सोमवार, १ जून, २०२०

महायुद्धाची नांदी

संपूर्ण जग हे एका नव्या युद्धाच्या किंवा तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या युद्धाचा केंद्रबिंद हा अर्थातच चीन असणार आहे. किंबहुना कोरोनाच्या निमित्ताने चीनने तशी गुप्तपणे सुरूवात केलीही आहे. हे युद्ध आर्थिक सत्ता, महासत्ता आणि नवा साम्राज्यवाद यासंबंधी असल्याने त्याचे पडसाद भारतावर उमटणार हे निश्चित आहे. त्यादृष्टीने चीनच्या कुरापती वाढत आहेत. भारतालाही सज्ज राहावे लागत आहे.    सिक्किममधील भारत-चीन सीमेवर भारतीय आणि चिनी सैन्याचे जवान चार दिवसांपूर्वी आमने-सामने आले. यावेळी दोन्हीकडील सैनिकांमध्ये हाणामारी झाली. यात दोन्ही बाजूंचे सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. उत्तर सिक्कीम येथे भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हा संघर्ष झाला. या संघर्षादरम्यान, भारतीय आणि चिनी सैनिक प्रचंड आक्रमक झाले होते. मात्र, स्थानिक पातळीवरील चर्चेनंतर सैन्य मागे घेण्यात आले. तसे पाहिले असता सीमेबाबतच्या वादामुळे अशा घटना भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये अधूनमधून घडत असतात. अशी परििदुसरीकडे नेपाळनेही भारताचा भूभाग बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच याला चीनचीच फूस असू शकते. हे सगळे नकटे एकत्र आले असतील तर त्यांची नकटी नाके ठेचावीच लागतील.अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर दोन्ही बाजूचे लष्कर प्रस्थापित शिष्ठाचारानुसार निर्माण झालेली समस्या सोडवतात. ही घटना बर्‍याच दिवसांनी घडली असल्याचे चीनने कुरापती काढण्यास सुरुवात केल्याचे दिसते. जम्मू-काश्मीर प्रश्नावर चीन सतत वक्तव्ये करताना दिसत आहे. अलीकडेच संयुक्त राष्ट्रातील चीनच्या कायमस्वरुपी मिशनच्या प्रवक्त्याने जम्मू-काश्मीरवर काही वक्तव्ये केलेली आहेत. त्या वक्तव्यातील भूमिकेला भारताने नाकारलेले आहे. भारताची भूमिका चीनला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. जम्मू-काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील. जम्मू-काश्मीरशी संबंधित मुद्दे भारताची अंतर्गत बाब आहे. असे असले तरी, चीनचे सैन्य लडाख ते अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर सतत फिरत असते. डोकलाम मुद्दाही दोन्ही देशांदरम्यान बराच काळ धुमसत राहिलेला होता. आता पुन्हा एकदा दोन्ही सैनिकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अरुणाचल प्रदेशजवळील भारत-चीन सीमा हा दोन्ही देशांदरम्यानचा नेहमीच संवेदनशील मुद्दा राहिलेला आहे. कोरोनाने उद्धवस्त केल्यानंतर आता चीन अशाप्रकारे सीमेवर हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यावेळी चीनचा काटा काढायला अमेरिका रिंगणात उतरेल आणि त्यातून महायुद्धाची नांदी गायली जाईल असे चित्र आज दिसत आहे. कारण चीनने लादलेला कोरोना हा रोग अमेरिकेच्या पोटात खुपत आहे. त्याचा सूड उगवण्याची काही संधी मिळाली तर अमेरिका ती घेणारच यात शंका नाही. त्यातून दुसर्‍या भूमिवर जाउन उत्पात माजवायला अमेरिकेला आनंदच असतो.भारत-चीन सीमेवर वास्तविक नियंत्रण रेषेपर्यंत जाणारा पूल बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने (बीआरओ) सुरू केला आहे. या पुलावरून चीनच्या सीमेपर्यंत 40 टन वजनी वाहने जाऊ शकणार आहेत. या नव्या पुलामुळे भारत आणि चीनदरम्यान आणखी एक नवा वादाचा मुद्दा उपस्थित होणार आहे. कारण नव्या पुलामुळे हा मार्ग अधिक सुरक्षित झाला असून आता कोणत्याही अडथळ्यांविना भारतीय सैनिक सीमेपर्यंत जाऊ शकतील. चीनच्या सुरू असलेल्या कुरापतींना आवर घालण्यासाठीही भारताची ही रणनीती आहे. केंद्र सरकारने थेट परदेशी गुंतवणूक नियमात बदल केल्यानंतर भारत चीनच्या कंपन्यांना गुंतवणुकीसाठी मज्जाव करत असल्याचे सांगत चीनने नाराजी व्यक्त केली होती. अशात आता भारताने चीनच्या सीमेपर्यंतचा मार्ग प्रशस्त केला आहे. ज्या डोकलाम पठारावर चीनने दावा ठोकला होता त्याच भागात हा पूल आहे. हा पूल कमकुवत झाल्यामुळे तुटला होता. हा पूल दापरिजो आणि सुबानगिरी नदीच्या पलिकडील गावांना जोडण्याचे काम करतो. या पुलामुळे सियांग पट्टा वरच्या सुबानगिरीशीही जोडला जातो. हा पूल म्हणजे भारत आणि चीनमधील वास्तविक नियंत्रण जवळील रणनीतीसंदर्भातील एक दुवा असल्याचेही मानले जात आहे.  वास्तविक नियंत्रण रेषेवर याच मार्गाने रेशन, बांधकामाचे साहित्य, औषधे अशा सर्व आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. कोरोनाच्या संकटकाळात सर्व प्रकारची काळजी घेत अत्यंत कमी वेळेत या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. चीनला थेट आव्हान देण्याची क्षमता फक्त भारतातच आहे, हे चीनही जाणून आहे, त्यामुळे या दोन्ही देशांतला सीमाप्रश्न जटिल झाला आहे. तो अधांतरी ठेवण्याचा आणि कुरापती काढून दबावाचे राजकारण खेळण्याचा चीनचा डाव आहे. भारत-भूतान-सिक्कीम सीमेवर नुकत्याच उद्भवलेल्या पेचप्रसंगाने भारताच्या अनिश्चित सीमांचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भारताची भूसीमा पाकिस्तान, चीन, नेपाळ, भुतान, बांगलादेश आणि म्यानमारशी जोडलेली आहे. पण खरा सीमावाद हा चीनबरोबरच आहे, कारण बांगलादेशबरोबरचा सीमावाद दोन्ही देशांनी सामंजस्याने सोडवलेला आहे. नेपाळ, भुतान आणि म्यानमारशी असा काही वाद नाही. पाकिस्तानबरोबर सीमावाद नाही, पण आहे तो वाद काश्मीरविषयी आहे आणि तो संपूर्ण काश्मीर राज्य कुणाचे याविषयी आहे. पाकिस्तानने कच्छच्या सीमेविषयी वाद निर्माण केला होता, पण तोही शांततेने सोडविण्यात आला आहे. त्यामुळे सध्या खरा सीमावाद आहे तो फक्त चीनशी. दोन्ही देशांतील मतभेदांचे मूळ कारण असलेला सीमावाद मिटवणे आवश्यक आहे. पण हा वाद कसा मिटवायचा हा खरा पेच आहे. हेच कारण नवे युद्ध सुरू होण्याचे असू शकते. जगभरात 62 देश आज चीनच्या विरोधात गेल्याने चीनला आता युद्धाला सामोरे जावे लागेलच. त्यासाठी भारताची खोडी काढण्याचे निमित्त होउ शकते. पण ही आजची परिस्थिती एकप्रकारे नव्या महायुद्धाची वात पेटण्याच चीन्ह आहे हे निश्चित. यात भारत, चीन आणि अमेरिका या तीन देशांचा समावेश असणार आहे. कारण मोठ्या लोकसंख्येमुळे भारत ही फार मोठी बाजारपेठ आहे. तिच्यावर कब्जा करण्यासाठी चीन आणि अमेरिका या दोघांचे प्रयत्न आहेत. तसेच महासत्ता म्हणून वर्चस्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने अमेरिका भारताची ढाल करून चीनवर वार करेल आणि त्याचा फटका भारताला बसेल असा प्रयत्न करेल हे नक्की.यापूर्वी 2017 मध्ये दोन्ही देशांदरम्यान सिक्कीममध्ये तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी निर्माण झालेला तणाव इतका मोठा होता की भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनीही अनेक दिवस या ठिकाणी मुक्काम केला होतो. यामध्ये 17 व्या डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंगही सामील होते. दोन्ही देशातील सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीची परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कराच्या मुख्यालयानेही दखल घेतली होती. त्यामुळे तेव्हापासून धुमसत असलेले हे युद्ध आता पेटू शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: