आपल्याकडे सामाजिक शिस्तिचा अभाव असतो. माणसं स्वत: शिस्तवान असतात. पण सार्वजनिक ठिकाणी ती शिस्त कुठेच दिसत नाही. कारण ती फक्त स्वत:पुरती बघत असतात. सामाजिक शिस्तीचा अभाव असला की काय घडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोरोनाचा वाढता प्रसार आहे. पण हा अभाव आमच्या पंढरीच्या वारीत नसतो. सगळं कसं शिस्तिनं चाललेले असते. स्वयंशिस्त हेच आमच्या पंढरीच्या वारीचे वैशिष्ठ्य असते. या नियोजनाचा उत्तम अविष्कार म्हणजे वारी विनाअडथळा पंढरपुरात पोहोचणे.या वारीचे टप्पे असतात. रोज किती किलोमीटर चालायचे? कुठे मुक्काम करायचा? मुक्काम केल्यावर या लाखो वारकर्यांचे राहण्याचे, जेवणाचे नियोजन करणे. त्यांना लागणार्या प्रत्येक गरजेचे नियोजन करणे हे फार महत्वाचे आहे. या मार्गावर वारकर्यांना त्रास होउ नये म्हणून सहज उपलब्ध होईल असे पाणी, खाणे, राहणे याशिवाय वैद्यकीय कँप असतात.वारीत रात्रीच्या मुक्कामाचेवेळी कुठे भजन करायचे, कुठे कीर्तन करायचे, कोणी हातात टाळ घ्यायचे, कोणी विणा घ्यायची, कोणी कीर्तन करायचे, कोणी साथ करायची हे सगळे ठरलेले असते. इथे ठरलेले असले तरी कोणी हुकुम सोडत नाही तर सेवाभावाने आपोआप घडत असते. या सेवेचा मान प्रत्येकाला मिळत असतो. कारण इथे एकच विचार असतो, तो म्हणजे कोणी लहान नाही कोणी मोठा नाही. सगळेच वारकरी, सगळेच मानकरी, सगळेच या पालखीचे भोई आणि सगळेच माउली आहेत. या माउलीचे वारीतील आनंदाचे क्षण वेगवेगळे असतात. या वारीत रिगण असते. ही फार मोठी संस्कृती आहे. एक सांस्कृतिक कलाविष्कार आहे. वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते. कडूस फाटा,वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्ध्येय संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने माऊलीचा अश्व असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे. तो अश्व जेंव्हा गोल फेर्या मारतो तेंव्हा ज्ञानेश्वरांचे अस्तित्व जाणवल्याचा भास प्रत्येकाला होतो. ज्ञानाचा वारू म्हणजे घोडा आता उधळणार आहे, ज्ञानाची भक्तीचा अश्व कोणी आता रोखू शकत नाही असाच संदेश हा रिंगणात धावणार घोडा देत असतो. या रिगणांचे दर्शन होणे हे फार मोठे भाग्य आहे असे प्रत्येक वारकर्याला वाटत असते. या वारीतून प्रत्येक वारकरी जेंव्हा चालत असतो तेंव्हा ते पांडुरंगाचा करत असतो. धावा म्हणजे धावणे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाता असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोटयाशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात. हे धावणे म्हणजे विठ्ठल भेटीची ओढ परमोच्च बिंदूला गेलेली आहे याचे लक्षण असते. त्यामुळेच या मार्गावरचा प्रत्येक मुक्काम, प्रत्येक टप्पा हे वेगवेगळे काही शिकवत असतो. आळंदी ते पंढरपूर या वारीचा कार्यक्रम हा अत्यंत शिस्तबद्ध असतो. त्याचे वेळापत्रक हे ठरलेले असते. त्यात कोणीही बदल करू शकत नाही. ती ठराविक वेळ आली की आपसूक सगळे होत असते. हे आळंदी-पंढरपूर पालखीचे वेळापत्रक साक्षात माउलीनेच घालून दिलेले आहे, त्याप्रमाणेच तर सर्व काही होणार आहे. या प्रवासात आळंदी-पुणे-सासवड- लोण्ंद- फलटण - नातेपुते-माळशिरस- वेळापुर- भंडिशेगा-वाखरि-पंढरपूर अशा मार्गाने ही पालखी जाते.वाखरी येथे शेवटचे सर्व पालख्यांचे रिंगण होते.पंढरपुरची वारी हा स्वयंशिस्तीचा, सामाजिक सलोख्याचा सार्वत्रिक, सामुहीक अविष्कार आहे. म्हणूनच वारी करून झाल्यावर मिळालेला आनंद हे स्वर्गसुख असते. तर तिथून परतताना प्रत्येकाचे मन हे माहेराहून सासरला जाणार्या सासुरवाशिणीसारखे डोळे भरून आलेले असते. वारी सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र परतवारी माहीत असणारे आणि ती करणारे लोक खूप कमी आहेत. वारी करताना जागोजागी पावलापावलांवर दानशूर लोक सोयी सुविधा उपलब्ध करून देतात. मात्र ‘ परतवारी ‘ च्या वेळी अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो. वारीला ग्लॅमर आहे, तर ’ परतवारी’ ला लाट ओसरून गेल्यानंतरचं वातावरण असते.वारी करत असताना या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक मुक्कामावर कीर्तन आणि प्रवचन केले जाते. त्याची अनेक व्यासपिठे असतात. त्याला फड असे म्हटले जाते. वारीच्या वेळी निरनिराळ्या फडावर कीर्तन-प्रवचन आदी कार्यकम होतात. फड म्हणजे वारीप्रमुख व त्यांच्या शिष्य मंडळींचा सुसंघटीत समुदाय. वारकर्याने ज्याच्याकडून माळ घेऊन वारी पत्करली असेल, त्याचा तो शिष्य असून वारीस आल्यावर नियमाने त्या त्या फडावर जाऊन तो कीर्तन -भजनादी श्रवण करतो. फडाचे नियंत्रण प्रमुखाकडे असून त्याची स्वतःची व त्याच्या अनुज्ञेने त्याच्या शिष्य मंडळींची कीर्तने व प्रवचने होतात. श्री नामदेव महाराजचा, वासकरांचा व देहूकरांचा फड हे प्रमुख फड असून पुढे वेळोवेळी त्यातून व काही स्वतंत्र फड निर्माण होऊन त्यांनी सांप्रदायिक वारी, भजनाच्या, कीर्तनाच्या परंपरा चालू ठेवल्या आहेत. हा संप्रदाय मोठा करण्याचे काम या फडातून होत असते. वारीची दीक्षा घेउन, माळकरी होउन या मार्गावरून जाण्याचे हे फार मोठे अधिष्ठान आहे. इथे सगळे विसरून एक होत असतात. खर्या अर्थाने हा जनसागर असतो. सर्वाचे वागणे एकसारखे. कोणी आपला कोणी परका नाहीच. प्रत्येकाच्या ठायी भगवंत आहे हेच सांगणारी ही वारी असते. आपण आजकाल लॉकडाउनमुळे अनेक मालिका पाहतो आहोत. त्यात रामायण, श्रीकृष्ण, विष्णूपुराण हे सगळे पाहतो आहोत. ते सांगण्याची जी नाट्यमयता आहे त्यापेक्षा अत्यंत सहजपणे वारीतून ते सिद्ध होते. श्रीकृष्ण मालिकेत इथे असलेल्या कणाकणात मीच आहे हे गोपालकृष्ण सांगून सगळ्यांचे उष्टे खातो. त्यातून ब्रह्मदेवाचा गर्व नाहिसा करतो. प्रत्येकाच्या ठायी मीच आहे तर उष्टे काय आणि परके काय? आपपररभाव नष्ट होतो. विष्णूपुराणात प्रल्हादही कणाकणात ईश्वर व्यापला आहे सांगतो. हिरण्यकशपूमध्येही ईश्वर आहे पण त्याला तो कळला नाही हे सांगताना सर्व कसे सारखेच आहेत हेच सांगितले आहे. रावणाला मारताना रामाची भावनाही तीच होती, म्हणूनच त्याला मारायला उशिर केला. प्रत्येकात आत्मा आहे, प्रत्येक आत्मा हा परमेश्वराचा अंश आहे हे तत्वज्ञान पुराणांनी सांगितले पण वारीने ते वागून दाखवले आहे. म्हणून इथे परकेपणा गळून पडतो आणि सर्व जगत विष्णूमय, विठ्ठलमय होउन जाते. हाच तो सामाजिक सलोखा आहे. तो स्वयंशिस्तीने निर्माण झालेला आहे.प्रफुल्ल फडके/9152448055
रविवार, २१ जून, २०२०
स्वयंशिस्त हे वारीचे वैशिष्ठ्य
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा