच. परप्रांतीय मजुरांचेही विश्व झाकोळले होते, कोरोनाच्या भयाने आणि गावच्या ओढीने. भाविकांचे श्रध्दास्थान असलेली प्रार्थनास्थळे चिडीचूप होती. खवय्यांचे श्रद्धास्थान असलेल्या खाऊ गल्ल्याही ग्राहकांअभावी आपली चवच हरवून बसल्या होत्या. सायंकाळी घोटभर घेणार्यांचे विश्वही पार लटपटले होते. मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक थांबले होते आणि चाय पे चर्चासुद्धा. रिक्षा, टॅक्सी, रेल्वेची गर्दी कधी नव्हे ती कुठे हरवली होती, कोण जाणे? मित्रांच्या, सग्यासोयर्यांच्या भेटीगाठी बंद होत्या, कडीकुलपात असल्यागत. नाक्या नाक्यावरील माणसांच्या गर्दीतला संवादही हरवला होता. रेड झोनमध्ये हुंदके फुटत होते, काळीज चिरल्यागत कावळ्यांची कावकावही आसमंत भेदत होती, गूढरम्य होऊन कोणत्याही भेदाभेदीला कोरोनाच्या कार्यकाळात थारा नव्हता हे विशेष. या कोरोनाने समस्त मानव जातीला माणुसकीचे महत्व पटवून दिले. चांगल्या रुग्णालयांची किती आणि कुठे कुठे आवश्यकता आहे, याचे गांभीर्य लक्षात आणून दिले. आता या लॉकडाऊनमधून सावधगिरीने बाहेर पडण्याचा इशाराही कोरोनाने सत्ताधार्यांना दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनश्य हरी ओमचा नारा देऊन सार्यांच्याच जीवनात नवी उमेद जागवली आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तोंडावर मुखपट्टी बांधून, तीन फुटाचे सुरक्षित अंतर ठेवून, साबण अथवा सॅनिटायझरने नियमित हात धुऊन कोरोनाला हरवायची आता सार्यांनाच घाई झाली आहे. मुंबईच्या बाजारपेठा आपली कधी उजवीकडची तर कधी डावीकडची दुकाने उघडण्यासाठी उत्सुक झाल्या आहेत, त्याही कधी सम तर कधी विषम संख्येच्या नियमानुसार सर्व ठिकाणची उद्याने, मैदाने, समुद्रकिनारे सुरक्षित अंतर ठेवून खुली होणार आहेत. त्यामुळे व्यायामाचा दम घुमणार आहे. पुन्हा परितांच्या गाठीभेटी होणार आहेत. हरवलेला संवाद पुन्हा बोलका होणार आहे. गाडयांची चाके पुन्हा गिरक्या घेण्याच्या तयारीत आहेत. मुंबईकर चाकरमान्यांची पावले पुन्हा मुंबईच्या रस्त्यावर उमटण्याच्या बेतात आहेत. सोमवारपासून खासगी कार्यालये काही प्रमाणात सुरू होणार आहेत. सारेच कसे आपल्या आयुष्याच्या मशाली पुन्हा पेटवायला सज्ज झाले आहेत. रिक्षा, टॅक्सीही नियमानुसार धावण्याच्या तयारीत आहेत. एकूणच काय मुंबई पुन्हा सुरु होणार आहे, गजबजणार आहे, एक नवा अध्याय रचणार आहे. आयुष्यातील खुशीचे नवे गीत गाणार आहे. पण, त्यासाठी कुठेतरी सुरुवात होणे आवश्यक आहे. मुळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठीच पुरेशा बसेस उपलब्ध नसताना, खाजगी कार्यालयात नोकरदारवर्ग जाणार तरी कसा याचा गांभीर्याने विचार होण्याची नितांत गरज आहे. मुंबईच्या सार्वजनिक प्रवासाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या उपनगरीय लोकलची सेवा सुरू होत नाही, तोपर्यंत लॉकडाऊनच्या शिथिलीकरणाला काही अर्थ उरणार नाही. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा नावलौकिक टिकवायचा असेल, देशाच्या अर्थकारणाला गती द्यायची असेल तर मुंबईची लोकल सेवा टप्याटप्याने सुरू करण्याशिवाय तरणोपाय नाही. रेल्वे मंत्रालयाने गरज होती तेव्हा परप्रांतीय मजुरांसाठी पुरेशा गाडया सोडल्या नाहीत आणि आता मागणी केल्यावर गरजेपेक्षा जास्त गाडया सोडल्या. तेव्हा रेल्वे मंत्रालयाने यापुढे कोणतेही आढेवेढे न घेता, मुंबईची लोकल सेवा लवकरात लवकर सुरू करण्याला प्राधान्य द्यावे, हीच अपेक्षा.कारखानदार, नोकरदार, कर्मचारी आणि सर्वसामान्य माणूस हा लोकलवर विसंबून राहणार आहे. मुंबईत केवळ ठाणे रायगडच नाही तर अगदी पुणे आणि नाशिकपासून लोक डेली अपडाउन करणारे आहेत. या सगळ्यांचा श्वास रोखला आहे. कर्जत, कसारा, पनवेल, विरार या टोकाहून चर्चगेट, सीएसएमटी याठिकाणपर्यंत प्रवास करत प्रवासी रोज येत असतात. साधारणपणे रोज 80 लाख लोक या लोकलचा प्रवास करत असतात. रेल्वेच्या एकुण उत्पन्नापैकी 20 टक्के पेक्षा जास्त उत्पन्न एकट्या मुंबई लोकलकडून मिळते. त्यामुळे ही मुंबई लोकल सुरू होत नाही तोपर्यंत देश सुरू होणार नाही आणि पुनश्च हरिओमही होणार नाही आणि देश खर्या अर्थाने अनलॉकही होणार नाही. किती समर्पक नाव आहे मुंबई लोकलला. जीवनवाहिनी. खरोखर या देशातल्या केवळ चाकरमान्यांचीच नाही तर उद्योजक आणि गुंतवणूक़दारांचीही ती जीवनवाहिनी आहे. श्रीमंत लोक गाडीने प्रवास करत असले तरी त्यांचे व्यवसाय, उद्योग, कारखाने चालवणारा कर्मचारी, कामगार, मजूर हा लोकलने प्रवास करणारा आहे. त्यामुळे सर्वांचीच ती जीवनवाहिनी आहे. यासाठीच ही वाहिनी सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. अगोदर मुंबईचा हा श्वास सुरू केल्याशिवाय काहीही होणार नाही.लोकल सुरू न करता पुनश्च हरिओम म्हणणे, किंवा अनलॉक होण्याचा विचार करणे म्हणजे पायात बेडी बांधायची आणि जोरदार पळा म्हणायचा आदेश दिल्यासारखे आहे. आज आता बेस्टची बस सुरू होणार आहे. पण बेस्ट अपुरी पडणारी सेवा आहे. ती प्रत्येक ठिकाणी जाउ शकत नाही. त्यातूनही आता सोशल डिस्टन्सींगच्या जमान्यात एका बसमध्ये 20 ते 22 प्रवासी असणार. त्यामुळे हजारो मुंबईकर चाकरमान्यांनी करायचे काय? त्यांची सोय करण्यासाठी मुंबईची लोकल तातडीने सुरू करण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा