सोमवार, ८ जून, २०२०

ज्योतिषी हे का सांगत नाहीत?

आपल्याकडे ज्योतिषशास्त्र हे फार पूर्वी प्रगत होते. किंबहुना केंव्हा काय होणार आहे हे ज्योतिषशास्त्र पूर्वी सांगायचे. म्हणजे आपल्या अनेक पुराणकथा आणि धर्मात ज्योतिष वर्तवून संकटाची चाहूल करून दिलेली आहे. जेंव्हा तंत्रज्ञान प्रगत नाही असे म्हटले जात होते तेंव्हा आपण कोणीतरी भविष्य वर्तवले आणि अमूक एक संकट टळले असे आपण अनेकदा ऐकले आहे. पण जर ज्योतिष शास्त्रच असेल तर जगभरातल्या नाही पण भारतातल्या एकाही ज्योतिषाने कोरोनाचा अंदाज का वर्तवला नाही हे न उलगडणारे कोडे आहे.  आपल्याकडे ज्योतिष हे शास्त्र न राहता एक थोतांड झाले आहे. भारतात आज मितीला एकही ज्योतिषी असा नाही की जो अचूक भविष्य वर्तवू शकेल. केवळ लोकांच्या भावनांशी खेळणे आणि फसवणे हाच प्रकार आजच्या ज्योतिषांकडून होताना दिसतो आहे. म्हणूनच जर ज्योतिषी अंदाज वर्तवू शकत नसतील तर त्यांच्यावर बंदी का घातली जात नाही, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो आहे.गेली अनेकवर्ष आपण ऐकतो की नॉस्टरडॅमसने चारशे वर्षांपूर्वी अमूक एक सांगितले, तमूक एक सांगितले. पण हे भाकित केले होते असे ती घटना घडून गेल्यानंतर सांगितले जाते. संकटापासून सावध करण्याचे काम जर ज्योतिषाने करायचे असेल तर ते केले जात नाही.आपण पुराण पोथ्यांमधून अनेक कथा ऐकल्या आहेत. पराशरादी गणिती येउन कोणावर काय संकट येणार आहे याचे अचूक भविष्य वर्तवायचे. त्यावर उपाय केला जायचा. पण आज असा एकही ज्योतिषी भारतात नाही का या देशात अमूक एक संकट येणार आहे असे सांगू शकेल?   आपल्यापैकी अनेकांनी शिवलिलामृत वाचले असेल, त्यातील कथा ऐकल्या असतील. त्यामध्ये सिमंतीनीच्या अध्यायात सिमंतीनीवर वयाच्या चौदाव्या वर्षी संकट ओढवणार आहे. तिच्यावर वैधव्याचा योग येणार आहे असे सांगितले जाते. मग त्यासाठी तिला सोमवारचे व्रत करायला सांगितले जाते. मग तरीही चौदाव्या वर्षी संकट येते. तिचा पती नदीत जलक्रिडा करताना वाहून जातो. मग त्याला नागलोक वाचवतात वगैरे वगैरे. ही सर्व कृपा सिमंतीने केलेल्या सोमवारव्रतामुळे होते. पण ती कृपा शंकराने करावी यासाठी तिच्या आयुष्यात असे संकट येणार आहे असे भविष्यकथन केलेले होते.याच पोथीत अकराव्या अध्यायात राजपुत्र आणि प्रधानपुत्राचे भविष्य वर्तवताना सात दिवसांनी राजपुत्राचा मृत्यू होणार आहे असे भविष्यकथन केले जाते. त्यासाठी रूद्राध्याय हा उपाय सांगितला जातो. तो उपाय केल्यावर राजपुत्राचे मरण टळते आणि यम त्याला 10 हजार वर्षांचे आयुष्य असल्याचे सांगतो वगैरे वगैरे.पण ज्योतिषशास्त्र हे भविष्यात येणारे संकट दाखवणारे शास्त्र आहे. असे असताना आज मितीला भारतात एकही ज्योतिषी अस्तित्वात नसावी की जो अचूक भविष्य कथन करून या संकटाचे भाकीत केले असेल. भारतातील हे शास्त्र आहे. सनातन आणि पुरातन आहे. असे असताना आज ते खोटे ठरत आहे. किंबहुना त्यात भोदुगिरी आली असावी किंवा अर्धवट ज्ञानाने भाकीते केली जात असावीत.आपल्याकडे ज्योतिष हे भविष्य कथनासाठी नाही तर भूतकथनासाठी सांगितले जाते हा फार मोठा विनोद आहे.आता सोमवारपासून झी मराठी या वाहिनीवर सकाळी 8 वाजता अतुलशास्त्री भगरे यांचे भविष्य कथन सुरू झाले आहे. 8 जूनचाच त्यांचा पहिला दिवस होता. चार महिन्यांनी त्यांचे आगमन झाल्याने झी मराठीने त्याची जाहीरातही भरपूर केली. अतूलशास्त्री हे विद्वान आणि अभ्यासू आहेत. त्यांच्या भविष्य कथनाची शैलीही खूप चांगली असते. विशेष म्हणजे भविष्यातल्या ज्या गोष्टी सामान्यांना समजत नाहीत त्या न सांगता साध्या सोप्या भाषेत कथन करण्याची त्यांची शैली चांगली आहे. म्हणजे अमूक एक दिवशी राहू काल केंव्हा आहे असे न सांगता आजचा अडचणींचा काळ किती ते किती आहे असे ते सांगतात. म्हणजे अमूक एक ग्रहाची तमूक एक ग्रहाबरोबर युती झाली आहे, त्रिकोण योग झालेला आहे, असले अनाकलनीय काहीही न सांगता सामान्यांना समजेल अशा भाषेत ते सांगतात. पण त्यांच्याकडूनही असे भविष्य कथन का केले गेले नाही याचे आश्चर्य वाटते आहे. अर्थात ते जर त्यांनी केले असते तर आज भारताचे तारणहार ते ठरले असते. जगभर त्यांचा नावलौकीक वाढला असता. तसे आज अनेक नामांकीत ज्योतिषी या देशात आहेत. पण यांचेच नाव घेण्याचे कारण म्हणजे त्यांनी सोमवारी केलेले भाकित आणि कथन.सोमवारी पहिल्याच एपिसोडमध्ये अतुलशास्त्री भगरे म्हणाले की, 24 मार्चपर्यंत आपल्याकडे विकारी नाम संवत्सर होते. 25 मार्चपासून गुढी पाडव्यापासून शार्वरीनाम संवत्सर सुरू झाले आहे. कोरोना हा रोग डिसेंबर महिन्यातील ग्रहणामुळे आलेला आहे. पाच दुष्ट ग्रह एकत्र आल्याने आणि विकारी नाम संवत्सर असल्याने मोठा विकार येणारच होता असे त्यांनी सांगितले. त्यांचे हे कथन पूर्णपणे पटलेही. पण भविष्य नाही . हा तर भूतकाळ झाला. ज्योतिषाने भविष्य सांगायचे असते. आता गेल्यावर्षीच्या पाडव्याला जर अतुलशास्त्री भगरे यांनी सांगितले असते की आजपासून विकारी नाम संवत्सर सुरू झाले आहे. या वर्षात एका फार मोठ्या रोगाची साथ येणार आहे. एखादा विषाणू येणार आहे. कारण हे विकारी नाम संवत्सर आहे. असे कथन जर त्यांनी तेंव्हाच केले असते तर त्यांचे कौतुक करावेसे वाटले असते. शिवाय भारतातील ज्योतिषशास्त्र किती पुढे गेले आहे याचा साक्षात्कार संपूर्ण जगाला झाला असता. पण ही संधी भारतीय ज्योतिषांनी गमावली. असे जर भविष्य त्यांनी गेल्यावर्षीच्या पाडव्याला म्हणजे मार्च 2019 मध्ये केले असते तर आज झी वाहिनीने याची फार मोठी न्यूज केली असती. आमच्या वाहिनीवरील भविष्यकथनात या संकटाची चाहूल आदरणीय अतुलशास्त्री भगरे गुरूजी यांनी आधीच करून दिली होती वगैरे वगैरे. मग लगेच विविध वाहिन्यांवर अतुल शास्त्रींना बोलावून त्यांना सन्मानाने विचारणा केली गेली असती. त्यांना उपाय विचारले गेले असते. अगदी त्यांना पद्म पुरस्कार देण्यापर्यंत शिफारसी झाल्या असत्या. पण हे काहीच झाले नाही. असे घडणार होतेच, कारण हे विकारी नाम संवत्सर होते हे आज सव्वा वर्षांनी सांगितले त्याऐवजी फक्त हे तेंव्हाच सांगायला हवे होते.आज भारतीय ज्योतिषशास्त्राचे वाभाडे सगळीकडे निघत आहेत. हे फार मोठे शास्त्र या देशाची एकेकाळची संस्कृती होती. पण आज ते करमणुकीचे साधन झाले आहे. त्यात कसलेही तत्थ्य आता राहिलेले नाही. कारण या शास्त्रातील भोंगळपणा आता समोर आलेला आहे.   आजकाल आपल्याकडे ज्योतिषी जे भविष्य कथन करतात ते तुमच्या भुतकाळात डोकावतात. तुम्हाला ते आजमावतात. तुमच्याकडून काढून घेतले जाते. भूतकाळातील घटना कशा अचूक सांगितल्या असे भासवून आपण अचूक भविष्यवेत्ते आहोत अशी पार्श्वभूमी केली जाते. त्यामुळे लोक भविष्यकथनावर विश्वास ठेवतात. वास्तविक निवडणुकीत अनेकजण भविष्यकथन करत असतात. अमूक एक पार्टी जिंकणार, तमूक एक मुख्यमंत्री होणार वगैरे वगैरे. पण कोणाचेच भविष्य कधीच खरे ठरत नाही. राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे होतील असे कोणीही भविष्य वर्तवले नव्हते. नरेंद्र मोदी 2019 ला पुन्हा पंतप्रधान होतील असेही कोणी सांगितले नव्हते. पण लोक विसरून जातात. वर्तवलेले भविष्य खोटे ठरले म्हणून कोणी ज्योतिषाला शिक्षा करत नाही. दुसर्‍या घटनेने, घडलेल्या निकालाने सगळे वर्तवलेले भविष्य विसरून जातात. ही मानसिकता वर्षानुवर्ष ज्योतिषांना धंदा करण्यास प्रोत्साहन देते. 1991 मध्ये असेच ज्योतिषांचे पेव फुटले होते. तेंव्हा असाच एका ज्योतिषाने भलामोठा दावा केला होता. राजीव गांधी देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार असा छातीठोकपणे दावा केला होता. पण राजीव गांधींची त्या निवडणुकीत प्रचारादरम्यान हत्या करण्यात आली. एकाही ज्योतिषाने त्यावेळी राजीव गांधींना धोका आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे असे भविष्यकथन केले नव्हते. एकाने तर राजीव गांधी मोठ्या फरकाने विजयी होतील आणि पुन्हा पंतप्रधान होतील असे वर्तवले होते. त्या ज्योतिषाला विचारले की हे कसे काय खोटे ठरले? राजीव गांधींच्या मृत्यूचे किंवा त्यांच्यावर फार मोठे संकट येणार आहे असे का सांगता आले नाही? त्यावर त्या ज्योतिषाने सारवासारव केली होती की म्हणे, तेंव्हा राजीव गांधींच्या कुंडलीत मृत्यूयोग नव्हताच. पण सोनिया गांधींच्या कुंडलीत वैधव्य योग होता. त्यामुळे राजीव गांधींचा मृत्यू झाला. इतका बोगस ज्योतिषी आजही राजकीय भवितव्ये करताना आपल्याला दिसतो आहे. त्यामुळे एकुणच या शास्त्रावरचा विश्वास उडत चाललेला आहे. ज्योतिषशास्त्र हे भविष्यकथनाचे शास्त्र आहे, भूतकाळातील घटना सांगण्याचे शास्त्र नाही.झी मराठीवरच्या अतुलशास्त्री भगरे यांच्या सोमवारच्या कथनावरून अनेक प्रश्न निर्माण झाले. पण एका फार मोठ्या ज्योतिषाने एक चांगली संधी गेल्यावर्षी घालवली. ती संधी जर साधली असती तर आज चॅनेलचेही भविष्य फार चांगले झाले असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: